Thursday, April 16, 2020

आपलाही गुन्हा छोटा नाही

Miscreants Pelt Stones At Medics, Attack Govt Ambulance In Uttar ...

लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी पुढल्या काळात शिकल्यावर हास्यास्पद वाटायच्या. पण हळुहळू जगाचे अनुभव घेताना त्याच गोष्टी आठवल्या, मग त्यातले तथ्य व आशय लक्षात यायला लागला. त्या गोष्टी भाकड वा काल्पनिक असण्यापेक्षा बोधप्रद असतात. त्यातले शब्द पकडून वाद घालायचा नसतो, तर त्यातला आशय शिकून सावध व्हायचे असते. जगण्यातले संदर्भ त्याच्याशी ताडून वाटचाल करायची असते. आता जेव्हा तबलिग जमात व नंतरच्या कालखंडात देशाच्या विविध भागातले अनुभव समोर येत आहेत, तेव्हा आपल्याला काही लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटतो. कोरोनाची बाधा थेट मृत्यूच्या दारात नेवून उभी करत असतानाही अशा ठराविक वस्त्यामध्ये आरोग्य सेवक डॉक्टर्स व पोलिसांसह रुग्णवाहिकांवरही हल्ले होत आहेत. मग त्या लोकांना त्यातला मुर्खपणा समजत नाही काय? हाच प्रश्न आपल्याला रोज पडतो ना? पण त्याचे उत्तर वा विश्लेषण कुठलाही संपादक मिमांसक देऊ शकलेला नाही. मला त्याचे नेमके उत्तर आजीने कथन केलेल्या एका अशाच गंमतीशीर गोष्टीत सापडले. एक साधू जंगलातून चालला होता आणि दुपारच्या टळटळीत उन्हात विश्रांती घेण्यासाठी एका डेरेदार झाडाखाली पहुडला. त्याला लागलेली झोप दाढीत काही हुळहुळल्यासारखे झाल्याने मोडली. तशाच अवस्थेत त्याने डोळे उघडून बघितले तर एक डोंगळा दाढीत शिरला होता. त्याच्या हालचालींनी साधूला गुदगुल्या होऊन झोपमोड झालेली होती. आता या इवल्या जीवाचे काय करावे, म्हणून साधूने विचार केला आणि अकस्मात त्याचे लक्ष झाडाच्या बुंध्यापाशी गेले. तर तिथे शेकडो डोंगळे वरखाली करीत होते. साधूला वाटले ते झाडावरच्या आपल्या वारूळ वा घरट्यात येजा करीत असताना हा बिचारा चुकून आपल्या दाढीत घुसलाय. त्याला सुखरूप घरी जायला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या साधूने पुढे काय केले?

साधू तपस्या करणारा म्हणून तो सामान्य बुद्धीचा नव्हता. गहन चिंतन करणारा असल्याने, त्याने त्या इवल्या जीवला सुखरूप माघारी जाण्यासाठी उपाय योजला. तो आपण सामान्य माणसे कधीही करणार नाही. कदाचित आपण अशा डोंगळ्याला बाजूला काढून फ़ेकले असते आणि विषय जिथल्या तिथे संपवला असता. कदाचित त्याला चिरडून मारूनही टाकले असते. पण साधूमहाराज चिंतक होते. त्यांनी आपल्या दाढीत बागडणार्‍या डोंगळ्याला परतण्यासाठी खास उपाय योजला. साधूबाबा उठून बुंध्याच्या जवळ गेले आणि दाढी बुंध्याला लावून डोंगळ्याला समजावू लागले ‘बाबू घर जा.’ पण त्यांची भाषा बाबूला म्हणजे डोंगळ्याला समजण्याचा विषयच नव्हता. त्यांच्या भावना किंवा भूतदया त्याच्या इवल्या मेंदूत शिरण्याचा मुद्दा येतोच कुठे? सहाजिकच साधूबाबांचा असला खेळ काही मिनीटे तसाच चालू राहिला आणि त्यांच्या दाढीतला बाबू आपल्या घरी परतण्यापेक्षा बुंध्यावरून येजा करणारे शेदिडशे बाबू दाढीत संक्रमित झाले. त्यांच्या लेखी बुंधा व साधूबाबांची दाढी यात किंचीतही फ़रक नव्हता. मग त्यातले अनेक बाबू एकाच वेळी महाराजांचा कडाडून चावू लागले आणि त्यांचा चिंतनातून कमावलेला सगळा संयम संपून गेला. कारण त्या चाव्यांनी बुद्धी तपस्या मातीमोल होऊन मानवी शरीरातील उपजत सुरक्षेची धारणा जागी झाली. वेदनांच्या असह्य भडीमारात महाराजांनी आपली दाढी चुरगाळून शक्य तितके बाबू मारून टाकले वा त्यांना दाढीतून झटकून टाकले. यात त्या बिचार्‍या जीवांचा काय दोष वा गुन्हा होता? ते आपल्या परीने बुंध्यावर येजा करीत होते. महाराजांनी दाढी बुंध्याच्या जवळ नेलीच नसती, तर पुढला प्रसंग ओढवलाच नसता. दाढीत शिरलेला डोंगळा आधीच झटकून वा काढून बाहेर फ़ेकला असता, तर आपणच बुंध्यावर चढला असता आणि शेकड्यांनी डोंगळ्यांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले नसते.

अशा गोष्टीतले सत्य वा ती कुठे घडली अशा चर्चा शहाणे करीत बसतात. सामान्य बुद्धीच्या लोकांना त्यातला आशय लौकर कळतो. त्यामुळे सामान्य लोक अशा प्राणिमात्रांपासून चार हात दुर रहातात. अंगावर आल्यास त्यांचा बंदोबस्तही करून विषय संपवतात. त्यासाठी पशूप्रेमी होऊन नसती नाटके रंगवित बसत नाहीत. बुद्धीचा खजिना असलेल्यांना मात्र बाबूंना दाढीत आणून घाऊक संख्येने त्यांना मारण्यात भूतदया वाटत असते. आजकाल देशाच्या कानाकोपर्‍यात शेकड्यांच्या संख्येने अशा बाबूंवर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि लाठीमार करूनच त्यांना शिस्त लावण्याची वेळ आलेली आहे. ते बाबू कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण अशा आरोग्य सेवकांवरच्या हल्ल्याच्या घटना कुठल्या वस्ती मोहल्ल्यात होत आहेत, ते अवघ्या जगाला ठाऊक आहेत व दिसत आहेत. पण त्याविषयी बोलायची बंदी आहे. त्यातून सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होईल असे आजच्या साधूंचे मत आहे. पण तशाच आधुनिक पुरोगामी सेक्युलर साधूमहाराजांनी या बाबूंना शेफ़ारून ठेवलेले आहे. शाहीनबाग किंवा काश्मिरात कायदा धाब्यावर बसवण्याचे कोडकौतुक होत राहिले नसते; तर आज त्याची परिणीती देशाच्या विविध राज्यात, जिल्ह्यात व वस्त्यांमध्ये होताना दिसली नसती. काश्मिरात दहाशतवादी तोयबा मुजाहिदीनांची कोंडी करून त्यांच्याविरोधात चालणार्‍या चकमकीत गुंतलेल्यांवर मागून दगडफ़ेक व्हायची ना? अशा दंगेखोरांचे लाड कोणी पुरवले आहेत? याच भारतीय कायद्यांनी, प्रशासनाने व कोर्टानेच ना? मग आता त्याचे स्थानिक भागात व गल्लीबोळात पडसाद उमटत आहेत. अशीच दगडफ़ेक काश्मिरात भारतीय सैनिक व जवान सोसत असताना आपण सगळे षंढासारखे गप्प बसलो होतो. सैनिक काश्मिरी महिलीवर बलात्कार करतात असे कन्हैयाकुमार बेछूट बोलत होता. आपण पुढे येऊन त्याचे मुस्काट फ़ोडले होते का?

तो असाउद्दीन ओवायसीचा भाऊ पोलिस पंधरा मिनीटे बाजूला करा शंभर कोटींना पंधरा कोटी भारी पडतील; असे म्हणाला तेव्हा त्याच्या समर्थनाला कोण उभे ठाकले होते? त्यापेक्षाही अशावेळी आपण गुळण्या घेऊन गप्प बसलो नव्हतो का? तेव्हा आपण डॉक्टर नर्स म्हणून आपल्या जागी काम करीत होतो. आपण पोलिस नव्हतो, तर सफ़ाई कर्मचारी होतो किंवा वैद्यक सेवेतले कर्मचारी होतो. पोलिस वा सैनिकांच्या भानगडीत आपण कशासाठी पडणार ना? पुरोगामी गुळण्या तोंडात घेऊन आपण सत्य बोलायला मागे राहिलो आणि तसे लोक शेफ़ारत गेले आणि त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. जे काश्मिरात चालून गेले व कायद्याला त्याला रोखता आले नाही, तर त्याचाच प्रयोग गल्लीबोळात वा मोहल्ल्यात कशाला करायचा नाही? आज असे कुणा मौलाना साद कांधालवीला वाटले, तर दोष त्याला एकट्याला देऊन भागणार नाही. आज त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपण हात झटकणेही गुन्हाच आहे. कारण आज त्याने प्रोत्साहन वा चिथावणी दिली असेल. पण गेली कित्येक वर्षे अशा मानसिकतेची जोपासना व पोषण आपण गप्प राहूनच केलेले नाही काय? कालपरवा तबलिगी प्रकरण उघडकीस आल्यावर खुप गवगवा झाला. तेव्हाही शरद पवार म्हणाले, तेच चित्रण दाखवून वा त्यातली नावे घेऊन चुकीचा संदेश जातो. त्यांचा हा संदेश कुणा चिकित्सकाने मिमांसकाने उलगडून सांगितला काय? पवार आपल्या नेहमीच्या शैलीने बाबूला त्याच्या घरी सोडायला बुंध्याजवळ दाढी घेऊन जायचाच सल्ला देत नव्हते का? कुणा संपादकाने वा विश्लेषकाने त्यातला मुर्खपणा आजच्या संकटातही उलगडून सांगण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. म्हणून इतकी पाळी आली आहे ना? कोरोना बाधीतांना ठराविक मोहल्ले वस्त्यांमधून हुडकताना वा क्वारंटाईनमध्ये घेऊन जाताना आरोग्यसेवकांवर हल्ले होत आहेत आणि पुन्हा तिथे पोलिसांना जीव धोक्यात घालून रोगबाधा रोखावी लागते आहे. त्यात अर्थातच गल्लीमोहल्ल्यातले अनेकजण लाठीमार झेलत आहेत वा गुन्हे अंगावर घेत आहेत. त्याची गरज होती का?

चटकन अशा मशिदी वा मोहल्ल्यातले बेछूट वागणारे मुस्लिम नागरिक वा तरूण नजरेत भरतात. पण म्हणून ते गुन्हेगार आहेत का? त्यांना असे आपल्याच जीवावर उदार होऊन पोलिस डॉक्टर्सवर हल्ला करण्यातला मुर्खपणा समजू शकत नाही. कारण त्यातल्या शहाणपणापासून मौलवी व पुरोगाम्यांनी त्यांना मैलोगणती दुर ठेवले आहे. किंबहूना त्यांना अंधश्रद्ध व धर्मवेडे बनवले गेले आहे आणि त्यासाठी ते मोठ्या श्रद्धापुर्वक आपल्याच जीवाशी खेळत आहेत. मात्र त्यांना अशा भ्रमात ढकलून देणारे सुरक्षित जागी जाऊन बसलेले आहेत. मुस्लिम वर्गात, वस्त्यांमध्ये देवदूत म्हणून कायम फ़िरणार्‍या तीस्ता सेटलवाड, शशी थरूर वा शाहीनबागेतले सर्व पुरोगामी नेते आज कुठे आहेत? कोरोना होऊन फ़क्त मराल, इतके साधे शहाणपण त्या अजाण मुस्लिमांना कोण सांगणार आहे? नागरिकत्व कायद्याने त्यांचे कुठलेही नुकसान होणार नसताना त्यांना झगडायला चिथावणारे सर्वच्या सर्व पक्ष, नेते व संघटना स्वयंसेवी आज कुठल्या कुठे गायब आहेत. मात्र त्यांनीच बिथरून टाकलेले मुस्लिम आपल्या वस्त्यांमध्ये क्वारंटाईनला नागरीकत्व डिटेन्शन सेन्टर समजून मदतीला येणार्‍या डॉक्टर्स पोलिसांवर प्राणपणाने हल्ले चढवित आहेत. कोरोनाचे यापेक्षा भयंकर दुसरे रुप नसेल. खरा कोरोना ज्याला झालेला आहे. त्यालाही थांगपत्ता नसताना तो इतरांना संसर्गाने रुग्णाईत करतो. पण या पुरोगाम्यांनी मुस्लिमांना नागरिकत्वाचा भयगंड लावून कोरोनाशी गळाभेट करायला भाग पाडलेले आहे आणि बिचारे गल्लीबोळातले मुस्लिम उदात्त कार्यासारखे त्यात उडी घेत आहेत. मग कायदा व्यवस्थाही सैल पडली आहे. या सगळ्यापासून दुर असलेले आपणही त्यामध्ये भरडले जात आहोत. कारण आपणही बेसावध रहाण्याचा, दुर्लक्ष करण्याचा गुन्हा केलेला आहेच. मुस्लिम तसे वागत असतील, तर त्यांना वेळोवेळी बहकवणार्‍याना रोखण्याची जबाबदारी आपलीही नव्हती का? पण आपण संकट आपल्या दारात येईपर्यंत प्रतिक्षा केलीच ना? मग परिणामही भोगावे लागणारच.

18 comments:

  1. The worst thing done in last 70 years is to divide the society on multiple lines and encourage certain groups who vote en-block. Instead of bringing out the best of Geeta, the majority was tricked into believing fake AHIMSA.

    ReplyDelete
  2. खरं आहे भले तर ़़़़़़़़़़़़़़़ हे ब्रिदवाक्य जपले .पण. त्याच्या पुढचे मात्र साफ विसरलोय

    ReplyDelete
  3. यावर व्यापक अशी उपाययोजना करण्याची आपण मागणी करू शकतो काय. असे काही करता आले तरमश मी नक्की सहभागी होणार

    ReplyDelete
  4. भाऊ अप्रतिम विश्लेषण. बेगडी सेक्युलर व पुरोगामी समजणारे बुद्धिवादी फारच सामाजिक नुकसान करत आहेत. हे सामान्याना समजू देत नाहीत

    ReplyDelete
  5. जे घड़त आहे त्यामुळे लोक जागृत होत आहेत ... हा फायदाच झाला आहे या प्रकारांचा

    ReplyDelete
  6. भाऊ, आपण नेहेमीच इतके योग्य आणि मुद्देसूद लिहिता कि मला तुमचा खूप अभिमान वाटतो. १९७१ साली तुम्ही रूपारेलला BAला होता आणि मी FYSc ला, तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही निक्सनच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यात मी पण होतो. त्यानंतर तुमचे लिखाण जेवढे वाचायला मिळायचे ते वाचतानापण तुमचे कौतुक वाटायचे. मागे साधारणपणे ३/४वर्षांपासून तुम्ही टीव्हीवरील चर्चेत दिसायला लागलात तेव्हा पण तसेच. पण तुमची अतिशय परखड व स्वच्छपणे मांडलेली मते त्या वाहिन्यांंना किंवा आणखी कोणाला तरी झेपली नसावीत आणि मग तुम्ही टीव्हीवर दिसेनासे झालात. खंत वाटत होती. पण आता परत व्हिडीओमध्ये दिसायला लागलात त्यामुळे छान वाटते. असे झणझणीत अंजन घालणारी व्यक्ती समाजस्वास्थ्यासाठी आवश्यकच असते. अभिनंदन आणि धन्यवाद. Keep it up.

    ReplyDelete
  7. This is everyone is telling but what a common man should have done against Pawar, Rahul, Teesta or Kanhaya needs to be specified. When stones were thrown in Kashmir or in Muradabad, what do we do sitting at Dadar.

    ReplyDelete
  8. Sir
    There is huge difference between
    Dharma vs Mazhab, Religion
    Dharma is minimum 20000 years old swadeshi ancient Bharat ideology
    Mazhab, Religion its early 1500 years old videshi Abrahamic ideology

    ReplyDelete
  9. Yes we are also responsible for this. Still we are doing same thing

    ReplyDelete
  10. सत्य चप्पल शोधत असते, तोवर असत्य त्याचे म्हणणे गावभर सांगून आले असते. योग्य लेख. आपल्या यादीत कायदे, ते करणारे राजकारणी, न्याय अंमलबजावणी, प्रशासन व माध्यमे इ हवेत. धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete
  11. खरं आहे भाऊ। आपलाही गुन्हा छोटा नाही। 100% सत्य। त्याची फळे आपल्याला भोगावी लागणारच।

    ReplyDelete
  12. भाऊ क्या मारा हैं... एकदम सही ऊदहरणा सकट सरळ सोप्या भाषेत समजून सांगितले..
    हे दोन्ही प्रकारचे (राजकारणी आणि ही जमात) लोक निर्लज्जपणाचा कळस आहेत ... आपण किती लिहिले तरी बदलणार नाहीत..
    कारण हेच यांचे धेय आहे.. चोवीस तास मते कशी मिळवायची याचा ध्यास आहे मग हे काही करायला तयार होतात..
    ना मताचे जोगवा मागणारे थांबत आपण पाठराखण केली की हिजमात पिसाळते.. व आपले अशा पाठिंब्यामुळे जरी जेल मध्ये टाकले तरी 2-3 दिवसात बाहेर पडणार.. ( पहा राहुल कुलकर्णी कोणाच्या जिवावर एवढी गंभीर कलमे लावली असताना जेल मधुन सुटले आणि तोंडावर झालेल्या घटने बद्दल लाजेचा जरा पण मागमुस नाही ) नाही केंद्र सरकार मध्ये धमक अशा लोकांना सजा द्यायची.. ईडी नोटिसची बिडि झाली व फुकुन पीत सत्ता पण मिळवली.. मग लोकांना का वाटु नये.. की राजकारणा मुळे अशी नोटीस दिली जातात.. काँग्रेसचे काळात सिबिआय चा धसका होता .. व मुलायम ममता जयललिता व माया.. मागे करा घेऊन उभ्या होत्या.. व पुर्ण बहुमत नसताना सत्ता उपभोगली.. ईथे या सत्तेवर असलेले लोकांना धडा पण शिकवता येत नाही.. कदाचित गुरुला कसा धडा शिकवायचा.. हा प्रश्न असेल..
    या समाजात जे पर्यंत राजाराम मोहन राॅय निर्माण होत नाहीत तो पर्यंत असेच चालणार.. आणी योगींनी योग्य अॅक्शन घेतली आणि दंगे खोरांना पहाटे कोर्ट चालवुन कोठडी दाखवली.. ही हिंमत शहा मोदी कधी दाखवणार.. कदाचित रावत यांची आजच्या कॅबिनेट मिटींगची हजेरी.. पुढची तयारी ची नांदी असवी..

    ReplyDelete
  13. एकदम बरोबर हे धर्म वेडे मुर्खासारखे काहीही करतील, मला खूप पूर्वी एक प्रश्न यायचा कि पुरण काळात भारत जर एवढा प्रगत होता एवढी अस्त्र आणि शस्त्र प्रगत होती तर भारतावर या परकीयांची आक्रमण झाकीच कसी आणि झाली तर त्यात भारताची एवढी अधोगती कशी झाली सोमनाथावरच्या सतरा स्वार्या, तैमुर्च्या मुंडक्याच्या राशी, आणि पानिपत या सगळ्यांचे उत्तर म्हणजे हा लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले राजे नियम वचन आणि हरलेल्या शत्रु विषयी दया याचे पालन केल्या मुळे धूर्त बेईमान चलाखी नियम बाह्य शत्रु समोर निष्प्रभ ठरले.
      भारतात नैसर्गिक,खनिज,आर्थिक समृद्धि होती पण पण या अरबी जिहादीं जवळ फक्त एक हिंसक पुस्तक आणि मरायला वाळवंट होते म्हणून अन्न पाणी आणि सम्पत्ति च्या हव्यसापायी भारतावर आक्रमण केले तरीही पूर्ण पणे जिंकू नाही शकले शिवाजी महाराज राणा प्रताप सारख्या भूमि पुत्रांनी यांना धडकी भरवली

      Delete
  14. खरंय भाऊ जे घडतंय ते आमच्या चुकांमुळे च घडतंय

    ReplyDelete