Sunday, April 26, 2020

KILL HIM SOON

    

१९७५ च्या सुमाराला मी मराठी ब्लिट्झ नावाच्या साप्ताहिकामध्ये काम करत होतो. ते मुळचे इंग्रजी साप्ताहिक होते आणि त्याचे संपादक रुसी करंजिया हे अत्यंत संधीसाधू म्हणून त्याही काळात ख्यातकिर्त होते. इंग्रजीच्या यशानंतर त्यांनी हिंदी व उर्दू भाषेतही त्याच्या आवृत्त्या काढलेल्या होत्या आणि १९७० नंतरच्या कालखंडात मराठी आवृत्ती सुरू केली होती. १९७५ च्या जुन महिन्यात देशात इंदिराजींनी आणिबाणी लादली, तेव्हा त्याचे बाहू पसरून स्वागत करणार्‍यात कम्युनिस्ट पक्षाचे नेतॄत्व पुढे होते, तसेच काही पत्रकारही आघाडीवर होते. आपल्या कुमार केतकरांचा त्यातच समावेश होतो. तर अशा रुसी करंजियांच्या मराठी ब्लिट्झ मध्ये मी नोकरी करीत होतो. अर्थात मराठी आवृत्तीसाठी स्वतंत्र ऑफ़ीस नव्हते, लायब्ररी म्हणून जे दालन होते, तिथेच एका लांबलचक टेबलावर आमचा संसार मांडलेला होता आणि तिथेच बसून आमच्याशी गप्पा करणारा बर्नार्ड हा संदर्भाचे काम करणारा गृहस्थ मस्त माणूस होता. त्या लायब्ररीचे स्वरूप एखाद्या झोपडी वा भंगारवाल्यासारखे होते. तिथे अनेक जुनी नवी वर्तमानपत्रे पुस्तक इतस्तत: पसरलेली असायची आणि त्यातच आम्हाला जागा शोधून आपले बस्तान राखावे लागत होते आणि कामही करावे लागत होते. अर्थात तिथे पडलेल्या निम्मेहून जास्त पुस्तकांना रद्दीपेक्षा अधिक किंमत नसायची. तर त्याच ढिगार्‍यात मला पहिल्यांदा उत्तर कोरियाचा कम्युनिस्ट हुकूमशहा किम इल सुंग याची ओळख झाली. त्या देशाची कम्युनिस्ट सत्तेखाली कशी वेगाने प्रगती व विकास चालला आहे. त्याची वर्णने असलेली पुस्तके मासिकांचा तिथे ढिग पडलेला असायचा. त्यापैकी काहीही उघडून बघितले तर त्यात तिथला कम्युनिस्ट सर्वेसर्वा किम याच्या फ़ोटोंचा पसारा असायचा. हा किम शेतीपासून वैज्ञानिक क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी नागरिकांना ‘ओन द स्पॉट गायडंन्स’ देताना ही छायाचित्रे असायची. आज त्याच्या जागी त्याचा नातू किम जॊंग उन त्यापेक्षा वेगळे काही करीत नाही आणि जगाला उत्तर कोरियाची त्यापेक्षा अन्य काहीही माहिती नाही.

माझ्या त्या ऑफ़िसमध्ये अनेक मित्र माझे यायचे. त्यात चळवळीतले असायचे तसेच इतर क्षेत्रातीलही असायचे. कमलाकर सुभेदार त्यापैकीच एक होता. तो समाजवादी युवजन सभेचा पुढारी होता आणि त्याने साकीनाका या चाळींच्या वस्तीमध्ये तेव्हा नव्याने एक शाळा सुरू केली होती. चारसहा खोल्यांच्या त्या शाळेत फ़ारशा सुविधा नव्हत्या. दिसायला काही उपयुक्त वस्तु असेल तर जुन्यापान्या गोष्टी तो गोळा करायचा. एकदा कमलाकर आला असताना त्याने त्या लायब्ररीवजा कार्यालयातले एक पुस्तक उचलले आणि तशाच पुस्तकांचा ढिग बघून तो सुखावला. त्याने त्यापैकी एक पुस्तक घेऊन जाऊ काय, असे नुसते विचारले आणि लायब्ररीयन बर्नाड इतका आनंदला, की त्याने सुभेदारला संपुर्ण पोतंभर पुस्तके न्यावीत म्हणून होकार दिला. सुभेदार त्याच्याकडे बघतच राहिला. तेव्हा बर्नार्डने आपले दुखणे खुल्या दिलाने कथन केले. अशी पुस्तके जितकी फ़ेकून द्यावीत तितकी अधिक संख्येने येतच रहातात आणि त्यांचा रद्दी म्हणून विकूनही त्याला कंटाळा आलेला होता. जणू त्याचा जीव त्याने मेटाकुटीला आणलेला होता. म्हणूनच माझ्या मित्राने एक पुस्तक मागताच बर्नार्डने त्याला थेट पोतंभर पुस्तके देऊ केलेली होती. मग त्याचे कारण विचारता बर्नार्ड संतापून त्या पुस्तकाच्या कव्हरवरचा किम इल सुंगचा फ़ोटो दाखवून म्हणाला, KILL HIM SOON. ह्या हरामखोराला दिसेल तिथे तात्काळ मारा. ह्याच माणसामुळे अशी पुस्तके निघतात आणि आम्हाला डोकेदुखी होत असते. त्याच्या इथल्या वकीलातीतून अशी पुस्तके गाडाभर पाठवली जातात आणि त्यांची विल्हेवाट लावताना आमची अकारण दमछाक होत असते. मलाही त्याच्या ह्या खुलाश्याचे आश्चर्य वाटले. वकिलात अशी पुस्तके घाऊक कशाला पाठवत असेल, असा मलाही प्रश्न पडला. तर त्याचा खुलासा बर्नार्ड देऊ शकला नाही. त्याने हिंदी आवृत्तीचा संपादक व सहसंपादकाला विचारायला सांगितले. तो खुलासा ऐकल्यापासून मला उत्तर कोरियाच्या सामान्य जनतेविषयी झालेले दु:ख अजून कायम आहे.

हे दोन हिंदी संपादक वा पत्रकार आणि त्यांचे अन्य सहकारी मित्र उत्तर कोरियाच्या मुंबईतील वकिलातीमध्ये नित्यनेमाने जायचे आणि त्यांची तिथे मोठी बडदास्त राखली जात होती. तिथे अशा भारतीय पत्रकार बुद्धीमंत वर्गासाठी एक राखीव दालनच ठेवलेले होते आणि त्यांची ‘खाण्यापिण्याची’ पुर्ण सज्जता असायची. असे पत्रकार तिथे जमून त्या वकीलात वा तिथल्या अधिकार्‍यांना आपण उत्तर कोरियाच्या प्रगतीचे भारतीय जनमानसात किती कोडकौतुक करीत असतो असे सांगायचे. तेही मुत्सद्दी वा अधिकारी सुखावायचे. बदल्यात अशा पत्रकारांना तिथे पुख्खा झोडण्याची तैनाती केलेली होती. मग कोरियाचा तो हुकूमशहा किती महान आहे आणि भारतीयांना त्याच्याविषयी किती कमालीचे कुतूहल आहे, त्याची माहिती दिली जायची. परिणामी भारतीयांची उत्सुकता पुर्ण करण्यासाठी त्याची विविध भाषेतील चरित्रे व गौरवगाथा असलेले ग्रंथ लिहीण्याची वा भाषांतरीत करण्याची कामे ह्या पत्रकार बुद्धीमंतांना मिळायची. त्याचे चांगले पैसेही मिळायचे. सहाजिकच अशी पुस्तके छापली तरी वाचायची कोणी, असा प्रश्न होता. त्याचे वितरण मग अशा गोणीभर पुस्तकांचा रतीब विविध ऑफ़िस वा तत्सम जागी घातला जायचा. परिणामी ती तिथल्या कारकुन वा लायब्ररीयन यांच्यासाठी डोकेदुखी होऊन जायची. बर्नार्ड त्यामुळेच वैतागून गेला होता. हा किम इल सुंग मेल्याशिवाय आपली यातून आपली सुटका नाही, अशी त्याची संतप्त प्रतिक्रीया म्हणूनच आलेली होती. पण विषय इतका वा इथेच संपत नाही. अशा परदेशी वा प्रामुख्याने कम्युनिस्ट देशांच्या इथल्या वकील मुत्सद्दी मंडळीना हे पत्रकार चळवळ्ये कशी शेंडी लावायचे, त्याचीही एक मजेशीर कहाणी हिंदी ब्लिट्झच्या त्या सहसंपादकाने मला सांगितली होती. ती अधिकच विनोदी आहे. एकदा अशा टोळीने कोरियन दुताला चक्क दक्षिण मुंबईत सार्वजनिक ठिकाणी आमंत्रित करून त्याचा जाहिर सत्कारही घडवला होता. त्यामुळे ते महाभाग कमालीचे भारावून गेले आणि त्यातूनच ते खानपान सेवेचे दालन सुरू झालेले होते.

कोरियनांना भारतीय भाषा समजत नव्हत्या आणि भेंडीबाजारातील वर्दळीच्या रस्त्यावर जमणार्‍या गर्दीला तरी कोरियन वकिल मुत्सद्दी म्हणून काय कळत होते? एका संध्याकाळी तिथल्या एका नाक्यावर ऑर्केस्ट्राचा खास कार्यक्रम असल्याचा गवगवा करण्यात आला आणि तिथे आधी गणवेशातला बॅन्ड उभा करण्यात आला. चांगले व्यासापीठ उभारलेले होते आणि समारंभ संपल्यावर गाण्यांचा कार्यक्रम होता. बॅन्ड सुरू झाला आणि सर्व रस्ते प्रेक्षकांनी फ़ुलून गेले. मग वाजतगाजत त्या कोरियन अधिकार्‍यांना मंचावर आणले गेले आणि त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. पंधरावीस मिनीटांचा तो कार्यक्रम उरकल्यावर वाजागाजा करीत पाहुणे खाली उतरले आणि सुखावून निघून गेले. पुढे दोन तास चित्रपट गीतांचा कार्यक्रम रंगला होता. पण तो कशासाठी त्याचा समोर जमलेल्या गर्दीला पत्ता नव्हता. तर आधी सत्कार स्विकारून गेलेल्या कोरियनांना उसळलेली गर्दी अशी आनंदाने आपले स्वागत करताना बघून उचंबळून आलेले होते. ही स्थिती इथे असेल तर कोरियातील जनतेला किम इल सुंग काय वागणूक देत असेल आणि त्यांना देश कुठल्या अवस्थेत आहे, ते किती ठाऊक असणार? १९९४ साली त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा वारस म्हणून त्याच्याच मुलाने, किम जोंग इल याने सत्तासुत्रे हाती घेतली. २०११ सालात त्याचाही मृत्यू झाल्यावर किम जोंग उन हा उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा झाला आणि आता तो अमेरिकेसह जगालाच धमकावत असतो. सध्या त्याच्या मृत्यूविषयी उलटसुलट बातम्या येत असताना बर्नार्डची शापवाणी आठवली. एखादा समाज गुलामीत भरडला गेला मग त्याला लढायची इच्छाही कशी मरून जाते त्याचे हा देश उत्तम उदाहरण आहे. पण तिथे आहे त्या घराणेशाहीलाही कम्युनिस्ट म्हणून डोक्यावर घेणार्‍या जगभरच्या बुद्धीमान कम्युनिस्ट नेत्यांची मात्र दया येते. हा जोंग उन सर्वेसर्वा आहे तिथल्या नाडलेल्या जनमानसात बर्नार्डसारखीच धारणा असेल का?

17 comments:

  1. श्री भाऊ अशी पुस्तके अगदी मराठीत रशिया कशी छान आहे आणि काय प्रगती करत्येय हे सांगणारी आमच्या इथे सार्वजनिक वाचनालयात यायची, अर्थात वाचनालयाला सरकारी अनुदान होते, शिवाय सिनेमा च्या आधी indian news होत्याच

    ReplyDelete
  2. किम जोंग इल याने बिल क्लिंटन ला सेउल मध्ये 2 तासात सैन्य घुसवून ते ताब्यात घेईन अस धमकावले होते आणि बिल क्लिंटन सपशेल झुकला होता गुगल करून पहा Kim's nuclear gamble ही डोकमेन्ट री

    ReplyDelete
  3. हसतखेळत बरीच माहिती मिळाली

    ReplyDelete
  4. भाऊ, या लेखामुळे माझ्या ज्ञानात भरच पडली. इतर स्वतःला तरुण पत्रकार म्हणवणारे कुठे कमी पडतात हे अशा लेखांमधून कळतं, असो. आता हा उत्तर कोरियन बाबा जर खरंच गेला असेल तर पुढे काय हा प्रश्न आहे. तिथे कोणीतरी चांगला जनतेचं खऱ्या अर्थाने (आता आहे तसं नाही) हित बघणारा नेता मिळायला हवाय. कारण अचानक जर जनतेला सांगितलं की तुम्ही स्वतंत्र आहात तर इराक सारखी अवस्था होईल. कायम वरवंट्याखाली वावरणाऱ्या जनतेला काय करायचं काय नाही हे कळणार नाही, म्हणून हळूहळू एकेक गोष्ट शिथिल करायला हवी.

    ReplyDelete
  5. Agadi barobar, aani samanya bhartiya lokanchya manat, secular writers baddal suddha. 🙏💯✔️👍🌹😔🙂✅🙏

    ReplyDelete
  6. Jagbharatil communist va aaplya deshatil bhikarchot dave va samajwadi aslya bhikarchot communistanche samarthan paise gheunach kartat.Uttar koreache bhayanak haal hya gharanyane kele aahet .Kumar ketkar,nikhil wagle,rajdeep sardesai hyachya sarkhya dalbhandri lokana uttar korea madhye pathavun dya.

    ReplyDelete
  7. भाऊ माफ करा विषय सोडून कमेंट करत आहे.. कारण;-
    १) तुम्ही कमेंट वर lock down केला आहे.
    २) आणि फेसबुक वर माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार केली नाही म्हणून.

    विषय :- निखिल वागळे सर्व एपिसोड करा आम्हाला पण कळू द्या त्याचा खरा/खोटा चेहरा आम्ही त्याला चागलं समजत होत तुमच्या आजच्या व्हिडीओ नंतर मीही माहिती गोळा केली हा तर लाबडा माणूस निघाल..सर्व एपिसोड साठी आम्ही उस्तुक आहोत भाऊ

    ReplyDelete
  8. माफ करा विषय सोडून बोलत आहे..
    निखिल वागळे ला सोडू नका भाऊ....

    ReplyDelete
  9. जनतेने पुढे-मागे उठाव केलाच तर भूतो न भविष्यती इतका भयंकर तो असेल

    ReplyDelete
  10. आठवणींचाही ज्ञानकोष असतो अनेक वेळा तरूणपणी नीटसे आकलन न झालेल्या संदर्भांचे निवांत निवृत्त आयुष्यात आकलन होऊ लागते.
    All animals are equal but some are more equal हे जॉर्ज ऑर्वेल लिखित कम्युनिस्ट मेंटॅलिटीचे अचूक वर्णन आहे.ऑर्वेलचे 1984 हे पुस्तक त्यातील भयावह कारभाराचे दर्शन घडवते.. इतिहासाची तोडमोड आणि त्याचे स्वतःच्या फायद्यासाठी लिखाण हे त्या पुस्तकातील वर्णन भारतीय JNU च्या कारखान्यातील तथाकथित बुद्धिवादी स-माजवादी विचारवंत इतिहासकारांनी त्या काळापासूनच आरंभले आहे..आतातर ते लोण मराठ्यांच्या इतिहासापर्यंत येऊन पोहोचले आहे!आता असे वाटते इंदिरा गांधींनी केलेली कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी ही त्यादिशेने केलेली वाटचाल तर नव्हती? पण आपले सुदैव असे की तसे झाले नाही.त्यालाकारण जयप्रकाश नारायण..की भारतीय जनतेची विरोधात उठण्याची हिम्मत..की इंदिरा गांधींची आत्यंतिक क्रूर न होण्याची भारतीय मानसिकता..?..
    यंदा यदाहि धर्मस्य..
    म्हणून एकंदरीत विचार करता करता भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान काहीसे आकलन होण्यासाठी मदत होते असे वाटते.

    ReplyDelete
  11. भाऊ, They all should soon. जगण्याच्या लायकीचेच नाहीत हे लोक. चीनच्या आक्रमणाला जाहीर पाठिंबा देणारे, लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चालवणारे, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना पाठिंबा देणारे, सेक्युलँरिझमच्या नावावर ठराविक धर्मियांना कायम पाठिंबा देणारे हे कम्युनिस्ट यांचा विनाश आवश्यक आहे.

    ReplyDelete
  12. भाऊ तुम्ही स्वाती ताईंचा ब्लॉग वाचला नाही वाटत!
    -कृष्णा देशमुख

    ReplyDelete
  13. भाऊ किती कम्युनिस्ट राज्य लोकांनी उलथऊन टाकून तिथे लोकशाही स्थापन झाली आहे. अशी किती उदाहरणे असतील जगात??? आणि जर हे अटळ सत्य माहिती असूनही कम्युनिस्ट इतके कडवे का राहतात.

    ReplyDelete
  14. मला सोविएट लॅंड आणी स्पुटनीक या रशियन पुस्तकांची आठवण झाली. १९६५ ते सोविएट संघ फूटे पर्यंत हि पुस्तके पाहिजे त्याला फुकट पोस्टाने यायची. त्यात सोविएट संघ कसा स्वर्ग आहे आणी तिथलू नागरीक किती आनंदात जगतात याचे वर्णन असायचे. अर्थात पुढे हा फुगा फुटला.

    ReplyDelete
  15. कम्युनिझम या मानवतेला कलंक लावणाऱ्या प्रकारामुळे जगात कोट्यावधींचे बळी गेले आहेत. तरीही आपल्याकडचे दीडशहाणे विचारवंत आणि जनेयुसारख्या विद्यापीठांमध्ये शिकणारे आणि शिकविणारे त्याच कुजलेल्या मानसिकतेचे समर्थन करत असतात. भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही म्हणून फुकाची बोंब मारणाऱ्या आणि त्याचवेळी डाव्या चळवळीविषयी ममत्व असणाऱ्या अतीशहाण्या विचारवंतांनी उत्तर कोरियात जाऊन बघायला हवे. सरकारने मान्य केलेल्या १५ हेअरस्टाईल पैकी एका प्रकारेच केस कापावे लागतात नाहीतर कारवाई होऊ शकते इतक्या बिनडोकपणाचा कळस तिथे झाला आहे. खरं वाटत नसल्यास https://www.dailymail.co.uk/news/article-4418628/Trim-Jong-North-Koreans-choice-15-haircuts.html वर जाऊन बघावे. म्हणजे सरकारची इतक्या प्रमाणावर बंधने तिथे आहेत. आणि या हलकट बुध्दीमंतांना मात्र भारतातील परिस्थिती वाईट वाटते. भारतात परिस्थिती अजिबात वाईट नाही. जर का काही वाईट झाले असेलच तर ते या बुद्धीमंतांसाठी-- मोदी हा माणूस आपले कित्येक दशकांपासूनचे सत्तेवरील साम्राज्य उध्वस्त करेल ही भिती.

    ReplyDelete
  16. भाऊ तुम्हाला एक विनंती. लोकसत्ता विषयी तुमची मते व्यक्त करावी असे वाटते

    ReplyDelete
  17. Bhau sir tumcha maild id milu shakel ka?

    ReplyDelete