Monday, November 26, 2018

पुत्र व्हावा ऐसा गुंडा?



कॉग्रेस नेत्यांना काय झाले आहे, तेच समजत नाही. एका बाजूला गाळात रुतून पडलेले पक्षाचे गाडे बाहेर काढायचे आहे आणि त्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. दुसरीकडे एकमागून एक कॉग्रेसनेते मुक्ताफ़ळे उधळून पक्षाविषयी असलेली सहानुभुतीही मातीमोल करायचे कष्ट सतत उपसत असतात. कालपरवा उत्तरप्रदेशचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधानांच्या वृद्ध आईविषयी काही आक्षेपार्ह विधान केलेले होते. आता नागपूरला माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या दिवंगत पित्याचा उद्धार केला आहे. नरेंद्र मोदींना मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी कोण ओळखत होते? त्यांच्या पित्याचेही नाव लोकांना ठाऊक नाही. जणू पित्याचे नाव ख्यातनाम असणे ही भारतीय राजकारणातील एक मोठी पात्रता असावी. अन्यथा मुत्तेमवार यांची असली भाषा कशाला वापरली असती? एकूण काय, तर नरेंद्र मोदी यांना क्षुल्लक टाकावू ठरवण्य़ाची स्पर्धाच लागलेली असावी. असायलाही हरकत नाही. राजकारणात एकमेकांची निंदानालस्ती होतच असते. त्यासाठी वेगवेगळे मुद्दे वा तपशील शोधून काढले जातात. घरकुटुंब पुर्वायुष्यातले प्रसंगही हुडकून काढले जातात. त्यामुळे जर काही कॉग्रेस नेत्यांनी मोदींचा बाप काढला, तर बिघडत नाही. त्यांच्या पुर्वाध्यक्षांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणून झालेले आहे. विद्यमान अध्यक्षांनी चोर शोरच्याही घोषणा देऊन झाल्या आहेत. त्यामुळे मुत्तेमवार यांनी मोदींचा बाप काढला, तर अश्रू ढाळण्याचे काही कारण नाही. पण मोदींच्या जन्मदात्या पित्याला कोणीही ओळखत नव्हता, हे राहुल गांधींचे कर्तृत्व कसे होऊ शकते? विलासराव त्याचा खुलासा करू शकलेले नाहीत. पण मग त्यांच्या त्याच मोजपट्टीला निकष मानायचे का? तुकोबा म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, नाहीतर माळावरचा धोंडा. यातला गुंडा कोण आणि धोंडा कोण, त्याचाही खुलासा व्हायला नको का?

राहुल गांधी वा त्यांच्या गोतावळ्यातले लंडन अमेरिकेत शिकलेले महान बुद्धीमंतर सहकारी सोडून द्या. विलासराव मुत्तेमवार निदान महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांना हे तुकोबाचे बोल ठाऊक असायला हवेत ना? मग मोदींच्या पित्याचे कर्तृत्व किंवा ओळख शोधण्यापुर्वी त्यांनी राहुल गांधींच्या पात्रतेची झाडाझडती आधी घेतली असती. पंतप्रधान झाल्यामुळेच लोक मोदींना ओळखू लागले अन्यथा त्यांना कोणी ओळखतही नव्हते, असा विलासरावांचा दावा आहे. यात तथ्य आहे नक्कीच. कारण त्यांनाही नरेंद्र मोदी कसे ठाऊक असतील? त्यांना गुजरातचा मौत का सौदागर नक्कीच माहिती असणार. कारण सलमान खुर्शिद यांच्या आईनेच त्यांच्याकडून असे घडे गिरवून घेतलेले आहेत ना? आता तुम्ही विचाराल सलमान खुर्शीद कोण आणि त्यांची आई कोण? तर मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी देशात गांधी हायस्कुलचे राज्य होते आणि त्यातल्या हुशार विद्यार्थ्याला हेडमास्तर मॅडमनी देशाचा पंतप्रधान म्हणून मॉनीटर सारखे नेमलेले होते. त्या मॉनिटरच्या हाताखाली सलमान खुर्शीद मंत्री म्हणून काम करत होते. त्या काळात त्यांनी आपल्या हेडमास्तर मॅडमच देशाची माता असल्याचे महान विधान केले होते. सोनियाजी आमच्या माता आहेत आणि पर्यायाने त्याच देशाच्याही राष्ट्रमाता असल्याचा शोध खुर्शीद यांनी लावला होता. त्या राष्ट्रमाता सोनिया गांधी, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला मौत का सौदागर म्हणून संबोधत होत्या आणि त्याच शाळेच्या अंगणवाडीत विलास मुत्तेमवार शिकत होते ना? त्यांना नरेंद्र मोदी कसा ठाऊक असेल? त्याला मौत का सौदागर नक्की ठाऊक असणार. तेव्हा त्यांची गल्लत नावाने केलेली आहे. सोनियांना ठाऊक असलेले मोदी विलासरावांनाही ठाऊक असतातच. फ़रक नावापुरता असतो. मुत्तेमवारही मोदींना खुप आधीपासून ओळखता. पण मौत का सौदागर म्हणून. मॅडमनी तेच नाव शिकवले आहे ना?

बरं विलासराव मुत्तेमवार बाकीचे सोडून द्या. मोदींचे काय व्हायचे ते होईलच. त्यांच्यासारख्या सामान्य लोकांना आपापल्या कर्माची फ़ळे भोगावीच लागतात. त्यामुळे आगामी निवडणूकीत त्यांचा बाप कोण होता म्हणून मते मिळणार नाहीत हे मान्य. पण तुमचे काय? तुम्हाला पुन्हा लोकसभा वगैरे लढवायची आहे की नाही? खरेच लढवायची असेल तर पक्षातर्फ़े उमेदवारी मिळवायला हवी ना? तेव्हा कशाच्या बळावर उमेदवारी मिळू शकणार आहे? यापुर्वी कशामुळे उमेदवारी मिळाली? सोनियांना व त्यांचे जे कोणी पुर्वज होते, त्यांचा पिताश्री मुत्तेमवार यांच्याशी परिचय वगैरे काही होता का? असला तरी आता त्याचा उपयोग उरलेला नाही. सोनिया बाजूला झाल्यात आणि राहुल पक्षाचे नवे अध्यक्ष आहेत. उमेदवारीचे वाटप त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे राहुलजी आपल्या पिताश्री मुत्तेमवारांना कितीसे ओळखतात, याची आताच खातरजमा करून घ्या. नाहीतर ऐनवेळी राहुलजी तुमच्या पिताजी वा पितामहांना ओळखत नसल्याचे सांगून तिकीट काटू शकतील. म्हणूनच तातडीने वंशवृक्षाची छाया निर्माण करण्याच्या मागे लागा. अर्थात तितक्यावर थांबण्याचे कारण नाही. इथे वरती एक फ़ोटो टाकलाय. त्यात आदर्श उदाहरण दिलेले आहे. कॉग्रेस पक्षात कुठलेही अधिकारपद मिळवण्यासाठी कोणता सराव किंवा तपस्या करावी लागते, त्याचेही प्रात्यक्षिक आहे., त्या चित्रात तुम्हाला एक बालक दिसेल. सहासात वर्षाच्या बालकाला नम्रतेने अभिवादन व नमस्कार करणारे ऐंशी वर्षापार गेलेले आजोबा दिसतील. त्यांचेही पिताश्री कोण जगाला माहिती नाहीत. पण तरीही उतारवयात आजोबा देशाचे थेट पंतप्रधान होऊन गेले. कारण त्यांना पिताश्रींची ओळख नसली तरी त्या बालकाच्या सगळ्या वंशवृक्षाची बारीकसारीक माहिती होती नि आहे. त्या बालकाची प्रार्थना आतापासून सुरू केलीत तर मुत्तेमवार पुढल्या दोन पिढ्या तुमच्या खानदानाला कॉग्रेस तिकीटाची बेगमी होऊन जाईल. ओळखलात त्या बालकाला?

देशातल्या करोडो लोकांना त्या बालकाची ओळख नाही. सोबत बसलेले आईवडील बघून मात्र अनेकांच्या लक्षात येईल की सहाव्या पिढीतला तो कॉग्रेसच भावी अध्यक्ष आहे, कारण राहुल गांधींनी वारस निर्माण केलेला नाही. त्यांनी ते काम आपल्या भगिनीवर सोपवले आणि त्यातूनच ह्या बालकाचा जन्म झालेला आहे. त्यामुळे राहुल थकतील तेव्हा कॉग्रेसचा अध्यक्ष कोण, हा प्रश्न एव्हाना सुटलेला आहे. बाकी देशाचे प्रश्न नवे नाहीत आणि प्राथमिकतेचे नाहीत. कॉग्रेसचा अध्यक्ष कोण होणार आणि त्याचा पिता पितामह वगैरे कोण, हे देशासमोरचे गहन प्रश्न असतात. रॉबर्ट वाड्रा नावाच्या एका उद्योगपतीने तो प्रश्न वेळीच सोडवून ठेवला असल्याने मुत्तेमवार सारख्यांना आता चिंता उरलेली नाही. मात्र जुनी वंशावळ सांगताना त्यात या बालकाकडे काणाडोळा करू नका. आज नसेल पण दहापंधरा वर्षांनी त्याची किंमत कळू शकेल. म्हणून आजच गुंतवणूक करा आणि या बालकाची ओळख करून घ्या. मोदी किंवा त्यांची सत्ता म्हणजे, काय आळवावरचे पाणी. आज आहे उद्या नसेल. नेहरू गांधी खानदान हे सनातन जनेयुधारी सत्य आहे. त्यात मध्येच कोणी रॉबर्ट आला वा फ़िरोज आला, म्हणून जानवे विटणार नसते. विटाळ वगैरे गोष्टी मोदी शहा इत्यादी सामान्य क्षुल्लक लोकांसाठी लागू होतात. त्यांची फ़िकीर कशाला करायची? राहुल मुंबईत आले, तेव्हा अशोक चव्हाण मंत्रालयातली खुर्ची सोडून रमाबाई आंबेडकरनगरात त्यांच्या प्रतिक्षेत काही तास ताटकळत बसले होते ना? आणखी कोणी मंत्री बुद्धविहारातून बाहेर पडलेले राहुलजी अनवाणी चालताना त्यांच्या मागून पादुका घेऊन धावले नव्हते का? बघा आज कुठे आहेत. तेव्हा विलासजी तातडीने या बालकाच्या भक्तीला लागा. कारण तुमच्या पुर्वजांना कोणी फ़ारसे ओळखत नाही. दामोदरदासाच्या पुत्राने तिन्ही खंडात झेंडा फ़डकवला म्हणून, काही तो मोठा होत नाही. तुम्ही माळावरच्या धोंड्याला शेंदूर फ़ासून मारुती केलाय, त्याच्या महाआरत्या जोरात चालू ठेवा बुवा. आणि तेवढी त्या बाळाची ओळख करून घ्या झटपट.

14 comments:

  1. असे मस्त टोले तुम्हीच देउ शकता भाउ, भारी सटायर

    ReplyDelete
  2. जोर का झटका

    ReplyDelete
  3. 2019 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मागील प्रमाणेच नरेंद्र मोदींना असभ्य शब्द वाक्य वापरून नामोहरम करण्याचा मूर्खपणा काँग्रेस करत असेल तर ते मागील पराभवातून काहीही शकलेले नाहीत असे नक्की होते

    ReplyDelete
  4. अहो भाऊ किती अब्रू काढाल त्याची ?? मुळात त्यांना लाज अब्रू इज्जत कशाशी खातात ह्याचाच पत्ता नाही , ते उद्या तुमचा लेख "बघा आमच्या वर किती मोठा लेख लिहून आलाय: असं म्हणून लोकांना फुशारकीने दाखवायला पण कमी नाही करणार .

    ReplyDelete
  5. भाऊ, तुम्ही मारल्याचा आवाज आला नाही पण नंतर बघितले तर गालफडे लाल झाल्याची दिसली.काय हे !

    ReplyDelete
  6. शालजोडीतून इतका मार सहन होणार नाही भाऊ त्यांना.
    शेवटी ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात.
    ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी...

    🤣🤣🤣🤣🤣🤣

    ReplyDelete
  7. मोदींना 2019 ला सुद्धा आशा बालबुद्धीने हरवायला काँग्रेस पाहत असेल तर देव सुद्धा हसू लागेल की बाबारे किमान काँग्रेस ह्या शब्दाची तरी लाज ठेवा��

    ReplyDelete
  8. हा'वार'भारीच आवडला भाऊ.

    ReplyDelete
  9. काय सणसणीत हाणलंय भाऊ !!

    ReplyDelete
  10. भाऊ, अप्रतिम ! मनमोहन आता कोणाचे मन मोहण्यात गुंतले हे पाहुन माझ्या मनाला लाज वाटतेय. पण त्या एकेकाळच्या पंतप्रधान व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा निर्लज्जपणा उतु जातोय. कशासाठी ? अजुन कोणत्या पदाची अपेक्षा आहे ह्या निर्लज्जाला ?

    ReplyDelete
    Replies
    1. हे छायाचित्र मनमोहन पंतप्रधान असतानाचे आहे
      पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली

      Delete
  11. किती फटके मारता भाऊ? ...बिचारे मुत्तेमवार

    ReplyDelete