Wednesday, April 25, 2018

मरा-मरा म्हणता म्हणता

वाटमारी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणारा वाल्या कोळी वाल्मिकी ॠषि कसा झाला, त्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा ह्या वाल्या कोळ्याच्या तावडीत खुद्द नारदमुनीच सापडतात आणि तिथून वाल्याचे परिवर्तन सुरू होते. अशा वाटमारीचे जे पाप जमा होते, त्यात कुटुंबिय भागिदार व्हायला तयार आहेत काय? त्याची विचारणा करून ये मग खुशाल मला मारून टाक, असे नारदमुनी सांगतात आणि कुटुंबिय ते नाकारतात. तेव्हा वाल्याला पश्चात्ताप होतो. मग पापक्षालनाचा जो मार्ग नारद सांगतो, त्याप्रमाणे वाल्या अखंड तपश्चर्य़ेला बसतो. मात्र त्याला कोणता मंत्र म्हणायचे ते आठवत नाही आणि तो भलतेच काही बडबडत बसतो. नारदाने त्याला रामनामाचा जप करायला सांगितलेले असते आणि वाल्या मात्र मरा मरा असे म्हणत कित्येक वर्षे तपश्चर्या करतो. पण तरीही त्याचे तप फ़ळते. त्यावरची एक कविता बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकात आलेली आहे. ‘मरा मरा म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला, मज म्हणतील माझेपाठी उपजला बिघडला गेला’. काहीशी तशीच अवस्था राहुल गांधी यांची झाल्यासारखी वाटते. ते आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना पक्षासाठी काय करावे, ते़च बहुधा अजून उमजलेले नाही. त्यामुळे सभा कुठलीही असो वा कार्यक्रम कसलाही असो, ते मोदी मोदी अशी जपमाळ ओढत असतात. त्यातून काय साध्य होणार आहे, ते त्यांचाच ठाऊक. सोमवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर संविधान बचाव संमेलन त्यांनी घेतले होते. पण तिथेही त्यांचा मोदी नामजप अखंड चालू होता. इंडिया टुडेच्या बातमीचे शीर्षकच बोलके आहे. ‘३० मिनीटाच्या भाषणात राहुलनी १७ वेळा मोदींचे नाव घेतले’. असे शीर्षक देण्याचा संपादकाला मोह झाला, याचा अर्थच मोदींना विसरून राहुल भाषण करू शकत नसल्याची ती ग्वाही झाली आहे.

गुजरात विधानसभा असो किंवा कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार असो, राहुल आपला पक्ष तिथे काय करील हे सांगत नाहीत. मोदी आल्यापासून देशाचा कसा सत्यानाश झाला आहे, त्याचा पाढा वाचत असतात. अर्थात त्यात काही गैर मानता येणार नाही. विरोधी पक्षाने वा नेत्याने आपल्या प्रतिपक्षाचा गौरव करावा, असे कोणी म्हणू शकत नाही. पण ते करतानाच आपला पक्ष सत्तेत आला तर काय करील वा आपल्या हाती सत्ता असताना आपण किती चांगले काम केले होते, त्याची जंत्रीही द्यायची असते. पण त्या दोन्ही बाबतीत राहुल गप्प बसतात. दहा वर्षे युपीए म्हणजे राहुल-सोनियांच्या हाती सत्तासुत्रे होती. त्या काळात आपल्या सरकारने कोणते उत्तम काम केले होते आणि सत्तांतर होऊन मोदी पंतप्रधानपदी आल्यावर देशाचा कसा विचका होऊन बसला आहे, ते राहुल समजावू शकले तर जनमानस मोदीविरोधी व्हायला वेळ लागणार नाही. पण त्या नावाने बोंब आहे. आपल्या काळात कोणते चांगले काम झाले, त्याचा कुठलाही तपशील राहुल देत नाहीत. उदाहरणार्थ गेले काही दिवस राहुलनी मोदींच्या राज्यात देशातल्या मुली महिला कशा संकटात आहेत, त्याचा घोषा लावला आहे. पण आधीच्या दहा वर्षात मुलीमहिला किती सुरक्षित होत्या, त्याचा कुठलाही तपशील राहुल सांगत नाहीत. निर्भयाकांड कोणाचे सरकार असताना घडले होते? निर्भयाला कोणते संरक्षण दिल्यामुळे ती सुखरूप बलात्कार्‍यांच्या तावडीत सापडली? पुढे तिच्यावरील सामुहिक बलात्कारानंतर तिला मारले गेल्यावर युपीएने कसे संजीवनी मंत्र जपून तिला जीवंत केले? त्यामुळे अवघ्या देशातील महिलांना कसे सुरक्षित वाटू लागले? त्याचा काही तपशील राहुलनी लोकांना सांगितला, तर लोक निवडणूकांपर्यंतही थांबणार नाहीत. त्याच्या आधीच पंतप्रधान मोदींना आपला गाशा गुंडाळून हिमालयात पळून जावे लागेल ना?

पण यापैकी काहीच राहुल गांधी करीत नाहीत, की काही सांगत नाहीत. किती मिनीटांनी व किती वाक्यानंतर मोदींच्या नावाने शंख करायचा, त्याचे त्यांनी कोष्टकच तयार केलेले असावे. तासाभरात पन्नास वेळा, अर्ध्या तासात १५-२० वेळा मोदींचे नाव घ्यायचे, असे त्यांना कुणा नारदमुनीने बजावले आहे काय असे वाटते. कारण लोकांना मोदी आवडत असो नसो, ते पंतप्रधान आहेत आणि त्यांच्यापेक्षा चांगला कारभार करणारा कोणी मिळेपर्यंत लोक सत्तापालट करणार नाहीत. सहाजिकच नुसता मोदींच्या नावाने शंख करून काहीही साध्य होणार नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात मुंबईवर भीषण हल्ला झाला. शेकडो लोक मारले गेले व हजारो जायबंदी झाले. तरीही मुंबईकराने कॉग्रेस व युपीएला मुंबईच्या सर्व जागा अवघ्या सहा महिन्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानात दिलेल्या होत्या. तेव्हाही भाजपा सेनेच्या नेत्यांनी मनमोहन सोनियांच्या नावाने अखंड शंख केला होता. महिलाच काय कोणीही मुंबईकर युपीएच्या राज्यात सुरक्षित नसल्याचे कानीकपाळी ओरडून सांगितलेले होते. पण त्यापेक्षा अधिक चांगला कोणी कारभारी पेश केला नव्हता. म्हणूनच लोकांनी पुन्हा युपीएलाच मते दिली होती ना? राहुल गांधी लौकरच पंतप्रधान होतील, अशी काही अपेक्षा बाळगून २००९ सालात मुंबईकराने वा अन्यत्रच्या मतदाराने युपीएला पुन्हा सत्ता बहाल केलेली नव्हती. २०१४ सालात तो बदल घडला, कारण मोदी नुसतेच युपीए वा कॉग्रेसच्या नावाने शंख करीत नव्हते, तर पर्याय म्हणून आपण काय करू शकतो आणि करणार त्याचाही तपशील मांडत होते. लोकांनी त्या पर्यायाला कौल दिला होता. राहुलनाही मोदींचा नामजप करायला हरकत नाही. पण त्याचबरोबर आपण किती छान कारभार करणार, त्याचीही योजना लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. पण त्या बाबतीत बोंब आहे. सुधारणा कशी व कोणती करणार, त्याचा मागमूस राहुलच्या भाषणात कुठे आढळत नाही.

एखाद्या माणसाने किती खुळेपणा करावा आणि लोकांनी तो किती सहन करावा, याला मर्यादा असतात. कॉग्रेस आणि सामान्य जनता यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. आपल्या संघटनेचे युवराज म्हणून कॉग्रेसवाले राहुलचा मुर्खपणा निमूट सोसू शकतात. ते तिकीटासाठी लाचार असतात. मतदार अजिबात लाचार नसतो. जनता मोदींसाठी लाचार नाही की राहुलसाठी अगतिक नाही. योग्य नसलेला कारभारी बदलण्याइतकी जनता शहाणी झाली आहे आणि योग्य पर्याय मिळाल्यास आज सत्तेवर बसलेल्यांना ती २०० वरून ४४ पर्यंत खाली पाडू शकते. हे राहुलनी लक्षात घेतले तर आपण काय पेश करायला पाहिजे ते त्यांच्या लक्षात येईल. त्यांना आजीने १९८० सालात पुन्हा मिळवलेली सत्ता आठवते आणि २००४ सालात युपीए बनवून आईने मिळवलेली सत्ता ठाऊक आहे. पण तेव्हाची स्थिती वेगळी होती आणि आजची स्थिती भिन्न आहे. मोदी व गुजरात दंगलीचे अवास्तव भांडवल करून २००४ सालात सोनियांनी युपीए बनवली होती व कुठल्याही बहूमताशिवाय सत्ता बळकावली होती. आजचे अन्य पक्ष तितके समर्थ नाहीत, की कॉग्रेस बलशाली राहिलेली नाही. त्यात पुन्हा राहुलनी स्वत:च शक्य तितका पक्ष खिळखिळा करून टाकलेला आहे. केवळ राहुल नको म्हणून मोदींना कामाशिवाय पुन्हा सत्ता मिळू शकते, इतकी कॉग्रेसची दुर्दशा झालेली आहे. परिणामी राहुल जितके मोदी विरोधाची जपमाळ ओढतील, तितकी मोदी यांची बाजू अधिक प्रबळ होत गेली आहे. राहुलचेच नेतृत्व सक्तीचे असेल तर बहूसंख्य विरोधी पक्षांची मोदी विरोधात कॉग्रेसच्या नेतॄत्वाखाली एकास एक उमेदवार उभे करू शकणारी भक्कम आघाडीही होऊ शकणार नाही. सरन्यायाधीशांच्या महाअभियोग विषयातून त्याची साक्ष मिळालेली आहे. ते समजण्याचा आवाकाही राहुलपाशी नाही. मग मोदी-मोदी म्हणून तपश्चर्या फ़ळाला येणार कशी?

6 comments:

  1. bhau congressi patrkar hindi belt madhil bjp chya 50-60 jaga kami honarey asa boltayat.te kuthalya tarkane mahit nahi.yewadhach ki mage sarw milya hotya mhanun ata milnar nahit,ha hishob kasa kay kadhatat?te lok kay rahul la pm karnyasathi matdan karnar ahet kay?karnar asatil tar rahul ne asa kay formula dilay tyana?shetkari ,dalit mahila ase vishay je ata jorat ahet tyache upay congress sangat nahi,ulat modi nehami boltat,jewadhe kay kele asel te tari boltat.

    ReplyDelete
  2. अगदी खरयं भाऊ...अर्णवला दिलेल्या मुलाखतीपासून ते कालपरवाच्या १५ मिनिटे बोलूद्याच्या घटनेपर्यत ...पूर्वी किमान कीव तरी यायची...आजकाल तर हा माणूस असह्य होतोय..

    ReplyDelete
  3. He is shooting himself in the foot.

    ReplyDelete
  4. अगदी खरं आहे पण का कोण जाणे पूर्वी निदान कॉमेडी म्हणुन तरी बरा वाटायचा आता तिडीक येती.

    ReplyDelete
  5. Rahul Gandhi is Narendra Modi's most comprehensive political insurance policy.
    Until he is leading congress,he shall act like a camel in the tent for Congress!

    ReplyDelete
  6. तंदुरकांड तर काँग्रेसनेच केलेले होते, त्याची आठवण आज काँग्रेसला का होत नाही ?

    ReplyDelete