Friday, August 16, 2019

३७० मागचा ‘व्यापक कट’

वर्षभरापुर्वी सतराव्या लोकसभेच्या निवडणूकांचे वेध लागले, तेव्हा मराठीतील ज्येष्ठ संपादक पत्रकार कुमार केतकर यांनी एक खळबळजनक विधान केले. त्यावरून खुपच कल्लोळ माजला होता. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणे, हा एक व्यापक जागतिक कटाचा भाग असल्याचे ते विधान होते. मग ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी बांगला देशचे संस्थापक शेख मुजीबूर यांच्या हत्याकांडापासूनचे अनेक संदर्भ जोडून वडाची साल पिंपळाला लावण्याचाही उद्योग केला होता. पण मुद्दा अगदीच चुकीचा नव्हता. मोदींचे भारतीय राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावर उगवणे हा एक योगायोग असला, तरी त्यानंतरच्या कालखंडातील घटना व्यापक जागतिक काटकारस्थानाला काटशह देणार्‍या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला ३७० कलमावरील राजकारण तपासणे भाग आहे. जितक्या सहजपणे हा वादग्रस्त विषय सतराव्या लोकसभेमध्ये मोदी व शहा यांनी निकालात काढला, त्यामागे पक्की व्यापक योजना होती. त्यातले धागेदोरे कुठे कुठे जाऊन पोहोचलेत, त्याचा शोध घेतल्यास धक्कादायक गोष्टी पुढे येऊ शकतात. किंबहूना ते धागेदोरे शोधत गेल्यास मुळच्या व्यापक कारस्थानाचे कटकर्तेच कसे चुकीच्या संगतीत जाऊन तोंडघशी पडले, त्याचाही उलगडा होऊ शकतो. आज अनेकांना वेदप्रकाश वैदिक हे नाव ऐकल्यासारखेही वाटणार नाही. पण २०१४ सालात मोदी प्रथमच पंतप्रधान होऊन दोन महिने उलटलेले नव्हते, तेव्हा हे नाव खुप गाजत होते. सगळ्या वाहिन्या व वर्तमानपत्रे त्याच माणसाच्या चमत्कारीक वागण्याचा उहापोह करण्यात बुडून गेलेले होते. काही आठवते? पाकमध्ये जाऊन तोयबाचा म्होरक्या हफ़ीज सईदला हे वेदिक भेटून आलेले होते आणि हाफ़ीजला मोदींच्या भेटीला येण्याचे आमंत्रण त्यांनी दिल्याने खुप वादळ उठलेले होते. काय होता तो सगळा प्रकार? कोणी या गृहस्थाला पाकिस्तानात धाडलेले होते?

सर्वप्रथम पाकिस्तानातूनच त्या भेटीचा गवगवा झाला आणि मग इथे हलकल्लोळ सुरू झाला. आधी सरकारच्या वतीने त्यात तथ्य नसल्याची घोषणा करण्यात आली आणि नंतर वेदिक यांनी सारवासारव सुरू केली होती. हे वेदिक मोदी वा भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानात गेलेले नव्हते, की त्यांनी कुठली बोलणी केलेली नव्हती. तर पाकच्या गुप्तचर खात्याच्या आश्रयाने चालविल्या जाणार्‍या एका संस्थेने योजलेल्या चर्चा समारंभात सहभागी व्हायला ते गेले होते. मोदी विरोधासाठी ख्यातनाम असलेल्या गोतावळ्यातून तिकडे गेलेले होते. मणिशंकर अय्यर हे त्या संस्थेचे एक संचालक आणि बाकी बहुतांश पाक गुप्तचर संस्थेचे निवृत्त अधिकारी समाविष्ट असलेल्या त्या कार्यक्रमासाठी बरखा दत्त, सुधींद्र कुलकर्णी, दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वर्धराजन यांच्या समवेत वेदिक तिथे गेलेले होते. तसे ते त्या गोतावळ्यातले अजिबात नव्हते. ऐनवेळी त्यांना त्यात समविष्ट करून घेण्यात आल्याने ते तिकडे गेलेले होते. बाकीच्या पुरोगामी गोतावळ्याला टांग मारून त्यांनी परस्पर हाफ़ीज सईद याच्या घरापर्यंत मजल मारली. खुद्द पाकिस्तानात अनेक नामवंत पत्रकारांना त्याचा धक्का बसला होता. कारण मुलाखतीसाठीही हाफ़ीज त्यांना भेटणे दुरापास्त असताना, या भारतीय बुद्धीवंताला हाफ़ीज कसा भेटू शकला? हाफ़ीजच्या घरात पोहोचणे सोपे नाही आणि तिथे पाकसेना व गुप्तचरांचा कडेकोट बंदोबस्त असतो. तरही वेदिक तिथे जाऊन धडकले व त्यांचा हाफ़ीजशी संवाद झाला. फ़ोटोही काढले गेले. या गॄहस्थांनी भारतात येण्याचे मोदींच्या वतीने हाफ़ीजला आमंत्रणही दिलेले होते. त्यामुळे प्रकरण खुप गाजले. त्याविषयीचा खुलासा करताना वेदिक यांनी आपण अप्रत्यक्ष मुत्सद्देगिरीच्या मोहिमेवर असल्याचा दावा केला होता आणि ज्यांच्यासोबत पाकचा दौरा त्यांनी केला, त्या शहाण्यांची बोबडी वळली होती. त्यांनाही वेदिक हाफ़ीजपर्यंत कसे पोहोचले, त्याचा खुलासा देत येत नव्हता.

यातली खोच लक्षात घेतली पाहिजे. जी इतर नावे वर आलेली आहेत, त्यांचे पाकप्रेम कधी लपलेले नाही. पकिस्तानशी लढाई नको, संवाद करा आणि काश्मिरात शांती असावी म्हणून सतत बोलणारा हा गोतावळा; कधीही तिथल्या जिहादी दहशतवादावर चकार शब्द बोलणार नाही. अशा गोतावळ्याचा वेदिक यांच्याशी कधीच खास संबंध नव्हता. मग त्यांना सोबत घेऊन जाण्याची काय गरज होती? वेदिक त्यांच्या टोळीत कुठून घुसले? तर त्या गोतावळ्यातून माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांनाच पाकिस्तानला न्यायचे घाटत होते. पण त्यावेळी सिन्हा नेमके कुठल्याशा वादात पडून अटक झालेले होते आणि जामिन घ्यायचे नाकारून अडकले होते. भारतातल्या सत्तांतरामुळे सत्तेतला वा सत्तेजवळचा कोणीही या टोळीत नव्हता. पण पाक गुप्तचर खात्याच्या मेजवान्या झोडण्यासाठी तशा कुणाला तरी सोबत घेण्याची गरज होती. भाजपाशी जवळीक असलेले सुधींद्र कुलकर्णी यांची तिथली पत संपलेली होती आणि यशवंत सिन्हा उपलब्ध नव्हते. सहाजिकच मोदी नजिकचा माणूस म्हणून वेदिक यांची निवड झाली. अखेरच्या क्षणी त्यांना अय्यर यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले आणि तिथेच पाकिस्तानचे राजदूतही उपस्थित होते. त्याच दिवशी झटपट वेदिक यांचा व्हिसाही सज्ज झाला. वेदिक यांचा तसा मोदींशी संबंध नव्हता. पण रामदेव बाबांशी जवळिक असल्याने, त्यांनाच मोदी व पर्यायाने भाजपाचे खास निकटवर्तिय म्हणून गोतावळ्यात सहभागी करून घेण्यात आलेले होते. की जाणिवपुर्वक भारताच्या गुप्तचर खात्याने वेदिक यांना पाकप्रेमी गोतावळ्यात घुसवले होते? ह्या गोतावळ्याचे पाकिस्तानातील धागेदोरे शोधून काढण्याचा यापेक्षा सोपा व उत्तम मार्ग अन्य कुठला असू शकतो? थोडक्यात वेदिक यांना पाकप्रेमी गोतावळ्यामध्ये सहभागी करून घेणार्‍य़ांचा एक उद्देश होता आणि वेदिकना तिथे धाडणार्‍यांचा उद्देश भलताच होता. याला कटकारस्थान म्हणता येते ना?

कारस्थानी कारवाया करणार्‍यांच्या नकळत त्यांच्या गोतावळ्यात आपला माणूस सराईतपणे घुसवणे, हे कारस्थान नसते? म्हणूनच वेदिक यांना आयएसआयचा हस्तक असलेल्या हाफ़ीजपर्यंत पोहोचणे शक्य झाले. किंबहूना तो मोदींचा निकटवर्ति म्हणून त्यालाच फ़ोडण्यासाठी पाकने हे कारस्थान केलेले असणार यात शंका नाही. परंतु त्यात गोतावळ्याला बेसावधपणे सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे एका बाजूला गोतावळ्याचे पाकिस्तानातले धागेदोरे व हितसंबंध उलगडू शकले आणि पाकच्याही गुप्तचरांच्या साखळीचा उलगडा होऊ शकला. बरखा, पाडगावकर वा यांच्यासोबत आलेल्या वेदिक यांच्यावर आयएस्आयने शंका घेण्याचे काहीही कारण नव्हते. म्हणून त्यांनी वेदिकना थेट हाफ़ीजपर्यंत जाण्याचा मार्ग खुला करून दिला. ३७० वा काश्मिरविषयक धोरणाचा तो आरंभ होता. कारण जेव्हा वेदिकना अय्यर यांच्या घरातून पाकचा व्हिसा मिळाला व तिथे जे पाक राजदूत उपस्थित होते, त्यांचे नाव अब्दुल्ला बासित. ते एक बाजूला अय्यर सुधींद्र यांच्याशी संवाद करीत होते आणि दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांशीही कुजबुज करीत होते. वेदिक हाफ़ीजला भेटायला गेले. त्याच दरम्यान बासित यांचा दिल्लीत भाजपाचे सरचिटणिस राम माधव यांच्याशीही संवाद झालेला होता. तेव्हा माधव यांनी बासित यांना काय समजावले होते? हल्लीच त्यांनी खुलासा केलेला आहे. ते म्हणतात माधव यांनी तेव्हाच आपल्याला हुर्रीयत व बाकीच्या पाकप्रेमी उपटसुंभांचा नाद सोडून देण्याचा इशारा दिलेला होता. हुर्रीयत वा अब्दुल्ला-मुफ़्ती अशा फ़ुटीरवादी पाक हस्तकांना मोदी सरकार संपवून टाकणार आहे आणि पाकला त्यांचा काडीमात्र उपयोग उरणार नाही. अशा भुरट्यांना हाताशी धरून उभारलेले काश्मिरविषयक धोरण यापुढे पाकिस्तानच्या कामाचे नाही. असेच माधव यांनी बजावले होते आणि ते खरे ठरले असे आता बासित म्हणतात.

वेदिक प्रकरण आणि तेव्हाच बासित यांच्याशी राम माधव यांचा झालेला संवाद, हा योगायोग नक्कीच नाही. कारण त्यानंतरही हुर्रीयतचा तमाशा चालू होता व मुफ़्ती यांच्या सोबत भाजपाने काश्मिरात सरकारच स्थापन केलेले होते. त्याचे सुत्रधारही राम माधव होते्. ज्यांनी हुर्रीयतला संपवणार असे आश्वासनच बासित यांना दिलेले होते. थोडक्यात मणिशंकर अय्यर आणि मुठभर दिल्लीच्या पत्रकारांचा गोतावळा पाकच्या काश्मिरी धोरणासाठी निरूपयोगी असल्याचा इशारा माधव यांनी आधीच दिला होता. फ़क्त तो वेळीच समजून घेण्याची सदबुद्धी बासित यांना झाली नाही, असे आज त्यांना वाटते आहे. मुद्दा इतकाच, की ज्यांच्यावर पाकिस्तानने काश्मिरविषयक धोरण राबवताना विश्वास टाकून इतका मोठा जुगार खेळला, तो पार दिवाळखोर ठरला आहे. किंबहूना तोच मुर्खपणा ठरलेला आहे. आपण भारतातल्या तथाकथित थोर पत्रकार विश्लेषकांच्या नादाला लागून मुर्खाच्या नंदनवनात बागडत राहिलो, असे बासित यांनी आता मान्य केले आहेच. पण आजचे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शहा महंमद कुरेशी तशी ग्वाहीच देत आहेत. यापुढे पाकिस्तानने मुर्खांच्या नंदनवनात राहू नये. आपल्या मदतीला कोणीही येणार नाही. राष्ट्रसंघात आपल्याला कोणी किंमत देत नाही आणि जगातला कुठलाही देश आपल्या पाठीशी उभा नाही. समोर मोदी व शहा हे कर्दनकाळ होऊन उभे आहेत, असेच कुरेशी यांना म्हणायचे आहे. कुरेशींना जे मुर्खांचे नंदनवन वाटते, ते इतरत्र कुठेही नसून; ल्युटीयन्स दिल्लीतल्या टोळभैरवांनी उभे केलेले ते मायाजाल आहे. त्याच मायाजालात गुरफ़टून पाकिस्तान भारतातल्या बदलत्या परिस्थितीविषयी पुर्ण गाफ़ील राहिला आणि तोंडघशी पडलेला आहे. कारण आता मुफ़्ती अब्दुल्ला कामाचे राहिलेले नाहीत किंवा ल्युटियन्स दिल्लीतल्या त्याच पत्रकारांना सत्ताधारी गोटात वा जनसामान्यात काडीची किंमत उरलेली नाही. त्यांची संगतच नको असेच कुरेशी सांगत आहेत.

कुरेशी यांची मुर्खाचे नंदनवन ही व्याख्या समजून घ्यावी लागेल. आजपर्यंत म्हणजे युपीएच्या कालखंडात याच गोतावळ्याकडून पाकिस्तानला महत्वाच्या भारतीय धोरणे व भूमिकांचे बारकावे भारतीयांच्या आधीच समजू शकत होते. तितकेच नाही, तर त्याच गोतावळ्यामार्फ़त भारतीय धोरणात हस्तक्षेपही करता येत होता. त्यात फ़ेरबदल घडवून आणायचेही डावपेच सहज खेळता येत होते. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या गोतावळ्याला सरकारचे दरवाजे बंद झाले. पंतप्रधान आपल्या सोबत दौर्‍यावर फ़ुकटात पत्रकारांचा ताफ़ा घेऊन जायचे, ती प्रथा बंद झाली. कुठल्याही सरकारी कार्यालयात मुठभर मक्तेदार पत्रकारांचा वरचष्मा असायचा, त्याला पुर्ण पायबंद घातला गेला आणि अशा गोतवळ्याची दुकानेच बंद होऊन गेली. भारत सरकारच्या गुपितांचा पुरवठा करण्याचा धंदा आटोपल्यावर यांचा उपयोग राहिला काय? पाकिस्तानने पोसलेल्या अशा लोकांना इथे मोक्याच्या जागी घुसण्याची क्षमता निर्णायक होती आणि मोदींनी तीच निकालात काढल्यावर त्यांना वेदप्रकाश वैदिक सारखे कोणी मोदींचे निकटवर्तिय शोभेला पुढे करावे लागले. पण बाकी काही उपयोग नव्हता. म्हणून तर सर्जिकल स्ट्राईक असो वा बालाकोटचा हवाई हल्ला असो, पाकला पुर्ण गाफ़ील ठेवून कारवाया यशस्वी झाल्या. पण त्यापेक्षाही पाकला बसलेला मोठा धक्का ३७० कलम रद्द होण्याचा आहे. असे काही धाडसी पाऊल मोदी-शहा वा भाजपाचे सरकार उचलू शकते, याचा साधा इशाराही हा पाकिस्तानी गोतावळा देऊ शकला नाही. मग त्यांना मुर्खाचे नंदनवन संबोधण्यापेक्षा कुरेशींना अन्य कुठला शब्द सुचणार आहे? कुरेशी इतकेच सांगत आहेत, की यापुढे भारतातल्या बित्तंबातमीसाठी ल्युटीयन्स दिल्लीतल्या मुर्खांवर विसंबून राहू नका. त्यांचे लिखाण, बातम्या, अफ़वा किंवा विश्लेषण, याच्यावर विश्वास ठेवण्याचे दिवस संपलेले आहेत. यापेक्षा कुरेशींनी काहीही वेगळे म्हटलेले नाही.

पाच वर्षात मोदींनी अतिशय थंड डोक्याने व संयमाने आपली कामे केलेली आहेत आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आधी त्यांच्या इथल्या छुप्या व उघड हस्तकांना निकामी करून टाकलेले आहे. अमित शहांनी ५ ऑगस्ट रोजी हे विधेयक राज्यसभेत आणण्यापर्यंत गोपनीयता कशाला पाळली? मुळात सतराव्या लोकसभा निवडणूकीनंतरच्या पहिल्याच संसदीय अधिवेशनात ठराविक तुंबलेली विधेयके संमत करून घेण्य़ाभोवतीच राजकीय चर्चा रंगतील, याची काळजी घेतली. मग अचानक अधिवेशनाची मुदत वाढवण्यात आली. मग क्रमाक्रमाने एक एक वादग्रस्त मानल्या जाणार्‍या विधेयकांना आधी राज्यसभेत आणून तिथे संमत करून घेण्यात आले. ही उलटी गंगा होती. जिथे भाजपाला हक्काचे बहूमत नाही, तिथे विधेयक आणायचे आणि नंतर लोकसभेतून पसार करून घ्यायचे, असा उलटा क्रम लावण्यात आला. पण तिथे पुरेसे यश मिळाल्यावर सर्वाधिक खळबळ माजवणार्‍या ३७० कलमाला हात घातला गेला्. तेही विधेयक मांडले जाईपर्यंत त्याचा मसूदाही पत्रकार सोडाच, संसदेच्या सदस्यांनाही आधी कळू दिलेला नव्हता. पाकिस्तानशी डाव खेळायचा तर इथल्या बुद्धीमंत पत्रकारांपासूनही किती सावध असावे लागते, त्याचे हे उदाहरण आहे. म्हणून तर तो मसुदा सादर होण्यापर्यंत ट्रम्पच्या आश्वासनावर इम्रानखान छाती फ़ुगवून चालत होते. कारण त्यांना भारतीय संसदेत काय होऊ घातले आहे, त्याचा थांगपत्ता शहांनी लागू दिला नाही. गोतावळ्यातला कोणी खबर देऊ शकला नाही आणि छाती फ़ुगवणारा पाकिस्तानी पंतप्रधान मुर्खांच्या नंदनवनात बागडत राहिला. बघताबघता काश्मिरचा मुद्दा पाकिस्तानच्या हातून निसटला. कारण ल्युटियन्स दिल्लीच्या गोतावळयावर विसंबून पाकिस्तान रणनिती बनवित होता आणि आता तिथे बागडण्याला अर्थ उरला नाही, असेच महंमद कुरेशींना सांगायचे आहे. केतकर म्हणतात, तो व्यापक कट हाच असेल का?

29 comments:

  1. खरय भाउ.हे सरकार अतिशय अपारदर्शक आहे अस बरेचसे लुटीयनवाले म्हणत असतात ते उगाच नाही.३ माणसांशिवाय इथे कुणालाच काही पत्ता नसतो.तसे करावे लागते कारण पाकने इथे पेरलेले एजंट ते कोणत्या रुपात असतील कोणालाच माहीत नसतय.

    ReplyDelete
  2. भाऊ तुम्ही महान आहात

    ReplyDelete
  3. Mind blowing analysis.Bhau you are really a sagacious journalist.

    ReplyDelete
  4. भाऊ, मानलं तुम्हाला! तुमची विचार करायची पद्धतच फार वेगळी आहे. अशी पत्रकारीता आज दुर्मीळ होत चाललीयं.

    ReplyDelete
  5. झकास विश्लेषण भाऊ..!!

    ReplyDelete
  6. सटीक विश्लेषण.👌👌

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्ही खरोखर ग्रेट आहात !!
    हुडकून हुडकून संदर्भ काढून त्यांच्या साखळ्या जोडून विश्लेषण करावे तर ते तुम्हीच. खरच खूप भारी!!

    ReplyDelete
  8. केतकर हेही खोटे पुरोगामी आहेत. पण 370 प्रकरण हे मात्र युद्धाच्या नियोजनासारखे आहे. आपण त्यावर, भविष्यकाळावर लिहीत रहावे ही विनंती

    ReplyDelete
  9. नाना पाटेकरचा "अपहरण" सिनेमातला डायलॉग आठवला... "दया...तुम्हारी लंगोटी पीछेसे निकालके ले गया वो कल का बच्चा...तुम्हे पता भी नही चला..."

    ReplyDelete
  10. भाऊ, गेल्या ५ वर्षात आपण लिहिलेला प्रत्येक लेख मी वाचला आहे. हा लेख त्यातील सर्वोत्कृष्ट विश्लेषणात्मक लेखांपैकी एक ठरावा! शीना बोरा, सुनंदा पुष्कर, काँग्रेसचे पतन, आप, मालेगाव स्फोट अशा अनेक विषयांवरचे लेख नवा दृष्टिकोन देणारे, प्रसंगी हादरवून टाकणारे होते. हा देखील त्यातलाच एक. अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
  11. Every word written by you, is perfect analysis. मानलं भाऊ तुम्हाला ,मोदीना आणि त्रिकुटाला.

    ReplyDelete
  12. भाऊ मागे एकदा एबीपीच्या पत्रकाराने मोदींना त्यांच्या २०१४-१९ च्या कार्यकाळाबद्ल विचारताना काही‌ गोष्टी करायच्या राहून गेल्या ज्याची तुम्हाला‌ खंत वाटते अस विचारलं असताना मी ल्युटियन्स पत्रकारांना आपलसं करू शकलो नाही असं‌ मोदी म्हणाले होते...आज मला त्यांच्या त्या प्रतिक्रियेचं महत्व कळालं.....समर्पक हेडलाईन व्यापक कट....धन्यवाद भाऊ

    ReplyDelete
  13. भाऊसाहेब तुमच्याप्रमाणेच मोदी शहाची जोडी खोलात जावुन विचारपुर्वक चपराक हाणणारी दिसते.

    ReplyDelete
  14. खूपच माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  15. यालाच " गनिमी कावा " म्हणतात ! पाकीस्तानला मोदी शहांनी कात्रजचा घाट दाखवला ! कात्रजचा घाट दाखवण्यात शरद पवार एक नंबर असे म्हणतात ! शरद पवार आपल्या अनुयायांना कात्रजचा घाट दाखवता दाखवता आपणच त्या घाटात अडकलेले आहेत. पण मोदी शहांनी सगळ्या जगाला " कात्रजचा घाट " दाखवला !
    जय हो ।

    ReplyDelete
  16. Bhauuu...you are Great Great Analyst !

    ReplyDelete
  17. भाऊ तुमचे लेख वाचण्यासाठी आम्ही इतके आतुर असतो की तुम्ही रोज किमान दोन ते तीन लेख टाकले पाहिजेत असे आम्हाला वाटते पटत असेल तर होकार द्या मित्रांनो

    ReplyDelete
  18. उत्तम विश्लेषण.

    ReplyDelete
  19. Anxiously Waiting for next Blog..

    ReplyDelete
  20. khup chan vishleshan

    ReplyDelete
  21. अप्रतिम विश्लेषण भाऊ!

    ReplyDelete
  22. सर ट्रम्प तात्यांनी पुन्हा आज मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तुमचं काय मत आहे ह्यावर आर्टिकल लिहा

    ReplyDelete
  23. अप्रतिम लिखाण भाऊ !!

    ReplyDelete