Monday, January 18, 2016

उठा साहेब, पत्र लिहायला बसा!

जाणते साहेब,
यांच्या सेवेशी



ठाण्याचे सर्वात लढावू आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोमाने फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य हाती घेतल्याचे वाचले. म्हणून हा पत्रप्रपंच! आपल्याला आठवतच असेल, सहाआठ महिन्यापुर्वी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना मुद्दाम पत्र लिहून एक आवाहन केलेले होते. अधिक माहितीही पुरवली होती. आमदार जीतेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रात फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य करीत असतात. त्यात बाधा आणण्याचे प्रकार घडत असल्याने आपण चिंताक्रांत होऊन ते पत्र लिहीले होते. अर्थात मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पनाच नसल्याने त्यांनी आपल्या पत्राची फ़ारशी दखल घेतली नाही आणि आव्हाडांना आपले काम गुंडाळून विधान मंडळाच्या आवारात चिक्कीवाटपाचे काम हाती घ्यावे लागलेले होते. पण आव्हाड आपलेच कल्याणशिष्य असल्याने त्यांची चिकाटी मोठी थोर! त्यांनी आपले उदात्त कार्य पुढे घेऊन जाण्याचा नवा मार्ग शोधलेला असून त्यातही पुन्हा बाधा येण्याचा धोका आहे. सहाजिकच त्यापासून आव्हाडांना वाचवणे आणि सामाजिक प्रबोधनाच्या महान कार्याला चालना देण्याची जबाबदारी आपल्याखेरीज कोण उचलू शकणार आहे? आपण एक पत्र लिहून जितके मोठे कार्य करू शकता, तितके अन्य कुठल्याही मार्गाने होण्याची शक्यता नाही. म्हणून आपल्याला आवाहन करायला हे खुले पत्र लिहीत आहे. काही महिन्यांपुर्वी पाकिस्तानातले थोर फ़ुलेवादी समाज सुधारक गुलाम अली यांनी मुंबईत येऊन सामाजिक उत्थान करण्याचा संकल्प सोडलेला होता. पण आपलेच जीवलग मित्र दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या काही सवंगड्यांनी त्यात व्यत्यय आणला. सहाजिकच पाकच्या त्या महान सुधारकाला इथे येताच आलेले नव्हते. त्यांच्या प्रबोधनाने आज पाकिस्तान अफ़गाणिस्तान व अन्य काही मुस्लिम देशात प्रबोधनाचा अखंड यज्ञयाग चालला आहे आणि त्यात हजारो बळी गेल्याचे आपल्याला ठाऊनच असेल.

पाकिस्तानी गायकांच्या व कलावंतांच्या प्रबोधनकार्यामुळे त्या देशात व आसपासच्या प्रदेशात इतकी शांतता व प्रगल्भता आलेली आहे, की हजारोच्या संख्येने लोकांना जगण्याची इच्छाही उरलेली नाही. म्हणून लोक मोक्षाप्रत जात आहेत. अनेकांना स्वर्गप्राप्ती झाल्याचेही कानी येते. इतका महान सुधारक भारतात आला तर आपोआप वैचारिक प्रबोधन व सामाजिक उत्थानाला वेग येणार, हे वेगळे सांगायला नको ना? तर त्यासाठी आपले लाडके जीतेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेने ज्याला विरोध केला, मग तेच करण्याला प्रबोधन म्हणतात, याची आजच्या जगातील अनेक अडाण्यांना कल्पना नाही. म्हणून आपण आव्हाडांचे हात मजबूत करणे आवश्यक नाही काय? ठाण्यात तर असे म्हणतात की आव्हाडांचे हात मजबूत केले, म्हणजे सिमेंटच्या इमारतीही कच्च्या व दुर्बळ होऊन जातात. नुसत्या आव्हाडाच्या गर्जनेनेच या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागतात. तिथले बिल्डरही आव्हाडांच्या आशीर्वादाने इमारती उभ्या करतात म्हणे. अन्यथा नुसत्या आवाजानेही जमिनदोस्त होण्याचा धोका असतो. परमार नावाच्या कुणा बिल्डरने म्हणे तसे लिहून जगाचा निरोप घेतला. अशा दांडग्या पाठीराख्याच्या मदतीने आपण महाराष्ट्राला पुरोगामीत्व बहाल करीत असताना त्यात बाधा आणली जाऊ नये, अशी अपेक्षा बाळगणे चुक आहे काय? गेल्या वेळी इतका कल्लोळ झाला, की अशीच एक प्रबोधनाची मोहीम रद्द झाली होती. उंच उंच दहीहंड्या बांधण्याचा आव्हाडांचा मनसुबा राज्य सरकारने दुष्काळाचे सावट आणुन अपयशी केला होता. बहुधा आता राज्यातला दुष्काळ संपलेला असावा. म्हणूनच आव्हाडांनी पुन्हा आपली मुलूखगिरी सुरू केली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानातून क्रांतीकारी तालिबानी सुधारकांना आमंत्रित केले आहे. गुलाम अली यांच्या गायनाने आता फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना चालना दिली जाणार आहे.

साहेब, गुलाम अलीची किमया तुम्हाला ठाऊक आहे काय? त्यांच्या गजलांनी पाकिस्तान इतका पुरोगामी झाला, की तिथे म्हणे हिंदू दहशतवादाचे नामोनिशाणच शिल्लक उरलेले नाही. ते शिल्लक राहू नये किंवा तो धोकाही भविष्यात संभवू नये, म्हणून हिंदुंचेच निर्मूलन पाकिस्तानातून करण्यात आले. पण ते निर्मूलन झाल्यावर भारतालाही त्यापासून मुक्त करण्यासाठी गुलाम अलींच्या अनुयायांनी भारताच्या अनेक भागात प्रबोधनाचे काम हाती घेतले. त्यापैकीच एक इशरत जहान ही आव्हाड यांच्या मतदारसंघातली असावी, यापेक्षा अन्य कुठले सुदैव असेल? पण गुजरातच्या पोलिसांनी त्या सुधारक महिलेची निर्मम हत्या केलेली होती. तेव्हा तिचे स्मारक उभे केले, ते आव्हाडांनी! तेव्हापासून त्यांचे प्रबोधनाचे कार्य अखंड चालू आहे. आता त्यांनी इशरतचे गुरूवर्य म्हणावे अशा गुलाम अली यांनाच ठाण्यात आणायचा संकल्प सोडला आहे. तेव्हा समाज प्रबोधन वेगाने होणार याची फ़िकीर नसावी. कालपरवाच गुलाम अली पश्चिम बंगालमध्ये येणार म्हटल्यावर मालदा जिल्ह्यात काय शांततेचे ढग दाटून आले आठवते ना? त्या शांततेच्या वादळात एका पोलिस ठाण्याची राखरांगोळी होऊन गेली. आज तिथे इतकी शांतता आहे, की लोक त्याला स्मशानशांतता म्हणू लागलेत. तर अशीच शांतता आपल्या महाराष्ट्रात नांदवायची असेल, तर गुलाम अलींना इथे गजल गायनासाठी आणायलाच हवे,. तीच जबाबदा्री आव्हाडांनी उचलली आहे. पण शिवसेनेकडून त्यात व्यत्यय येण्य़ाची दाट शक्यता आहे. म्हणूनच आपल्यासारख्या जाणत्याने त्यात हस्तक्षेप करायला हवा. जितक्या म्हणून इशरत ठाण्यात जन्माला येतील, त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय फ़ुले-शाहूंचे काम पुढे कसे सरकणार ना? तेव्हा साहेब त्वरा करा! लेखणी उचला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला बसा! फ़डणविसांना महाराष्ट्राचा थोर गुलाम (अली) परंपरेची आठवण करू द्या साहेब!

पामर परमार बिल्डरच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी आव्हाडांना गुलाम अलीचा आशीर्वाद घेणे अगत्याचे आहे. पुस्तकात फ़ुले शाहूंचे विचार धुंडाळत बसलेल्या लाखो मराठी मुलांना तरूणांना ते विचार गुलाम अलीच्या गजल गायनात सहज उपलब्ध असल्याचे ठाऊकच नाही. ते जितक्या लौकर उमजेल, तितकी लौकर महाराष्ट्रातील तरूणांची बुद्धी पुरोगामी होऊन महाराष्ट्र तालिबानमय होऊन जाईल. जितका त्याचा वेग वाढेल, तितका महाराष्ट्र व भारताचा अफ़गाणिस्तान व्हायला वेग येऊ शकेल. ममता बानर्जीमध्ये गुलाम अलीने माता सरस्वती बघितली. आव्हाडांमध्ये त्याला चक्क बुद्धीची देवता गणेशाचे दर्शन होऊ शकेल. आव्हाडांना पितॄतुल्य असलेले आपण गुलाम अलींना भोलानाथ असल्याचाही साक्षात्कार होऊ शकेल. तेव्हा आपण काहीतरी करायला हवे. गुलाम अली ठाण्यात येऊन प्रबोधनाचे कार्य व्हायचे असेल, तर त्याला राज्य सरकारचे संरक्षण मिळायला हवे. ते मुख्यमंत्र्यानेच द्यावे लागेल. ते आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. आपण एक पत्र लिहायची खोटी, म्हणजे आव्हाडांचे प्रबोधन कार्य किती सोपे होऊन जाईल? आपल्या आशीर्वादाने ते प्रबोधन कार्य यशस्वी झाल्यास देशाचा पाकिस्तान वा अफ़गाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. मग पुरोगाम्यांच्या मनात इतके फ़ुटाणे फ़ुटायला लागतील, की त्यातला एक फ़ुटाणा ‘पाकिस्तान कधी कधी माझा देश’ असल्याचेही लिहून मोकळा होऊ शकेल. खरेच साहेब, आपण किंवा आव्हाड चुकीच्या कालखंडात जन्माला आलात. फ़ुले शाहूंच्या समकालीन जन्मला असता, तर त्यांचे कष्टप्रद काम किती सोपे होऊन गेले असते? पुस्तके लिहा, भाषणे करा, मेळावे भरवा किंवा आंदोलने छेडा; असल्या गुंत्यात सापडण्यापेक्षा त्यांनी गजल गायकी वा दहीहंडीचे कार्यक्रम योजून अल्पावधीतच अवघा महाराष्ट्र पुरोगामी व प्रगत करून टाकला असता. अजून वेळ गेलेली नाही. उठा साहेब, देवेंद्रना पत्र लिहायला बसा! आव्हाडांचे हात मजबूत करायला हवेत.

17 comments:

  1. दहीहंडी मंडळानी आव्हाडाच्या दहीहंडीवर बहिष्कार केल्याने व सोशल मिडया वाढत्या बदणामी मुळे दहीहंही सोहळा गुडांळावा लागलेला पण त्यातुन आव्हाड साहेब काही शिकलेले नाहीत असे दिसते.
    देव, देश आणि धर्मासाठी जिव देणारे एक मोठा समाज ठाणे शहरात असल्याचा आव्हाडाना विसर पडलेला दिसतोय.फाजिल साहस करू ठाणे शहराची शांतता बिघडवण्याचा पर्यत आव्हाडानी करू नये.
    भाई आपल्या लेखातुन सुंदर चपराक दिलेला आहे ते कमीत कमी त्याच्या साहबे समुज घेतली अशी आशा.

    ReplyDelete
  2. वा भाऊ!फार छान लिहीलत. यावर कोण काय बोलेल/लिहिलं अशी शक्यता वाटत नाही.

    ReplyDelete
  3. यालाच म्हणतात शालजोडीतून मारणे

    ReplyDelete
  4. सनसनीत टोला

    ReplyDelete
  5. लय भारी!

    ReplyDelete
  6. आपल्या स्वार्थासाठी मुलीचे ठरलेले लग्न मोडून मोगल सरदारांना स्वत:च्या मुली पुरविणारे अकबराचे बेशरम सासरेच जणू पुन्हा पुन्हा या देशात जन्माला येत राहतात. शिवाय महाराजांच्या राज्यातच अफजलखानाला फितूर असणारे, टायगर मेमनच्या वकिलाला खासदार करणारे चक्क 'जाणते राजे' ( !!!!!) म्हणवून मिरवतात. महाराष्ट्राची बौद्धिक दिवाळखोरी अजून किती खाली जाणार आहे देवच
    जाणो !!

    ReplyDelete
  7. लक्ष्मीनारायण यांची बदली आणि आव्हाडांची विपश्यना संपणे यांचा परस्परसंबंधे आहे काय? कारण परमार्थ आत्महत्येनंतर आव्हाडांची दातखीळ बसली होती.कल्याणडोंबिवली मनपा निवडणुकीतही पवारांचाblue eyed boy कमालीचा शांत होता.दरम्यानच्या काळात काही सेटलमेंट झाली काय? प्रत्येक हिंदुत्ववादी हा अतिरेकी,ब्राह्मण हा नथुरामि आणि प्रत्येक मुस्लिम फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीचा असे ठाम मानणारे आव्हाड इतका काळ शांत का होते हे कोडे अटकेतल्या नगरसेवकांनाच सुटू शकेल.

    ReplyDelete
  8. जनाब; गुलामअलीसहाबकी गजले इन काफिरोंके मुहपे तमाचे मारेगी । काफिरोंका खुनसे गला ठंडा होजायेगा

    ReplyDelete
  9. भाऊ या देशद्रोहयाला सांगलीतील सांगलीकरांनी कानाखाली उगाचच मारली याला गोळी घालायला हवी होती सांगली हळदी सोबत घोडे व गाडवांसाठी femous आहे

    ReplyDelete
  10. भाऊराव,

    लीलाबाई या जितेंद्र आव्हाडांच्या आई होत्या. त्यांचं एक वाक्य फार समर्पक आहे : सालं चुलीकडे हगायचं नि म्हणायचं नशिबात हेच लिहिलं होतं! ( संदर्भ : राजू परुळेकरांचा लोकप्रभेतला लेख http://www.lokprabha.com/20090918/alke.htm )

    समर्पक अशासाठी की आव्हाड आपल्या आईचं बोलणं अक्षरश: खरं करून दाखवताहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  11. Avhaad la Syria kiva Pakistanat neun sodla pahije manje vishay sampel ekdacha..

    ReplyDelete
  12. Saral Sahaj Soppe !!! Well Written Bhai !

    ReplyDelete
  13. kadhi kadhi purogamipana dakhavala 'kirloskaranchi dosti' 'Parulekaranchi' Dosti aadi goshti tondi aanavya lagtat.

    ReplyDelete