Wednesday, February 3, 2016

सामाजिक आजाराचे बळी



पुण्यातल्या कॉलेजची मुले कोकणात मुरूड येथील सागरी किनार्‍यावर सहलीला गेली असताना झालेली दुर्घटना, एकूणच समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी म्हणायला हवी. अर्थात अंजन घालणे हा एक शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ सर्वांना चांगला ठाऊक आहे. पण संजन घालून काही उपयोग होतो किंवा नाही, याकडेही बघण्याची गरज आहे. अंजन डोळ्यात घालतात, कारण नजर साफ़ व्हावी आणि डोळ्यात कचरा असेल, तर तो निघून जावा, ही अपेक्षा असते. पण ते अंजन डोळ्यातच पडले तर उपयोग असतो. डोळेच बंद असतील, तर अंजन कितीही घातले तरी झापड लावलेल्या डोळ्यांवर त्यातून उपाय होत नाही. नजर तशीच्या तशी धुरकटलेली रहाते. म्हणून अशा शेकडो घटना नित्यनेमाने होत असूनही त्यात काहीही फ़रक पडलेला दिसत नाही. मुरूडच्या दुर्घटनेच्या दोनच दिवस आधी दूर दक्षिणेला चेन्नई महागनरात एक शालेय विद्यार्थी धावत्या लोकल गाडीसमोर सेल्फ़ी फ़ोटो काढताना मरण पावला. मुंबईत आठवडाभर आधी एक प्रेमीयुगुल समुद्र किनारी अशाच उसळत्या लाटांवर स्वार झाल्याचा फ़ोटो काढताना बुडाल्याची बातमी आलेली होती. अशा प्रकारच्या घटना सातत्याने कानावर येत आहेत. पण त्यातून जो धोका जाणवावा आणि शहाणपणा सुचावा ही अपेक्षा काही पुर्ण होत नाही. मग अंजन कशाला म्हणायचे, असा प्रश्न पडतो. कारण कितीही लोकांना ठेच लागून त्यांचे जीव जात असताना, मागचे शहाणे होऊन सुखरूप जगताना दिसत नाहीत. असे का होते आहे, त्याचा शोध म्हणूनच जरूरीचा होत चालला आहे. एका आठवड्याच्या अल्पावधीत तरूणांच्या बाबतीत घडलेल्या या लागोपाठच्या घटना मन सुन्न करणार्‍या आहेत. कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करून सोडणार्‍या आहेत. त्या फ़क्त मृतांच्या आप्तस्वकीयांना दु:खी करणार्‍या नाहीत, तर सुजाण नागरिकाची मती गुंग करणार्‍या आहेत.

अशा स्वरूपाच्या घटना दिवसेदिवस नित्याच्या होऊ लागल्या आहेत. त्यातल्या जागा बदलतात वा बळींची नावे बदलतात. पण त्यातली बेफ़िकी्र मानसिकता मात्र सर्वत्र सारखीच आढळून येते. मुरूड येथे गेलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांना कोणी उनाड वा मस्तवाल म्हणू शकत नाही. विद्यार्थीदशेतील ही मुले एका ठराविक वयाची आहेत. पौगंडावस्थेतील ही मुले बेताल नव्हती. पण मौजमजा करायला आले असताना, एक बेफ़िकीरी वा बेशिस्त त्यांच्यात आपोआप आलेली असते. नेहमीचे अभ्यासाचे ताणतणाव यापासून मुक्त पाखरासारखे विहरावे, म्हणून सहलींचे आयोजन केलेले असते. पण तेही करताना आपण पाखरे नव्हेत, म्हणूनच आपल्याला पंख नाहीत, याचे भान सोडून चालणार नाही. ही मुले तिथे मौज करायला गेलेली होती. सागराचे अथांग पात्र हे आव्हान देणारे असते आणि त्यात उडी घेऊन लाटांनाही कवेत घेण्याचा मोह त्या कोवळ्या वयात होण्याची शक्यता नक्कीच असते. दोष वयाचा असतो. हे वय अधांतराचे असते. मुले धड लहान राहिलेली नसतात आणि अनुभवाने शहाणीही झालेली नसतात. त्यांना रोखणे शक्य नसते, तसेच त्यांना जबाबदार समजून पुर्ण स्वातंत्र्यही देण्याची सोय नसते. देखभाल एवढाच मार्ग उपलब्ध असतो. आजवर ज्या दडपणातून बालपण गेलेले असते, त्यातला जाचक वाटणारा वडीलधार्‍यांचा लगाम तोडून उधळण्याची उर्मी मनात आणि उरात उसळ्या घेत असते, असे हे वय असते. लगाम कसून बांधण्याला अर्थ नसतो, कारण तोही तोडण्याचा इर्षा त्यातून जन्माला येऊ शकत असते. आपण कोणाच्या आज्ञेत रहावे इतके परावलंबी नाही, अशी काहीशी जाणिव नव्याने येऊ लागलेली असते. ती नाजूकरितीने हाताळण्यातूनच अशा वयातल्या मुलांना संभाळावे लागत असते. त्यासाठी त्यांना लगाम लावण्यापेक्षा नजर ठेवून सैरभैर होऊ न देणे अगत्याचे असते.

हल्ली नेमकी तीच बाब कुठेही आढळत नाही. एका बाजूला पालकांना पैसे कमावण्यातून वेळ नसतो आणि दुसरीकडे लागेल तितक्या सुविधा बहाल करण्याने आपली जबाबदारी संपली, अशी काहीशी अलिप्ततेची भावना पालकांमध्ये दिसते. त्यामुळे मुलांना नवनव्या सुविधा बहाल करण्याकडे पालकांचा कल असतो. त्या सुविधा देताना पालकांना किती कष्ट उपसावे लागतात, याची किंचीतही जाणिव मुलांमध्ये नसते. अपवादानेच अशी मुले आसपास दिसतील. अन्यथा पालकांनी आपल्यासाठी राबावे आपण मजेचे दिवस अनुभवावेत, असे प्रत्येक पौगंडावस्थेतील मुलाला वाटत असते. त्याला खतपाणी घालणारे पालक मुलांना अधिकच बेताल व्हायला हातभार लावत असतात. हे आजच होत नाही. विकासाच्या मार्गावर असलेल्या समाजात ही उलथापालथ होतच असते. जगातल्या प्रत्येक समाजात व देशात हे घडलेले आहे व घडतेही आहे. पण आज जितकी तांत्रिक व आर्थिक प्रगती झाली आहे, त्यातून अनेक नवनव्या सुविधा मुलांना सहजगत्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांची महत्ता त्यांना समजली आहे असेही नाही. उदाहरणार्थ तीन दशकापुर्वी साधा फ़ोन मुलांना सहजगत्या वापरायला मिळत नव्हता. आज खेडोपाडी मोबाईलची रेलचेल झाली आहे. सु्खवस्तु घरातल्या शाळकरी मुलांच्या हाती मोबाईल आलेला आहे आणि जगभरची कुठलीही माहिती बोटावर खेळवता यावी, इतकी तांत्रिक साधने हाताशी आली आहेत. त्यामुळे त्यात गुरफ़टलेली नवी पिढी घरापासून व कुटुंबापासून दुरावत चालली आहे. मित्रांच्या घोळक्यात कंपूतही आता त्यांना रमण्याची गरज उरलेली नाही. अज्ञात अशा कुणाशीही अत्यंत जवळीकीचे संबंध विनाविलंब मूळ धरतात. त्यातच पौगंडावस्थेतील बेफ़िकीरीचा प्रभाव असला, तर विचारू नका. म्हणूनच जुन्या पालकांपेक्षा आजच्या पालकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. मात्र त्याचे भान पालकातही दिसत नाही.

कारण पालकांनाही साधने व सुविधांमध्ये गुरफ़टून गेल्याने मुलांकडे बघायला वा त्यांना विश्वासात घ्यायला सवड राहिलेली नाही. त्यामुळे वेसण नसलेल्या गुरांप्रमाणे मुले चौखुर उधळलेली दिसतात. अशावेळी कुठलेही आव्हान हे आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन मांडायची पुर्व संधी असल्याची धारणा वाढीस लागते आणि त्यातून असल्या दुर्घटना साकार होत असतात. सागरी लाटांवर स्वार व्हाय़ची किंवा धावत्या लोकलसमोर सेल्फ़ी फ़ोटो काढण्याची इच्छा अन्यथा कशाला होऊ शकेल? जीवाला धोका असेल तिथून सावध हालचाल करण्याची जाणिव प्रत्येक सजीवात उपजतच असते. ती जागरूक असेल तर कोणीही असले खुळे धाडस करणार नाही. पण इथे अशा प्रत्येक घटनेत तेच घडताना दिसेल. त्याचे परिणाम काय होतात, ते बघायला वा अनुभवायला माणुस हयातच रहात नाही. मग त्यातून धड शिकणे दूरची गोष्ट झाली. तो धडा इतरांना असतो. तो धडा गिरवायचा तर मुळात ‘शिकवला’ गेला पाहिजे. शिकवणार्‍या शिक्षकाला किंवा पालकाला त्यासाठी मुलांना वेळ द्यावा लागेल. तो वेळ किती वडीलधार्‍यांकडे आज आहे? आपल्या गरजा व इच्छा यांच्यापुढे दुसर्‍यासाठी कोणाला सवड राहिलेली नाही. मग मुलांकडे दुर्लक्ष होते आणि त्याची भरपाई म्हणून अधिक खर्च मुलांवर किंवा त्यांच्या सुविधांवर करण्याची पळवाट शोधली जाते. मुले कुठे चुकतात वा भरकटत जातात, तिकडे वळून बघायला पाकलांना सवडही नसते. आपण मुलांवर इतका मोठा खर्च करतो, म्हणजे त्याने शहाण्यासारखे वागले पाहिजे आणि तो वागतच असणार; हे आजच्या पालकवर्गाचे गृहीत झाले आहे. त्याचे हे सर्व बळी आहेत. त्यातला बेफ़िकीर पालकही तितकाच दोषी आहे. कारण आपल्या वयात आलेल्या मुलाची मानसिकता दुर्लक्षित करणारा पालक वा शिक्षक खरा दोषी आहे. त्यातून मग काहीतरी तुफ़ानी करूया नामे अघोरी वृत्तीला खतपाणी घातले जाते, जी प्राणघातक सामाजिक आजार बनते आहे.

6 comments:

  1. विनय राऊतFebruary 3, 2016 at 2:08 AM

    भाऊ, या विद्यार्थ्यांना गावकर्‍यानी पुढे असलेल्या धोक्याची जाणीव करुन दिली होती. ABPमाझा वर त्या गावकर्‍याची प्रतिक्रीया दाखवण्यात आली होती पण या मुलांनी त्यांना तुम्ही तुमची काम करा अशी उद्दटपणे
    उलट उत्तर दिलीत. धोक्याची कल्पना दिली असताना सुध्दा असा जीव धोक्यात घालणार्‍या अशा या मुलांना
    कोण आणि कसं समजवणार?

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर. अति लाडाने पूर्ण पीढ़ी वेडी झालेली आहे.

      Delete
  2. गल्ली चुकलं काय तुम्ही, भाऊ.

    कुछ तो गडबड है, दया.

    माफ करा भाऊ. मी तुमच्या लेखनाचा चाहता आहे. (नेहेमी प्रतिक्रिया देत नसलो तरी)

    पण आज मात्र विषय खूपच भरकटलेला वाटतोय. तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर असेल किंबहुना आहेच. पण सुसंगत वाटत नाही.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    लेख पटला. मात्र एक विधान पटलं नाही :

    >> अन्यथा पालकांनी आपल्यासाठी राबावे आपण मजेचे दिवस अनुभवावेत,
    >> असे प्रत्येक पौगंडावस्थेतील मुलाला वाटत असते.

    पालक राबतांना मुलांच्या दृष्टीस पडंत नाहीत. त्यामुळे पालकांनी राबणे म्हणजे नक्की काय ते मुलांना ठाऊक नसते. 'आम्ही तुझ्यासाठी इतकी मेहनत करतो' किंवा 'आम्ही दूर कामावर असलो तरी आमचं सगळं लक्ष तुझ्यावर असतो' ही वाक्यं मुलांच्या दृष्टीने निरर्थक आहेत. आपण मजा करावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण मजा करायला सोबत पालक नाहीत, म्हणून आपण मुलंमुलंच मजा करूया अशी काहीशी वृत्ती होते. पालकांनी मुलांना वेळ द्यायलाच हवाय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ आभारी आहे मलाही लहान मुली आहेत मी पुढे काळजी घेइन

    ReplyDelete
  5. Alpasankhyakachya shaleche vidyarthi hote. Te uddhatpane bolale. Parinam alyawar nuksan Maharashtrachya tijoriche jhale.Ek Hindu mela tar Musalmananna anand hoto. Asach vichar apanhi thevla tar bare hoil.

    ReplyDelete