Friday, August 30, 2019

युती नाही, संगनमत

Image result for devendra uddhav

उकिरड्यासमोर उभे रहायचे आणि विचारायचे दुर्गंधी कुठे आहे? किंवा अत्तराचा फ़ाया समोर धरला असताना कोणी सुगंधाचा पुरावा मागत असेल, तर खुशाल समजावे, या इसमाला नाक नावाचा अवयव नाही. हे इतक्यासाठी सांगायची पाळी आली, की आजकाल अनेक पत्रकार शिवसेना भाजपाच्या नेत्यांना युतीचे काय झाले; असा प्रश्न हटकून विचारत असतात. मग हे नेते त्यांना ‘आमचं ठरलंय’ असे मोघम उत्तर देतात. या मोघम उत्तराचा अर्थ इतकाच असतो, की नाक असेल तर हुंगा, तात्काळ उत्तर मिळेल. ज्यांना राजकीय पत्रकारिता करायची असते, त्यांना युती कधीच झालीय आणि त्यातले जागावाटपही संपलेले आहे, हे सहज लक्षात येण्यासारख्या घडामोडी सभोवती घडत आहेत. पण त्यांचे वर्णन शिवबंधन बांधले किंवा मेगाभरती अशा शब्दात संपवून टाकले; मग त्याच भरती वा शिवबंधनात बांधलेली युती दिसायची कशी आणि बघणार कोण? सध्या कॉग्रेस किंवा अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपा किंवा शिवसेनेत माजी वा आजी आमदारांचा ओघ चालू आहे. यापैकी भाजपात जाणार्‍यांचा ओघ समजू शकतो. कारण त्या पक्षाचे केंद्रात वा राज्यात सरकार आहे आणि सत्तेचा हुकमी पत्ता नरेंद्र मोदी, त्यांच्याच हातात आहे. शिवाय विजयाकडे रेटून नेणारी भरभक्कम संघटना उभारणारे अमित शहाच अजून पक्षाची निवडणूक रणनिती चालवित आहेत. त्यामुळे भाजपात जाण्यासाठी रीघ लागली असेल, तर समजू शकते. पण असे काही इच्छुक अचानक वाट वाकडी करून मातोश्रीवर शिवबंधन बांधायला कशाला जातात? हा प्रश्न कोणालाच का पडत नाही? खरे राजकीय रहस्य किंवा गुढ तिथेच तर सामावलेले आहे. कारण दोन्ही पक्षात नवागत आला तर मित्र पक्षाची त्याविषयी काडीमात्र तक्रार नाही, की प्रतिकुल प्रतिक्रीयाही उमटत नाही. असे का?

जे कोणी शिवसेनेत अलिकडे दाखल झालेत, त्यांच्या मतदारसंघाची स्थिती वा रागरंग बघितला, तर ती जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे सहज लक्षात येऊ शकते. याच्या उलट जिथे भाजपात माजी आमदार दाखल होतो, तिथे आगामी निवडणुकीत जागा भाजपाच्या पारड्यात पडणारी असल्याचे लक्षात येऊ शकते. म्हणजेच शिवसेना किंवा भाजपा हे संगनमतानेच इतर पक्षातून येणार्‍या इच्छुकांना सामावून घेताना दिसत आहेत. कदाचित भाजपात यायला उत्सुक असलेला एखादा आमदार, उद्या शिवसेनेलाच जाणार्‍या मतदारसंघातला असेल, तर त्याला भाजपा उमेदवारी देऊ शकणार नाही, ही बाब उघड आहे. मग त्याला आताच पक्षामध्ये घेऊन नाराज कशाला करायचे? हा भाजपासमोरचा गहन प्रश्न आहे. म्हणून तर यायला अनेकजण उत्सुक आहेत, पण सामावून घ्यायला भाजपापाशी जागाच नाही, असे मुख्यमंत्र्यानीही स्पष्ट शब्दात मांडलेले आहे. त्याचा अर्थ तोच आहे. ज्या जागी आपल्याकडे स्वपक्षीय उमेदवार मजबूत आहे आणि सहज निवडूनही येणार आहे, तिथे भाजपाला खोगीरभरती नको आहे. पण जी जागा अवघड आहे, तिथे मात्र नवागताचे स्वागत नक्की करायचे आहे. पण तितकीच अडचण नाही. सगळ्याच उत्सुक परपक्षीयांना भाजपात जायचे असणार हे उघड सत्य आहे. कारण आज भाजपाकडे मोदी नावाचा हुकूमाचा पत्ता आहे. ते आजच्या राजकारणातले चलनी नाणे आहे. मग भाजपा सोडून कोणी शिवसेनेत कशाला जाईल? पण परिस्थिती अशी आहे, की मागल्या खेपेप्रमाणे यावेळी मित्रपक्षाला दुखवून विधानसभा लढण्याची भाजपाची तयारी नाही. म्हणूनच ठरविक जागा सेनेसाठी सोडणे अपरिहार्य असून, कुवतीप्रमाणे निम्मेहून कमी जागा स्विकारण्याची मनस्थिती सेनेनेही बनवलेली आहे. पण आजच त्याचा गवगवा केल्यास पक्षांतर्गत गदारोळ होऊ शकतो. म्ह्णून दोन्ही पक्षांना पत्ते आताच उघडायचे नाहीत. म्हणून तर ‘ठरलंय’ काय ते गुलदस्त्यात आहे. पण वागण्यातून बरेच काही उघड होते.

ज्या जागा ढोबळमानाने शिवसेनेला सोडायच्या ठरलेल्या आहेत, तिथे आपला हक्क सोडायचा भाजपात निर्णय आधीच झालेला असावा. तितकेच नाही, तर अशा जागांविषयी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री यांच्यात सहमतीही झालेली असावी. त्याबदल दोन्ही पक्षांनी आपापल्या तोंडाळ नेत्यांना आवरून धरलेले असून, धुर्तपणे नव्याने येणार्‍यांचे स्वागत चालविले आहे. म्हणून मग जिथली जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे, त्यांच्यासाठी भाजपाचे दार बंद आहे. पण त्याच जागेसाठी नवागत इच्छुक शिवसेनेत जायला मोकळा आहे. त्यासाठी भाजपा मध्यस्थीलाही सज्ज आहे. तसे नसते तर अकस्मात काही आमदार राष्ट्रवादी वा कॉग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झाले नसते. कदाचित कोणी शिवसेनेत यायचे असताना तसाच भाजपाकडेही पाठवला जात असणे शक्य आहे. हे संगनमत असल्याशिवाय ही मेगाभरती इतकी गाजावाजा करून होऊ शकली नसती. जी जागा आपण भाजपाकडून पदरात पाडून घेऊ शकत नाही, तिथे शिवसेनेने कोणाला पक्षात आणले नसते. उदाहरण म्हणून सचिन अहीर यांच्याकडे बघता येईल. त्यांचा वरळी मतदारसंघ बदलून गेला आहे आणि आज तिथे शिवसेनेचा स्वबळावर जिंकलेला आमदारही आहे. मग अहीर सेनेत कशाला दाखल झाले? तर त्याचे उत्तर भायखळा मतदारसंघात मिळू शकते. तिथून गेल्या वेळी अरूण गवळीची कन्या शिवसेनेचा पाठींबा असूनही थोडक्यात पराभूत झाली आणि ओवायसींचे उमेदवार वारीस पठाण मतविभागणीने बाजी मारून गेले. सेना, भाजपा व मनसेच्या विभागणीत पठाण यांना फ़ायदा घेता आला. आता तीच जागा युतीने शिवसेनेला दिली तर अरूण गवळीचा नातलग म्हणून अहिरना तिथली हक्काची मते मिळतीलच. पण त्यांची आजवरची कॉग्रेस राष्ट्रवादी म्हणून जोडलेली मतेही सहज मिळून जातील. म्हणजेच सचिन अहिर हे भायखळ्यातून युतीचे उमेदवार असतील आणि ती जागा सेनेच्या खात्यात भर घालणारी असू शकते. भाजपासाठी तिथे अन्य कोणी चांगला उमेदवार नाही, तर त्यांना धुर्तपणे शिवसेनेकडे धाडण्यात आलेले नाही काय?

महाजनादेश यात्रा संपल्यावर येत्या दोनचार दिवसात आणखी मोठी मेगाभरती होणार असल्याच्या गप्पा चालू आहेत. त्यातही कोण कुठल्या पक्षात जातो, ते बारकाईने बघायला हवे आहे. छगन भुजबळ सेनेत गेल्यास नाशिक पादाक्रांत होऊ शकतो. नाशिकमध्येच मनसेची मोठी शक्ती आहे. तिला भुजबळ यांच्या आगमनाने काटशह दिला जाऊ शकतो. मनसे किंवा राज ठाकरे हे भुजबळांच्या नाशिक भागातील प्रभावक्षेत्राला आव्हान झालेले होते आणि शिवसेनेत भुजबळ अधिक भाजपाचे पाठबळ मिळाल्यास, तिथले अनेक आमदार युतीचे म्हणून विधानसभेत पोहोचतात. एका बाजूला राष्ट्रवादीचे खच्चीकरण आणि दुसरीकडे मनसेच्या असलेल्या शक्तीला निरूपयोगी केले जाते. ह्याला युतीची रणनिती म्हणता येईल. एकमेकांशी लढत बसण्यापेक्षाही निर्णायकरित्या कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचे खच्चीकरण करून घ्यायचे आणि त्यात मनसे वा वंचित यांचे बळ वाढले तरी बेहत्तर, अशी ती रणनिती आहे. एकदा हे दोन्ही बलदंड पक्ष खिळखिळे झाले, मग सेना व भाजपा राज्यामध्ये मायावती व अखिलेश यांच्याप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करायला मोकळे होतात ना? मग सवडीने मोठा भाऊ कोण आणि छोटा कोण, ते ठरवायची लढाई लढता येईल, असे सेना भाजपा यांच्यातले आजचे संगनमत असू शकते. म्हणूनच जे काही चालले आहे, त्याला निवडणूकपुर्व युतीही म्हणणे योग्य नाही. त्याला निवडणूकपुर्व फ़ोडाफ़ोडी करण्यातली युती म्हणणे भाग आहे. त्यामुळे ‘ठरलंय’ काय, त्याचा खुलासा अजिबात केला जात नाही आणि निव्वळ हसर्‍या चेहर्‍याने मुख्यमंत्री किंवा उद्धव ठाकरे प्रश्नाला बगल देत असतात. ठरलंय असं, की कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आगामी विधानसभेत पुर्णपणे खिळखिळी करून टाकायची आणि पुढल्या राजकारणात असेल तसे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे व्हायचे. सहाजिकच मतदान कार्यक्रम जाहिर झाला, मग आधीच ‘ठरलंय’ त्याची घोषणा होईल आणि बंडखोरांनाही तमाशा करण्याची सवड मिळणार नाही. किंवा विरोधातल्या पक्षांनाही सत्ताधार्‍यांचे दुबळे स्थान शोधून हल्ले करायला जागा शिल्लक उरलेली नसेल. याला युतीपेक्षाही संगनमत अशा शब्दप्रयोग उत्तम ठरावा.

17 comments:

  1. भाऊ....झकास लेख...
    तुमच्या कडुन खुप शिकायला मिळतं...
    धन्यवाद...

    ReplyDelete
  2. भाऊ सलाम तुमच्या राजकिय निरीक्षण शक्तीला तुम्ही तुमच्या सारखे पत्रकार घडवण्याचं पन मोठे काम करताय 🙏

    ReplyDelete
  3. परखड विश्लेषण. नवे पत्रकार गुडघ्याला बाशिंग बांधुन पळतात.

    ReplyDelete
  4. भाऊ खरंच सुंदर लेख

    ReplyDelete
  5. वास्तव वादी लिखान

    ReplyDelete
  6. अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  7. यथार्थ विश्लेषण!!

    ReplyDelete
  8. भाऊ आर्थिक मंदी वर आपले मत काय?

    ReplyDelete
  9. "आमच ठरलय" याचा अर्थ सामान्य मतदाराला उमगलाय, आयारामांच्याही ध्यानात आलाय पण पत्रकारांना, मिडियाला कळला नाही अस समजण भाबडेपणाच ठरेल.

    ReplyDelete
  10. भाऊ तुम्ही तरुण पत्रकार मंडळी साठी अभ्यास वर्ग घ्यायला पाहिजेत। विचार कसा करावा हे तुम्ही योग्यपणे सांगता। नवी पिढी तयार व्हायला हवी। कदाचित तुम्ही हे करत असलच। धन्यवाद!

    ReplyDelete
  11. काल महाराष्ट्रातील जाणता राजा एका प्रश्नावर नाराज झाला व बराच काळ तणाव निर्माण झाला. हि हातातून निसटून जात असलेल्या राजकारणाची चाहूल तर नाही ना? राष्ट्रवादीचा भविष्यावर अजून प्रकाश टाकावा.

    ReplyDelete
  12. भाऊ या पध्दतीने मेगाभरती चालू राहिली तर पवार साहेबांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायला उमेदवार म्हणून आपले सगळे पै पाहूणेच आणायला लागणार आहेत. त्यांचे अनेक खंदे वीर जहाज सोडून पळतानाच दिसतात. पवारांनी आता राजकारण संन्यास घ्यायला हवा. त्यांच्या नावावर राजकारण करण्याचे राष्ट्रवादीचे दिवस संपले आहेत.

    ReplyDelete
  13. संगनमताचा छुपा अजेंडा यापूर्वी दोन्ही कॉग्रेसनी वापरून टाकलेला उस्टाव आहे.परवा परवा सातारा mp जागा ncp ने घेऊन उदयनांनी पक्षात येणे अपरीहार्य केले.शेतकरी संघटनेला सांगलीची जागा व उमेदवारही दिला.असे होत आले आहे. शिवाय मित्रत्वाची लढत हाही भाग होताच.त्यांचेच डावपेच त्यांनच्यावर खेळण्याचे बळ सध्या युतीला आले आहे. हाच काय तो भाग इतकेच.

    ReplyDelete
  14. भाऊ मी तुमची न चुकता वाचणारी वाचक आहे आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही चपखल पणे देता म्हणून मी बरेचदा प्रतिक्रिया देत नाही कारण अवाक झालेली असते, खूप छान विवेचन

    ReplyDelete
  15. Trojan horse होऊ नये एवढी प्रार्थना

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे, मला परवा एक स्वप्न अगदि अपवादाने पडले होते, ( अशी राजकारणाची स्वप्ने मला कधीच पडत नाहीत म्हणून अप्रूप वाटले ) की निवडणूकीनंतर युतीतील एक जबरदस्त सत्ताप्रेमी गट पुलोद प्रमाणे आयाराम गयारामातून काहींना गळाला लावून बाजूला काढतात व पुढे काय व्हायचं ...तर मी नेमका जागा होतो !

      Delete