Friday, January 8, 2016

शिंदे सरकारांचा बेतालपणा



वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मुंबई बॉम्बस्फ़ोटाची घटना घडून गेलेली होती. तेव्हा आजच्या केजरीवाल यांच्यासारखे एक गृहस्थ तात्कालीन माध्यमात आपला प्रभाव टाकून होते. त्यांचे नाव गो. रा. खैरनार! त्यांनी तेव्हा शरद पवार यांच्यावर एकाहून एक आरोपांचा भडीमार चालविला होता. सार्वजनिक सेवेत असलेल्या अधिकार्‍याने असे बोलणे बेताल होते. पण म्हणूनच त्यांच्या त्या आरोपांना वजनही होते. मुंबई महापालिकेचे उपायुक्त असलेले खैरनार यांनी शरद पवार यांच्यावर दाऊद मार्फ़त स्फ़ोट घडवल्याचाही खळबळजनक आरोप केला होता. पुरावे मागितले तर ट्रकभर पुरावे असल्याचाही हवाला दिला होता. सहाजिकच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे भाग झाले होते. त्याबद्दल तात्कालीन पालिका आयुक्त शरद काळे यांनी दिलेले एक स्पष्टीकरण आज खुप मोलाचे वाटते. किंबहूना ते आजच्या माध्यमांनी व शहाण्यांनी समजून घेण्य़ाची खुप गरज आहे असेही अगत्याने वाटते. खैरनार यांच्यावर कारवाई करताना आयुक्त काळे म्हणाले होते, खैरनार कुठलाही नियम पाळत नाहीत. पण त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करताना मला मात्र सर्व नियम पाळावे लागतात. म्हणूनच त्यांच्या बेछूट आरोपा इतकीच बेछूट कारवाई करणे मला शक्य नाही. नियमांच्या चाकोरीत राहून मला प्रत्येक पाऊल उचलणे भाग आहे. कारण कारभार नियमांनी चालवावा लागतो आणि त्यासाठीच अधिकार मिळालेला असतो. नियम झुगारणार्‍यांना नियम मोडल्यावरही नियमांचे संरक्षण मिळू शकते. पण अधिकाराच्या पायातली बेडी तोडून आपण कारवाई करू शकत नाही. अन्यथा माझाही खैरनार होऊन जाईल. ही बाब फ़क्त खैरनार यांच्यापुरती नाही. प्रत्येक बाबतीत अधिकार वापरणार्‍याला तेच बंधन असते आणि म्हणूनच कुठल्याही अधिकार्‍याला त्याच चाकोरीत रहावे लागत असते.

पठाणकोट हल्ला वा अन्य तशा खळबळजनक घटना घडतात, तेव्हा प्रत्येक अधिकार्‍याला आपल्या मर्यादा ओलांडून पुढे जाता येत नसते. मग भले त्यात नैसर्गिक न्याय दिला जात असेल, तरी संयम राखावा लागतो. पठाणकोटच्या घातपाती हल्ल्यानंतर विरोधक वा माध्यमांनी काय बोलावे किंवा काय सांगावे, याला बंधन नाही. पण सरकार म्हणून काम करणार्‍यांना मर्यादा संभाळाव्या लागतात. त्यात इवली त्रुटी राहिली तरी पुन्हा त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. पठाणकोटच्या हल्ल्याविषयी कारवाई चालू असताना माध्यमांनी घाईगर्दीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कारवाई यशस्वी झाल्याचे विधान केले होते. पण प्रत्यक्षात कारवाई तेव्हाही संपली नव्हती. भले मोठा धोका टाळला गेला होता आणि तशी माहिती सिंग यांना मिळालेली होती. म्हणूनच मग सरकारकडे अपुरी माहिती होती आणि आपल्या अपयशाचीच गृहमंत्री पाठ थोपटत असल्याची टिका नंतर झाली. उलट त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वा संरक्षणमंत्री मनिहर पर्रीकर यांनी एकूण घटनेविषयी मौन धारण केले, अशीही टिका चाललेली होती. याचे कारण लक्षात येऊ शकते. माध्यमांना त्या घटनेचे गांभिर्य कळतेच असे नाही आणि त्यांना मिळालेली अर्धवट माहिती खळबळ माजवणारी असण्याशी त्यांना मतलब असतो. पण त्यातून विपरीत परिणाम घडण्याचाही धोका असतो. राजनाथ सिंग त्याला बळी पडले. म्हणूनच टिकेचे लक्ष्य झाले. मात्र ती सवलत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देता येत नाही. दीड वर्षापुर्वी तेच देशाचे गृहमंत्री होते. म्हणूनच पठाणकोट घटनेनंतर सरकार किती माहिती जाहिर करू शकते आणि कोणत्या बाबतीत सरकारने गोपनीयता राखावी, याचे त्यांना भान असायला हवे. पण पक्ष प्रवक्ता म्हणून त्यांनी जी मागणी केली आ,हे ती खैरनार यांना शोभणारी वाटते.

लाहोर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धावती भेट दिलेली होती आणि ते पाक पंतप्रधानांच्या वैयक्तीक आमंत्रणावरून तिथे गेलेले होते. तिथे नेमके काय शिजले, याविषयी जाहिर वाच्यता झालेली नाही. त्यानंतर पठाणकोटचा हल्ला झाला. म्हणूनच लाहोरची मोदीभेट वादग्रस्त झालेली आहे. त्यावरून राजकारण होणार. त्याबद्दल तक्रार कोणी करू शकणार नाही. पण राजकारण करताना शिंदे यांची भेटीत काय शिजले, त्याचा तपशील जाहिर करण्याची मागणी बेताल नव्हे काय? दोन पंतप्रधान काय बोलतात, तो जाहिर चर्चेचा विषय असू शकत नाही, हे शिंदे यांना कधी कळणार आहे? की आपल्याप्रमाणेच कुठल्याही पंतप्रधान वा मंत्र्याने बेताल बकवास करावी अशी त्यांची अपेक्षा आहे? तीन वर्षापुर्वी शिंदे देशाचे गृहमंत्री झाले. योगायोगाने तोही जानेवारी महिना होता आणि कॉग्रेस कार्यकारीणीचे जयपूर येथे अधिवेशन भरलेले होते. तेव्हा शिंदे यांनी अशी काही मुक्ताफ़ळे उधळली, की त्यासाठी त्यांना नंतरच्या काळात नाकदुर्‍या काढाव्या लागल्या होत्या. नव्याने उच्चपद मिळाल्याने शेफ़ारलेले शिंदे पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना म्हणाले होते, संघाच्या शिबीरामध्ये व शाखांमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे देशाला हिंदू दहशतवादाचा धोका आहे. आपल्याकडे तसा गुप्तचर विभागाचा अहवाल आलेला आहे. त्याला अर्थातच संघ व हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यातून कल्लोळ माजला होता. पण विषय तिथेच थांबला नाही. पाकिस्तानचा जिहादी नेता सईद हाफ़ीझ याने तात्काळ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांची पाठ थोपटली होती. जगभर भारताची मोठी नाचक्की झाली होती. अखेर मान खाली घालून शिंदे यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले होते. तेच शिंदे आज तोच मुर्खपणा करण्यासाठी पंतप्रधानांना आवाहन करीत आहेत ना? की सत्तेतून बाजूला झाले मग घेतलेल्या अनुभवाकडेही पाठ फ़िरवायची असते?

आपण परकीय घातपाती शक्तींना पाठबळ देत आहोत, याचे भान शिंदे यांनी अधिकार पदावर असताना ठेवलेले नव्हते. पण पक्षाचा प्रवक्ता असताना बोलताना त्यांनी त्याचे भान ठेवायला नको काय? कारण दोन पंतप्रधान आपसात बोलतात, ते दोन देशातील गुपित असते आणि जाहिर चर्चेचा विषय नसतो. सोनियांच्या बहिणीचा वा गांधी घराण्याच्या आर्थिक व्यवहाराचा विषय नुसता राजकीय चर्चेत आला, तरी विचलीत होऊन त्यावर पांघरूण घालायला धावत सुटणार्‍या कॉग्रेस नेत्यांना राष्ट्रीय विषयातील गोपनीयता दुय्यम वाटते काय? गांधी घराण्यापेक्षा देश दुय्यम असतो काय? संसदेचे अधिवेशन चालू असताना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशी कशाला व कुठे गेले,त याविषयी कमालीची गोपनीयता राखणार्‍यांना पंतप्रधानांनी शरीफ़ यांच्याशी काय बोलणी केली, त्याची जाहिर वाच्यता हवी असते ती कशाला? मुंबईवर घातपाती हल्ला झाला त्यावेळी वा तत्सम घटनांपुर्वी मनमोहन सिंग यांचे कोणाशी काय बोलणे झाले होते, त्याचा तपशील शिंदे यांनी कधी मागितला होता काय? नसेल तर आज त्याची मागणी कुठल्या हेतूने शिंदे करतात? राजकारणात बेतालपणा खुप असतो. पण आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्याइतका मुर्खपणा शिंदेच करू जाणोत. मुंबई हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तातडीने बैठक घेतली आणि त्यापासून गृहमंत्री असलेल्या शिवराज पाटील यांना बाजूला ठेवले होते. त्यांना बैठकीतही बोलावले नव्हते. इतकी तरी राजनाथ सिंग यांची लायकी कमी नाही ना? त्या हल्ल्यानंतर तडकाफ़डकी शिवराज पाटलांचा राजिनामा घ्यावा लागलेला होता. आजची स्थिती तितकी गंभीर नाही. विनाविलंब संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली आहे आणि धागेदोरे शोधले गेले आहेत. युपीए सरकार सत्तेत असताना यापैकी काय होऊ शकले होते? देशाची सुरक्षा हा इतका खालच्या पातळीवरचे राजकारण खेळण्याचा विषय असतो काय?

9 comments:

  1. सोनीयांची चाटुन ज्यांनी मंत्रीपद मिळविले त्यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार ? जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहेच ! विनाकारण फुक्तारून आपल्या अस्तीत्वाची जाणिव करून देतात दुसरे काय ?

    ReplyDelete
  2. भाऊ ज्यांची राजकीय कारकीर्द नेहरू घराण्याची धुनी भांडी घासण्यात गेली त्यांच्याकडून यापेक्षा अधिक काहीच अपेक्षित नाही.

    ReplyDelete
  3. Todays shallow boys and girls who are talking/making foolish comments in various marathi channels as jounalist must learn how to analyse the news from the style of Shri Torsekar.

    ReplyDelete
  4. Ajunahi aapali laayaki pattewalyaachi aahe he te siddha karat aahet.....

    ReplyDelete
  5. निषेध , शिंदे यांच्या चाटू गिरी चा निषेध

    ReplyDelete
  6. छान भाऊ मी या देशद्रोही लोकांचा निषेध करतो (इनकी पिठपर गोलियां मारनी चाहिए)हे देशद्रोही आहेत

    ReplyDelete

  7. खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |

    उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

    ReplyDelete
  8. bhau tumhala modinchya saglyach goshti barobar vatatat.modi kahi goshti barobr kartayet pn kahi babtit tyanche nirnay chuktat he tumhi kadhich lihit nahi.Modi fakt ahat tumhi.

    ReplyDelete
  9. अहो भाऊ ज्या सोलापूरने आणी ज्या डाँ. कुटुंबाने मोठ केलं दोन वेळंच अन्न दिल त्यांच्यावर उलटलंय हे बांडगूळ

    ReplyDelete