Saturday, August 4, 2018

बफ़र्स आणि बोफ़ोर्स



आजही आपण बालेकिल्ला हा शब्द सहजगत्या वापरत असतो. आता किल्लेच राहिलेले नाहीत वा उपयोगाचे राहिलेले नाहीत. तर बालेकिल्ला तरी काय कामाचा? पण भाषेतले असे शब्द कायम टिकून असतात. ते त्यातल्या संदर्भासाठी. किल्ल्यावरून राजकारण चालायचे आणि युद्ध जिकले वा पराभूत केले जायचे, तेव्हा बालेकिल्ला अतिशय महत्वाचा असायचा. कारण सैन्याचा प्रमुख वा राजा तिथे सुरक्षित असायचा. शत्रूचा हल्ला आलाच तर आधी बुरूजावरून त्याचा प्रतिकार केला जायचा. शत्रू आपले तोफ़गोळे व हल्ले बुरूजा्वर करायचा आणि राज्याचे सैनिक बुरूज टिकवून लढायचे. पण एखादा बुरूज ढासळला, मग घुसलेल्या शत्रूशी किल्ल्यातच हाणामारी सुरू व्हायची. पण सेनापती राजे बालेकिल्ल्यात सुरक्षित असायचे. अशा व्यवस्थेला बफ़र्स म्हणातात. म्हणजे जिथे नाजूक वा महत्वाची जागा आहे, तिथे धक्का लागणार नाही यासाठी केलेली व्यवस्था. मोठा धक्का वा हल्ला या बफ़र्स व्यवस्थेने सोसायचा आणि मुख्य ठिकाण वा यंत्रणेला नुकसान होऊ द्यायचे नाही. रेल्वेत आपण जोडलेल्या डब्यांना एकमेकांवर आदळण्यापासून रोख्णारी बफ़र्सची व्यवस्था आजही बघतो. जेव्हा गाडीला अकस्मात ब्रेक लागतो वा असे डबे जोडले वेगळे केले जातात, तेव्हा आपल्याच गतीने ते रुळावरील अन्य डब्यांवर जाऊन आदळण्याचा धोका असतो. तर त्यांची गती रोखून त्यांना थाबवण्याची यंत्रणा म्हणजे बफ़र्स. दोन देशांच्या मधे एखादा छोटा देश वा प्रदेश असतो, त्यालाही असेच बफ़र्स स्टेट म्हटले जाते. आजच्या राजकारणात नेत्यांना राजकीय हल्ल्यातून सुरक्षा मिळावी म्हणून अशीच कार्यकर्ते, नेते वा प्रवक्ते यांचे बफ़र्स योजलेले असतात. विरोधकांचा आकस्मिक हल्ला आला, तर त्यांनीच तो अंगावर घ्यायचा असतो आणि नेत्याला त्याचा धक्काही लागू द्यायचा नसतो. पण असे बफ़र्सच नुकसान करू लागले तर? कॉग्रेसचे बफ़र्स नेमके तसेच काम हल्ली करताना दिसतात.

बफ़र्स निकामी झाले, मग रेलगाडीचे नुकसान होतेच आणि त्यातल्या प्रवासी किंवा सामानाचे रुळावर गाडी असूनही भीषण नुकसान होत असते. आजच्या कॉग्रेसची जी दुरावस्था दिसते, त्याचे नेमके तेच कारण आहे. या शतायुषी राजकीय पक्षामध्ये जी बफ़र्स व्यवस्था योजलेली आहे, ती बाहेरून येणारे हल्ला थोपवणे वा पहिला धक्का आपण सोसणे, याच्या पलिकडे गेलेली आहे. उलटा बाहेरून येणारा हल्ला रोखण्यापेक्षा हे बफ़र्स स्वत:च असे काही पराक्रम विक्रम करीत असतात, की त्यातूनच कॉग्रेस पक्षाचे अधिक नुकसान होते. याच बफ़र्समुळे पक्षाला हानिकारक धक्के बसत असतात. आधुनिक कालखंडात विचारांचा प्रचार हे लढाईचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून मोठी राजकीय लढाई चालते. त्यासाठी विविध पक्ष, प्रसार माध्यमांच्या सतत संपर्कात असतात आणि जमेल तशी आपापली मुखपत्रेही चालवित असतात. प्रत्येक पक्षाचे लहानमोठे मुखपत्र असते आणि त्यांच्या विभागवार शाखांचीही मुखपत्रे असतात. काही पत्रे अनधिकृत म्हणून पक्षाच्या बफ़र्सचे काम करतात. कॉग्रेसच्या मुंबई शाखेचेही एक मुखपत्र आहे आणि दिड वर्षापुर्वी त्याच मुखपत्राने सोनिया गांधी वा नेहरू घराण्यावर शेलक्या शब्दात लिखाण केलेले होते. त्यावरून खुप काहूर माजलेले होते. साधारणपणे जे आक्षेप सोनिया वा राहुल यांच्यावर घेतले जातात, त्याचाच उच्चार या नियतकालिकाच्या लेखातून झाला होता. मग त्याच्या सर्व प्रती मागे घेण्यात आल्या. पण ते मुखपत्र चालविणारा प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम आजही मुंबई कॉग्रेसच्या अध्यक्षपदी कायम आहे. थोडक्यात त्या बफ़र्सची डागडुजी करायचेही कारण पक्षनेत्यांना समजलेले नाही. मध्यंतरी असेच एका कार्यक्रमात मुंबई कॉग्रेसमध्ये संघाच्या प्रार्थनेचे गीत अगत्याने वाजवण्यात आले आणि गदारोळ झालेला होता. असे सातत्याने कशाला होत असते? या लोकांना आपले काम तरी नेमके ठाऊक आहे काय?

स्वातंत्र्योत्तर काळात पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉग्रेसचे सर्वेसर्वा होते आणि भविष्यात पक्षाची दैनंदिन बाजू लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणून त्यांनी नॅशनल हेराल्ड नावाचे एक दैनिक सुरू केले होते. मध्यंतरीच्या काळात ते बंदही पडले. मग त्याच्या देशाच्या विविध भागात असलेल्या मालमत्ता कब्जात घेण्यासाठी पक्षाचा निधी बेछूटपणे वापरून सोनिया व राहुल यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याचा खटला सध्या न्यायालयात पडून आहे. तर तो घोटाळा झाकण्यासाठी हे बंद पडलेले दैनिक नव्याने सुरू करण्यात आले. थोडक्यात त्याला कॉग्रेसचे मुखपत्र किंवा प्रसार माध्यमातील कॉग्रेस नेतृत्वाचा बुरूज वा बफ़र्स म्हणता येईल. त्यातून आपल्या नेतॄत्वाने घेतलेली भूमिका व धोरणांचे समर्थन करणे अपेक्षित आहे. शक्यतो नेतृत्वावर होणार्‍या आरोपांना परतून लावणे, हेच त्याचे कर्तव्य आहे. पण कालपरवा नॅशनल हेराल्ड दैनिकाने पत्रकार जगताला मोठाच धक्का दिला. रेल्वे रुळावरचा निसटलेला डबा मोकाट घसरत सरकत जावा, तशी या दैनिकाची हेडलाईन येऊन राहुल गांधी व गांधी घराण्यावर आदळली. बोफ़ोर्स घोटाळा हे गेली तीन दशके कॉग्रेस आणि गांधी घराण्य़ासाठी अवघड जागीचे दुखणे झालेले आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी लष्करासाठी जी बोफ़ोर्स तोफ़ांची खरेदी केली, त्यात करोडो रुपयांची दलाली उकळली गेली असा आरोप झाला. पुढे त्यात कॉग्रेस बुडाली, त्यानंतर कॉग्रेस पक्षाला उठून पायावर उभे रहाणेही शक्य झालेले नाही. सहाजिकच मागल्या तीन दशकात बोफ़ोर्स हा शब्दही कॉग्रेस पक्षात उच्चारला जात नाही. आसपास कोणी बोफ़ोर्स असे म्हटले, तरी कॉग्रेस निष्ठावान अंगावर झुरळ पडल्यासारखे अंग झटकून टाकतात. अशा कॉग्रेसच्या मुखपत्रामध्ये मोदी सरकारच्या राफ़ेल खरेदी म्हणजे बोफ़ोर्स घोटाळाची पुनरावृत्ती असल्याचे विधान छापून येण्याने काय झाले असेल?

नुकता़च संसदेत अविश्वास प्रस्ताव येऊन गेला. त्यात मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नानाविध आरोप झाले आणि निंदाही झाली. कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यात राफ़ेल विमान खरेदीत मोदी सरकारने घोटाळा केल्याचा दणदणित आरोप करून धमाल उडवून दिली. तर त्यांना तिथल्या तिथे चोख उत्तर देऊन संरक्षण खात्याच्या मंत्री निर्मला सीतारामन, यांनी आरोपाच्या ठिकर्‍या उडवल्या. नंतर काही वाहिन्या व वर्तमानपत्रांनी या खरेदीतले इतर तपशील समोर आणुन राहुल गांधीच्या आरोपातला पोकळपणा व निरर्थकताही जगासमोर आणली. पण म्हणून राहुल गप्प बसलेले नाहीत. त्यांनी राफ़ेल संबंधात धडधडीत खोटे आरोप चालूच ठेवले. बहुधा आपण राहुलपेक्षाही अधिक राहुलनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्याची हेराल्ड संपादकाला खुमखुमी आलेली असावी. अन्यथा त्यांनी कॉग्रेसला बुडवणार्‍या बोफ़ोर्सचा उल्लेख राफ़ेल संदर्भात कशाला केला असता? ‘राफ़ेल हे मोदींच बोफ़ोर्स आहे’ असा मथळा या दैनिकाने दिला आणि प्रसार माध्यमांसह सोशल माध्यमांच्या भुवया ताणल्या गेल्या. कारण बोफ़ोर्स हा घोटाळा असल्याची ही अप्रत्यक्ष कबुलीच झाली ना? तो संपादक वा संबंधितांचा मुर्खपणा आहे, यात शंका नाही. पण आपल्या पाठराखणीसाठी असे नामचिन अक्कलशून्य आणुन बसवणार्‍या पक्षाध्यक्षांचे काय? त्यांना बफ़र्स आणि बोफ़ोर्स यातलाही फ़रक कळत नसेल काय? असता तर संजय निरूपम किंवा हेराल्डच्या संपादकांसारखे नग त्यांनी कुठून शोधून आणले, असा प्रश्न पडतो. अर्थात हा त्या एका संपादकापुरता विषय नाही. विविध वाहिन्यांवर कॉग्रेस प्रवक्ते म्हणून झळकणारे नमूनेही लक्षणियच असतात. त्यांना निदान बफ़र्स व बोफ़ोर्स यातला फ़रक समजावून देण्याचे कष्ट कोणीतरी घ्यायला हवेत. पण पक्षाध्यक्षच सतत हवेत असले, माग कार्यकर्ते पाठीराख्यांचे पाय जमिनीला कसे लागायचे?

4 comments:

  1. भाऊ महाराष्ट्रात पण असे अडचणीत आणणारे काँग्रेस बफर काही कमी नाहीत ,कालच्या निवडणुकांचं त्याच उदा आहे . २ मोदीविरोधी चॅनेल वगळता सर्वजण सांगलीचे निकाल व्यवस्थित सांगत होते ,निकाल उशिरा येत असल्याने चॅनेलनी चर्चा घेतली नाही ,पण अतिउत्साही काँग्रेसशी पत्रकार आधीचे निकाल आघाडीला अनुकूल येत असताना चक्क ४ तास विश्लेषण करत बसले होते,आणि कहर म्हणजे त्या चर्चा बरोबर ठरविण्यासाठी score बोर्ड पण तसाच ठेवला होता पण बाकीचे चॅनेल बदलणारे निकाल दाखवत होते ,आणि शेवटी तासंतास चाललेल्या पुरोगामी चर्चा पोकळ ठरल्या ,त्या चॅनेलनी प्रेक्षकांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे

    ReplyDelete
  2. जिथे मुख्य राजाच स्थिर नाही त्या बफर ची काय कथा ,राहुल २ दिवसापूर्वी आजारी करुणानिधींना भेटायला गेले होते ,त्या भेटीचं icu मधील फोटो त्यांनी ट्विट केला त्यात ते चक्क हसतायत ,मग ट्विटर वर लोकांनी असा पहिलीच वेळ नसल्याचे फोटो टाकले ,पंजाब CM च्या मातेच्या निधनावेळी ,जयललितांच्या पार्थिवासमोर ,आणि एक दिवंगत काँग्रेस नेत्या च्या विधवा पत्नीसमोर तर ती रडत असताना राहुल हसत असणारा फोटो आहे .लोकसभेत मिठी मारून झाल्यावर डोळा मारण्याची घाई अशा घटनांतून ते नेता सोडा मानसिक दृष्ट्या ठीक आहेत कि नाही याच प्रश्न लोक विचारू लागलेत. राहुलच्या माताजी काही खरं सांगणार नाहीत ,मोदीना पण असलाच विरोधक हवाय त्यामुळं ते हि यावर बोलणार नाहीत ,लोकांनी काय ते ठरवायचं हल्ली social मीडिया मुळे काहीच लपविता येत नाही

    ReplyDelete
  3. Bhau
    It means they accepted Bofors was their Scam. :-) :-)

    ReplyDelete
  4. 'डफर' नेतृत्वाच्या हाताखाली असेच कुचकामी 'बफर' तयार होणार

    ReplyDelete