Wednesday, October 17, 2018

२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’!

(लेखांक पहिला) 

modi cartoon kureel के लिए इमेज परिणाम

येत्या डिसेंबर महिन्यात पाच विधानसभांचे मतदान उरकलेले असेल आणि निकाल लागलेले असतील. त्यानंतर विनाविलंब सतराव्या लोकसभा निवडणूकीचे वेध लागतील. तसे त्याचे वेध अनेकांना आतापासूनच लागले आहेत. म्हणून तर गुजरात विधानसभेपासूनच लोकसभेची लढत चालू झालेली आहे. मागल्या खेपेसही तशी लढत तिथूनच सुरू झालेली होती. गुजरात जिंकूनच लोकसभेला गवसणी घालण्याचा मनसुबा घेऊन नरेंद्र मोदी कामाला लागलेले होते. आधी गुजरात तिसर्‍यांदा सलग जिंकायचा आणि त्या बळावर पक्षात आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ती पहिली पायरी होती. कारण तिथूनच पुढली लढाई सुरू व्हायची होती. आताही राहुल गांधी यांनी गुजरातपासून सुरूवात केली होती. आपली नवी प्रतिमा उभी करून पप्पू ही हास्यास्पद झालेली प्रतिमा पुसण्यासाठी त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊनच आरंभ केला होता. पण आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार ही अडचण आहे. म्हणूनच गुजरात असो वा नंतरच्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीत राहुलना कॉग्रेसला प्रभावित करणारे कुठलेही दमदार पाऊल टाकता आलेले नाही. पण याच दरम्यान बहुधा मोदींच्या प्रयत्नामुळे राहुलना विरोधी पक्षाचा चेहरा बनवण्याची चाल यशस्वी ठरलेली आहे. विरोधकांना सोबत घेऊन जाण्यात २००४ सालात सोनिया गांधी जितक्या यशस्वी ठरल्या होत्या. त्याच्या क्षुल्लक प्रमाणातही राहुलना त्यात यश मिळू शकलेले नाही. उलट कर्नाटकचा सत्यानाश होऊन गेल्यावर सोनियांना आपली निवॄत्ती सोडून क्रियाशील राजकारणात पुढाकार घ्यावा लागला आणि संयुक्त सरकार स्थापण्याचा डाव खेळावा लागला. तिथल्या शपथविधीला सर्व पक्ष नेत्यांची हजेरी लागण्यासाठीही सोनियांना जातिनिशी यावेच लागले. अशा स्थितीत २०१९ ची लोकसभा निवडणूक कुठल्या दिशेने जाईल, याविषयी चर्चा स्वाभाविक आहे.

हळुहळू विविध वाहिन्या व माध्यमे मतचाचण्या घेऊन विविध अंदाज व्यक्त करू लागलेली आहेत. १९९९ पासून हा खेळ जोरात सुरू झालेला होता. २०१४ च्या निकाल व आकड्यांनी त्यातली मजा संपून गेली. कारण कोणालाही भाजपा वा मोदी एकहाती बहूमत मिळवतील, असा अंदाज बांधता आला नाही. उलट मतचाचण्या करणारे व विविध राजकीय अभ्यासक आघाडीचे युग असल्या भ्रमात गुरफ़टून पडलेले होते. त्यामुळे राजकीय गणिते समिकरणे सातत्याने फ़सत गेलेली आहेत. शिवाय राजकारण लोकसभेच्या निकालांनी बदलले, तसेच राजकारणाचे निकष नियमही बदलून गेलेत. त्याचा आवाका अभ्यासकांना आलेला नाही. म्हणूनच पुढल्या सगळ्या निवडणूकांचे निकाल अभ्यासकांना हुलकावणी देऊन गेले. मग लोकसभेनंतर दहा महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका असोत, किंवा बिहार विधानसभेच्या निवडणूका असोत. त्यात भाजपाचा दारूण पराभव कोणाला ओळखता आला नाही, किंवा उत्तरप्रदेशात भाजपा मोदींच्या पुण्याईवर अपुर्व यश मिळवण्याची शक्यता कोणी ताडू शकला नाही. दुसरीकडे एकामागून एक विधानसभा जिंकत सुटलेल्या भाजपाच्या अश्वमेधाची दौड, कोणाला जोखता आलेली नाही. अशा लोकांकडून २०१९ लोकसभा निवडणूकीचे अंदाज ऐकणे मनोरंजक असते. पण त्याचा वास्तवाशी संबंध असू शकत नाही. यापैकी अनेकांना मोदी व भाजप सत्ता गमावतील, अशी आशा दिसू लागली आहे. पण ती दिसण्यासाठी पर्याय कोण, त्याचेही उत्तर शोधण्या्ची गरज मात्र वाटलेली नाही. तो पर्याय राहुल गांधी नक्कीच असू शकत नाहीत. किंबहूना महागठबंधन नावाचा प्रयोग उभा केला तर त्याचे नेतृत्व कोणाचे, या प्रश्नाचे उत्तरही गुलदस्त्यात आहे. मग हीच मोदींसाठी जमेची बाजू होऊन जाते, याचे अभ्यासकांना भान उरलेले नाही. त्या़चे एकमेव कारण त्यांना आजची कॉग्रेस ओळखता आलेली नाही.

राहुल गांधी सातत्याने आवाज चढवून एक गोष्ट सांगतात, पुन्हा कॉग्रेसला चांगले दिवस येतील आणि कॉग्रेसच देशाचा कारभार चालवू शकते. त्यांच्या शब्दात तथ्य नक्कीच आहे. पण ती कॉग्रेस म्हणजे आज उरलेला कॉग्रेस पक्षाचा संघटनात्मक सांगाडा अजिबात नाही. तर कॉग्रेस प्रवृत्ती वा कॉग्रेसचे पुर्वापार चालत आलेले राष्ट्रव्यापी स्वरूपच देशाचा कारभार चालवू शकते. ती जागा आता भाजपाने घेतलेली आहे. १९७०-८० या कालखंडातील कॉग्रेस आणि आजचा भाजपा यांच्यात जराही भिन्नता राहिलेली नाही. मोदी भले तोंडाने कॉग्रेसमुक्त भारत बोलत असो, त्यांनी भाजपालाच कॉग्रेसयुक्त करून टाकलेले आहे. म्हणून त्यांना इतके यश मिळू शकले आणि तो बघताबघता देशव्यापी राष्ट्रीय पक्ष बनुन गेला आहे. १९८० पुर्वीचा जनसंघ किंवा जनता पक्षातून बाजुला झालेला भाजपा आणि आजचा भाजपा यामध्ये प्रचंड फ़रक आहे. आजचा भाजपा चक्क आधुनिक कॉग्रेस झालेली आहे. कॉग्रेस म्हणजे तरी काय होते? नेहरू शास्त्रीजींच्या निधनानंतर आणि इंदिराजींच्या उदयानंतर कॉग्रेस पक्षाचे रुप आमुलाग्र बदलून गेले होते. सत्ता मिळवणे व त्यासाठी कुठल्याही तडजोडी करणे. कोणालाही निवडणूका जिंकण्यासाठी आपल्यात सामावुन घ्यायचे, हे तेव्हाच्या कॉग्रेसचे राजकीय स्वरूप होते. आज तेच भाजपाचे स्वरूप आहे. त्यात कुठल्याही विचारधारेचे व पक्षातले लोक सहज सहभागी होत आहेत व गुण्यागोविंदाने नांदताना दिसत आहेत. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी; अशा कुठल्याही भूमिकेतले जुने उपयुक्त लोक भाजपाने आपल्यात सामावून घेतलेले आहेत. हेच तर १९७० नंतर इंदिराजींच्या कॉग्रेसचे स्वरूप नव्हते का? पुर्वाश्रमीचे जनसंघी वा मार्क्सवादी इंदिराजींनी आपल्या पक्षात सामावून घेतलेले नव्हते का? समाजवादी फ़ोरम व नेहरू फ़ोरम अशी वादावादी इंदिराजींच्या पक्षात नव्हती का?

नुसती कुठल्याही विचारधारेची खोगीरभरती नव्हेतर समाजाच्या विविध धर्मपंथ व सामाजिक घटकांची बांधलेली मोट, हे कॉग्रेसचे तात्कालीन स्वरुप होते ना? आजचा भाजपा त्यापेक्षा कितीसा वेगळा आहे? मुळात आजच्या भाजपाचा सर्वोच्च नेताच ओबीसी या सामाजिक घटकातून आलेला आहे. त्याखेरीज राष्ट्रपती पदावर भाजपाने दलित वर्गातील सामान्य कुटुंबातली व्यक्ती आणून बसवली आहे. विविध राज्यातले मुख्यामंत्री वा विविध पदाधिकारी बघितले, तर समाजाच्या व लोकसंख्येच्या सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व भाजपामध्ये प्रतिबिंबीत झालेले दिसेल. उलट कॉग्रेससह बाकीचे विविध पक्ष व्यक्तीकेंद्री वा घराण्याच्या मालमत्ता होऊन गेलेल्या आहेत. इंदिराजी वा राजीव गांधींनी विविध पक्ष वा क्षेत्रातील गुणवान कर्तबगार व्यक्तींना उचलून आपल्या पक्षात व राजकारणात महत्वाचे स्थान दिलेले होते. आज त्याचे नेमके अनुकरण नरेंद्र मोदी करताना दिसतात. कारण देशावर राज्य करायचे असेल, तर सर्वसमावेशक असल्याखेरीज पर्याय नाही, हे त्यांनी ओळखलेले आहे. तिथेच मोदी थांबलेले नाहीत. तर केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत आवश्यक आहे, तिथे घेण्यातली लवचिकता त्यांनी स्पष्टपणे दाखवलेली आहे. १९८० साली जनता पक्षाचा प्रयोग फ़सल्यावर आणि आपल्याच कॉग्रेस पक्षात फ़ुट पडल्यावर, एकाकी लढताना तामिळनाडूत कॉग्रेस पक्षाला स्थान नव्हते. तर द्रमुकतून वेगळ्या झालेल्या रामचंद्रन यांच्या अण्णाद्रमुकशी साटेलोटे केले होते इंदिराजींनी. लोकसभेतल्या बहूमताची किंमत त्यांनी विधानसभेत मोजली होती. तेव्हा तिथला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष कॉग्रेस होता. त्याला विधानसभेत कमी जागा देऊन रामचंद्रन यांनी आपली खेळी साधली. मोदी-शहा कुठल्या वेगळ्या चाली खेळतात? नेमके राहुल सोनिया तिथेच तोकडे पडले आहेत. त्यांना २०१४ नंतर सावरून उभेही रहाणे शक्य झालेले नाही. तर मोदी शहांनी हातपाय पसरून घेतलेत. 

मोदी पुन्हा बहूमत मिळवतील काय? आजकाल हा सगळ्या राजकीय अभ्यासक विश्लेषकांना सतावणारा प्रश्न झाला आहे. त्यात बहुतांश असे आहेत, ज्यांना मुळातच २०१४ सालात आपल्याला ‘उल्लू’ बनवून मोदी बहुमतापर्यंत पोहोचले, हे सत्य अजून पचवता आलेले नाही. त्याचे एकमेव कारण आघाडीयुग’ नावाची संज्ञा आहे. आधीच्या सात लोकसभा निवडणूकांमध्ये कॉग्रेस क्रमाक्रमाने रसातळाला गेली आणि तिची जागा भरून काढणारा कुठलाही राजकीय देशव्यापी दुसरा पक्ष उपलब्ध नसल्याने, तशी तयारी करण्यात भाजपाचा वेळ गेलेला होता. त्या अवस्थेला भाजपा येण्याचा काळ आपण प्रतिक्षा काळ म्हणू शकतो. सर्कशीमध्ये एका झोक्यावरून झेपावणारा कोणी कसरतपटू, दुसरा झोका हाती लागण्यापर्यंत अधांतरी असतो, तशीच ही राजकीय अवस्था होती. लोकमताने वा लोकशाहीने कॉग्रेस नावाचा झोका सोडून दिला होता आणि दुसरा झोका कुठला ते अभ्यासकांनाही ठरवता येत नव्हते, की मतदाराला निश्चीत करता येत नव्हते. पण समोर अनेक झोके हलत होते आणि त्यातला कुठला भक्कम यावर कसरतपटूची कला अवलंबून होती. त्यातल्या अनेक झोक्यांना सामान्य मतदाराने पकडून बघितले नक्कीच. कधी जनता पक्ष, जनता दल, विविध पक्षांची आघाडी असे अनेक प्रयोग झाले. मात्र मतदार त्यावर विसंबून नव्हता, तो एक देशव्यापी राष्ट्रीय पक्ष शोधत होता आणि कुठलाच पक्ष त्यासाठी पुढाकार घ्यायला राजी नव्हता. प्रत्येक पक्षच तात्पुरत्या सोयी-लाभ बघूनच तडजोडी करत होता आणि त्या मोडूनही टाकत होता. अशा काळात जनतेची ही अपेक्षा ओळखून भाजपाने पुढाकार घेतला आणि कॉग्रेसला पर्याय किंवा पर्यायी कॉग्रेस होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी आपल्या राजकीय आर्थिक वा सामाजिक भूमिकांमध्ये आवश्यक ते फ़ेरबदलही भाजपा करत गेला. त्यातून आज समोर दिसतो तो भाजपा, १९८० सालचा भाजपा उरलेला नाही.   (क्रमश:)


5 comments:

  1. भाउ पण हे पुरोगामी लेकांना कोण सांगणार ते अजुनही फॅसिस्ट हुकुमशाहीची जपमाळ ओढतायत कांगरेसचेच चॅनेल indiatoday ने केलेल्या चाचणीत आणखी एक गोष्टसमोर आलीय त्यात मोदी हे obc समाजात जास्त लोकप्रिय दाखवलेत अगदी उच्चजातीपेक्षाही जी भाजपची वोटबॅंक आहे obc 63% open 61% यातच सर्व काही आल

    ReplyDelete
  2. राजकीय विश्लेषकांना मोदी फोबिया झालाय सहज म्हणुन त्याची fb twitter पाहिलेकी खरच मोदी किती डोक्यात बसलेत हे कळत बर त्यांचे पाठीराखे पण म्हनतात रोज सारख मोदीकरुन का पण ते delusion झाल्यासारख मोदीच सर्व गोष्टींना जबाबदार धरतात आणी भासपण व्हायला लागलेत राफेल२५% लोकांनाच माहितआहे तरीही बॅनरवर लिहीतात मेोदी राफेलच्या गाळात रुतत चाललेत अस खुप मजेशीर असत

    ReplyDelete
  3. व्वा ! आदरणीय भाऊ तुमच्या सारख्या अभ्यासकाची आजच्या काळात आम्हा या भारताच्या तरुणांना खूप गरज आहे ... तुम्हाला उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो ... दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  4. Today I read an article in the Marathi website misalpav.com where the writer has given detailed answers to the questions Rahul Gandhi has raised and called PM Modi a chor and bhrashtaachari. At the end of the article the writer writes a telling comment on RaGa which I paste here: मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे. Should such a person and his party lead our nation anytime in future? The answer is no.

    ReplyDelete
  5. This is the quality of leader, they aren't feared of people superior to them by means of knowledge, power or any other qualities. And end of the day you have to run the operations.

    ReplyDelete