Friday, March 6, 2020

हिटलरच्या वारसांची कथा


 Image result for tulasi gabbaard tweet hinduphobia

सध्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक फ़ेर्‍या चालू आहेत. त्यात प्रमुख दोन्ही पक्षाचे अंतिम उमेदवार ठरवले जात असतात. त्यापैकी डेमॉक्रेट पक्षाच्या उमेदवारांमध्ये तुलसी गब्बार्ड नावाच्या महिला उमेदवाराचा समावेश आहे. त्यांनी जगभर किंवा प्रामुख्याने पाश्चात्य देशातून जाणीवपुर्वक हिंदूविरोधी अपप्रचार चालू असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. भारतात तर हिंदूद्वेषालाच आता सेक्युलॅरीझम वा पुरोगामीत्व असे नाव मिळालेले आहे. पण अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशातही पद्धतशीरपणे हिंदूविरोधाला प्राधान्य मिळू लागले आहे. इथे रा. स्व. संघ किंवा भाजपासह काही हिंदू संघटनांनी तसा आरोप करणे वेगळे आणि अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीतील एका इच्छुक उमेदवाराने तोच आरोप करणे भिन्न असते. पण अलिकडल्या काळात जगभर जो हिंदूविरोधी अपप्रचाराचा धुमधडाका लावण्यात आलेला आहे, त्यामुळे सात समुद्रापलिकडल्या ह्या नवहिंदू महिला नेत्यालाही रहावलेले नाही. तिनेही अमेरिकेतल्या हिंदूंसाठी आवाज उठवण्याची हिंमत दाखवलेली आहे. हिंदूस्तानातही अनेक राजकीय नेते जे सत्य बोलायला धजावत नाहीत, ती हिंमत नगण्य अल्पसंख्य असलेल्या या अमेरिकन हिंदू महिलेने केली, ही बाब लक्षणिय आहे. कारण तुलसी गब्बार्ड ही अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या मुळ भारतीय वंशाच्या कुटुंबात जन्माला आलेली महिला नाही. तिचे जन्मदाते धर्माने श्रध्द्दाळू ख्रिश्चन आहेत आणि आपल्या कोवळ्या वयात तिला हिंदू धर्मतत्वांनी प्रभावित केल्याने ती हिंदू झालेली आहे. त्यामुळेच तिने आपले नाव तुलसी असे केलेले असून, तिच्या पाचही मुलांची नावे हिंदू पुराणकथांमधून आलेली आहेत. आता ती अध्यक्षीय स्पर्धेत उतरलेली असून ऐन प्रचार काळात तिने जगभरच्या वा पाश्चात्य देशातील हिंदूफ़ोबियावर तोफ़ डागली आहे. कारण आता हळुहळू यामागचे जागतिक कारस्थान उघड होत चालले आहे.

आपण विसरलेले नसू तर गतवर्षी याच दरम्यान भारतात सतराव्या लोकसभेच्या निवडणुका ऐन भरात आलेल्या होत्या आणि तेव्हा अमेरिकेतील ख्यातनाम मानल्या जाणार्‍या ‘टाईम’ नियतकालिकाने मोदी विरोधात खोटेनाटे आरोप करणारी कव्हरस्टोरी केलेली होती. ‘महान दुभाजक’ असे त्यात मोदींचे वर्णन होते आणि त्याचा लेखक पाकिस्तानी असावा हा योगायोग नव्हता. अर्थात त्याने वापरलेली सर्व माहिती वा तपशील इथल्याच भारतीय पत्रकार बुद्धीजिवींनी मागल्या दोन दशकात पसरवलेले असत्य होते. त्या अफ़वा आणि काल्पनिक आरोपांचा गोषवारा करून जागतिक पातळीवर मोदींना बदनाम करणे, हा त्यामागचा एक हेतू होताच. पण त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्याचा आधार घेऊन भारतीय मतदाराचे मन कलुषित करण्याचा खरा डाव होता. कारण अमेरिकेतील महत्वाच्या माध्यमातून तेव्हा अशाच खोट्यानाट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. मग त्याचे इथे पुनर्मुद्रण किवा वाहिन्यांवरून प्रक्षेपण चाललेले होते. त्याचा एकच सूर होता, मोदी व भाजपा मिळून भारतातल्या अल्पसंख्यांक मुस्लिमांचे हाल करीत असतात. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि मोदी पुन्हा एकदा प्रचंड बहूमताने विजयी झाले. तेव्हा आपल्या उघड्या पडलेल्या अब्रुला झाकण्यासाठी त्याच ‘टाईम’ने मोदींना महान एकजुट करणारा नेता अशी भलामण केलेली होती. जे टाईमकडून चाललेले असते, तेच न्युयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉलस्ट्रीट जर्नल अशा नावाजलेल्या दैनिकांनी नंतर सातत्याने चालू ठेवलेले आहे. आर्थिक राजकीय सामाजिक घटनाक्रम घेऊन त्यात मोदींना व पर्यायाने हिंदूंना बदनाम करण्याच्या मोहिमा अखंड राबवल्या जात आहेत. त्यांनी वाटेल त्या थापा मारायच्या आणि मग तेच ब्रम्हवाक्य म्हणून इथल्या पुरोगामी माध्यमांनी पुढे न्यायचे; असा खेळ चालला आहे. हे आपण बोलणे वेगळे आणि तुलसी गब्बार्डने सांगणे म्हणूनच वेगळे आहे.

अशा प्रचाराने भले इथल्या जनमानसावर फ़ारसा परिणाम होत नसला तरी जगभरच्या अन्य देशातील लोकांची मने कलुषित होतात. त्याचा अनुभव तुलसी गब्बार्डने आपल्या वक्तव्यातून मांडला आहे. अमेरिकेत स्थायिक एका डॉक्टरला तिथल्या एका सामान्य उबेर ड्रायव्हरने केवळ हिंदू म्हणून कशी अपमानास्पद वागणूक दिली, त्याचाच तो किस्सा आहे. अशा बातम्या वाचणार्‍या ऐकणार्‍या त्या ड्रायव्हरच्या मनात हिंदूंविषयी इतका द्वेष रुजला होता, की त्याने त्या हिंदू डॉक्टर व त्याच्या मुलीला अर्ध्या वाटेतच गाडीतून हुसकावून लावण्यापर्यंत मजल मारली. त्याआधी केवळ नावावरून हिंदू असल्याचे जाणवल्यावर ड्रायव्हर त्यांच्याशी उद्धट वागू लागला. भारतात हिंदू  समाजाने मुस्लिमांचे जिणे कसे हराम करून सोडलेले आहे, त्याच्या कपोलकल्पित कहाण्या सांगू लागला. त्यात तथ्य नसल्याचे या डॉक्टरने पटवून देण्याचा प्रयत्न केल्यावर ड्रायव्हर हातघाईपर्यंत आला. हे कशामुळे होते आणि ते कसे साध्य करता येते, तेच ज्युंचे सार्वत्रिक हत्याकांड करणार्‍या हिटलरने सांगून ठेवलेले आहे आणि अमेरिकन, पाश्चात्य वा भारतीय बहुतांश पत्रकार हिटलरचे अनुकरण कसे करीत आहेत, त्याचा हा पुरावा आहे. भारतातील हिंदू संघटना वा राजकारणाला अकस्मात महत्व कसे आलेले आहे्, हे हिटलरच समजावू शकतो. ‘हिटलरच्या ज्युविरोधी प्रचाराचा आवाका बघून कोणीतरी त्याला म्हणाले की ज्यु लोकांना तुम्ही वाजवीपेक्षा जास्त महत्व देत नाही का? त्यावर हिटलर उत्तरला की, ‘छे छे असे बिलकुल नाही. एक शत्रू म्हणून ज्यु लोकांना जे महत्व आहे, ते मुळीच कमी लेखता येणार नाही.’ ह्याचा अर्थ इतकाच, की देशातील ७०-८० टक्के लोकसंख्या हिंदू असूनही त्यात अर्धेही मतदार भाजपाला हिंदूत्ववादी म्हणून मते देत नाहीत. मग तथाकथित विरोधकांनी हिंदूत्वाला घाबरण्याचे कारण काय? तर त्याचे महत्व शत्रू म्हणून आहे. ज्यांचा पाठींबा आपल्या पापकृत्यासाठी मिळवायचा असतो, त्याच्या मनात बळी घ्यायचाय त्याच्या विषयी शत्रूभाव किंवा भयगंड निर्माण करण्यातून ते साध्य होत असते.

जगातला कुठलाही विषय भारताच्या संबंधात आला, मग तात्काळ हिंदूत्वावर खापर फ़ोडायचे खुनशी तत्वज्ञान त्यातूनच उदभवले आहे. जगातल्या किंवा जर्मनीतल्या सर्व समस्यांचे मुळ ज्यू समाज असल्याचे लोकांच्या मेंदूत नाझींनी भरवले आणि त्यामुळेच नंतरच्या काळात केवळ कोणी ज्यु आहे म्हणून त्याचे शिरकाण वा कत्तल करणे उदात्त कार्य बनवणे सोपे झाले. आज आपण बारकाईने बातम्या वा अपप्रचार तपासला तर त्यात कुठेही हिंदू मारला गेल्यास अश्रू ढाळलेले दिसणार नाहीत. पाकिस्तानात वा मुस्लिम देशात राजरोस हिंदूंचा छळ होतो, त्यांना अरबी देशात आपल्या चार भिंतीत आपल्या दैवताची आराधना केली म्हणूनही फ़ाशी होऊ शकते. त्यावर कुणीही अश्रू ढाळणार नाही. पण हिंदू बहुसंख्यांक असलेल्या देशाच्या राजधानीत मुस्लिम महिला हमरस्ता अडवून बसल्या व त्यांनी एकूण जनजीवन ठप्प केल्यावरही त्यांना उठवायला जाणार्‍या पोलिसांना हिंदूंनीच केलेला छळ ठरवले जाते. ह्यातून हिटलरची मनोवृत्ती डोकावत असते. ती भारतातल्या भाजपा विरोधी व हिंदू विरोधी संघटना व राजकीय पक्षांची कार्यप्रणाली आहेच. पण आता हळुहळू त्यात जगभरच्या मुस्लिम व ख्रिश्चन धार्मिक संघटनाही उतरलेल्या आहेत. जगभरच्या माध्यमे व प्ऱचार साधनांच्या कंपन्यांमध्ये चर्च व इस्लामी राज्यकर्त्यांनी पैशाची मोठी गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच बळावर असा अपप्रचार प्रतिष्ठापुर्वक चाललेला असतो. आता त्याचा जाच तुलसी सारख्या नवहिंदू अमेरिकन महिलेलाही जाणवू लागला असेल, तर बाकीच्या जुन्या वांशिक हिंदूंनी काय करायचे? इथल्या खोट्या घटनांवर भारताला व हिंदूंना सहिष्णूता शिकवणार्‍या अमेरिकेत तरी कितीजणांना केवळ हिंदू म्हणून प्राण गमवावे लागलेले आहेत? त्याची अशा माध्यमांनी वा बुद्धीजिवी पत्रकारांनी दखल घेतली आहे काय? कसे घेणार? हिटलरच्या जमान्यात वा कारकिर्दीत ज्युंचे छळ चालले असताना त्याच्या आशीर्वादाने आणि पुरस्काराने चाललेल्या कुठल्या माध्यमांनी त्याचे वर्तमान जगाला सांगितले होते? हिटलरचा राजकीय पक्षही समाजवादी होता, आजचे पुरोगामी त्याचेच वंशज निघाले तर नवल कुठले?

7 comments:

  1. Atyant parkhad vishleshan, very true, thank you, thank you, thank you.

    ReplyDelete
  2. हा खूप मोठा व्यापक कात आहे.. हिटलर नि सांगितल्या प्रमाणे खोटं मनावर बिंबवून ते खरं वाटण्यास लोकांना परावृत्त केले जात आहे..

    ReplyDelete
  3. पूर आलेल्या नदीच्या या किनारपट्टीवर असावे नाहीतर पलिकडे तरी असावे. ' पूर आलेलाच नाहीये', असे म्हणत जे नदीपात्रात उतरतात, ते मरणार हे निश्चित असते. पूर थांबवायचा प्रयत्न करणेही व्यर्थ असते. निसर्ग साफसफाई करतोच.

    ReplyDelete
  4. भाऊ, इथला बहुसंख्य समाजा बरोबर जे होतय त्याला हा "बहुसंख्य समाजातील जयचंद" जबाबदार आहे,
    त्यांना माझं घर माझी मुलं या उपर काही सुचत नाही. स्वधर्म म्हणजे काय तो पुढच्या पिढीला फायदेशीर व्हायला मी आज करायला हवं याची सुतराम कल्पना नाही
    म्हणून यांच्या सोबत जे होतय ते योग्यच होतय

    ReplyDelete
  5. भाऊ, हे जे चालले आहे ते भयंकर आहे. दिल्लीची दंगल कोण करत होते, का करत होते, आरपारची चिथावणी कोणी दिली सर्व उपलब्ध असूनसुद्धा तथाकथित पुरोगामी हिंदूनी दंगल घडवली हेच पटवण्याचा प्रयत्न करताहेत. गेला बाजार भाजपाच्या कपील मिश्राच्या चिथावणीखोर भाषेने दंगल पेटली हेच पटवण्याचा प्रयत्न चालू आहे. भाषा कोणती तर शाहीनबागेचा रस्ता खाली करा नाही तर आम्हाला खाली करायला यावे लागेल ही भाषा अनेक हिंदूची दुकाने, हिंदू शाळा, मंदीरे जाळणे, चाळीसपन्नास माणसे, पोलीस अधिकारी मारणे इतकी चिथावणीखोर खरंच आहे? पण हा विचार या हिंदू द्वेषाची कावीळ झालेल्या पुरोगाम्यांना सुचेल? नक्कीच नाही. पण आता प्रत्येक हिंदूने याचा विचार करावाच लागेल. सगळ्या जगातील मुठभर ज्यू एकत्र येऊन जर त्यांच्या सर्व शत्रूना पूर्णपणे नेस्तनाबूत करु शकतात जरब बसवू शकतात तर आम्ही हिंदू जागे कधी होणार १०० कोटींचे एक कोटी झाल्यावर की भारत सेक्युलरच्या नावाखाली मुस्लिम राष्ट्र झाल्यावर?

    ReplyDelete
  6. USA has reduced financial aid to Pakistan not because they have more inclination towards India, but they have just realized that more money needs to go to anti-India NGOs, it works better that way.

    ReplyDelete
  7. भाऊ, नेहमप्रमाणेच उत्तम लेख.
    परंतु आश्चर्य याचे की ह्या समस्त हिंदू अहितचिंतकांची हिटलर बरोबर तुलना करून आपण हिटलरचा अपमान कसा काय केलात? अहो हिटलर कमीत कमी जर्मनीचे गतवैभव, स्वाभिमान, साम्राज्य पुनः प्रतिष्ठित करण्यासाठी इरेस आला होता. एका राष्ट्रवादाचा जनक होता. त्याने भलेही इतर खूप वाईट आणि टोकाची भूमिका घेतल्या पण त्याचा कार्यकारण भाव हा राष्ट्र प्रेम हाच होता ज्यु विरोध हा त्याच्या कार्याचा एक भाग होय. परंतु इथे हिंदू विरोध हेच मुख्य कार्य झाले आहे. काहीही करा, हिंदू विरोध हा झालाच पाहिजे, कसेही करा पण हिंदूंची निंदा नालस्ती होणे ह्या समाज घटकाला अपरिहार्य झाले आहे.
    तसा हिंदू समाज अतीव शोशिककच म्हणा. कोणीही यावे आणि टपली करून जावे, यांची समाधी भंग होणार नाही. पण यालाही काही मर्यादा आहेत याची जाणीव आता इतरांनी ठेवायला हवी. जेव्हा हिटलरचा उदय होतो तेव्हा कुठेतरी एक चर्चिल दबा धरून असतोच की.. न जाणो आत्ताही अशीच स्थिती असेल. हिंदूंनी सहिष्णुता नक्कीच सोडायला नको पण प्रतिकार तर करायलाच हवा.
    बरं हे सर्व का चालले आहे? केवळ धर्मयुद्ध? नक्कीच नाही..... या मागे कुठेतरी एक राजकीय व व्यावसायिक कारस्थान नक्कीच आहे, या भारत भूमिवर, तिच्या सर्व साधन संपत्तीवर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करायची आहे. कोणाची कारस्थानं चालली आहेत आणि त्यांचं भारतातील इतिहास काय आहे याचा विचार केला तर हे नक्कीच जाणवेल. आणि हिंदू विरोध? तो ह्याच्या साठी की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. मागिल काळात हिंदूंनी आक्रमकांना परतवले होते, विरोध केला होता. तो धोका आता यांना नको आहे.
    ज्यावेळी हिंदू कालानुरूप स्वतःच्या व्यावसायिक आणि राजकीय दृष्टीत बदल घडवतील, एक आस्था निर्माण करतील त्यावेळी नक्कीच कोणाचीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. हिंदू जागृत होऊ नये तसेच आपापसात तेढ निर्माण व्हावी यासाठीच इतर सर्व झटत आहेत. हिंदूंमध्ये व्यावसायिकता आणि राजकीय परिपक्वता येणे अतिशय महत्त्वाचे आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही. हिंदू हित संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, मग ते हित कोणतेही, कुठेही, कसेही असेना.

    ReplyDelete