Sunday, November 11, 2018

धडधाकटांचे अपंगत्व

naidu rahul के लिए इमेज परिणाम

राजकारणात अनेकदा आपला तोटा करून घेताना शत्रूला मोठा करणारे धुर्त जगाने बघितले आहेत. किंबहूना धुर्तपणाच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी शत्रूच्या शत्रूला मित्र बनवताना, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचा मुर्खपणा अनेकदा केलेला आहे. अशाच मुर्खांमुळे जगाच्या इतिहासाला विचीत्र वळणेही मिळालेली आहेत. चंद्राबाबू नायडूंची नोंद अशा इतिहासात अगत्याने केली जाईल. कारण आज त्यांनी कॉग्रेस पक्षाची कास धरताना आपल्याच पायावर धोडा पाडून घेतला आहे. ज्या पक्षाचा जन्मच मुळात तेलगू अस्मिता जपण्यासाठी कॉग्रेसच्या विरोधात झालेला होता, त्याच कॉग्रेसला नवे जीवदान देण्यासाठी नायडू आपल्या पक्षाचा बळी द्यायला निघाले आहेत. पाच वर्षापुर्वी याच नायडूंनी आंध्राच्या विभाजनाला विरोध करताना कॉग्रेसला तेलगू भाषिकांचा शत्रू ठरवून भाजपाशी युती केलेली होती. पण या वर्षाच्या पुर्वार्धात त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि उर्वरीत आंध्राला मोदी सरकारने विशेष राज्याचा दर्जा दिला नाही म्हणून शत्रू ठरवले. आता आपल्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे जाणवताच कॉग्रेसशी हातमिळवणी केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी तेलंगणाच्या निवडणूकीत चंद्रशेखर राव यांच्या स्थानिक पक्षाला पराभूत करण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि नवी युती तेलंगणासाठी केलेली आहे. त्यात कॉग्रेस व कम्युनिस्ट पक्षाला सहभागी करून घेतलेले आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले यात शंकाच नाही. वेगळ्या तेलंगणासाठी उपोषण करून मागणी पदरात पाडून घेतलेल्या राव यांनी नंतर तिथल्या निवडणूकाही जिंकल्या आणि मनमानीही भरपूर केली. मात्र पाच वर्षांनी आपला करिष्मा टिकून नसल्याची शंका आल्याने त्यांनी मुदत संपण्यापुर्वीच विधानसभा बरखास्त केली व मध्यावधी निवडणूका घेतल्या आहेत. त्यात आपल्या स्वार्थासाठी नायडूंनी अशी खेळी केली आहे. पण त्यांना काय लाभ होणार आहे?

आंध्राचे विभाजन करताना सोनियांनी हे एक मोठे राज्य कॉग्रेसच्या हातून गमावले होते. वास्तविक आंध्राने २००४ सालात कॉग्रेसला दिल्लीची सत्ता पुन्हा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला होता. त्यातही राजशेखर रेड्डी यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी एकत्रित आंध्रप्रदेशात सर्वाधिक जागा कॉग्रेसला मिळवून दिल्या व त्यावेळी राव यांच्या विभाजनवादी तेलगंणा समितीलाही सोबत घेतलेले होते. पण त्यांना दिलेला शब्द सोनियांनी पाळला नाही आणि २००९ च्या निवडणूकात राजशेखर रेड्डींनी तेलंगणा समितीलाही हरवून एकत्रित आंध्राची सत्ता पुन्हा कॉग्रेसला मिळवून दिलेली होती. मात्र अल्पावधीतच त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांच्या पुत्रानेच पुन्हा सत्तेवर दावा केला, तो सोनियांनी जुमानला नाही. तिथून कॉग्रेसचा आंध्रातला र्‍हास सुरू झाला होता. रेड्डीपुत्राची नाराजी ओढवून घेत सोनियांनी त्याच्या मागे आयकर खात्याचा ससेमिरा लावला आणि तरीही त्याने काढलेला वेगळा पक्षच जिंकताना दिसल्यावर आंध्राचे विभाजन करून तिथली कॉग्रेस जमिनदोस्त करून टाकली. कॉग्रेसने हे विभाजन केले आणि आंध्रात कॉग्रेस संपलीच. पण वेगळा केलेल्या तेलंगणातही कॉग्रेसला स्थान उरले नाही. ती मागणी घेऊन दिर्घकाळ लढलेल्या तेलंगणा समितीला लोकांनी भरभरून मते दिली आणि दोन्ही जागी कॉग्रेस नामशेष होऊन गेली. चंद्राबाबू विभाजनाचे विरोधक होते. त्यामुळे उर्वरीत आंध्रात त्यांना विजय सोपा झाला होता. पण पुरेसा आत्मविश्वास नव्हता. म्हणूनच त्यांनी अखेरच्या क्षणी भाजपाशी युती करून लोकसभा विधानसभेत चांगले यश मिळवले. अर्थात त्यांनी युती केली नसती, तर रेड्डीपुत्राने आंध्राची सत्ता मिळवली असती. कारण दोघांना तुल्यबळ मते मिळाली आणि केवळ भाजपा सोबत असल्यामुळेच नायडूंचा तेलगू देसम पक्ष काठावरचे बहूमत घेऊन सत्तेवर आलेला होता. आता त्याचीही शाश्वती राहिलेली नाही.

चार महिन्यांपुर्वी उर्वरीत आंध्राला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून रेड्डीपुत्र जगनमोहन याने आपल्या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांना सामुहिक राजिनामे द्यायला भाग पाडले आणि चंद्राबाबूंची कोंडी झाली. त्यांनाही त्याच मागणीसाठी एनडीएतून बाहेर पडावे लागले. पण ते केल्यावर त्यांना भाजपामुळे मिळणारी मते वाया गेलेली आहेत आणि स्वबळावर आंध्रात लढण्याची वेळ आलेली आहे. पाच वर्षापुर्वी त्यांची होती तितकी लोकप्रियता शिल्लक राहिलेली नाही आणि उद्या तेलंगणानंतर आंध्रातही त्यांना कॉग्रेसची तुटपुंजी मते सोबत घेतल्याखेरीज जिंकण्याची शाश्वती उरलेली नाही. पण तसे करताना त्यांना आपल्याच काही मतांवर पाणी सोडावे लागणार आहे आणि कॉग्रेसची मते त्यांना मिळतीलच, अशी कुठलीही हमी नाही. कारण त्यांचा पक्षच मुळात कॉग्रेसमुक्त आंध्रासाठी जन्माला आलेला होता. आता त्याच कॉग्रेसशी हातमिळवणी केल्यावर काय होईल? असलेली हक्काची मते दुखावली गेली आहेत आणि कॉग्रेसची बहुतांश मते आधीच रेड्डीपुत्र खाऊन बसलेला आहे. त्यामुळे तिथून काही हाती येण्याची बिलकुल शक्यता नाही. तेलगंणातील निकाल कसेही लागले, तरी त्यात नुकसान नायडूंच्याच पक्षाचे होणार आहे. तिथे राव यांना कॉग्रेस-नायडू आघाडीने पराभूत केले व सरकार बनवले; तर ती आघाडी आंध्रातही पुढे चालवावी लागेल आणि त्यात लाभ कॉग्रेसचा आहे. कारण तिला रेड्डीपुत्राला आव्हान उभे करणे शक्य होईल आणि त्यासाठी तेलगू देसमची काही मते मिळून जातील. त्यातून कॉग्रेसला त्याही राज्यात नवे जीवदान मिळू शकेल. मात्र चंद्राबाबू कायमचे परावलंबी होऊन जाणार आहेत. त्यासाठीच मग आता त्यांनी राज्यात सत्ता जाणार असेल, तर देशाच्या राजकारणात टिकून रहाण्याची धडपड चालविली आहे, द्रमुक व देवेगौडांना हाताशी धरून ते आपले राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करू बघत आहेत.

मागल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीत जाऊन पवार अब्दुल्ला राहुल अशा नेत्यांना शाली घातल्या होत्या. या आठवड्यात दक्षिणेतील द्रमुक व देवेगौडांना हाताशी धरून वेगळी प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी उभारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तेव्हा त्यांना बावीस वर्षापुर्वीचा घटनाक्रम आठवला आहे. वाजपेयींचे तेरा दिवसांचे सरकार बहूमत दाखवू शकले नाही, तेव्हा खिचडी सरकार स्थापन झाले होते, देवेगौडा पंतप्रधान झाले आणि त्यांना पुढे करणारे किंगमेकर चंद्राबाबूंच होते. मात्र ती सरकारे फ़ार टिकू शकली नाहीत आणि कोसळल्यावर मध्यावधी निवडणूका झाल्या, तेव्हा हेच किंगमेकर भाजपाच्या वळचणीला येऊन बसलेले होते. त्यांनीच तात्कालीन फ़ेडरल फ़्रन्टला लाथ मारून वाजपेयी सरकारला पाठींबा दिलेला होता. त्यामुळेच त्यांना आता किंगमेकर होण्याचे डोहाळे लागलेले असतील, तर त्यासाठी लोकसभेत व आपल्या राज्यात निदान आपली हुकूमत असावी लागते, हे विसरून चालणार नाही. तेव्हा देवेगौडा व नायडू आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि लोकसभेत त्यांच्या पक्षाचे निदान राज्यातून निवडून आलेले बहूसंख्य खासदार होते. आज दोघांतही आपापल्या राज्यातही बहूसंख्य खासदार निवडून आणण्याची क्षमता नसल्याने आघाडीच्या मागे पळावे लागते आहे. तेव्हा त्यांच्या तशा खिचडी सरकारला पाठींबा देण्यासाठी डाव्यांचे पन्नास तरी खासदार होते. आज त्यांचीही पुरती दुर्दशा झालेली आहे. म्हणजे लुळेपांगळे एकत्र येऊन स्वत:ला पहिलवान म्हणून घोषित करू बघत आहेत. खरे असे दुबळे विकलांगही मोठी हिंमत करून आपल्या अपंगत्वावर मात करायला कायम प्रयत्न करीत असतात. उलट नायडू देवेगौडा वा अन्य विरोधक आहेत, ते धडधाकट असूनही मानसिक दुबळेपणाने ग्रासलेले आहेत. मेहनतीने शक्य असलेली कामेही त्यांना लबाडीने धुर्तपणे करून विजय मिळवायचा आहे. पण तो जुगार असतो आणि त्याची मोठी किंमत नंतरच्या काळात मोजावी लागते. डाव्यांपासून कॉगेसपर्यंत अनेकांना ती मोजावी लागली आहे. पण अक्कल येतेय कुठे?

3 comments:

  1. खुप छान विश्लेशण....

    ReplyDelete
  2. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी थेट जनतेत जाऊन आणि लोकांच्या समस्यांवर काम करण्याचा मार्ग लांबचा आणि अधिक कष्टाचा आहे । त्याऐवजी तडजोडी करीत शॉर्टकट्सच्या आधाराने सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग विरोधकांनी निवडलेला आहे । त्याचा फारसा उपयोग होणार नाही । फक्त बोलघेवड्या आणि वेडगळ विधाने करणाऱ्या आणि नामांतरासारख्या मूर्खपणाच्या मागण्या भंपक नेत्यांपासून आणि कार्यकर्त्यांपासून मोदींची मुक्तता होणे गरजेचे आहे ।

    ReplyDelete
  3. भाऊ
    वाय एस आर रेड्डी यांचे दुसरं नाव राजशेखर रेड्डी आहे का ?

    ReplyDelete