Saturday, May 23, 2015

हंगामा है क्यु बरपा?



शाळेतला शिक्षक असो किंवा कुणी मोठा वक्ता असो, तो जे बोलतो; तेव्हा समोरच्या श्रोत्यांसाठी ते लागू असते. प्राथमिक विद्यार्थ्यांना जे शिकवले ते त्यांच्यापुरते असायला हवे. महाविद्यालयीन विद्यार्थी वा प्राध्यापक त्याची चिरफ़ाड करू लागले, तर हास्यास्पद ठरेल. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण जे प्रवचन देतात, त्याची शास्त्रीय चिरफ़ाड मुर्खपणा असतो. कारण तिथे जमलेल्या भक्तगणांनी आध्यात्मिक बोध घेण्यापुरते त्याचे प्रयोजन असते. म्हणूनच कुठल्या देशाचा प्रमुख जागतिक व्यासपीठावर बोलतो त्याची भाषा आणि अन्यत्र कुठेही आपल्या चहात्यांपुढे केलेले भाषण, यांची तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून परदेशात गेले होते हे सत्य आहे. पण त्यांचे जे विधान वादग्रस्त म्हणून काहुर माजवले गेले, ते त्यांनी विदेशी व्यासपीठावर किंवा राजकीय मंचावर केलेले नाही. त्यांच्या स्वागतार्थ तिथल्या भारतीयांनी जो समारंभ आयोजित केला होता, तिथे आपले मनोगत मोदींनी व्यक्त केलेले आहे. म्हणजेच ते राजकीय भाषण असण्यापेक्षा परदेशी वसलेल्य भारतीय सुहृदांशी केलेला संवाद आहे. त्याची फ़ारशी दखल कुठला परदेशी प्रवक्ता वा मुत्सद्दी अजिबात घेणार नाही. कारण तो खाजगी समारंभ होता. पण याचेही तारतम्य नसलेले विश्लेषक व शहाणे बोलू लागले, मग त्यांना कसले भान राहिल? जे कोणी अशा विधानाचे विश्लेषण करण्यात रमलेले आहेत, त्यांची खाजगी विधाने व वक्तव्ये चर्चेला घेतली, तर काय निष्पन्न होईल?

मध्यंतरी एका आप कार्यकर्त्याने केजरीवाल यांच्याशी झालेल्या फ़ोन संभाषणाचे ध्वनीमुद्रण माध्यमांना सोपवले होते. त्यात केजरीवाल आपल्याच निकटवर्तिय सहकारी योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांच्याविषयी कोणते शब्द वापरत होते? त्याबद्दलही असाच जाब विचारण्याचा प्रयत्न झाला होता. कुठल्याही मान्यवर नामवंत व्यक्ती वा नेत्यांच्या बाबतीत तेच आढळून येईल. मुद्दा इतकाच, की एखादा माणुस कोणासमोर बोलतो आहे आणि कोणत्या संदर्भात मतप्रदर्शन करतो आहे, त्यानुसार त्याचे विधान विचारात घ्यायला हवे. मोदी जे काही बोलले, ते आपण अनेकदा थोरामोठ्यांच्या तोंडी ऐकलेले आहे. प्रामुख्याने सेक्युलर वा उदारमतवादी नेते बुद्धीमंत नेहमीच आपल्या भारतीय असण्याबद्दल निराश असतात. याचा अर्थच त्यांना आपण भारतात जन्मल्याची शरम वाटत असते. अन्य कोणी प्रगत राष्ट्राच्या यशाने व सुधारणांमुळे भारावून आपल्या भारतीय असण्याला दोष देत असतो. अगदी भट्टा परसोल येथे भूसंपादनाच्या संदर्भात गोळीबार झाला, तेव्हा राहुल गांधी यांनीही भारतीय असल्याची शरम वाटते असे उद्गार काढलेले आहेत. परदेशात उच्च जीवनशैलीत जगणार्‍या वा त्याला वंचित असलेल्या इथल्या अनेकांना त्याचे नेहमी वैषम्य वाटलेले आहे. म्हणून मोदी जे विधान बोलतात, ते कोणाविषयी बोलतात, त्याकडे काणाडोला करून त्याचे विश्लेषण करता येणार नाही. कारण अनेक विरोधाभासाने भारतीय समाज भरलेला आहे.

देवयानी खोब्रागडे यांची भारतीय मुत्सद्दी असतानाही ज्याप्रकारे अमेरिकेत पोलिसांनी अवहेलना केली, तेव्हा यापैकी कितीजणांनी संताप व्यक्त केला होता? झाला तो भारतीयांचा सन्मान नव्हता. पण तेव्हा त्यातला तांत्रिकपणा बघण्यात धन्यता मानणार्‍यांना आज एका नगण्य विधानाने भारताचा सन्मान आठवला आहे. मग तेव्हा त्यापैकी कितीजणांनी तात्कालीन भारत सरकारला व पंतप्रधानांना जाब विचारला होता? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी मनमोहन सिंग यांची संभावना पाणवठ्यावर किरकिरणारी रडवेली बाई अशी केलेली होती. त्यावर पाक वाहिन्यांवर खिल्ली उडवली गेली. एका तरी इथल्या भारतीय ‘अभिमानी’ वाहिनी वा पत्रकाराने त्यावर पाकिस्तानला जाब विचारला होता काय? सगळे मूग गिळून गप्प बसले होते. आपल्या कुठल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी त्याचा उल्लेख केला, म्हणुन शरीफ़ यांच्या विधानाचा भारतीयांना सुगावा लागला. पण प्रत्यक्षात तिथे हजर असलेल्या बरखा दत्त या भारतीय पत्रकाराने मौन धारण केले होते. आज असेच नामवंत मोदींना जाब विचारयला पुढे सरसावले आहेत. पण भारताचा अपमान निमूट सहन करायची परंपरा त्यांनीच निर्माण केलेली नाही काय? नरेंद्र मोदी या भारतीय नेत्याला अमेरिकेने परस्पर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा गुन्हेगार ठरवला, तेव्हा कुणाला अभिमानास्पद वाटले होते? मोदी प्रकरणी भारत सरकारने अमेरिकेला जाब विचारण्याचा अभिमान कशाला दाखवला नाही? तेव्हा या अभिमानी लोकांची अस्मिता झोपा काढत होती काय?

आणखी एक जुनी गोष्ट सांगता येईल. अमेरिकेतले एक मोठे नामवंत पत्रकार सेम्युर हर्ष यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई अमेरिकन हेरसंस्था सीआयएचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. किती जाणत्यांनी त्यावर आवाज उठवला होता? तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याच्या विरोधात अमेरिकेला जाब विचारण्याचे धाडस केले होते काय? जगाकडून लाथा खायच्या आणि त्यातच धन्यता मानण्याची आपली बौद्धिक परंपरा राहिलेली आहे. म्हणूनच अमेरिकेला जाब विचारणे सोडून मोदींना व्हिसा नाकारला जातो याचेच कौतुक बुद्धीमंत करीत राहिले होते ना? तेव्हाही इंदिरा सरकार गप्प बसले आणि अमेरिकेतल्या भारतीयांनी संयुक्तपणे सेम्युर हर्ष यांच्या विरोधात मोरारजी प्रकरणी खटला भरलेला होता. पण भारत सरकार गप्प बसले होते. अशा कित्येक घटना व प्रसंग सांगता येतील, की खर्‍या भारतीय राष्ट्रप्रेमी व्यक्तीचे रक्त खवळले पाहिजे. पण त्या प्रत्येकवेळी जे झोपा काढत बसले, त्यांना एका विधानाने खडबडून जाग आलेली आहे. काश्मिरात लोक व सैनिक मारले जातात, त्याच्याकडे काणाडोळा करून क्रिकेट खेळायचा आग्रह धरणार्‍यांनी राष्ट्राभिमानाच्या गप्पा माराव्यात, यासारखा दुसरा विनोद असू शकत नाही. परदेशात असताना पंतप्रधानाने वा राष्ट्रप्रमुखाने एकजुटीची भाषा बोलावी हे चुक नसले, तरी तसा कुठला नियम नाही. आणि मोदी जाहिर व्यासपीठावर तसे काही बोललेले नाहीत. नरसिंहराव पंतप्रधान असताना विरोधी नेता असलेल्या वाजपेयींनी भारत सरकारची भूमिका मांडलेली होती. तरीही भाजपाला देशाचा शत्रू ठरवणार्‍यांनी कुठल्या सभ्य राजकीय संकेताचे आग्रह धरावेत? कुठल्याही अतिरेकाला व अतिशयोक्तीला मर्यादा असतात. राजकीय विरोध म्हणून मोदींवर दोषारोप व्हायला हरकत नाही. पण राजकीय विश्लेषण करताना विधान कुठे आणि कुठल्या संदर्भात केलेले आहे, त्याचेही भान ठेवायला हवे. ज्यांना व्हिसा नाकारण्याचे कौतुक होते त्यांनी तरी इतका शहाजोगपणा दाखवू नये ना? दोनचार दिवस हा सगळा गदारोळ बघून पहिल्यांदाच गुलाम अलीच्या गझलीचा अर्थ उमगला

थोडीसी जो पी ली है
हंगामा है क्यु बरपा


मी मराठी   (खुसपट)  २३/५/२०१५

3 comments:

  1. Sir (maf kara marathi font nahi sapadat iPhone varati Changala) I am not sure when you say why they did not do when you say I am still not understanding who are they? Because incident you mentioned like Muraraji many of us father were kids and era was different people were not really aware about what is happening at such high level, I would like to again defend them who protested against PM said, though it wasn't public I never heard any pm proclaimed himself in such bad manner in foreign countries before. Second point is very nice point where we have such nice culture that Atalaji represented India when Narsinhji was pm , this shows culture and political maturity of these leaders. With my very limited knowledge I would like to highlight onemore point where advaniji represented India in UNo and showcased MAREGA as example of good thing happened in India(current pm has different views and he feel he is running this skim to showcase congress 60 failure @cost of our money for his own ego) that's other part.but attacking opposition saying this of sentences in foreign what he want to show world? What if congress as they said before starts sending speaker and starts replying pm in same country? What will be consequences? This country is nighther property of congress nor its mr Modiji point is clear we elected person for countries betterment and not to showcase his egos and fulfill desire to showcase himself on top of countries pride and culture, we are equally proud of all the PM Of this country who contributed to build this country from zero to country reached on Mars and country who found water on moon we were never waited for someone to become to feel proud of our country.

    ReplyDelete
    Replies
    1. Its not the question whether modiji did was appropriate or not. What he did surely suits only him and his style.

      But do you find how other people change colours. The persons who felt nothing when Devyani was ill-treated or hon. PM at that time was insulted, are jumping now that they are and were proud of Bharat. This also includes some people who could do strong actions against the persons and the incident but didn't do any protest or utter any word against it.

      Delete
  2. देवयांनींना अमेरिकेत अटक झाली त्या वेळी आपले काही भाडखाऊ लोक/काही न्युज चॅनल संताप व्यक्त करण्या ऐवजी संशय व्यक्त करत होते.

    ReplyDelete