Wednesday, January 6, 2016

भारतीय शरणागतीचा नायक



पठाणकोट येथील घातपाती हल्ल्याच्या जखमा अजून सुकलेल्या नाहीत, की जिहादींच्या हाताला लागलेले रक्त अजून तसेच आहे. इतक्यात काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ़्ती महंमद सईद यांचे अल्पकालीन आजाराने निधन झाले. सहाजिकच आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा गुणगौरव तमाम माध्यमातून व राजकीय वर्तुळातून सुरू झाला आहे. पण गौरवाचे शब्द बोलणार्‍यांना कालपरवा आपणच बोललेले शब्दही आठवू नयेत, याचे मात्र नवल वाटते. पठाणकोटच्या हल्ल्याशी पंतप्रधान मोदींची लाहोर भेट जोडून अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या. प्रामुख्याने कॉग्रेस त्यासाठी आघाडीवर होती. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर नेहमीप्रमाणे आपल्या अकलेचे तारे तोडण्याची संधी साधली. भाजपाचे सरकार सत्तेत असते, तेव्हाच असे जिहादी दहशतवादी सोकावतात, इथपर्यंत त्यांनी मजल मारली. वाजपेयी सत्तेत असताना अझर मसूदला तुरूंगातून सुखरूप उचलून कंदाहारला सोडण्यात आल्याचा संदर्भ शिंदे यांनी दिला. त्याच्याशी मग मोदींच्या लाहोर भेटीचा प्रसंग जोडला होता. यातून काय सिद्ध करायचा प्रयत्न होत असतो? अनेक माध्यमकार व पत्रकारही कंदाहारचे स्मरण अगत्याने करून देतात, तेव्हा भारतातील जिहादी घातपाताचा आरंभ जणू कंदाहारच्या विमान अपहरणापासून सुरू झाला, असेच भासवले जात असते. निदान तशी लोकांची समजूत व्हावी असाही त्यामागचा हेतू असतो. मात्र ते करताना आपण मुफ़्ती महंमद सईद यांचे एक कर्तृत्व झाकतोय, याचे त्यापैकी कोणाला भान नसते आणि आज त्यांच्या निधनांतरही बहुतेकांना मुफ़्तींच्या त्याच ऐतिहासिक कामगिरीचे विस्मरण झालेले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक आता आठवडाभर चालेल. तसेच त्यांच्या वारस कन्येचाही उदो उदो सुरू होईल. पण मुफ़्तींमुळेच जिहाद समोरील भारताच्या शरणागतीचा इतिहास सुरू झाला, याची आठवण कोणी करून देणार नाही.

उद्या पित्याच्या जागी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेणार्‍या महबुबा मुफ़्ती या एकमेव कन्या नाहीत. मुफ़्तींना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी घाकटी कन्या डॉ. रुबाया यांच्या अपहरणाने भारताच्या शरणागतीचा इतिहास सुरू झालेला होता. १९८९ सालात राजीव गांधींचा पराभव झाला आणि देशात प्रथमच आघाडी सरकार सत्तेत आले. भाजपा व मार्क्सवाद्यांची डावी आघाडी यांच्या पाठींब्यावर जनता दलाचे व्ही. पी. सिंग सरकार सत्तेत आले. त्यात मुफ़्ती महंमद सईद यांची देशाचे गृहमंत्री म्हणून नेमणूक झालेली होती. मुफ़्ती यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यापासून अवघ्या सहा दिवसात श्रीनगर येथून त्यांची कन्या रुबाया हिचे अपहरण झाले. तेव्हा भारत सोडा, काश्मिरमध्येही कुठे घातपात वा हिंसाचाराची घटना घडत नसे. जिहाद, घातपात वा पाकिस्तानचा झेंडा फ़डकवण्याची कुणाला हिंमत नव्हती, असा तो कालखंड होता. अशावेळी मुफ़्ती या काश्मिरी नेत्याच्या हाती देशाची अंतर्गत सुरक्षा गेली आणि त्याच्याच मुलीचे अपहरण झाले. त्याच्या बदल्यात तुरूंगात खितपत पडलेल्या पाकधार्जिण्या पाच घातपात्यांच्या मुक्ततेची अट घालण्यात आली. जम्मू काश्मिर लिबरेशन फ़्रंट या संघटनेने तो उद्योग केला होता. तेव्हा त्या संघटनेला भारतात बंदी होती आणि त्याचा नेता परदेशी आश्रय घेऊन जगत होता. तेव्हा देशाची सुरक्षा गुंडाळून मुफ़्तींनी ती मागणी पुर्ण केली आणि तिथून मग जिहादींपुढे शरणगत होण्याचा दिर्घकालीन इतिहास सुरू झाला. आपल्या मुलीला सुखरूप परत मिळवण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्याने जिहादी मागणीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर एकामागून एक अशा घटना घडू लागल्या आणि क्रमाक्रमाने काश्मिरमध्ये पाकिस्तानातून जिहादी हल्लेखोर येण्याचा सिलसिला सुरू झाला. तिथेच न थांबता देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जिहादी हिंसाचार घडवण्यापर्यंत मजल मारली गेली.

जिहाद वा घातपात यांच्याशी तितक्याच खंबीरपणे दोन हात करून आपण अधिक भेदक व प्रत्युत्तर देणारे आहोत, असेच दाखवावे लागते. तरच दहशतवादाचा सामना होऊ शकत असतो. आपल्या पोरांचे कुटुंबियांचे अपहरण झाले वा त्यांचा जीव धोक्यात असला, म्हणून देशाचा गृहमंत्री शरण जाणार असेल, तर पार्यायाने भारत सरकारच जिहादला शरण जात असते. त्यातून मग एक संदेश अशा घातपात्यांना मिळत असतो. मोक्याच्या वा महत्वाच्या व्यक्ती वा नातलगांचे अपहरण करा, त्यांना ओलिस ठेवा, म्हणजे सरकारला नाक मुठीत धरून शरण आणता येते. त्या शरणागत धोरणाचा जनक, ही मुफ़्ती महंमद सईद यांची खरी ओळख आहे. स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान म्हणूनच शरणागतीचा नायक हीच आहे. बाकीच्या राजकीय कारकिर्दीला फ़ारसे महत्व नाही. गेल्या पाव शतकात त्यामुळे देश दहशतवाद व जिहादच्या विळख्यात फ़सत गेला, तरी कोणी मुफ़्तींच्या या राजकीय देणगीचा उल्लेखही सहसा करीत नाही. कारण मुफ़्ती हे मुस्लिम नेता आहेत आणि त्यांच्या चुका वा गुन्ह्यावर पांघरूण घालण्याला आपल्या देशात पुरोगामीत्व मानले जाते. आज त्यांच्या निधनानंतर देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात काश्मिरला आणून सहभागी करण्यासाठी मुफ़्तींनी दिलेल्या योगदानाचे कोडकौतुक सुरू आहे. पण वास्तवात अजून तरी काश्मिर खरोखर भारताच्या मुख्यप्रवाहात सहभागी झालेला आहे काय? उलट त्याच पाव शतकात काश्मिरातून क्रमाक्रमाने पंडितांना पळवून लावण्यात आले. रुबायाच्या अपहरणापर्यंत काश्मिरात पंडीत गुण्यागोविंदाने नांदत होते आणि पुढल्या २५ वर्षात तिथून लक्षावधी हिंदूंना परागंदा व्हावे लागले. याला काश्मिर मुख्यप्रवाहात आणणे म्हणायचे काय? व्यक्ती मरण पावली, मग त्याची निंदा करू नये. पण मृत व्यक्तीचे खोटेनाटे दिशाभूल करणारे कौतुक सुद्धा करू नये.

मुफ़्तींनी आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत काश्मिरला भारताच्या मुख्यप्रवाहात किती आणले, हा विषय बाजूला ठेवला तरी त्यांनी जिहादी मानसिकता व हिंसाचार मात्र देशाच्या मुख्यप्रवाहात आणला, हे मान्य करावे लागेल. कालपरवा पठाणकोटच्या हल्ल्यानंतर जी संरक्षणात्मक कारवाई भारतीय सुरक्षा दलांनी केली, त्यातला सर्वात गंभीर मुद्दा अपहरण वा ओलिस ठेवण्याचा होता. हवाईतळापर्यंत घुसलेले जिहादी तिथे वास्तव्याला असलेले नागरिक वा कर्मचार्‍यांचे कुटुंबिय यांचेच अपहरण करतील वा त्यापैकी कोणाला ओलिस ठेवतील काय, याची सर्वाधिक काळजी घेतली गेली. म्हणजेच अतिरेक्यांपाशी कोणती हत्यारे होती वा स्फ़ोटके होती, त्यापेक्षा अपहरण वा ओलिस ठेवण्याची भिती अधिक होती. हे सर्वात भेदक व सोपे हत्यार पाकधार्जिण्या जिहादींना सोपवण्याचे वा त्याला धार लावून देण्याच श्रेय मुफ़्तींना आहे. त्यांनी गृहमंत्री असताना जे शरणागतीचे धोरण पत्करले, तिथून पाक व जिहादी यांना एक भेदक हत्यार मिळाले. त्याचाच पुढला मोठा प्रयोग मग काठमांडू येथून भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण व सव्वाशे प्रवाश्यांना ओलिस ठेवण्याचे धाडस झालेले होते. मानवी भावनांशी खेळण्याचे हत्यार उपसून भारत सरकारला वाकवता येते, याचा शोध मुफ़्तींमुळे लागला. म्हणूनच त्यांना जिहादीपुढे शरणागत होण्याच्या भारतीय इतिहासाचे जनक वा नायक संबोधणे योग्य ठरेल. बाकी त्यांनी भारताला काय दिले, हा विषय फ़ारसा महत्वाचा नाही. तसे शेकडो नेते भारतीय राजकारणात होऊन गेले. पण मुफ़्तींची आठवण करायची असेल, तर भारताला भेडसावणार्‍या व रक्तबंबाळ करणार्‍या प्रत्येक जिहादी हल्ल्याच्या वेळी करावी लागेल. कारण त्यांनीच रुजवलेली ही विषवल्ली आहे. पण शरणागत मनस्थितीच्या आहारी गेलेल्या कोणालाही त्याची आठवणही करावीशी वाटत नाही वाटणार नाही. शरणागतांकडून कुठली मोठी अपेक्षा बाळगता येईल?

8 comments:

  1. ते गृहमंत्री असतानाच त्यांच्या मुलीचे अपहरण होणे ...नंतर अतिरेक्यांना सोडून देणे ...वगैरे वगैरे हा सुद्धा ठरवून केलेला बनावच असू शकतो त्याकाळी....हे पण सामील असू शकतात...एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे....

    ReplyDelete
  2. Hey kharesch ahe .. Ashya netya mulech Jihad janmala ghatala gela
    ani ajun ek bhau saheb - Ya Pathankot chya jihadina ka aply bhart maatechya jaminit dfan karto appan hyana agni deun tya so called Jannat chi hoor or noor la pan jalayla pahije

    ReplyDelete
  3. भाऊ,तुमचे हे वाक्य फार आवडले 'जिहादीपुढे शरणागत होण्याच्या भारतीय ईतिहासाचे जनक '

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर
      हीच खरी शोकांतिका आहे.

      Delete
  4. मुफ्ती मोहम्मद सईद यांनीच संगनमत करून आपल्या मुलीचे अपहरण करवले आणि अतिरेक्यांना सोडायला भागपाडले असावे- अशी शंका कधीच कोणाच्या मनात का आली नाही?

    ReplyDelete
    Replies
    1. सतीश सुर्वेJanuary 12, 2016 at 8:27 AM

      ..
      रामदास जी शंकेवर घेतलेली शंका योग्य आहे. यावर शंका घेण्यास जागा आहे. असे तर्क लढवले जातात. असे तर्क मग सोशल मिडीयावर आतली बातमी म्हणून पसरतात आणि ते कालांतराने खरे मानले जातात.

      Delete
  5. छान भाऊ सत्य परिस्थिति सांगितलीत धन्यवाद

    ReplyDelete