Thursday, October 11, 2018

शिवसेनेने काय मिळवले?

मतचाचणी विश्लेषण (४)

Image result for uddhav   cartoon

मागल्या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाने युती मोडली व एकहाती शत-प्रतिशत सत्ता बळकावण्याचा कावा केलेला होता. त्यासाठी जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला गाफ़ील ठेवून खिंडीत गाठलेले होते. ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होईपर्यंत जागावाटप झाले नाही आणि युती तुटल्यावर शिवसेनेला सर्व जागी उभे करायला उमेदवारही मिळवताना मारामार झालेली होती. उलट भाजपाने अन्य पक्षातून आधीच बलदंड उमेदवार आणून सर्व जागा लढवायची पुर्ण तयारी केलेली होती. फ़क्त उमेदवार जाहिर करायची खोटी होती. पण त्यातूनही शिवसेनेची जमेची बाजू अशी होती, की सदिच्छा तिच्या पाठीशी होत्या. म्हणूनच प्रथमच सर्व जागा लढवण्याची वेळ आली असताना व बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत सेनेने मिळवलेली मते व जागा हे दैदिप्यमान यश होते. पण आपल्या यशाकडे बघण्यापेक्षा सेना नेतृत्व युती तुटल्याच्या नाराजीतून बाहेर पडू शकले नाही. त्यामुळे मिळालेली मते व जागांचा राजकीय डावपेचांसाठी तिला वापर करता आला नाही. उलट सतत कुरबुर करण्यात मागली चार वर्षे खर्ची पाडताना सेनेने मिळालेल्या सदिच्छाही मोठ्या प्रमाणात गमावल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब नंतरच्या स्थानिक जिल्हा व पालिका मतदानात पडलेले होतेच. अगदी अलिकडेच त्याची साक्ष जळगाव आणि सांगली पालिकांच्या मतदानातून मिळाली होती. पण आता त्याच्यावर एका मतचाचणीतून राज्यव्यापी शिक्कामोर्तब झाले आहे. कळीची गोष्ट अशी आहे, की भाजपाला अपशकून करण्याच्या नादात सेनेने आपल्यालाच अपशकून करून घेतला आहे. कारण या चाचणीत सेनेची घटणारी मते तशीच्या तशी भाजपाकडे वळताना दिसत आहेत. अर्थात त्याची नेतृत्वाला फ़िकीर असेल असे वाटत नाही. चुका मान्य केल्या नाहीत मग त्यातून बाहेर पडता येत नाही आणि सावरण्याचा विचारही मनाला शिवत नाही.

मागल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा एकत्र लढले होते आणि त्यात सेनेने एक कोटीहून अधिक मते मिळवलेली होती. वेगळे लढताना जवळपास तितकीच मते सेनेने स्वबळावर पुन्हा मिळवली. मतदार युतीशिवायही सेनेला प्रतिसाद देत असल्याचे संकेत दिले होते. ते स्विकारून सेना नेतृत्वाने आपला राज्यभरचा मतदार घट्ट बंदिस्त करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती. थोडक्यात शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करून त्यातून मतदाराचा पाया विस्तारण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. पण नंतरच्या काळात शिवसेना चालवण्यापेक्षा पक्षप्रमुख व नेते भाजपाशी ‘सामना’ खेळण्यातच गढून गेले. परिणामी सेनेचा मतदार निराश होत दुरावत गेला. म्हणून मग कशीबशी मुंबईतली सत्ता टिकवताना ठाणे वगळता अन्य कुठल्याही महापालिकेत सेनेला आपले बळ सिद्ध करता आले नाही. मात्र या चार वर्षात मोदींना शिव्याशाप व भाजपाच्या नावाने शंख करताना संघटनात्मक शक्ती सेना गमावत गेली. त्यातच मान खाली घालून किरकोळ मंत्रीपदाच्या बदल्यात सेनेने सत्तेत सहभाग घेतला आणि काहीही कारण नसताना त्याच सरकारला शिव्याशापही देणे चालू ठेवले. त्याला धार येण्यासाठी कधीही राजिनामे देऊन बाहेर पडण्याच्या धमक्या इतक्या सतत दिल्या गेल्या, की तो एक हास्यास्पद विषय होऊन गेला आहे. भाजपाला दुखावण्यापेक्षाही आपला विस्तार व मतदारसंख्या वाढवण्याला महत्व असते. तेच भाजपाला वा अन्य कुठल्याही पक्षाला खराखुरा धडा शिकवू शकत असते. पण आजकाल शिवसेना ‘सामना’पुरती मर्यादित होऊन गेलेली आहे. म्हणूनच मतचाचणीच्या आकड्यात अन्य राज्यात मार खाणारा भाजपा, महाराष्ट्रात मात्र सेनेने साथ सोडल्यावरही शिरजोर होताना दिसतो आहे. त्याचे कारण कॉग्रेस वा राष्ट्रवादीची मते घटत नसून शिवसेनेची मतेच भाजपा गिळंकृत करताना दिसतो आहे. तो खरा धोक्याचा इशारा आहे.

लोकसभा वा विधानसभा अशा दोन्ही निवडणूकांमध्ये शिवसेनेने युतीतून वा स्वबळावर १९ टक्के मते मिळवलेली होती. भाजपाला २७ टक्क्याच्या आसपास मते मिळाली होती. ती अन्य पक्षातून आलेल्या दांडग्या उमेदवारांमुळे मिळाली हेही कोणी नाकारणार नाही. पण आता ताज्या चाचणीत भाजपाला ३८ टक्के मते मिळताना दिसत आहेत आणि ही वाढलेली ११ टक्के मते नेमकी सेनेच्या खात्यातून घटताना दिसत आहेत. मागल्या दोन वर्षातल्या विविध मतदानात यंत्रावर दोषारोप झाले खरे. पण चाचण्यांमध्ये एव्हीएम वापरले जात नाही. त्यामुळे त्यातला संकेत महत्वाचा असतो. सांगलीत सेनेला एकही नगरसेवक मिळवता आला नाही आणि जळगाव सेनेच्या सुरेश जैनांचा आजवरचा बालेकिल्ला भाजपाने एकहाती जिंकला आहे. हे अपयश वाटत नसेल, तर मतचाचणीचे आकडेही समजून घेणे अशक्य आहे. त्यावर आगपखड करायची मोकळीक आहे. पण तशी करून मते वाढण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यापेक्षा अवघ्या सात आठ वर्षात मनसेचे नुकसान कशाला होऊन गेले, त्याचा सेनेने गंभीरपणे अभ्यास करणे उपयुक्त होईल. २००९ मधल्या निवडणूकांमध्ये सेनेतून बाजूला झालेला गट म्हणून राज ठाकरे यांना मतदाराच्या शुभेच्छा मिळू शकल्या होत्या. ती मते आपला अधिकार मानून चालत नाही. त्या सदिच्छांचे हक्कांच्या मतामध्ये रुपांतर करण्यासाठी पुढली पाच वर्षे झटावे लागते. तर ती पक्षाची ताकद होते आणि नवी मते वा सदिच्छा मिळवून प्रगती करता येत असते. मनसेला ते करता आले नाही आणि २०१४ च्या निवडणूकीत त्या पक्षाचा सफ़ाया झाला. आज मनसे तसा बातमीपुरता उरलेला पक्ष झाला आहे. मागल्या चार वर्षात हळुहळू करत शिवसेनेच्या नेतृत्वाने राज ठाकरे यांचीच नक्कल करण्यात धन्यता मानली आणि ताजी मतचाचणी शिवसेनेची मनसे होताना दाखवत आहे.

युती तुटली हे चुकच होते. पण त्यानंतर सत्तेत सहभागी झाल्यावर सतत कुरबुरत राहून सेनेने काय मिळवले? मनसेने आधीच्या पाच वर्षात शिवसेनेला डिवचण्यातच धन्यता मानली होती. त्याचे जे परिणाम झाले त्याचे प्रतिबिंब सेनेला चाचणीतल्या आठ टक्के मतात पडलेले दिसत आहे. असे काय पाप शिवसेनेने केले की त्यांच्याच खात्यातली अकरा टक्के मते भाजपाकडे जावीत? बाकी कॉग्रेस व राष्ट्रवादी आपली मते टिकवून ठेवताना दिसतात. त्यामुळे ३८ टक्के मतांवर भाजपा लोकसभेतील आपल्या २२ जागा टिकवण्याची शक्यता चाचणीने व्यक्त केली आहे. युती वेगळी व दोन्ही कॉग्रेस एकत्र लढल्यास भाजपाला १६ जागा तर सेनेला अवघ्या दोन जागा मिळू शकतात. म्हणजेच कुठूनही नुकसान शिवसेनेचे होते आहे? त्याचे काय कारण आहे? मते घटून वा मतदाराची नाराजी असेल, तर त्याचा मोठा फ़टका मुख्यमंत्री व पंतप्रधानाच्या पक्षाला बसला पाहिजे. पण तो मित्र पक्षाला बसत असेल, तर त्याची काही मिमांसा त्याच मित्र पक्षाला करावी लागेल. पण सत्याचा ‘सामना’ करायला जे तयार नसतात, त्यांना निकालच धडा शिकवू शकतात. अर्थात शिकायची तयारी असली तर उपयोग असतो. मनसेला अजून शिकता आलेले नाही. शिवसेना लोकसभा व विधानसभा निकालानंतरच विचार करू शकेल, अशी शक्यता आहे. मायावती अखिलेशना तसेच शिकता आले आणि राहुल वा कॉग्रेसला लागोपाठचे पराभवही काहीच शिकवू शकलेले नाहीत. शिवसेना कोणाचे अनुकरण करते त्याला महत्व आहे. पण ताजी सी-व्होटर मतचाचणी शिवसेनेने मागल्या चार वर्षात आपल्याच पायावर धोंडा पाऊन घेतल्याची साक्ष देते आहे. अर्थातच उद्धवनिष्ठ शिवसैनिकांना असली मिमांसा आवडणारी नाही. त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला तरी ते शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचे वाचून खुश होत असतात. त्यांना १९ टक्क्यावरून शिवसेना ८ टक्के मतांपर्यंत घसरण्यातली वेदना कशी उमजावी?

18 comments:

  1. परखड विश्लेषण भाऊ! शिवसेनेने सत्तेत राहुन रोज भाजपच्या नावाने शंख करुन पायावर धोंडाच पाडुन घेतला. जर बाहेर पडले असते तर कदाचीत काही आमदार बाहेर पडले असते पण भविष्यात फायदा झाला असता.किंवा वस्तुस्थिती मान्य करुन भाजपला एकदिलानं सहकार्य केल असत तर मताधार निश्चित वाढला असता.

    ReplyDelete
  2. लोकांची आपल्या बद्दल मते काय आहेत हे जाणुन घेण्यासाठी पुर्वी राजे-महाराजे सामान्य माणसाचा वेष धारण करुन नगरात फिरत असत; त्यामुळे जनता आपल्यावर संतुष्ट आहे कि नाही हे कळुन येत असे....उध्दवने पण असेच करायला पाहिजे होते पण ते संजय विंसबुन राहिले परंहा महाभारतातला संजय नाहि त्याने युद्ध भुमितली खरी स्थीती कधी उद्धवला सांगितलीच नाही.

    ReplyDelete
  3. अगदी सत्य विश्लेषण भाऊ . मी स्वतः भाजपने विधानसभेच्या वेळी शिवसेनेशी केलेल्या गद्दारपणामुळे नाराज होऊन पुढच्या वेळी फक्त शिवसेना लाच मतदान करायचे असे ठरवले होते. परंतु नार्वेकर आणि राऊत यांच्या नादाला लागलेल्या उद्धवने दरम्यानच्या काळात इतकी नाटके केली की आता शिवसेना नको रे बाबा म्हणायची पाळी आली आहे

    ReplyDelete
  4. भाउ हि दुश्मनी बघवेना पण.तेही इतक्या वर्षानी सत्ता मिळाली असताना खरच राजकारन फार क्रुर असत युतीचा मतदार अगदी भावनिकपने दोन्ही पक्षांशी जोडला गेलाय आणि एक या चाचनीत काॅंगरेसवा ११ जाागा कशा काय दाखवल्यात राज्यात कुठलया भागात तो पक्ष एवढा सक्षमआहे?ना नेते आहेत ते फक्त गांधीचे परीवारतील आहेत दोन्ही चव्हाण देशमुख बाकी कोन राहीलय?

    ReplyDelete
  5. परखड विशश्लेषण भाऊ! सत्तेत राहुन रोज भाजपच्या नावाने बोंब मारण्याने आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतला.नपेक्षा त्यांनी एकदिलानं साथ दिली असती तर झालेल्या कामांच श्रेय मिळुन मताधारही वाढला असता. ते करायच नव्हत तर सरकार मधुन बाहेर ताठ मानेनं पडायला हव होत, मग भले काही आमदार बाहेर पडले असते तरी स्वाभिमान टिकला असता व येणार्या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा झाला असता.

    ReplyDelete
  6. भाऊ, सेना सद्धया ‘कारभाऱ्यांच्या’ सल्ल्यावरून चालतेय. हे कारभारीच सेनेला बुडवणार. कॅांग्रेसचे जसे ‘किचन कॅबिनेट’ असते तसे सेनाप्रमुखांभोवती कारभाऱ्यांनी एक अभेद्य कॅबिनेट उभे केले आहे.

    ReplyDelete
  7. शिवसेनला भाजप सोडून कोणीही थारा देत नाही. आम आदमी पार्टी आणि शिवसेना यांना इतर कोणत्याही आघाड्या भिक घालत नाही. कोणाशीही व्यक्तिगत मैत्रीचे संबंध नाहीत.

    ReplyDelete
  8. Bhau kalkal vatte ho shivsenechi duravstha pahun.karan ajunhi vatte ki ha paksh Balasahebani Nirman kelela ahe.aakha ayushya vechal tyani tyasathi. As vatat ki tumcha lekh jaun udhojinchya hati dyava,pan te samna khelnyat dang ahet.vait vatte ho shivsenechi vatahat hotahat hot asleli pahun. Naval vatat ki shivsenene apple Shatru Congress v rashtravadila sodun bhajpla kelay. Thik ahe rajkarnat te manyahi asel pan tyalahi Kahi vel kal asto. Tyana mahit nahi jantechya manatil bhajpache garud ajun utarle nahi.tyani sandhichi vat pahayla havi hoti.pan sallagar mandal sadhya far jorat ahe. Tyamule sudharnyachi shakyata far kami vatte.jar he asech chalu rahile tar mala vatte ki shivsena hindutva sodun Rashtravadhich sodun dya pan Mim la pan sobat gheil.

    ReplyDelete
  9. असं तर नाहीये की २०१४ मध्ये शिव सेनेला मिळालेली अधिकतम मते ही मराठी माणसानं बाळा साहेबांना केलेला एक शेवटचा सलाम होता ? आणि या पुढे सेनेला मतदार नव्यानं जिंकावा लागणार आहे ?

    ReplyDelete
  10. Apratim vishlelshan Bhau. Ek se upar ek. Shiv Sena should quickly patch up with bjp and they will maintain their numbers. But will this wisdom dawn on the leadership who is just busy scoring empty points.

    ReplyDelete
  11. भाऊ, आजकाल उठा व्यक्त होत नाहीत. सबकुछ सरा आहेत. यामुळे सैनिक संभ्रमात आहेत. या परिस्थितीत उठा सेनेला सावरू शकतात. फक्त उठाच करू शकतात, अन्य कोणी नाही. अन्य कोणी करायचे ठरविल्यास उलटेच होईल.

    ReplyDelete
  12. भाऊ 1990 मध्ये जेव्हा भाजप सेना युती झाली तेंव्हा सुरुवातीला सेना 185 आणि भाजप 102 अशी वाटणी झाली होती तर लोकसभेला भाजप मोठा भाऊ असे ठरले होते मात्र जिंकणाऱ्या जागात सेना भाजपमध्ये केवळ काही जागांच्या फरकाने सेना भाजपपेक्षा मोठा पक्ष ठरत होता.2009 मध्ये भाजप सेनेपेक्षा 2 जागी पुढे होता दुसरे म्हणजे ज्याच्या जास्त जागा मुख्यमंत्री त्याचा असे ठरल्याने 1995 चा अपवाद वगळता एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा खेळ दोन्ही पक्षात सुरु झाला आणि सत्ता या युतीपासून लांब जात राहिली. त्यामुळे जी युती 1999 पासून कार्यकर्त्यांच्या मनातून तुटली होती ती 2014 मध्ये अधिकृत पणे तुटली आज जरी मुख्यमंत्री युती टिकवण्याची भाषा बोलत असले तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पणे लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे ज्या पक्षाचे संघटनात्मक बळ जास्त आहे तो यात तरून जाईल आणि दुसरा नुकसानीत जाईल मतचाचणीत हाच निष्कर्ष पुढे आला आहे.

    ReplyDelete
  13. शिवसेनेने सातत्याने भाजप आणि मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे । पण सततच्या आणि टोकाच्या टीकेमुळे भाजपबद्दल सहानुभूती बाळगणारा मतदार सेनेपासून दूर गेला आहे । भाजपाला विरोध असणारा मतदार काँग्रेस व राष्ट्रवादी यांना मत देणारा मतदार आहे । दोन्हीकडून नुकसान शिवसेनेचेच होते आहे । पण जनतेत कवडीईतके देखील स्थान नसणारे संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना हे उमजतच नाही

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ,
      संजय राऊत शरदरावांच्या सल्ल्याने सेना बुढ़वायला निघालेय पण उद्धवजीना हे कधी समजणार ?

      Delete
  14. शिवसेनेची जर बाकीच्या राज्यातील प्रादेशिक पक्षांशी तुलना केली तर अखिलेश मायावती नवीन चंद्राबाबू ममता या लोकांनी स्वतःच्या बळावर सत्ता मिळवली आहे.युतीच्या जागा वाटपात सेनेला 170 अशा घसघशीत जागा लढवायला मिळाल्या आहेत मात्र सेना स्वतःच्या जीवावर युती असताना देखील कधी 85 ते 90 जागांचा टप्पा गाठू शकली नाही याचे कारण म्हणजे सेनेने कधीच गंभीरपणे मुंबई ठाणे आणि कोकणचा भाग वगळता राज्यात पद्धतशीरपणे हातपाय पसरायचा प्रयत्न केला नाही.औरंगाबाद पश्चिम हा एकेकाळी सेनेचा बालेकिल्ला होता मात्र लोकमतचे मालक राजेंद्र दर्डा यांनी तो सेनेच्या हातून हिसकावून घेतला असे अनेक ठिकाणचे मतदारसंघ आहेत.आता येणाऱ्या निवडणुकीत विचार केला तर विदर्भात गडकरी फडणवीस यांच्या विकासाच्या लाटेपुढे सेनेचा निभाव लागणे कठीण आहे मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाचा चांगलाच बोलबाला झाला आहे त्याचा फायदा ते घेतल्या शिवाय राहणार नाहीत मुंबईत गेल्या विधानसभा आणि महापालिकेत सेनेच्या बरोबरीने भाजप ची शक्ती आहे हे निवडणुकातून सिद्ध झाले आहे कोकणात भाजपने नारायण राणे यांना आपल्या गोटात आणून ठेवले आहे पश्चिम महाराष्ट्रात नगर आणि पुणे जिल्ह्यातील काही भाग वगळता सेना फारशी ताकदवान नाही अशा स्थितीत मुख्यमंत्री जरी युतीची गोष्ट करत असले तरी सेनेचा कारभार कोणत्याही लोकसभा विधानसभा निवडणुकीला उभे न राहता आरामात राज्यसभेत निवडुन येणाऱ्या संजय राऊत यांच्या सल्ल्याने चालत असेल तर सेनेबरोबर काम करणे कठीण आहे याची कल्पना आलेल्या फडणवीस यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी कधीच चालू केली आहे त्यामुळे मतचाचणीत आलेले सेनेबाबतचे अंदाज हे योग्य वाटतात

    ReplyDelete
  15. भाऊ तुमचं लिखाण सेनेविषयी लिहीताना एकांगी होत जातं याचा पुर्नप्रत्यय आला . कारण तुमच्याकडून इतक्या उथळ विश्लेषणाची अपेक्षा नव्हती . तुम्ही कधीपासून चाचण्यांवर विश्वास ठेवू लागलात ?
    बाकी सेनेचा जळगावात झालेल्या पराभवाचा विनोद भारी होता .
    असो . जमिनीवर असणाऱ्यांना जे दिसतंय , समजतंय ते तुमच्यापासून फार दुर चाललेय दिसतंय इतकंच .

    ReplyDelete
  16. विश्लेषणात चूक झालेली वाटते ती म्हणजे २०१४ ला विधान सभेचे वेळी युती तुटल्याचे खापर आपण भा ज पावर फोडत आहात तिथे !! केवळ १५० जागांच्यावर सेना अडून राहिली आणि जागेनुसार चर्चा वा इतर पक्षांबद्दलची दाखवलेली उदासीनता तसेच खडसे ज्या पोटतिडकेने बोलत होते तिकडे केलेले दुर्लक्ष शिवाय चर्चेला आदित्य वगैरे छोट्या नेत्यांना दिलेले महत्व या मुद्यांवरून तरी मोठी चूक उद्धव आणि बेलगाम बरळणारे संजय राऊत यांचीच दिसून आली . आणि याच गोष्टीची साशंकता वाटल्याने त्यांनी सर्व जागांवर केलेली लढण्याची तयारी हि भा ज पाची खेळी वाटायचे काय कारण ?

    ReplyDelete
  17. सेनेने तेव्हा भाजपला ११७ किंवा त्यापेक्षाही कमी जागा देऊ केल्या होत्या.शिवाय त्यांच्या केंद्रीय निरिक्षकासमोर आदित्यसारख्या गांभीर्य शून्य व्यक्तीला चर्चेसाठी पाठवणे उठवळपणाचेच होते.आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेना भाजप युती मागील तीन निवडणुकीत आतून मोडलेलीच होती.एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न होतच होते.हे सुद्धा आघाडी सरकार निवडून येण्याचे कारण होते.स्वबळाच्या चाचपणी मुळे भाजपला ख-या अर्थाने आपली ताकद समजली.परिणाम देऊ केलेल्या जागांपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले.सेनेचा ६२ चा आकडा केवळ कॉंग्रेस राष्ट्रवादी नको या भावनेतून आला.

    ReplyDelete