Monday, July 20, 2015

दिल्ली ते दहिसर, व्हाया विरार-वसई



आज जशी मुंबईत शिवसेना भाजपा यांची जुंपली आहे, तशीच तब्बल तीस वर्षापुर्वी जुंपलेली होती. योगायोग असा, की अवघ्या दोनतीन महिन्यापुर्वी त्यांच्यात प्रथमच युती झालेली होती आणि शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडिक कमळाची निशाणी घेऊनच लोकसभा लढलेले होते. मात्र राजीव लाटेत सपाटून मार खाल्ला तेव्हा भाजपाने सेनेला टांग मारून विधानसभेसाठी शरद पवारांच्या तात्कालीन पुलोदशी दोस्ती केली होती. त्यावर मल्लीनाथी करताना बाळासाहेबांनी म्हटले होते, ‘कमळाबाई गेली सोडून’. तिथून मग भाजपा व शिवसेनेची चांगलीच जुंपली होती. शिवसेनेने स्वबळावर तेव्हाच्या विधानसभा जागा लढवल्या, त्यात मराठी-गुजराती वाद उफ़ाळून आलेला होता. कारण भाजपाच्या जयवंतीबेन मेहता उभ्या होत्या आणि शिवसेनेच्या कुणा नेत्याने मराठी मतांना आवाहन करताना जयवंतीबेन गुजराती असल्याचे म्हटलेले होते. त्यामुळे खवळलेल्या बेन एका सभेत उत्तरल्या, ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची.’ त्याचा परिणाम तितक्या मतदानापुरता राहिला नाही, भले त्याचा लाभ सेनेला तेव्हा मिळाला नाही. पण त्या एका वाक्याने अवघ्या मुंबईत मराठी अस्मिता डिवचली गेली आणि तीन महिन्यांनी आलेल्या महापालिका निवडणूकीने मोठा चमत्कार केला होता. विधानसभेत कसाबसा छगन भुजबळ हा एकमेव आमदार निवडून आणू शकणार्‍या शिवसेनाला पालिकेत मुंबईकराने सत्ताच बहाल करून टाकली होती. राजीव लाट आणि गिरणगावात घोंगावणारी दत्ता सामंतांची लोकप्रियता त्या मराठी अस्मितेच्या वादळात कुठल्या कुठे वाहून गेले होते. अर्थात त्यात एका बाजूला जयवंतीबेन मेहतांचे ते डिवचणारे शब्द जितके कारणीभूत होते, तितकेच तेव्हा मुंबई कॉग्रेसमधील मुरली देवरा यासारख्या गुजराती नेत्याचे निरंकुश वर्चस्वही कारणीभूत झाले होते. पुढे सेना भाजपा युती झाली तेव्हा अनेकजण सेनेला खिजवण्य़ासाठी जयवंतीबेनचे ते शब्द मुद्दाम आठवण करून द्यायचे.

इतक्या मागे जायचे नसेल तर लागोपाठ २००९ च्या लोकसभा विधानसभा लढतीमध्ये सपाटून मार खाणार्‍या शिवसेनेला २०१२ च्या महापालिका निवडणूकीत मिळालेले मोठे यश कोणत्या कारणाने मिळालेले होते? त्या लढतीच्या ऐन कालखंडात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वादग्रस्त विधान सेनेच्या पथ्यावर पडलेले होते. ‘पालिका निकालानंतर ठाकरे यांचे नामोनिशाण शिल्लक उरणार नाही’, असे चव्हाण म्हणाले आणि नैराश्याने घेरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त मोठे यश मिळून गेले. तेव्हा शिवसेना उत्तम कारभार करीत होती आणि मुंबईचे नाले-गटारे अत्यंत साफ़सुथरी होती, असे कोणाला म्हणायचे आहे काय? तसे अजिबात नव्हते. तर मुंबईचा मराठी माणुस डिवचला गेला होता आणि त्यातून सेनेला नवे स्फ़ुरण चढलेले होते. तेव्हाच मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी पद्धतशीर मराठी उमेदवारांना तिकीटे नाकारल्याचा खुला आक्षेप, अजित सावंत या कॉग्रेस नेत्यानेच केलेला होता. मनसेचे उमेदवार मोठे यश मिळवत असतानाही शिवसेनेचे शंभरावर नगरसेवक निवडून आले. त्यात सेनेचे कर्तृत्व किती आणि अन्य विरोधकांनी मराठी अस्मित्ता डिवचल्याचे श्रेय किती; याचा कोणी तौलनिक अभ्यास केलेला आहे काय? दहिसरची घटना व त्यावर उमटणार्‍या प्रतिक्रीया समजून घ्यायच्या असतील, तर अशा जुन्या घडामोडी आधी समजून घ्याव्या लागतात. कृपाशंकर सिंग वा पृथ्वीराज चव्हाण १९८५ च्या मुरली देवरांच्या अरेरावीचे परिणाम समजून घेऊ शकले नाहीत, त्यांनी शिवसेनेला बहुमोलाची मदत केली. तर युती मोडणार्‍यांनी स्वबळावर शिवसेनेला गेल्या आक्टोबरमध्ये मराठी मतावर मुंबईत १५ आमदार निवडून आणायला निर्णायक सहाय्य केले. मराठी माणुस डिवचला गेला म्हणजे शिवसेनेला फ़ायदा होतो. पण त्यापेक्षा तो मराठी मतदार अशा डिवचणार्‍याला धडा शिकवायला एकवटतो, हे विसरता कामा नये.

राजकारणात अस्मितेचे भांडवल करणे कितपत रास्त आहे? हा राजकीय तात्विक चर्चेचा विषय जरूर आहे. पण चर्चेच्या पलिकडे ज्याला निवडणूका लढवायच्या आणि जिंकायच्या असतात, त्याला वास्तवाला सामोरे जाण्याखेरीज पर्याय नसतो. मुंबई परिसराची ही वस्तुस्थिती आहे, तशीच भारतीय मतदाराची मानसिकता अशीच एक चमत्कारीक वास्तविकता आहे. मागल्या वर्षी विधानसभा निवडणूकीत युती तुटल्याचा लाभ राष्ट्रवादी व कॉग्रेसला जास्त मिळू शकेल, असे अनेक जाणकारांना वाटले होते. पण एकमेकांच्या विरोधात लढूनही सेना भाजपाला एकत्रित दोनशेच्या आसपास जागा मिळवता आल्या. कारण त्यांच्यापैकी कोण येतो, त्यापेक्षा मतदाराला पुन्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत येऊ नयेत, इतकेच करायचे होते. मग सेना जिंकते की भाजपा, असा विचार झाला नाही. त्याचेच प्रत्यंतर दिल्लीत अधिक ठळकपणे बघायला मिळाले. लोकसभेतील बहूमत व दिल्लीतील निर्णायक यशाने दिल्लीकर भाजपापेक्षा त्याचे नवे अध्यक्ष अमित शहा इतके धुंद झाले होते, की आपण कुठल्याही राज्यात व प्रदेशात जिंकू शकतो, अशा समजूतीने त्यांना पुरते पछाडले होते. परिणामी त्यांचा तो उर्मटपणा स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही दुखावत गेला. दिल्लीकरांना तर शहानितीची इतकी किळस आलेली होती, की भाजपाला सत्ता मिळू नये यासाठीच विरोधातील जिंकू शकणार्‍या उमेदवाराच्या मागे मतदार एकवटत गेला. त्याचाच फ़ायदा केजरीवाल यांना मिळू शकला. त्यांनी आधीच्या ४९ दिवसात असे कुठले दिवे लावले नव्हते, की त्यांना ७० पैकी ६७ जागा मिळाव्यात. पण लोकांना तरी केजरीवाल यांना कुठे जिंकून आणायचे होते? दिल्लीकरांना भाजपाला धडा शिकवायचा होता. म्हणून वर्षभरापुर्वी मिळालेल्या ३२ पैकी तीन आमदार टिकवताना ‘शहा’ण्यांचा शत-प्रतिशत पुरता वाताहत होऊन गेली. पण म्हणून भाजपा धडा कुठे शकला आहे?

दहिसरच्या घटनेचे गांभिर्य त्याच दृष्टीने महत्वाचे आहे. लोकसभेचे मोठे व विधानसभेचे तुलनेने बरे यश मिळाल्यावर भाजपावाले भरकटले आहेत आणि इथले गुजराती तर आपणच मोदींना पंतप्रधान बनवले अशा थाटात दादागिरी व उद्धटपणा करू लागले आहेत. त्याचे परिणाम नुसत्या दहिसरमध्ये बघायचे कारण नाही. थोडे आजुबाजूला बघितले तरी गुजराती अरेरावीची किंमत भाजपा कशी मोजतोय, त्याचा ताळेबंद मिळू शकेल. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात मंदा म्हात्रे भाजपाच्या आमदार आहेत. पण तिथेच पराभूत झालेल्या गणेश नाईकांचे अनुयायी प्रचंड संख्येने निवडून कशामुळे निवडून आले? भाजपाची इथे वाढलेली ताकद कुठे गायब झाली? विरार-वसई ज्या पालघर लोकसभेचा भाग आहे, तिथे लोकसभेत मिळवलेली लाखो मते भाजपाने ताज्या पालिका मतदानात कशामुळे गमावली? केवळ आठरा हजार मते शिल्लक उरलीत आणि त्यावरून कळते, की त्या दोन विधानसभा क्षेत्रात सगळे गुजरातीही भाजपाला मते देताना दिसत नाहीत. ही किमया हितेंद्र ठाकुरची वा गणेश नाईकांची अजिबात नाही. त्याला अमित शहा नावाची गुजराती जादू म्हणतात. शत-प्रतिशत गुजराती अशी ती रणनिती आहे. आपल्याशी जुळते घेणार नाही, त्याला उचलून फ़ेकून द्या किंवा हाकलून लावा. देशात आपले राज्य आहे आणि आपण म्हणू तसेच लोकांनी जगले वागले पाहिजे, अशी सक्ती म्हणजे शहानिती होय. तिचाच प्रयोग १६ मे २०१४ पासून निदान मुंबई परिसरात दिसू लागला आहे आणि त्याचा खुला चेहरा युती मोडून समोर आला. तेव्हा उद्धव किंवा कोणी शिवसेनानेता अफ़जलखानाशी तुलना कशाला करतोय, त्याची प्रचिती जशी येत चालली आहे, तसे भाजपापासून मतदार दुरावत चालले आहेत. दुसरा कोण निवडून येईल त्याची फ़िकीर न करता भाजपाला मतदार धडा शिकवणारे निकाल दिल्ली ते दहिसर व्हाया विरार-वसई समोर येत आहेत. अर्थात त्यामुळे भाजपाचे झिंग चढलेले नेते शहाणे होण्याची अजिबात शक्यता नाही. पाठोपाठच्या पराभवाने राहुल वा त्यांच्या भक्तांना तरी कुठे जाग आलेली होती? ते काम काळच करीत असतो.

3 comments:

  1. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपाची मस्ती उतरेल

    ReplyDelete
  2. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपाची मस्ती उतरेल

    ReplyDelete