Friday, May 22, 2015

त्याबद्दल मोदींना धन्यवादच द्यायला हवे



रामायणात अहिल्या उद्धार अशी एक कथा आहे. अहिल्येला शाप मिळालेला असतो आणि तिचा दगड होऊन जातो. शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला त्यापासून एक मुक्तीचा एकमेव मार्ग असतो. जी शिळा झालेली आहे तिला प्रभू श्रीरामचंद्राचा पदस्पर्श झाला मगच ती पुन्हा ‘माणसात’ येणार असते. ते पुढल्या रामायणात होते आणि अहिल्या दगडातून मानवी रुप धारण करते. अर्थात प्रभू रामचंद्र तिला मुद्दाम ‘लाथ’ मारत नाहीत. व्हायचे ते अनवधानाने होऊन जाते. मात्र साक्षात अहिल्या समोर उभी रहाते, तेव्हा त्या देवालाही धक्का बसतो. मग तिच्याकडून त्याला ह्या शापवाणीची कथा कळते वगैरे. अर्थात अशा गोष्टी तर्कबुद्धीच्या पलिकडे असल्याने आपल्या देशातल्या विद्वानांना त्या भाकडकथा वाटतात. त्या खरेच घडलेल्या गोष्टी असतात याची कुठली हमी देता येत नाही. पण आयुष्यात असे चमत्कार मात्र अनुभवाला येत असतात. मागल्या काही दशकात अशाच अनेक अहिल्या शिळा होऊन पडल्या होत्या आणि आपल्या उद्धाराची प्रतिक्षा करत असाव्यात. पण त्यांच्या उद्धारार्थ पदस्पर्श करायला प्रभू रामचंद्राला उसंतच मिळालेली नव्हती. तो बिचारा अयोध्येत मंदिराच्या उभारणीतच इतका अडकून पडला, की अहिल्येच्या उद्धारासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. शेवटी या प्रभू रामचंद्राचा सेवक म्हणून राजकारणात आलेल्या नरेंद्र मोदी नामक हनुमंताला शिळा होऊन पडलेल्या अनेक अहिल्यांचा उद्धार करावा लागला असेल काय? नसेल तर या पाचसात दिवसात अनेक शिळावत पडलेल्या लोकांच्या राष्ट्राभिमानाचा उद्धार कशाला झाला असता? परदेशात मोदींनी एक वादग्रस्त विधान करून दुसरे काय केले? त्याच पदस्पर्शाने किती लोकांचा राष्ट्राभिमान जिवंत झाला ना? आजवर ज्यांच्याकडून आपण कधी राष्ट्राभिमान राष्ट्रप्रेम असले शब्द ऐकू शकलो नव्हतो, ते अकस्मात ही भाषा का बोलू लागले?

परदेशात असताना देशाच्या पंतप्रधानाने काय बोलावे आणि काय बोलू नये? या विषयात नरेंद्र मोदी यांना आता नव्याने अनेकजण सल्ले देत आहेत. कारण त्यांनी अनेकांच्या राष्ट्रपेमाला डिवचण्याची हिंमत केली. हे बरे झाले. कारण त्यामुळे आजवर राष्ट्राभिमान, राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेमाची हेटाळणी करण्यातच धन्यता मानणार्‍या शेकडो बुद्धीमान जाणकारांना अकस्मात राष्ट्रप्रेमाचे भरते आलेले आहे. कालपर्यंत तशी अवस्था अजिबात नव्हती. बारीकसारीक निमीत्त शोधून ही माणसे, भारतीय असल्याची वा भारतीय अभिमानाची टवाळी करीत होती. तेव्हा आज आपल्या भारतप्रेमाविषयी त्यांनी अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. केवळ मोदींच्या विधान वक्तव्याला विरोध करायचा म्हणून अशा लोकांना राष्ट्रप्रेमाचे भरते आलेले आहे, की त्यांना भारत या शब्दाशी जोडलेल्या गोष्टींविषयी अभिमान आहे? अभिमान हा नुसताच असू शकत नाही. त्याची कारणे असतात. उदाहरणार्थ काही महिन्यापुर्वी येमेन या आखाती देशात युद्धाची स्थिती उदभवली. तेव्हा तिथे हजारो भारतीय फ़सलेले होते. त्याच्याही आधी इसिस या जिहादी संघटनेने तशीच स्थिती इराक सिरीयात उभी केली होती. या दोन्ही प्रसंगी भारत सरकारने हजारोच्या संख्येने भारतीयांना सुखरूप बाहेर काढले व मायदेशी आणले. येमेनमधून तर बिगर भारतीयांनाही हजारोच्या संख्येने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तेव्हा तर जगभर भारत सरकारचे वा मोदी सरकारचे कौतुक चालू होते. तेव्हा यापैकी कितीजणांना आपण भारतीय आहोत म्हणून अभिमान वाटला होता? कारण तो काही मोदी सरकारचा पराक्रम नव्हता, तर भारतीय सेनादल व भारतीय मुत्सद्दी मंडळींचा पराक्रम होता. आज अभिमानाच्या गप्पा ठोकणार्‍या कितीजणांची तेव्हा भारतीय सेना वा मुत्सद्दी आपल्या देशाचे आहेत म्हणून अभिमानाने छाती फ़ुगली होती?

कशी गंमत आहे ना? जेव्हा अभिमानाने छाती फ़ुलावी असा पराक्रम भारतीयांनी केला होता, तेव्हा त्याचेच नेतृत्व करणार्‍या व्ही. के. सिंग नावाच्या आजी मंत्री आणि माजी सेनाधिकार्‍यावर दुगाण्या झाडण्यात जे तमाम भारतीय बुद्धीमंत हिरीरीने भाग घेत होते. त्यांचाच राष्ट्राभिमान आज फ़ुलून आला आहे. त्यामुळे असा प्रश्न पडतो, की हे आकस्मिक राष्ट्रप्रेमाचे पिक कोणाच्या मेहनत व मशागतीमुळे येऊ शकले आहे? समजा परदेशात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलले ते बोललेच नसते, तर यापैकी कितीजणांना आपल्या भारतीयत्वाच्या अभिमानाची अशी गर्जना करावीशी वाटली असती? यापुर्वी त्यांनी कुठल्या प्रकारे व शब्दात आपल्या या राष्ट्राभिमानाची घोषणा केलेली आहे? उलट असे दिसेल, की किरकोळ घटना घडली तरी आपल्या भारतीयत्वाची शरम वाटते, असे सांगण्यात हेच लोक आघाडीवर असायचे. जणू राष्ट्रप्रेम वा राष्ट्राभिमान म्हणजे खुळेपणा असल्याचे सांगण्यात त्यांची बुद्धी खर्ची पडत होती. गुजरातच्या दंगलीसाठी यांना शरम वाटायची. सामुहिक बलात्कार झाला की यांना शरम वाटायची. कुठल्या चर्चवर कोणी दगड मारले वा हिंदू साध्वी काही बाष्कळ बडबडली, तर यांच्या माना शरमेने खाली जायच्या. अशा शरमेने खाली गेलेल्या माना पुन्हा कधी वर आल्या व कशामुळे आल्या, त्याचा खुलासा कधीच होऊ शकला नाही. प्रत्येक संधी मिळाली, की माना खाली घालण्यासाठीच निसर्गाने यांना मान नावाचा शारिरीक अवयव दिला असावा, अशी त्यांची आजवरची वागणूक राहिली आहे. की त्यांच्यातही राष्ट्राभिमान होता आणि तो मिरवण्याची संधी येण्य़ाची प्रतिक्षा करीत ही मंडळी ताटकळत बसली होती? मोदी यांनी जे विधान केले, त्याची कित्येक वर्षापासून प्रतिक्षा करत हे ‘राष्ट्राभिमानी’ बसले होते काय? नसेल तर यापुर्वी कधी त्यांनी असे अभिमानाचे प्रदर्शन मांडले ते तरी सांगावे.

संसदेचे ५०-६० खासदार अमेरिकेच्या अध्यक्षाला सामुहिक पत्र लिहून गुजरातच्या मुख्यमंत्र्याला व्हिसा देऊ नका, अशी विनंती करतात. तेव्हा यांच्या माना अभिमानाने उंचावल्या होत्या काय? उलट यातलेच अनेकजण छाती फ़ुगवून मोदींना अमेरिका व्हिसा देत नाही, असे गर्वाने सांगण्यात धन्यता मानत होते ना? त्याचा अर्थ अमेरिका भारताचा सन्मान करत होती आणि म्हणून यांच्या छात्या गर्वाने फ़ुगल्या होत्या काय? भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मुंड्या पाक सैनिकांनी कापून नेल्या, तेव्हा यांच्या अभिमानाला ऊत आला होता काय? यापैकी कोण कोण तेव्हा शरमेने माना खाली घालून उभे होते? चवताळून उठले होते? जणू भारताचा अवमान होण्याने सतत खुश असलेली ही जमात असावी, अशीच त्यांची वागणूक राहिली आहे. भारतीय योग प्रणालीला जागतिक मान्यता मिळण्याचा प्रसंग आला, तेव्हा यांनी छाती फ़ुगवली होती काय? भारतीय पंतप्रधानाला अमेरिकन अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये खास मेजवानी दिल्यावर यांना कधी अभिमान वाटला नाही. कुठलाही देश वा समाजाचा अभिमान त्याच्या पारंपारिक व पराक्रमाशी निगडीत असतो. पण आज ज्यांना अभिमानाचे झटके आलेत, त्यांना सतत देशाच्या अवमानात धन्यता वाटलेली ही मंडळी आहेत. शब्दाने नाही तरी कृतीने त्यांना सतत भारतात जन्मल्याची लाजच वाटलेली आहे. उलट देशाच्या अवमानाची त्यांनी सातत्याने पाठराखणच केल्याच इतिहास आहे. मोदींच्या एका क्षुल्लक वाक्याने त्यांचा मृतावस्थेतला राष्ट्राभिमान जागला असेल, तर त्या माणसाला व त्याच्या वक्तव्याला धन्यवादच द्यायला हवेत. मोदी जे काही बोलले ते योग्य अयोग्य हा भाग बाजूला ठेवून त्याचे परिणाम लक्षात घेतल्यास, अशा एका विधानाची गरज होती असेच म्हणावे लागेल. ज्यामुळे कायम शरमेने माना खाली घातलेल्यांना त्यांनी मान वर करण्याची संधी दिली.

परदेशी दौर्‍यावर असताना देशाच्या पंतप्रधानाने आपली भाषा संयत राखायला हवी यात शंका नाही. देशांतर्गत व राजकीय व्यासपीठावरची भाषा आणि राष्ट्रीय नेता म्हणून परदेशात वापरलेली भाषा, यात फ़रक आवश्यक आहे. पण त्यासाठी मोदींना दोष देताना आपण तितकेच निर्दोष असायला हवे, याचे भान त्यांच्या टिकाकारांनी सुद्धा ठेवायला हवे. राष्ट्राभिमानाचे असे हंगामी झटके येऊन उपयोगी नसतात. त्याची प्रचिती प्रत्येकाच्या वागण्यातून वेळोवेळी येताना दिसायला हवी. मोदींविषयी इथे मायदेशी जे राजकारण झाले, त्याला हरकत नाही. पण त्यांच्या विरोधात भारतीयांचे परदेशी डावपेच खेळण्याचे प्रकार चालू होते, त्याला प्रतिकार करणार्‍यांना आज राष्ट्राभिमानाची भाषा बोलता येईल. तेव्हाच्या डावपेचांना टाळ्या पिटणार्‍यांनी पुतनामावशीचे अश्रू ढाळण्यात अर्थ नाही. ज्यांना अभिमान म्हणजे काय त्याचाच पत्ता नाही आणि गर्व वाटावा अशाच गोष्टीमध्ये शरम वाटते, त्यांनी असली नाटके रंगवून काहीही साध्य होणार नाही. मागल्या बारा वर्षात ज्यांना केवळ मोदी एका राज्यात मुख्यमंत्री आहेत म्हणून भारतीय असण्याची कायम शरम वाटलेली आहे, त्यांनी कधी जिलानी यासिन मलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता? कल्याणचे चार मुस्लिम तरूण इराकमध्ये जिहाद करायला गेल्याचा विषाद वाटला का? कुठल्या शरमेची व अभिमानाची गोष्ट अशी मंडळी करतात, तेच समजत नाही. शरम वा अभिमान असल्या गोष्टी मानवी भावना व अस्मितेशी निगडीत असतात. तिच्याशी ज्यांचा संबंध येत नाही, त्यांनी आपल्या विचारसरणीनुसार मोदींचा निषेध जरूर करावा. त्यात देश वा राष्ट्र इत्यादी गोष्टींची भेसळ करू नये. ज्यांना कितीही विपरीत परिस्थितीत देशाविषयी आत्मियता आहे आणि इथल्या बर्‍यावाईट गोष्टींशी ज्यांचे अतुट नाते आहे, त्यांनी मोदींचा निषेध करायला अजिबात हरकत नाही. कारण तो घटना वा कायद्यापुरता अधिकार नसतो, तर नैतिक अधिकार असतो. म्हणूनच मोदींच्या विधानाचा आम्ही खुलेआम निषेध करतो आणि त्याचवेळी त्यांनी अनेकांच्या मृतावस्थेतील अभिमानाला संजीवनी दिली, म्हणून त्यांना धन्यवादही देतो.


7 comments:

  1. भाऊ! आपल्या लेखात सतत काहीनाकाही नावीन्यपूर्ण असतेच. आम्हीही फेसबुकवर खुप निषेध केला मोदींचा, परंतु हा विचार मनात आला सुद्धा नाही. मस्तच.

    ReplyDelete
  2. Sir,I use to read your blog for unbiased review but that unbiased reviews are turning into blind Modi Bhakti whatever incident you mentioned above for all that incident true Indian always protested and showed respect and proud for our country. Whatever Modi said is irresponsible and showcase of ill mentality,its harsh but it's reality

    ReplyDelete
    Replies
    1. संदीपसाहेब!
      भाऊंनी मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध केलाच आहे ना? ते कुठे चांगले म्हणत आहेत? त्यांनी फक्त एक वेगळी बाजू दाखवली आहे. ती आपण समजून घ्यावी.

      Delete
  3. From last 12 years Congress and gang regularly attacks on Shree Modi that time Mr Sandeep why u r not comment. They made passport issue on each foreign platform that time apan kontya bilat lapala hotat?

    ReplyDelete
    Replies
    1. जबरदस्त टोला सालुंके ला

      Delete
  4. Ramdas & Aniket India is not property of father and grandfathers of congress nighther Modi, person at post of pm when visit to foreign countries when he visit he don't represent his party he represents country so when he speak he should have that common sense and should think twice before speaking such type of sentences my objection is on point mentioned by Sir saying did these people ever raised there voice when pakis did cut our soldiers head and all other issues also including Modis visa rejection, sir with due respect to your experience either you haven't red about related voice or you might have ignored, I feel about my country I feel blessed that I born country called India and feel even much more proud that I belongs to state Maharashtra so if someone speak something jerk like this behalf of us. if someone thinks that he was feeling shameful till he became pm he should talk about himself not in behalf of us.

    ReplyDelete
    Replies
    1. sandip salunke modi na virodha karita virodh karne soda. tyane kahihi sadhya honar nahi

      Delete