Wednesday, August 29, 2018

जोडलेले जग, तुटलेली माणसे

संबंधित इमेज

एक बातमी काळजाला घरे पाडणारी वाचनात आली. पालघर येथे वास्तव्य असलेल्या एका पारशी वृद्ध जोडप्याची एकुलती एक मुलगी लग्न होऊन अहमदाबादला आहे. तिचे आईवडील खुप थकलेले आणि त्यांची देखभाल करायला कोणीच नाही, म्हणून नोकर आहेत. त्यापैकी आईचा अलिकडेच मृत्यू झाला, म्हणून शेजार्‍यांनी मुलीला कळवले. तर तिने पालघरला येणे अशक्य असल्याने अंत्यसंस्कार उरकून घेण्याचा शेजार्‍यांना सल्ला दिला. इतकेच नाही. अंत्यसंस्काराचा विधी आपल्याला व्हिडीओद्वारे दाखवायलाही सांगितले. बिचार्‍या शेजार्‍यांनी आपुलकीच्या नात्याने त्या मुलीची इच्छा पुर्ण केली. पण त्याहीआधी आई खुप आजारी असल्याने एकदा तिला शेवटचे बघायला यावे म्हणून पित्याने मुलीला फ़ोनवर सांगितले, तर मुलीने नकार दिला होता. कारण तेव्हा ती कन्या बाहेर कुठे फ़िरायला गेलेली होती. अंत्यसंस्कारासाठी तात्काळ येणे अशक्य असेल कदाचित. पण नंतरही दोन दिवसात मुलगी तिकडे फ़िरकली नाही. शेजार्‍यांनी तिला कळवण्याचा प्रयत्न केला असता तिने येण्याची गरज नसल्याचे सांगून संपर्क तोडला. या बातम्या अंगावर शहारे आणतात. कारण त्यातून आजच्या जगाचा वा माणूसकीतला विरोधाभास काळजाला घरे पाडणारा आहे. असे म्हणतात, की विविध साधने उपकरणे व संपर्काच्या व्यवस्थांनी जग जवळ आणले व जोडले गेले आहे. आपल्या जन्मदातीची अंत्ययात्रा दुरवरूनही मुलीला प्रत्यक्ष बघता आली, ही त्यातील जमेची बाजू नक्कीच आहे. पण त्यातली अलिप्तता वा त्रयस्थता भयभीत करणारी आहे. मुलीला आईविषयी कुठली आस्था वा माया नव्हती. एखादे थेट चित्रण प्रक्षेपण बघावे, त्यापेक्षा त्यात काही अधिक नव्हते. हेच त्या मुलीच्या वागण्यातून समोर आले. मग जग जोडले याचा अर्थ माणसे तुटली असाच नाही का होत? याला यांत्रिक तांत्रिक प्रगती म्हटले जाते. पण प्रत्यक्षात त्यातून रक्ताची नात्याची माणसेही तुटून गेलेली नाहीत काय?

असाच आणखी एक किस्सा आहे. मुंबईच्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांना एका बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने जगणे अशक्य झाले. ते घर दार वाजवूनही कोणी उघडत नव्हता. तर पोलिसांना बोलवावे लागले. त्यांनी दार फ़ोडून आत प्रवेश केला तर तिथे वास्तव्य करणारे वृद्ध गूहस्थ दोनतीन दिवस बेवारस मरून पडलेले आढळले. त्यांचा मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटलेली होती. मोलकरणीकडून नातलगांचा पोलिसांनी शोध घेतला तर त्यांचा मुलगा व सून परदेशी जाडजुड पगाराची नोकरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलाशी संपर्क साधला तर त्याला पित्याच्या अंत्यविधीला येण्यास सवड नव्हती. पोलिसांनी व अन्य शेजार्‍यांनी अंत्यविधी उरकून घ्यावेत. कारण आपल्याला कामातून सवड नाही, असे मुलाने सांगितले. फ़ार कशाला, आपल्याला पित्याच्या मालमत्तेतले काही नको. पोलिसांनीच त्याचीही विल्हेवाट लावावी, असे त्याने सांगून टाकले. ही दोन प्रसिद्ध झालेली प्रकरणे आहेत. पण भारतातल्या अनेक शहरातल्या शेकडो घरात असेच आज तुटलेले संबंध आहेत. आत्मियता आपुलकी माया हे शब्द शब्दकोषात शिल्लक राहिलेत. त्याला आपण प्रगती उन्नती अशी नावे दिलेली आहेत. माणसातला माणुसकी नावाचा अवयव जणू नामशेष होऊन गेला आहे. व्हीडीओ फ़ोन, नेटवर्क, ऑनलाईन हे शब्द आता आपल्या सार्वजनिक व व्यक्तीगत जीवनाचे अभिन्न अंग होऊन गेले आहेत. पण इतरांशी संपर्क साधताना आपण माणूस किती राहिलोय? उपकरणातून आपली नाती, प्रेम, भावना जोडल्या जातात. पण प्रत्यक्ष माणसाचा संपर्क सहवास आपल्याला नकोसा होऊन गेला आहे. आपण आजकाल सुखीसमाधानी व्हायचे विसरून गेलो आहोत. आपण आता आयुष्य एन्जॉय करतो. ते कसे करावे याचेही मार्ग कुणा कंपनीने ठरवलेले असतात. आपण नातीगोती, भावभावना असल्या मानवी जाणिवांना पारखे झालेले आहोत.

आयुष्यभर पालक आपल्या पुढल्या पिढीसाठी राबत रहातो. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि आपल्या आयुष्यात खावे लागलेले टक्केटोणपे मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून पालक आयुष्य खर्ची घालतो. पण जेव्हा त्याची परतफ़ेड करायची वेळ येते, तेव्हा मुले कुठे असतात? परदेशी वा अन्य कुठे दुर जाऊन वसलेली असतात. त्यांना आपल्याच जन्मदाते पालकांविषयी कुठलीही आत्मियता उरलेली नसते. त्यासाठी मुलांनाही दोषी मानण्याचे कारण नाही. भौतिक सुखांच्या अतिरेकाचे महात्म्य आपणच त्यांना शिकवलेले रुजवलेले नसते का? ही स्थिती श्रीमंत पालक वा सुखवस्तु कुटुंबातलीच नाही. घडणारे गुन्हे वा विसंवादाकडे बघितले, तर माणसे आपले माणुसपण हरवून बसलेली दिसतील. कालपरवा मराठा मोर्चात सहभागी झालेला एक तरूण औरंगाबादला नदीत उडी टाकून मोकळा झाला. तेव्हा कोणी त्याला वाचवायला पुढे सरसावला नाही. उलट त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो घुसमटत मृत्यूशी झुंजताना, शेकडो सहकारी त्याचा जयजयकार करीत होते. व्हिडीओ घेण्यात मग्न होते. रस्त्यावर चौकात कुठे मुली महिलांची छेड काढली जाते वा अब्रु लुटली जाते. तेव्हा बघे उभे असतात, पण हस्तक्षेप करायची हिंमत कोणी दाखवत नाही. नंतर न्यायासाठी आवेशात आरोळ्या ठोकल्या जातात, हे आजकालचे संस्कार झालेले आहेत. आपण कशाला नसत्या भानगडीत पडायचे, हा कौटुंबिक सामाजिक संस्काराचा मूलमंत्र झाला आहे. मग दाभोळकरांच्या हत्येनंतर ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवले जातात. पण प्रत्यक्षात असाच कोणी भरगर्दीत किंवा चौकात मारला जात असताना पुढे येण्याची इच्छाही आपण गमावून बसलो आहोत. जे घरात होते, तेच समाजात इतरत्रही अनुभवायला मिळत असते. प्रत्येक बाबतीत सरकारने अमूक करावे, तमूक करावे अशी आपण आता मानसितता बनवल्याचा तो परिणाम आहे.

मध्यंतरी अशीच एक बातमी वाचनात आली. शाळेतून मुलांना समाजशिक्षण म्हणून कुठल्या वृद्धश्रमात भेटीसाठी नेण्यात आलेले होते. त्यापैकी एका विद्यार्थिनीला तिथे आपली आजीच बघून रडू फ़ुटले. त्या किशोरवयीन मुलीला तिच्या जन्मदात्यांनी कोणते संस्कार दिलेले आहेत? आजीला अन्य कुणा नातलगाकडे ठेवलेले आहे असे घरात तिला सांगण्यात आले होते आणि प्रत्यक्षात आजीला उचलून वृद्धाश्रमात भरती करण्यात आलेले होते. आपल्याच जन्मदात्यांनी स्वत:च्या आईला कुठल्या दुर्घर जागी आणून बेवारस फ़ेकून दिलेले आहे, हे अनुभवणार्‍या त्या मुलीला कुठल्या आपुलकी वा मायेचे संस्कार मिळत असतील? आणखी दहापंधरा वर्षांनी तिचेच जन्मदाते वृद्ध होतील, तेव्हा त्यांच्याशी कसे वागावे, याचे धडेच यातून मिळत नसतात काय? जगण्यातल्या गरजा आणि चैनमौज यातला फ़रकच पुसट होऊन गेला आहे. अमूकतमूक गोष्ट आवडली म्हणून हवी असते आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करायची गरज वाटेनाशी झाली आहे. आपल्यापाशी नसेल आणि हवीच असेल तर हिसकावून घ्यावी, किंवा कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने ती मिळवावी. त्यासाठी चोरी करावी किंवा मुडदाही पाडायला हरकत नाही. हा स्वभाव किंवा संस्कार बनत गेला आहे. घरात गैरलागू मार्गाने मिळवलेले पैसे, लाचखोरी याविषयी इतके उजळमाथ्याने बोलले जात असते, की चांगुलपणा हा मुर्खपणा असल्याची समजून नकळत मनावर बिंबवली जात असते. आपल्या भावना, इच्छांना प्राधान्य देताना इतरांच्या गरजा, हक्क वा भावनांची पायमल्ली करण्याला चतुराई मानले जाऊ लागले आहे. मग त्याचे असे विकृत परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असतात. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्याला इतरांना समजून घेऊन सुखदु:खात सहभागी होऊनच जगणे भाग असते, हे आपण आता विसरून गेलेले आहोत.

सहाजिकच अशा बातम्या कानावर येतात किंवा वाचनात येतात, तेव्हा आपल्या अंगावर शहारा येत असतो. वाहिन्यांवरच्या मालिका बघून त्यातले मानवी संबंध बघून डोळ्यात अश्रू येतात. पण ते किती खरे आहेत? कारण कमीअधिक तशीच परिस्थिती घरोघर पसरलेली आहे. आपण आत्मकेंद्री माणूस होत चाललो आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून मग एका मर्यादेपर्यंत आपल्याला नातीगोती हवी असतात. जेव्हा ती नाती जबाबदारी वा कर्तव्याचा बोजा घेऊन समोर येऊ लागतात, तेव्हा पहिल्या फ़टक्यात ती तुडवायला आपण सज्ज असतो. मालमत्तेसाठी सख्ख्या भावंडांनी पाडलेले मुडदे वा आईबापांची केलेली फ़सवणूक, ह्या गोष्टी आता नित्याच्या होऊन गेलेल्या आहेत. पण कधीतरी आपल्यालाही अगतिक होऊन कोणाकडे तरी आशाळभूतपणे बघावे लागेल, याचे भान सुटलेले आहे. पुर्वी शंभर वर्षे जगू आशा कल्पनेने लोक आयुष्याकडे बघत होते आणि नातवंडे सोडा पतवंडेही बघायची इच्छा बाळगून जगायचे. आज अनेकांना नातवंडाचे तोंड बघायलाही अगतिक व्हावे लागते. प्रत्येकजण आजच्या पुरता मनसोक्त जगायला इतका उतावळा झालेला आहे, की त्याला कालची फ़िकीर नाही आणि उद्या उजाडणार नाही, असाच समज झाला आहे. त्यातून ह्या दुर्दैवी घटनांच्या सापळ्यात आपण गटांगळ्या खाऊ लागलो आहोत. म्हणून अशा बातम्या वाचून आपल्या काळजात चर्र होते, परंतु असेच काही आसपास घडत असताना आपण नामानिराळे असतो. दिसत असूनही डोळे झाकून घेत असतो. ते भयंकर असले तरी आपल्या जवळपास येणार नसल्याची समजूत आपल्याला अधिकच बेफ़िकीर बनवत असते. तो अमेरिकेतला मुलगा आणि ती अहमदाबादची मुलगी आपल्या अंतरंगातही दबा धरून बसलेली असते. आपण डोळे उघडून त्यांच्याकडे बघायची हिंमत करू शकत नाही. कारण जग जोडताना माणसे तुटत गेली आहेत आणि जग माणसांनी बनलेले आहे, त्याचाच आपल्याला विसर पडला आहे.

8 comments:

  1. भाऊ .........!! गेल्या ५ ते ६ वर्षात परिस्थिती अजूनच बिघडली आहे. पनवेल , पुणे येथील ' वृद्धाश्रमात ' राहणारे लोक बघितले तर प्रत्येकाची वेगळी कहाणी आणि अशीच काळजाला ' घरे पाडणारी ' सर्वात जास्त कुचंबणा होते ती या वृद्ध दाम्पत्यातील एकजण गेल्यावर उरलेल्याचे हाल कुत्रा खात नाही. अशाच एका वृद्धाची मुलाखत बघत असताना त्या वृद्धाला आपल्या स्वतःच्याच मुलाबद्दल ' वाईट ' बोलणे जड जात होते. सतत डोळ्यातून अश्रुधारा. वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध बघितले की एकाच विचार येतो तो म्हणजे हे सर्व लोक त्यांच्या मरणाची ' आतुरतेने ' वाट पाहत आहेत की काय ?? मुले म्हाताऱ्या आईबापांना झिडकारतात हे ऐकले होते पण मुलीसुद्धा अशा प्रकारे वृद्ध आई बापानं झिडकारू लागल्या आहेत हे बघून अंगावर काटा येतो. काही वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध छायाचित्रकार ' जगदीश माळी ' हे असेच भणंग अवस्थेत निवर्तले तेंव्हा त्यांची अभिनेत्री मुलगी ' अंतरा माळी ' हिनेही जगदीश माळीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी धुडकावून लावली होती. आजूबाजूला अशा अनेक जोडपी आहेत ज्यांची सर्व मुले परदेशामध्ये आहेत आणि अशी हे वृद्ध जोडपी भारतातच स्वतःचे आयुष्याचे उर्वरित दिवस ढकलताना दिसतात.

    ReplyDelete
    Replies
    1. बापरे, जगदीश माळी यांच्याबद्दलची हिं गोष्ट माहिती नव्हती.

      Delete
  2. भाउ खरय आपल्या समाजा हा भयावह पैलुची चर्चा कोणी करत नाही

    ReplyDelete
  3. Bhawu, He etake saral dhopat nahiye. apalyala ekach baju disate ki aai-wadilanna mulanni takale. parantu dusari baju bagha. 1) Mulanna ka janm dyayacha? hyacha koni wichar kela ahe ka? kharokhar fakt mhatarpanachi kathi mhanun ki nisarg niyaman mhanun? 2) aai-wadil lok swatahachya mulanna kiti chalatat hyacha koni wichar kelay ka? Swatahachya apeksha mulanni purna karawyat mhanun tyanna kiti chalayache? kiti dabaw takayacha? tya mulanchi tewadhi kshamata ahe ka? kimanpakshi swatahachi tewadhi kshamata ahe ani hoti ka? manasache ayurman prachand wadhalay ani barechase khayala kaal ani bhueila bhaar ahet. 80 warsha jagatana apalyamule bakichyanna kay zelawe lagate hyacha koni wichar kelay ka? bakiche prani jiwan saral saral sodun dewun maratat. apalyach Hindu dharmat Wanprasthashram sangitlaay. tyacha wapar koni karatay ka? apalya TV war gele don dashake hidis ashya kautumbik malika lagatat tyat satat ek mekanwar kurghodi karanarich patre ahet. purvi mala prachand raag yayacha. pan halli wichar karatana ase watate ki he samajache ek prakarche pratibimbach ahe. te nakarun kase chalel? fakt aai-wadilanchi kalaji ghetali nahi pan tya sathi mulanni tyanchi umedwarichi warshe kaa waya ghalawawit? tyanchya sagalya echha apeksha marun takayachya ka? hyachawar ekada uhapoh zala pahijel. fakt ekach ekangi chitra dharun honar nahi. khare mhanje durun jivhala japata yeto pan tewadhi maaya lawawi lagate he kiti wrudhhanna samajate. apalya waganya mule apan lokanna kay tras dilay hyachi janiv ahe ka? ajubajula je chalale ahe tyatune mala he disale.
    shiway sadhya palakach apalya mulanna prachand ani wichitra spardhet dhakalat ahet. jyaat 2-3 flats, 2-3 cars, uttam kapade ani 2-3 warshakathi sahali baher wa bharatatach zalya pahijet. he sagale kamawanyasathi wel ahe ka? he sagale karun punha gharachyankade baghayache? kahitari ek sutanar ahe. purvi chanchauki navhati pan striyanna prachand tras zala mhanun ektra kutumb tikale ani hyat purushancha fayada, me swataha ek purushach ahe ani hyacha purva fayada milalay, pan tenvha gharachyanakde baghata yaayche. ata baki ahe pan wel nahiye. tenvha kalay tasmai namaha. Less is beautiful nawache ek pustak ahe. sarvanni jaroor wachawe. pan tumacha lekh ekach gosht dakhawatoye dusari baju durlakshit keli jatiye. mhanunach kitihi watale tari lok apalyala je soyiskar ahe tech karatayat.

    Chaitanya

    ReplyDelete
    Replies
    1. You have a point mate...

      My experience with elder people has been exceptionally good. But I can't help thinking that I might be more fortunate than others. 🙏

      Delete
  4. संस्कृती असण्याची खरी गरज अशावेळी कळते.

    ReplyDelete
  5. खरं आहे भाऊ. मुलांना ऐशोरामी आणि अय्याशी बनवायला आपणच कारणीभूत आहोत. भौतिक सुख मिळवायच्या नादात मुलांवर संस्कार करायचेच आपण विसरून गेलोय.

    ReplyDelete
  6. My view ...

    आपण मुलांना जन्म देतो तेव्हा त्यांची permission घेतो का? नाही ! त्यांचा जन्म ही पूर्णपणे आपली आणि फक्त आपली जबाबदारी असते । तेव्हा we are accountable to them. They are not accountable to us.
    We must behave with them as such and be fully responsible to train them likewise...
    We might succeed or fail in this endeavor, but that is life.
    My view only... 🙏

    ReplyDelete