Thursday, November 28, 2019

हीच वेळ आणि योग्य वेळ



शनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यांवर बघणार्‍यांचाही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण बातमी खरी होती. कारण भाजपाचे देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. शपथ घेतल्यावर त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले आणि विषय संपला. त्यानंतर ते दोघेही पुन्हा एकत्र दिसले, ते विधानभवनातील यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहताना. त्यानंतर दोघांचा एकत्रित असा कुठलाही कार्यक्रम नव्हता किंवा झाला नाही. मधेच बातमी यायची अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले किंवा त्यांना भेटायला राष्ट्रवादीचे कोण कोण दिग्गज नेते आले. अखेरीस ऐंशी तासांच्या या नाट्यावर पडदा टाकत अजितदादांनी आपल्या पदाचा थेट राजिनामा दिला आणि रात्री उशिरा ते माघारी काकांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. दरम्यान फ़डणवीसांनी आपल्या मुख्य्मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. कुठल्या तरी हॉटेलात तीन पक्षाच्या आघाडीचे आमदार एकत्र आणून त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेतेपदी निवडही झालेली होती. आमदारांना घटनेशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ देण्यात आली होती. इतके उरकून काका घरी परतले, तेव्हा पुतण्या हजर झालेला होता. तिकडे राजिनामा देण्यापुर्वी घटनाक्रम सांगताना फ़डणवीसांनी बहूमत नसल्याचे मान्य करून राजिनामा देणार, अशी बातमी पत्रकारांना दिलेली होती. पण तेव्हा किंवा त्यानंतर हे सरकार बनले कशाला व कशाच्या आधारावर; याचा एका शब्दानेही खुलासा देवेंद्र यांनी केला नाही. दुसर्‍या दिवशी तसा प्रश्न विचारण्यात आल्यावर योग्यवेळी अजितदादांबद्दल बोलेन, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे गुरूवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्यापुर्वी तोच प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यांनीही तशीच टोलवाटोलवी केली. मुद्दा इतकाच, की यांनी नाही तर जनतेला सतावणार्‍या त्या रहस्याचा भेद कोणी करायचा? हीच ती वेळ आणि योग्य वेळ, यामध्ये काय आशय सामावला आहे?

अजितदादा व देवेंद्र यांनी हे सरकार स्थापन केले. ते बनले कसे आणि मोडले कशाला, त्याचा खुलासा त्यांनीच करायला हवा आणि जनतेच्या वतीने सत्ता राबवणार्‍या ह्या लोकांनीच आपल्या कृतीचे उत्तर द्यायला हवे ना? त्यांनी जनतेला उत्तर देऊ नये. पण निदान त्यांच्या पक्षाने वा नेतृत्वाने तरी त्यांच्याकडून त्याचे खुलासे घ्यायला नकोत का? कारण या दोघांची कृती त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावून गेलेली आहे. पण गंमत बघा, दोन्ही नेत्यांच्या त्या बालीश फ़ुलीश भासलेल्या कृतीला त्यांच्याही नेत्यांनी जाब विचारलेला नाही. पत्रकारांच्या त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना दोघेही टोलवित आहेत. ‘योग्य वेळी उत्तर देऊ’ हे उत्तर कसे असू शकते? पण त्यांचे हे उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्वांना समाधानी करणारे आहे, म्हणजेच त्या एकूण नाट्याचे सुत्रधार हे दोघे दुय्यम नेते असण्यापेक्षाही त्यांचेच पक्षश्रेष्ठी त्यात खर्‍या अर्थाने गुंतलेले आहेत. सुप्रियाताईंनी तर घराण्यात फ़ुट पडली, असे अश्रू ढाळलेले होते आणि काकांनी तर कुटुंब वेगळे आणि पक्ष वेगळा, इतके हात झटकलेले होते. पण त्यांनाही ‘शाम को लौटा’ दादा मुळात कुटुंबातून बाजूला कशाला झाला, त्याचा खुलासा नको आहे. दुसरीकडे भाजपाची सर्व प्रतिष्ठा पणाला लावून अल्पजिवी सरकार स्थापन केलेल्या देवेंद्र फ़डणवीसांनाही त्यांचा पक्ष कुठला जाब विचारत नाही. उलट पुन्हा झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांचीच पक्षाचे सर्वोच्च नेता म्हणून निवड केली जाते आणि त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला जातो. किती अजब गोष्ट आहे ना? रस्त्यावरचा सामान्य पाठीराखा, कार्यकर्ता वा सहानुभूतीदार त्या घटनाक्रमाने विचलीत होऊन गेला आहे. पण त्याच पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांना आपल्या पक्षाची इज्जत धुळीला मिळाल्याचे जराही वैषम्य वाटलेले नाही. दादांचे पक्षात जोरदार स्वागत झाले आणि देवेंद्र यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास प्रकट केला. मात्र कॉग्रेस व शिवसेना यांना त्याविषयी काय वाटते वा वाटले; त्याचाही खुलासा आलेला नाही. कदाचित त्यांना कुठूनही कसाही भाजपा सत्तेबाहेर गेला इतक्याचाच आनंद झालेला असावा. बाकी तपशीलाची फ़िकीर नसावी.

आता दोघेही म्हणतात, योग्य वेळ आल्यावर त्याविषयी बोलू. ती योग्य वेळ कुठली असेल? विधानसभा निवडणूका लागल्या असताना आपला अर्ज दाखल करताना बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी ‘हीच ती वेळ’ अशी घोषणा केली होती. पण ती वेळ यायला दोन महिने लागले आणि आता उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झालेला आहे. मग देवेंद्र आणि अजितदादा यांच्या अल्पजिवी सरकारविषयी बोलण्याची ‘योग्य वेळ’ कधी येणार आहे? ही वेळ इतक्यासाठीच महत्वाची आहे, की शिवसेना वा आदित्यच्या ‘हीच वेळ’ शब्दांनी चमत्कार घडवला आहे. मग द्वेवेंद्र अजितदादा यांच्या तशाच पद्धतीच्या ‘योग्य वेळ’ शब्दात कुठल्या चमत्काराची शक्यता दडलेली आहे? त्या ‘योग्य वेळेला’ असे काय घडायचे आहे? तेव्हा पुन्हा कसली उलथापालथ व्हायची आहे? कुठली घटना घडली, मग हे दोन नेते आपण असे अल्पजिवी सरकार कोसळण्याची हमी असताना का स्थापन केले, त्याचा खुलासा देणार आहेत काय? अन्यथा त्या दोघांनी इतक्या महत्वाच्या राजकीय भूकंपाविषयी असे अर्थपुर्ण मौन धारण करण्याचे कारण काय? एकटे अजितदादा वा एकटे देवेंद्रच त्याविषयी मौन धारण करून बसलेले नाहीत. दोघांनी संयुक्तपणे मौन धारण केलेले आहे. खरे म्हणजे त्यांच्या मौनव्रतावर पहिला प्रश्न कॉग्रेस आणि शिवसेनेने उपस्थित करायला हवा आहे. तितकाच भाजपाश्रेष्ठी व शरद पवार यांनीही दोघांना चांगले फ़ैलावर घेऊन झालेल्या खेळखंडोबाविषयी जाब विचारला पाहिजे. पण त्याही आघाडीवर शांतताच आहे. याचा एकमेव अर्थ काढता येतो आणि तो म्हणजे सगळ्या मौनव्रती लोकांनी संगनमताने हे नाट्य घडलेले आहे. दिसायला त्यात कोणी तरी बाजी मारलेली दिसेल आणि काहीजणांची अब्रु गेली असेही भासणार आहे. पण हेतू भलताच काही साध्य करण्यात आलेला आहे. तो हेतू कदाचित कधीही उघड होणार नाही. फ़ार तर हे नेते आपण कशी दुसर्‍यांवर कुरघोडी केली वा अन्य कुणाला बनवले, त्याचा खुलासा करतील. पण खरे रहस्य कधीच उघड होण्याची शक्यता नाही.

एक गोष्ट साफ़ आहे, इतकी नाचक्की होऊन भाजपाचे श्रेष्ठी फ़डणवीसांना जाब विचारत नाहीत, हे पटणारे नाही. शरद पवार सर्वकाही विसरून पुतण्याला सन्मानाने कुटुंबाची एकजुट म्हणून सोबत घेतात. यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. एकूण नाट्य रंगवले गेले, त्यात भाजपाश्रेष्ठी व शरद पवार यांच्यात कुठला तरी वेगळाच सौदा झालेला आहे आणि त्याविषयी शिवसेना व कॉग्रेस पुर्णपणे अनभिज्ञ असावेत. सामान्य जनतेप्रमाणे त्याही दोन पक्षांना पुर्णपणे अंधारात ठेवले गेलेले आहे. अर्थात त्यांनीही याविषयी खोदून खोदून चौकशी विचारणा केलेली असणारच. पण त्यांनाही ‘योग्य वेळ’ आल्यावर समजेल, अशीच पाने पुसली गेलेली असणार. राजकारणात अनेकदा आरंभी वा अकस्मात माघार घ्यावी लागते व तोही एक डावपेच असतो. योग्य वेळ येण्याची प्रतिक्षा करावी लागते. कदाचित त्यासाठी मानहानी व अपमानही सहन करावा लागतो. पण मोठ्या यशासाठी वा दुरचा पल्ला गाठण्यासाठी दोन पावले माघार घ्यावी लागते. शिकार करताना वाघही दोन पावले मागे येतो म्हणतात. शिवसेनेचा वाघ हे किती ओळखून आहे, ते इतिहासच आपल्याला सांगू शकेल. कारण ‘हीच वेळ’ शिवसेनेला ठाऊक होती, तरी ‘योग्य वेळ’ शिवसेनेला कितपत ठाऊक आहे, ते उद्धव ठाकरे जाणोत. कारण भाजपावाले वा त्यांचे इथले नेतृत्व कितीही लेचेपेचे असले तरी दिल्लीतील सर्वांचे श्रेष्ठी नेते इतके बुद्दू नक्कीच नाहीत. खुद्द शरद पवार इतके गाफ़ील नसतात, की त्यांना अंधारात ठेवून अजितदादांनी इतके मोठे धक्कादायक बंड करावे. फ़क्त या सर्वांनी जे काही खुलासे करायचे आहेत, त्याची योग्य वेळ कधी यायची आहे, तितके तरी जाहिर करावे, इतकीच अपेक्षा आहे. पण अजितदादा व देवेंद्र यांनी मुख्य प्रश्नाला बगल देऊन उत्तर टाळण्याचा लावलेला सपाटा, त्या विषयाला अधिक रहस्यमय बनवणारा आहे. अर्थात आपण कितीही आग्रह धरला, म्हणून ती योग्य वेळ कधी हे सांगण्याची सक्ती करण्याची शक्ती आपल्यापाशी कुठे आहे?

23 comments:

  1. भाऊ, अगदी योग्य, ज्याने त्याने बुद्धीला उमगेल तसा अर्थ लावावा. ही घटना घडवणारेच त्याचा अर्थ सांगू शकतील.

    ReplyDelete
  2. या सरकारचे गूढ कधीच समजणार नाही आणि जो कोणी याची चौकशी करायचा प्रयत्न करेल त्याला परिणाम भोगावे लागतील असे वाटते.

    ReplyDelete
  3. अजित पवार विधिमंडळाचे नेते बनले त्यापूर्वीची त्यांची नाराजी जगजाहीर आहे..! अडिचवर्षे मुख्यमंत्री पद किंवा पांच वर्षे उपमुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून "मी बारामतीला चाललोय" म्हणत ते बैठकीतून रागारागात बाहेर पडले. जयंत पाटलांनी त्यांना गोंजारुन परत बैठकीत आणले. ते आले तेच डोक्यात वेगळा प्लॅन घेऊन. बैठकीत विधिमंडळ पक्षाचे गटनेते बनले आणि ५४सदस्यांच्या सह्यांची यादी घेऊन पांच वर्षे उपमुख्यमंत्री होण्याच्या अटीवर थेट भाजपला जाऊन मिळाले. त्यामागची अटकल ही की व्हीप चा अधिकार मिळाला म्हणजे पक्षाच्या ५४ आमदारांची मते भाजपच्या पारड्यात टाकता येतील. (कारण व्हीपचा भंग करणाराची आमदारकी विधानसभा अध्यक्ष रद्द करु शकतात..!)
    पण दोन गोष्टी आडव्या आल्याने त्यांना माघार घ्यावी लागली..!
    १) त्यांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याची यादी फक्त राज्यपालांना दिली. विधानसभा अध्यक्षांना (घटनेतील तरतुदीनुसार आधीच्या विधानसभेचे अध्यक्ष हे त्यावेळी पदसिद्ध असतात) दिलीच नाही. ही मोठी आणि अडचणीची तांत्रिक चूक ठरली..! त्यामुळे अजित पवारांचे गटनेतेपद धोक्यात आले.
    २) सर्वोच्च न्यायालयाने नवीन हंगामी अध्यक्ष नेमून त्यांच्यापुढे हात वर करुन विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला.
    या परिस्थितीत अजित पवार यांचीच आमदारकी धोक्यात येणार होती. त्यामुळेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
    पण.., एक तर्क..!
    ही कदाचित त्यांची तात्पुरती माघार असू शकते..! कदाचित आगामी काळात स्थिरावल्यानंतर अजित पवार पुन्हा तरुण आमदारांचा मोठा गट घेऊन बाहेर पडतील. सोबत सेनेचेही असंतुष्ट असतील..! कदाचित तीनही पक्षातील पुरेसे संख्याबळ फोडून ते परत बाहेर पडू शकतात अशी त्यांची देहबोली सांगत होती..!
    त्यामुळे आता परत..
    Wait and Watch
    पण तुर्तास मात्र भाजपच्या हातात काही नाही हे नक्की..!

    ReplyDelete
    Replies
    1. नाही मला वाटतं हे असेल

      Delete
    2. मला नाही वाटत

      Delete
    3. हा सगळा प्रकार जनतेच्या मनात धूळफेक करण्यासाठी होता हे तर आता उघड गुपित आहे. कशासाठी? हे महत्त्वाचं आहे. तेच भाऊ Torsekar म्हणत आहेत.

      Delete
  4. dhanyawaad bhau, ya prashnanna tumhi vacha phodalit. he nakkich kodyat takanare prashn ahet .. baghu mainstream media kadhi ya prashnakade gambhiryane baghate

    ReplyDelete
  5. हो हेच वाटते... दिल्लीत दोघं भेटले तेंव्हा काय वाटाघाटी झाल्या ते एक तर पवार नाहीतर मोदी आणि शाह ह्यांनाच माहीत.. आणि प्याद्याच काम देवेंद्र आणि अजितदादा यांनी केलं हे नक्की...

    ReplyDelete
  6. अगदी माझ्या मनातलेच प्रश्न तुम्ही मांडले आहेत.
    तुमचे विशेष म्हणजे तुमच्याशिवाय माध्यमातील इतर कोणीही हे प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. तुमचे लेख नेहमीच राजकीय पटाचे आकलन करण्यास मदत करतात. धन्यवाद
    अस्मिता फडके, पुणे

    ReplyDelete
  7. भाऊ, सगळयांच्या मनातलेच प्रश्न तुम्ही मांडले आहेत.
    दुर्देवाने मिडीयामध्ये इतर कोणालाही ते पडले नाहीयेत. तुमच्या लेखांमुळे माझे राजकीय आकलन वाढते.
    धन्यवाद

    ReplyDelete
  8. १) या सर्व वगप्रकारात जनता, मतदार सर्व विसरेल, हा आग्रह योग्य नाही.२)हे सत्ताकारण, फडणवीस,राज्य बीजेपी, केंद्र बीजेपी यांना निस्तरावे लागेल.३)पण यापुढे शरद पवार व केंद्र बीजेपी काय बोलत राहतील हे पहावे लागेल.

    ReplyDelete
  9. भाऊ , पण यामागे एक शंका येते की अमित शहा चा देवेन्द्र ला खाली खेचण्याचा डाव तर नाही ना कारण त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि 5 वर्ष सेनेला सोबत घेऊन शिव्या खाऊन पूर्ण केली होती.मोदीनंतर पंतप्रधान म्हणून कदाचित rss ने देवेंद्र ला पुढे केले असते तेच अमित शहाला नको असेल?.

    ReplyDelete
  10. सर्वप्रथम एक मत व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाशी सेना आणि शिवसैनिक वगळता उर्वरित महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. तो त्या पक्षाचा वैयक्तिक मामला आहे. तेंव्हा सर्व महाराष्ट्राची ही इच्छा आहे हे थोतांड आहे.कारण...

    सेनेची खरी ताकद २०१४ मध्ये कळली जेंव्हा त्यांना स्वतंत्रपणे लढून फक्त ६३ जागी विजय मिळाला.इतर वेळेस युतीत लढल्यामुळे त्यांची मते कळणार नाहीत.म्हणून जिंकलेल्या सीट्सची टक्केवारी सांगितली जाते. प्रत्येक निवडणुकीत भाजपचा परफॉर्मन्स उजवा आहे. यावेळी तर खूपच.फडणवीस हेच सांगतात. पण ते मान्य व्हायला डोक्यात मेंदू असावा लागतो.

    मुंबई जे सेनेचे होम पिच आहे तिथे खरेतर सेनेने भाजपला डावाची मात द्यायला हवी. इथेही वेगळे लढले तेंव्हा २०१४ च्या विधानसभेत भाजपने (१५-१४) म्हणजे एक सीट जास्त तर महापालिका निवडणुकीत सेनेने (८४-८२) म्हणजे २ सीट्स जास्त जिंकल्या.यावेळी भाजपने १७ लढवून १६ जिंकल्या तर सेनेने १९ लढवून १४.

    मुंबईत यापुढे तुम्ही "आवाज कोणाचा"चे असे ओरडलात लोक "भाजपचा" असे उत्तर देतील हे लक्षात ठेवलेले बरे.

    महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कम्फर्टेबल मेजॉरीटी दिली होती. सरकार २५ ऑक्टोबर रोजीच स्थापन व्हायला हवे होते. झाले नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे सेनेची फिरलेली नियत. भाजपच्या सीट्स कमी झाल्या म्हणून सेनेने बेटकुळ्या दाखवायला सुरवात केली.

    दुसऱ्याच दिवशी व्यभिचार करायला सुरुवात केली. जे कधी ठरलेत नव्हते त्याचा आधार घेत सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असे पेचप्रसंग उभे राहिले.

    जर अंगात दम असता तर मुख्यमंत्री पद अर्धे अर्धे ठरले आहे हे उघडपणे सांगून निवडणूक लढवली असती. सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे असणार आहे हे जनतेला आधी कळले असते तर ५६ सुद्धा मिळाल्या नसत्या.मतदान वेगळे झाले असते.

    फोटो मोदींचा फोटो लावून, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा लाभ उठवून लढलात म्हणून इतक्या तरी मिळाल्या. आणि आता खाल्ल्या थाळीत घाण करायला लाज नाही वाटत ? नंतर हा मुद्दा उपस्थित करून अभद्र युती करत आहात हा भाजपचा सोडा जनतेचा विश्वासघात आहे.

    असले विश्वासघातकी राजकारण करायला बुद्धी नव्हे उलटे काळीज लागते. महाराष्ट्रातील जनतेला हे दिसले आहे.

    शिवसेनेचा मुख्यमंत्री आणीन हे वचन पूर्ण केले म्हणे. कपट करून, पाठीत खंजीर खुपसून मिळवले आहे. तुमची ताकदच नाही एकट्याच्या जीवावर बहुमत मिळवायची.असेल हिंमत तर यापुढे मिळवून दाखवा.

    स्वतःच्या बळावर कधीही मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही हे पूर्णपणे माहिती आहे तुम्हाला. म्हणून हिंदुत्व सोडून भगव्याच्या शत्रूच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्री पदावर आरूढ होत आहात. ती खुर्ची तुम्ही स्वबळावर मिळवली नाही.एका दुर्बळ ,मर्यादित वकुबाच्या नेत्याने कपटाच्या आधारे मिळवली आहे.लायकी नसताना मिळालेले पद आहे हे.

    तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याचा जनादेश मिळालेला नाही.तुम्ही बळेच तो हिसकावून घेतला आहे.

    बेसावध क्षणी पाठीमागून वार करून "हीच ती वेळ " दगा देण्याची हे सिद्ध केलेत.

    सत्य,सचोटी,स्वबळ,प्रामाणिकपणा,कर्तृत्व,मेहनत इत्यादींच्या जोरावर केलेल्या वचनपूर्तीचे कौतुक होते. वाटमारी, विश्वासघात , फसवणूक करून वचनपूर्ती केली तर त्याला कवडीची किंमत नसते.

    कपट, विश्वासघात, खोटेपणा,फसवणूक हे तुमच्या खुर्चीचे चार खूर आहेत.

    ही कपटी वचनपूर्ती आहे.

    ReplyDelete
  11. चतुर फडणवीस- शरद पवारचा केला गेम

    दि. २३.११.१९ फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि धिंगाणा सुरु झाला.पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. आधि बहुमत युतीकडून अल्यावर फडणविस निश्चिंत होते, पण शिवसेनेने पाठित खंजिर खुपसल्यावर मात्र एक प्रश्न निर्माण झाला.जे विकासकामे महाराष्ट्रात चालु होते त्याचा अतिरिक्त निधी संबंधीत खात्यात अधिच पडुन होता. तर दुसरीकडे शिवसेना व दोन्हि काँग्रेस नोटबंदि मुळे चांगलेच संकटात सापडले होते.त्यांचा पुर्ण डोळा ह्या निधीवर होता.ह्या निधीला मुख्यमंत्र्याच्या सहि शिवाय कोणिहि हात लावु शकत नव्हते.राज्यपाल सुद्धा नाहि.त्यामुळेच फडणविस ह्यांनि ही योजना आखली कि सरकारी कामकाजाच्या वेळेत किमान चार ४ तासांचा अवधि हा सर्व निधि पुन्हा केंद्र सरकारच्या खात्यात जमा करायचा.त्या योजने नुसार अजित पवारला त्याच्या सर्व गुन्ह्या मधुन मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले.(ह्याच्या दोेन बाजु होत्या,एक जर अजित पवार सोबत अालेच तर विकास कामे चालु रहातिल व राष्ट्रवादि दुबळि होइल आणि शिवसेनेचा काटा काढता येइल,दुसरी अजित पवार सोबत नाहि थांबले तर ४ तासात हा निधि पुन्हा केंद्राकडे पाठवता येइल).हे सर्व माहित असणारे दोघंच विरोधि पक्षाकडे होते ते म्हणजे शरद पवार आणि प्रुथ्विराज चव्हाण. अजित पवार ह्यांनि शपथ घेतली हे ऐकुन ह्या तिन्हि पक्षांना घामच फुटला.आणि इकडे हा तमाशा चालु असतांना फडविसांनि त्यांचे काम व्यवस्थित पार पाडत हा निधी सुरक्षित पणे केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला.एकंदरित फडणविसांनि जनतेचा पैसा चुकिच्या हातात पडण्या पासुनच वाचवला.पण दुसरिकडे लोक शरद पवार ला राष्ट्रपती राजवट कशी अजित पवारला मुद्दामुन हे नाटक करुन उठवलि ही गरळ अोकतायेत. खरेतर फडणविसांनि शरद पवारचाच गेम केला त्याचे घर फोडुन.आता त्यांना निधि साठि वारंवार केंद्रा कडेच हात पसरावे लागतिल.

    ReplyDelete
  12. शरद पवार bjp च्या जवळ सरकत आहेत.अस्पृश्य शिवसेनेला जवळ करून आता त्यांनी सिद्ध केले की अस्पृश्य कोणी नाही शिवसेना नाहीतर बीजेपी पण नाही

    ReplyDelete
  13. 'हीच ती वेळ'ह्याच विश्लेषण पश्चात बुद्धीने केलेले वाटतेय. तुमच्या आधीच्या विश्लेषण प्रमाणे शिवसेनेने राष्ट्रवादी अथवा काँग्रेस बरोबर कोणतीही बोलणी न करता युती तोडली होती. त्यामुळे हीच ती वेळ जर आधी पासून ठरले होते तर मग नंतर चा घटनाक्रम जुळत नाहीये.

    ReplyDelete
  14. भाऊ, आगदी बरोबर लिहलेय.कांहीतरी महत्वाची घडामोड झालेली आहे. कारण उघड आहे. ही सर्व मंडळी राजकारण करण्यात तरबेज आहेत. सेनेला याचा सुगावा लागणे कठीणच.

    ReplyDelete
  15. भाऊ एक व्हाट्सएप msg आसा फिरतोय की केंद्र सरकार ने पाठवलेला पैसा परत केन्द्राला वापस केला जसा की बुलेट ट्रैन साठी आलेला

    ReplyDelete
  16. भाऊ महाराष्ट्रात 1989 मध्ये जी सेना भाजप युती झाली ती दोघांच्याही फायद्याची होती, शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचा जसा उपयोग भाजपला झाला तसा भाजपच्या पक्ष संघटनेचा तसाच त्याच्या मागे असलेल्या संघ परिवारातील संघटना या सगळ्याचा उपयोग सेनेलाही होत गेला, त्यामुळे राज्यात सेना मोठा भाऊ तर केंद्रात भाजप मोठा अशी ही वाटणी होती मात्र तिथेही सेनेने अरेरावी करत भाजपकडून अनेक लोकसभेच्या जागा वाटणीत हिसकावून घेतल्या आणि लोकसभेला सेना जवळपास भाजपच्या बरोबरीने जागा लढवू लागली,मात्र दिल्लीत बहुमत नसल्याने भाजपला तिथेही सेनेसमोर झुकावे लागत होते, मात्र 2014 मध्ये भाजप स्वतःच्या बहुमतात आला आणि युती मोडण्याची हिंमत दाखवून भाजपने 122 जागा मिळवल्या, सेनेच्या पेक्षा दुप्पट जागा मिळवून भाजप मोठा पक्ष बनला,2019 मध्ये देखील भाजप सेनेपेक्षा दुपटीने मोठा पक्ष आहे या स्थितीत भाजप आता मोठा भाऊ झाला आहे ही वस्तुस्थिती सेनेला पचवता आली नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या वाटणीची न मान्य होणारी मागणी रेटून युती मोडली यात भाजप एवढे मोठे राज्य घालवणार नाही असा सेनेचा अंदाज असावा पण तो चुकला कारण केंद्रात 303 जागा मिळवलेल्या भाजपला केंद्र सरकार चालवण्यासाठी सेनेची गरज नाही आणि म्हणूनच मोदी शहा यांनी जाणीवपूर्वक भाजपच्या गळ्यातील ही धोंड काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळ्यात बांधली आणि सेनेला पद्धतशीर पणे काँग्रेसच्या गोटात ढकलून एक मोठी स्पेस भविष्यात भाजपसाठी राज्यात तयार केली. पक्ष संघटना बांधण्यात हयात घालवलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या या धूर्त डावपेचांचे आकलन शिवसेनेला खूप उशिरा झाले असावे कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही आता मोदी किंवा अमित शहा यांनी एखादा फोन जरी केला असता तरी हे घडले नसते असे म्हणू लागले आहेत,पण सेने साठी भाजपसोबत येण्याचे दोर पूर्णपणे कापले गेले आहेत.

    ReplyDelete
  17. Sir
    Hyat prashant kidhr ani uddhav thakre bheticha kahi sambadha asu shakti ka?

    ReplyDelete
  18. भाऊ, मला तुमचा लेख हा wishful thinking असा वाटला आहे.

    ReplyDelete
  19. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bjp-mp-anant-kumar-hegde-claims-that-devendra-fadnavis-made-cm-to-save-central-funds-worth-rs-40000-crore/articleshow/72326623.cms

    ReplyDelete