Monday, December 22, 2014

धर्मभावनांचा इंधनासारखा वापर



धार्मिक उन्माद किंवा धार्मिक दहशतवाद हे शब्द आता भारतीयांना नवे राहिलेले नाहीत. पण त्या शब्दांचे अर्थ मात्र गोंधळात टाकणारे असतात. पेशावरच्या घटनेनंतर कोणाला एका घटनेची आठवण कशाला होऊ नये, याचे म्हणूनच नवल वटते. याप्रकारे हत्याकांड झाल्यावर कसाबचा मुंबईवरचा हल्ला अनेकांना आठवला. पण त्यानंतर तीन वर्षांनी मुंबईतच घडलेली एक घटना, कोणाच्या स्मरणातही राहू नये का? २०११ च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत रझा अकादमीने एक प्रचंड मोर्चा काढला होता आणि त्यातून मोठाच हिंसाचार माजला होता. त्यात महिला पोलिसांवर लैंगिक हल्ल्यापासून अमर जवान स्मारकाच्या विटंबनेपर्यंत घटना घडल्या होत्या. पोलिस व माध्यमांवर हल्ले झाले व त्यांच्या गाड्याही जाळल्या गेल्या होत्या. त्यातून मुंबईकरात इतका मोठा क्षोभ उठला, की नाकर्तेपणाचा ठसा तात्कालीन पोलिस आयुक्त अरूप पटनाईक यांच्यावर बसला होता. शेवटी तडकाफ़डकी त्यांना दूर करून नवा आयुक्त नेमावा लागला होता. हे सगळे कशामुळे व कोणत्या कारणास्तव झालेले होते? रझा अकादमीने हा मोर्चा काढायचेच मूळात काय कारण होते? तर भारताशेजारी असलेल्य म्यानमार नावाच्या देशात दंगली होऊन त्यात मुस्लिमांवर मोठे अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ ह्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. म्हणजेच जगाच्या पाठीवर कुठेही मुस्लिमांवर अत्याचार झाले, तर त्याविषयी भारतातले मुस्लिम वा त्यांच्या संस्था संघटना हळव्या असतात, हे नव्याने सांगायला नको. मग असा प्रश्न येतो, की त्यापैकी सगळेच परवाच्या पेशावर येथील हत्याकांडानंतर इतके गप्प कशाला? म्यानमारचे मुस्लिम आणि पाकिस्तानात सामुहिक हत्याकांडात हकनाक मारले गेलेले मुस्लिम, यात काही गुणात्मक फ़रक आहे काय? नसेल तर भारतातले तमाम मुस्लिम उद्धारक नेते व संस्था निष्क्रीय कशाला बसल्या आहेत?

म्यानमारसाठी मुंबईतल्या हिंसक मोर्चासारखे आणखी एक उदाहरण द्यायला हवे. त्याच वर्षी अमेरिकेत कोणी मुस्लिमांच्या प्रेषितावर एक अश्लिल चित्रपट बनवल्याचे प्रकरण खुप वादग्रस्त झाले होते. त्यातून अनेक मुस्लिम देशात दंग्यांचा धुडगुस घातला गेला. लिबीयामध्ये तर अमेरिकन दूतावासच पेटवून देण्यात आला. त्यामध्ये अमेरिकन राजदूतही होरपळून ठार झाला. भारतातही त्याच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. कारण अर्थात इस्लाम व प्रेषिताची विटंबना हेच होते. कुठल्याही श्रद्धावानाच्या भावना हळव्या किंवा संवेदनाशील असायला अजिबात हरकत नाही. पण त्या सोयीनुसर हळव्या व गैरसोयीच्या वेळी बधीर होणे चमत्कारीक नाही काय? म्हणजे घटना जशाच्या तशा असतील, तर प्रतिक्रीयाही समानच असायला हव्यात ना? मुस्लिमांच्या कुठल्याही कत्तल हत्येविषयी तितकीच संतप्त प्रतिक्रीया उमटायला नको काय? म्यानमारच्या मुस्लिमांविषयी जसा प्रक्षोभ झाला, तसाच मग पेशावरच्या घटनेनंतर दिसायला हवा ना? पण इथे रझा अकादमी वा अन्य मुस्लिम संघटना जवळपास थंड बसलेल्या दिसतात. त्यांना जणू पेशावरमध्ये मारल्या गेलेल्या कोवळ्या मुस्लिम मुले माणसांविषयी काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते. मग प्रश्न असा पडतो, की या भावना हत्या-हिंसा याविषयी असतात, की त्याला अन्य काही कारण असते? म्यानमार व पेशावरच्या घटनांमध्ये कोणता असा फ़रक आहे, की दोन्हीविषयी प्रतिक्रीया भिन्न उमटतात? जाणत्यांनी त्याचा विचार शोधक वृत्तीने करायला हवा आहे. या दोन घटनांमध्ये मरणारे मुस्लिम असले, तरी मारणार्‍यात फ़रक आहे. म्यानमारचे मारेकरी बौद्ध म्हणजे बिगर मुस्लिम होते आणि पेशावरचे मारेकरी मुस्लिम जिहादी होते. आणि इतक्याशा फ़रकामुळे भारतीय मुस्लिम संघटना, पक्षांच्या प्रतिक्रीया अजिबात भिन्न आढळून आलेल्या आहेत.

या निमीत्ताने ज्या चर्चा वाहिन्यांवर व माध्यमातून मुस्लिम संघटना व नेत्यांच्या प्रतिक्रीया आल्या, त्या कमालीच्या सौम्य आहेत. त्यामध्ये त्रयस्थपणे घटनेचे विश्लेषण केलेले दिसेल. पहिला नेहमीचा युक्तीवाद वा खुलासा असा, की जे काही पेशावरमध्ये झाले त्याचा इस्लामशी संबंध नाही. इस्लाम कुणाही निरपराधाची हत्या करायला मान्यता देत नाही वगैरे. आणि दुसरे नेहमीचे स्पष्टीकरण असे, की जिहादच्या नावाने चाललेली कृत्ये हा इस्लाम नव्हेतर ती धर्माची विटंबना आहे. हे युक्तीवाद एकदम मान्य. पण सवाल त्यातूनच निर्माण होतो. जर कोणी धर्माच्या नावाखाली अशी अमानुष कृत्ये करीत असेल आणि त्यालाच इस्लाम म्हणत असेल, तर तीही इस्लामची विटंबना नाही काय? मग त्याबाबत या मुस्लिम संघटना व त्यांचे नेते इतके उदासिन कसे? अमेरिकेत कोणीतरी चित्रपट काढला आणि तो इथल्या कोणी बघितलेला नसतानाही विटंबना म्हणून इथे धिंगाणा घालण्यापर्यंत संवेदनशील असलेले हेच मुस्लिम नेते, भारतानजीक पेशावरची घटना व त्यातली धर्माची विटंबना बघूनही असे बधीर कशाला रहातात? काही नेते तर याला इस्लाम बदनाम करण्याचे कारस्थान म्हणतात. त्यात तथ्य असेल, तर त्यांनी त्यावर कोणती हालचाल केली आहे? कशाला केलेली नाही? पुन्हा मग अशी विटंबना करणारे कोण, इथे येऊन आपण थांबतो. अमेरिकेत ज्यांनी विटंबना करणारा चित्रपट काढला, तो बिगर मुस्लिम होता आणि पेशावरमध्ये हत्याकांड करून इस्लाम बदनाम करणारे मुस्लिम जिहादी आहेत. म्हणजेच धर्माची विटंबना कोणी केली त्यानुसार भावना व प्रतिक्रीया हळव्या किंवा तीव्र होत असतात, अशाच निष्कर्षाप्रत यावे लागते. अर्थात त्यात सर्वसामान्य मुस्लिम येत नाही. ही भावनांची तीव्रता वा सौम्यता मुस्लिम नेत्यांपुरतीच मर्यादित असते. कारण त्यातून धार्मिक राजकारणाची पोळी भाजता येत असते.

अमेरिकेने इराकवर आक्रमण केल्यावर तिथे मारल्या गेलेल्या काही हजार मुस्लिम नागरिकांविषयी इथल्या मुस्लिम नेत्यांनी आकाशपाताळ एक केलेले दिसेल. परंतु त्याच इराकमध्ये दिर्घकाळ सत्ता उपभोगणारा हुकूमशहा सद्दाम हुसेन याने लाखो विरोधकांची इतक्या वर्षात राजरोस कत्तल केली, तेव्हा कुणा मुस्लिम नेत्याची तक्रार नव्हती. काश्मिरचे उदाहरण तर आपल्याच देशातलेच आहे. गेल्या दोन दशकात काश्मिर खोर्‍यात शेकडो घातपाताचे प्रकार होत आले आहेत आणि त्यात हजारो नागरिक मारले गेले आहेत. ते बहुतांश नव्हेतर जवळपास सगळेच मुस्लिम होते. पण त्याविरुद्ध कुठल्या मुस्लिम संस्था-नेत्यांनी कधी आकाशपाताळ एक केल्याचे दिसले काय? पण त्याच काश्मिरात सुरक्षेसाठी व घातपात्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या भारतीय लष्कराकडून कोणी मुस्लिम चुकून मारला गेला, तर प्रक्षोभाचे रान उठते. हा फ़रक कशाला होतो? जो मारला जातो तो मुस्लिम असल्याची तरी त्यात सहवेदना असते, की कोण मारणारा असतो, त्यानुसार भावनांचा उद्रेक होत असतो? कधीचीही घटना शोधून काढा, मुस्लिम नेते व संघटनांनी मुस्लिमांच्या हत्या वा धर्माच्या विटंबनेच्या विरोधात आक्रोश केलेला दिसणार नाही. जिथे बिगर मुस्लिमाकडून काही घडले, तेव्हाच अशा संघटना व नेते उसळून अंगावर आलेले दिसतील. याचा अर्थ इतकाच, की अशा संघटना व नेत्यांना मुस्लिमांविषयी काडीमात्र आस्था वा सहभावना नाही. पण जिथे धर्माच्या नावाने भावनांना चिथावणी देऊन सामान्य मुस्लिमांना आपल्या दावणीला बांधता येईल, तेवढ्यापुरत्या अशा संघटना व नेत्यांच्या प्रतिक्रीया तीव्र व प्रक्षोभक झालेल्या दिसतील. धर्माचे राजकारण असे नेते व संघटना करतात. त्यात मग सामान्य मुस्लिमच अधिक भरडला जात असतो. सामान्य मुस्लिमांच्या भावनांच्या इंधनावर अशा धार्मिक राजकारणाच्या गाड्या पळवल्या जात असतात.

2 comments:

  1. barobar bhau... ani ata kuni mhanayala tayar nahi ki " islam khatare me hai"

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    अगदी अचूकपणे दुखण्यावर बोट ठेवलंत तुम्ही. इस्लाम हा परस्परविसंगत पंथ आहे. माझाच इस्लाम खरा असं म्हणून कोणीही कोणावरही हत्यार उचलू शकतो. एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति हे वैदिक वचन इस्लामला मान्य नाही.

    जे वेदांच्या विरोधात जातात ते अंतिमत: नष्ट होतात. इस्लामची तीच गत होणार आहे. ही दुर्गती टाळायची असेल तर हिंदू एकमेकांशी कसे सलोख्याने वागतात त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हिंदूंचा द्वेष करणं सोडून द्यावं लागेल. प्रत्यक्ष कुराणातही भारतातील हिंदूंना काफीर म्हंटलेलं नाहीये.

    पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण! जो इस्लामी विचारवंत हे काम करायला जाईल त्याचाच आधी मुडदा पडेल अशी परिस्थिती आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete