Saturday, October 14, 2017

पिवळी ‘धमक’ पत्रकारिता



वर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जबाबदार धरायला सर्व पक्ष संसदेत एकवटलेले होते. नऊ हजार कोटींचे भारतीय बॅन्कांचे कर्ज बुडवून हा भामटा हातोहात फ़रारी झाला होता. तर त्याला निसटून जाण्याला मोदी सरकारनेच मदत केल्याचा सरसकट आरोप झाला होता. कारण तो राज्यसभेचा सदस्य होता आणि त्याच्या विरोधात बॅन्का कायदेशीर कारवाई करीत असल्याचा सुगावा लागताच त्याने संसदेतून बाहेर पडून थेट विमानतळ गाठला होता. त्याला कोणी रोखले नाही. कसे रोखणार? त्यासाठी कायदेशीर बंधने असतात,. ज्याच्या विरोधात कुठला गुन्हा नसेल व ज्याच्यापाशी कायदेशी्र दस्तावेज असतील, त्याला विमानतळावर कोणी रोखू शकत नाही. तेवढी तांत्रिक गोष्ट धरून मोदी सरकारला जे लोक जाब विचारत होते. आता त्यांचीच बोलती बंद झालेली आहे. मल्ल्याच्या भामटेगिरीत त्यांचाही सहभाग दिसू लागल्यावर अशा तमाम लोकांना पत्रकारिता पिवळी भासू लागली आहे. जोवर हे लोक मोदी सरकारवर आरोप करीत होते आणि पत्रकार छापत वा प्रक्षेपित करीत होते, तोवर पत्रकारित्ता वटसावित्रीसारखी पवित्र होती. पण आता ती अकस्मात पिवळी झालेली आहे. या आठवड्यात एका वाहिनीने मल्ल्याच्या जुन्या कागदपत्रांचा हवाला देऊन त्याला बुडवेगिरीसाठी कर्ज मिळवून देण्यात कोणाकोणाचे हातपाय गुंतलेत, त्याचा खुलासा केल्यावर जाणता राजा शरद पवार यांनी त्या वाहिनीवरच पिवळ्या पत्रकारितेचा आरोप केलेला आहे. गंमतीची गोष्ट अशी, की रिपब्लिक नावाची ही वाहिनी वगळता अन्य तमाम वाहिन्या व वर्तमानपत्रे या बाबतीत मूग गिळून गप्प बसलेली आहेत. ज्यांची हयात मोठमोठे गौप्यस्फ़ोट करण्यात गेली, त्यांची वाचा मल्ल्या प्रकरणात साफ़ बसलेली आहे. की मल्ल्याच्या इशार्‍याने त्यांची गाळण उडालेली आहे?

मार्च २०१६ मध्ये मल्ल्या एकेदिवशी थेट लंडनला पळून गेला आणि त्यानंतर इथल्या पत्रकारांना जाग आली. तात्काळ मग भगोडा वा फ़रारी भामटा म्हणून मल्ल्याचे वर्णन सुरू झाले. त्याने किती हजार कोटीचा धपला केला वा कुठल्या कुठल्या बॅन्कांना बुडवले, त्याचे तपशील झळकू लागले. त्यानंतर एकेदिवशी विजय मल्ल्या याने आपल्या ट्वीटर खात्यावरून या तमाम महान दिल्लीकर पत्रकार संपादकांना त्यांची औकात दाखवून दिली. माध्यमांचे मालक व संपादक पत्रकार आपल्या पाहूणचाराचे किती लाचार होते, त्याची आठवण करून देत मल्ल्याने त्यांना सरळ सरळ धमकावले होते. ११ मार्च २०१६ रोजी केलेल्या ट्वीटमध्ये मल्ल्या म्हणतो, माध्यमातले जे कोणी म्होरके आहेत, त्यांनी एक गोष्ट विसरू नये. ‘वेळोवेळी मी त्यांना सुविधा व मदत दिलेली आहे. त्या प्रत्येक गोष्टीचे दस्तावेज माझ्यापाशी आहेत. आता फ़ुकट टीआरपी मिळवण्यासाठी खोटारडेपणा करू नका.’ याचा अर्थ तो फ़रारी भामटा खुलेआम अशा दिल्लीकर नामवंत प्रतिष्ठीत संपादक पत्रकारांना धमकावतच होता, की माझ्या पापातले तुम्ही भागिदार व लाभार्थी आहात. त्याचे पक्के पुरावे माझ्यापाशी आहेत, अधिक शहाणपणा केलात तर तुमच्या प्रतिष्ठेचे वस्त्रहरण करावे लागेल. ही धमकी लागू पडली आहे आणि कुठल्याही वाहिनी वा मान्यवर वर्तमानपत्राने मल्ल्याच्या पापकर्माविषयी बोलायचे सोडून दिले आहे,. अर्णब गोस्वामीची नवी वाहिनी त्याला अपवाद आहे. म्हणूना सध्या मल्ल्याला लंडनहून परत आणण्यासाठी जे पुरावे तिथल्या कोर्टात दाखल करण्यासाठी जमवले जात आहेत, त्याचा बभ्रा होऊनही कोणी पत्रकार संपादक त्याविषयी अवाक्षर बोलत नाही. त्यांच्याही पुढे जाऊन शरद पवार अर्णबच्या वाहिनीवर पिवळ्या पत्रकारितेचा आरोप करीत आहेत. हा काय चमत्कार आहे? पिवळी पत्रकारिता म्हणजे काय?




मल्ल्या किंवा तत्सम ज्या काही अफ़रातफ़री होतात, त्याचा छडा लावण्यासाठी एक खास सरकारी यंत्रणा आहे. त्यात कायदा, कंपनी व्यवहार, परकीय चलन वा अन्य तपशीलाचा कसून शोध घेणारे हुशार जाणते लोक कार्यरत असतात. त्यामुळेच अशा स्वरूपाच्या गोष्टींचा जो तपशील त्यांच्या अहवालात असतो, त्याला कायदेशीर मूल्य असते. अशा कागदपत्र व तपशीलात जर कोणा अधिकारी वा मंत्र्याचे नाव येत असेल, तर त्याला संशय म्हणता येत नाही. त्याकडे गंभीर पुरावा असे समजूनच बघावे लागते. गोस्वामीच्या रिपब्लिक वाहिनीवर अलिकडे जे गौप्यस्फ़ोट चालू आहेत, त्यात मल्ल्याच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर आणल्या जात आहेत. त्यासाठी सतत उपरोक्त तपासयंत्रणेच्या अहवालाचे हवाले दिले जात आहेत. त्या अहवालाच्या प्रतीच समोर ठेवल्या जात आहेत. त्यात सोनिया गांधींच्या संपुर्ण कुटुंबाला मल्ल्याच्या विमान कंपनीने फ़ुकटात प्रवास करू देण्याविषयीची माहिती आहे. तसाच फ़ारुख अब्दुल्ला यांनाही फ़ुकटात विमान पुरवण्याचा तपशील आला आहे. त्याचाच पुढला भाग म्हणून या बुडीत विमान कंपनीला आणखी कर्ज देण्याविषयीच्या शिफ़ारशी व वशिल्याचा तपशील आलेला आहे. त्यात शरद पवार यांचा उल्लेख आलेला आहे. शरद पवार तेव्हा युपीए सरकारमध्ये कृषीमंत्री होते. त्यांचा मल्ल्याच्या विमान कंपनीशी काय संबंध? त्याच्या दिवाळखोरी वा व्यापाराविषयी पवारांनी दखल घेण्याचे तरी काय कारण? पण पवारांनी आपल्यासाठी शिफ़ारस केल्याचे व अर्थमंत्र्यांना गळ घातल्याचे मल्ल्या आपल्या व्यवस्थापकाला लिहीतो. ही बाब म्हणून गंभीर ठरते. त्याचा खुलासा पवारांनी करायला नको काय? पण तसा खुलासा घ्यायला त्यांना रिपब्लिकच्या पत्रकाराने गाठले असता, पवारांनी त्याला उडवून लावले. आपण पिवळ्या पत्रकारीतेला प्रोत्साहन देत नसल्याचे सांगून टाकले.

अर्थात खुलासा नाकारणे वा स्पष्टपणे समोर येऊन बोलणे, हा पवारांचा व्यक्तीगत अधिकार आहे. ते उत्तरे नाकारू शकतात. पण त्याऐवजी त्यांनी एका वृत्तवाहिनीवर पिवळ्या पत्रकारितेचा आरोप करणे कितपत योग्य आहे? पिवळी पत्रकारिता म्हणजे तरी काय असते? जेव्हा प्रसार माध्यमाचा उपयोग कोणाला तरी बदनाम करून लाभ उठवण्यासाठी केला जातो, किंवा त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावत अफ़वांचा गवगवा केला जातो, त्याला पिवळी पतकारिता म्हणतात. इथे रिपब्लिक वाहिनीने अशी कोणती अनाठायी व बिनबुडाची बदनामी केली आहे? त्यांनी एका सरकारी तपास अहवालातील तपशील पुढे करून बातमी दिली आहे. त्यात पवारांची बाजू जगासमोर यावी म्हणून त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. ते देता येत नसेल तर सदरहू बातमी व तपशील पुर्णपणे खोटा असल्याचेही पवार सांगू शकले असते. पण त्यांनी तसे केलेले नाही. उलट खुलासा मागणार्‍याच्याच हेतूवर शंका घेऊन चिखलफ़ेक केली आहे. चारित्र्यहनन करण्यालाच पिवळी पत्रकारिता म्हणायचे असेल, तर रिपब्लिक या वाहिनीने तसे काहीही केलेले नाही. खुद्द पवारांनी मात्र तोच मार्ग चोखाळला आहे. किंबहूना अर्धवट व त्रोटक माहिती माध्यमांना देऊन अनेकदा पवारांनीच पिवळी पत्रकारिता करण्याला प्रोत्साहन दिलेले आहे. हिंदू दहशतवाद किंवा पुरोहित प्रकरणात प्रत्येक वेळी शरद पवारांनी केलेली स्फ़ोटक विधाने कुठल्या पुराव्याच्या आधारावर केली होती? नसतील तर अशा अफ़वा पसरवण्याला पवारांनीच सतत हातभार लावलेला नाही काय? नऊ वर्षे गजाआड सडत पडलेले कर्नल पुरोहित न्यायालयाने जामिन दिल्याने बाहेर आलेले आहेत. नऊ वर्षे त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नसताना, पवार कशाच्या आधारे हिंदू दहशतवादाचे हवाले देणारी दिशाभूल करत होते? त्यांच्या विधानांना प्रसिद्धी देणार्‍यांनी कुठल्या रंगाची पत्रकारिता केलेली होती?

जाणता राजा म्हणून ज्यांनी आजवरची हयात घालवली, ते पवार आजकाल नवा इतिहास घडवू बघताना दिसतात. ते ब्रिगेडी बोगस इतिहासाच्या पुस्तकाचे उदघाटन करायला जाऊन इतिहासाचे विकृतीकरण करण्याला प्रोत्साहन देतात. पण सत्य समोर आणले गेले, मग पिवळी पत्रकारिता म्हणून नाक मुरडतात. अलिकडेच त्यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या धरपकडीविषयी अशीच चमत्कारीक विधाने केलेली होती. कासकरच्या अटकेनंतर जे धागेदोरे समोर येत आहेत, त्यावर भाष्य करताना पवारांनी एका पोलिस अधिकार्‍यावरही दुगाण्या झाडलेल्या होत्या. प्रदीप शर्मा हा मुंबईतील टोळीयुद्ध मोडीत काढण्याने ख्यातनाम झालेला अधिकारी होता. त्यालाच गुन्हेगार ठरवून खोट्या चकमकीच्या आरोपात गोवण्याचे काम पवारांच्या अनुयायांकडे महाराष्ट्राचे गृहखाते असताना झालेले होते. त्यानंतरच्या काळात दाऊदचा भाऊ आरामात खंडणीखोरीचा उद्योग चालवत होता. आता त्याचीच उचलबांगडी प्रदीप शर्माने केल्यावर पवारांनी विचलीत होण्याचे कारण काय? प्रदीप शर्मा विरोधात पवारांपाशी कुठले सज्जड पुरावे आहेत की त्याच्या निलंबनाचा पवारांनी इतका आवेशपुर्ण उल्लेख करावा? नुसत्या निलंबनाने कोणी गुन्हेगार होत नसतो, इतकीही जाण जाणत्या राजाला नसावी काय? पुराव्याशिवाय पवार बोलले तर ते ब्रह्मवाक्य असते आणि तपशीलाचा अहवाल रिपब्लिकने समोर आणला तर ती पिवळी पत्रकारिता असते, हे कुठले नियम व निकष आहेत? इक्बाल कासकरच्या चौकशीत राष्ट्रवादीच्या कुणा नगरसेवकाचे नाव आल्याने पवार विचलीत झालेत. पण असेच आरोप त्यांनी नित्यनेमाने अनेकांवर केलेले आहेत. तेव्हा त्यांना पुराव्याची गरज कशाला वाटलेली नव्हती? मुंबईतल्या इक्बाल कासकरला ठाण्यातला अधिकारी कशाला येऊन पकडतो आणि त्याच्या बातम्या कशाला झळकतात, असा पवारांचा सवाल रास्त आहे काय?

ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍यांचे मुंबईतले कार्यक्षेत्र तपासून बघणार्‍या पवारांनी कृषीमंत्र्याचे विमान वाहतुक विषयक निर्णय धोरणातले अधिकार क्षेत्र जरा साफ़ उलगडून सांगू नये काय? प्रदीप शर्मा ठाण्याच्या गुन्हेशाखेतला असल्याने त्याने मुंबईत इक्बाल कासकरला पकडताना लक्ष्मणरेषा ओलांडली तर गुन्हा असतो. मग कृषीमंत्र्याने विमानवाहतुक खात्याच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचे प्रयोजन कोणते असू शकते? पिवळी पत्रकारिता अशीच सुरू होत असते. म्हणूनच पवारांनी पत्रकार परिषदेत असे विधान केल्यावर कुणा पत्रकाराने त्यांना जाब विचारला नाही. आताही रिपब्लिक वगळता अन्य कोणी वाहिनी वा संपादक पवार, सोनिया वा फ़ारूख अब्दुला यांना जाब विचारण्यास पुढे आलेला नाही. किंबहूना इतक्या खळबळजनक तपशीलावर अन्य कुठली वाहिनी बातमी करायलाही तयार नाही. याला पिवळी पत्रकारिता म्हणतात. कारण मागल्या कित्येक वर्षात भामटे, दरोडेखोर, व्यापारी व राज्यकर्ते यांच्याशी पत्रकारांचीही मिली्भगत झालेली आहे. त्यामुळे कुणाला बदनाम करून काहूर माजवावे आणि कुठले पुरावे दडपून सामान्य जनतेला अंधारात ठेवावे, त्याचे कारस्थानच चालू होते. त्यात पत्रकारांनाही हिस्सा देऊन सहभागी केलेले असेल, तर मल्ल्याचे पाप कोणी चव्हाट्यावर आणायचे? मल्ल्या तर उघडपणे माध्यमांचे मालक म्होरक्यांना आव्हानच देतो आहे. त्यांच्या पापातील हिस्सा व भागिदारीचे पुरावे असल्याचे मल्ल्या सांगत असल्यावर कोण आपल्या पापांना प्रसिद्धी देणार? आज काही राजकीय नेते व अधिकारी यांचा पापातला हिस्सा समोर आला आहे. लौकरच दिल्ली राजधानीत इतकी वर्षे ठाण मांडून बसलेल्या पत्रकार, संपादक व तथाकथित विचारवंतांचेही पापाचे भरलेले घडे समोर येणार आहेत. तो देशातील सर्वात मोठा घोटाळा आसेल. त्यात अनेक प्रतिष्ठीतांचे मुखवटे फ़ाटणार आहेत.

पवार साहेब, आज नव्हे मागल्या दीडदोन दशकात देशात प्रतिष्ठा पावलेली मुख्य प्रवाहातील पत्रकारीताच पिवळी धमक होऊन गेलेली आहे. ज्यांनी चोरांवर नजर ठेवावी व त्यांना जगासमोर आणावे, त्यांनीच दरोडेखोरीत भागिदार होण्याचा पवित्रा घेऊन देशहिताचा बळी दिला असेल, तर प्रामाणिक पत्रकार तुम्हाला पिवळा दिसू लागल्यास नवल नाही. मंत्रीमंडळात कोणाला घ्यावे किंवा कोणती खाती कोणत्या पक्षाला द्यावी, असे सौदे करण्यात पत्रकार संपादक दलाली करू लागल्याचे पाप नीरा राडीयाच्या टेप्समुळे जगासमोर आलेले आहेच. त्याला पिवळी पत्रकारिता म्हणतात जाणते राजेहो! त्यापैकी कुणावर कधी पिवळा आरोप केला होता तुम्ही? इशरत जहानला थेट मुलीसारखी म्हणून गोंजारताना कुठले पुरावे तपासले होते साहेब तुम्ही? ती विशुद्ध पिवळी धमक पत्रकारिता होती. आता त्याची लक्तरे चव्हाट्यावर आलेली आहेतच. पुरोहित व साध्वी यांच्यासारख्या निष्पाप लोकांना खोटेनाटे आरोप लावून दिर्घकाळ तुरूंगात डांबण्यासाठी तुमच्याच राजकारणाने ज्या पत्रकार व माध्यमांचे सहकार्य मिळवले, त्याला पिवळी पत्रकारिता म्हणतात. सत्य असे़च भयंकर असते. ते नाकारून संपवता येत नाही. संपतही नाही. एका क्षणी दत्त म्हणून समोर येऊन उभे रहाते. ज्या मल्ल्या तपासात तुमची नावे आलेली आहेत, ते एका तपास अहवालाचे भाग आहेत आणि मल्ल्याच्या घरवापसीसाठी सादर व्हायच्या पुराव्याचे हिस्से आहेत. ते पवारांनी नाकारल्याने नष्ट होत नाहीत. जेव्हा आपण केलेल्या नोंदीविषयी मल्ल्या इथल्या वा लंडनच्या कोर्टात बोलू लागेल, तेव्हा त्याचा रंग कोणता असणार आहे पवार साहेब? तुम्ही खुलासा नाकारून पिवळ्या पत्रकारितेचा उलटा आरोप केलात, इथेच खुलाश्याची गरज संपलेली होती. उत्तर नसल्याची ती सर्वात मोठी कबुली आहे आणि उद्या त्याची सफ़ाई करण्यावाचून कोणालाही गत्यंतर उरणार नाही. कारण पिवळ्या पत्रकारितेची ‘धमक’ आता संपत आलेली आहे.

16 comments:

  1. रिपब्लिक ने मनमोहन काळात विमानात फुकटात फिरणार्या पत्रकारांचे धंदे पन बाहेर काढले पाहिजेत.तु्म्ही म्हनता तसे मल्ल्या बोलु लागला तर फार मोठी सुनामी येइल.पिवळी पत्रकारीता बाहेर पडेल.जाणता राजाचे कारनामे पन

    ReplyDelete
  2. Apratim lekh ahe Bhau. Pawaranna pharach Sundar pakadit pakadla ahe tumchya lekhat. Dhanyawad

    ReplyDelete
  3. �� छान उघड सत्य आहे �� सत्य कधी ना कधी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारात समोर येतच

    ReplyDelete
  4. मल्ल्याचेॆ पावसामुळे बुमरँग उलटले

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख..... भाऊ अभिनंदन !!

    ReplyDelete
  6. Congress kay kiva rashtrawadi congress kay....donhi dukarachya jati aahet.

    ReplyDelete
  7. Asech pratekache pital ughde padayla pahijet

    ReplyDelete
  8. भाऊ बहुतेक तेव्हा नागरिक उदयाण खाते हे NCP कड़े होते।व प्रफुल्ल पटेल हे त्या खात्याचे मंत्री होते। महनूण कदाचित NCP अध्यक्ष महनूण त्यानी शिफरिश कली असल।

    ReplyDelete
  9. भाऊ, नेहमीप्रमाणेच अप्रतिम, सडेतोड लेख. या लोकांचा पापाचा घडा आता भरत आलाय. थोड्याच काळात या सर्वांचे वस्त्रहरण झालेले दिसेल.

    ReplyDelete
  10. पण भाऊ काका, ही पिवळी धमक पत्रकारिता च पुन्हा एकदा काँग्रेस च्या विजयाचा मार्ग बनेल असे वाटते....ज्या प्रमाणात खोटे नाटे पसरवले जात आहे त्यावरून तसेच वाटते...

    ReplyDelete
  11. See this link
    http://www.moneylife.in/article/pawar-and-mallya-four-seasons-later/5906.html

    ReplyDelete
  12. इथे फक्त माल्याचा विषय येत नाही, अशाच पद्धतीने फरार झालेला ललित मोडी याने हि लंडनमधून त्याचावर आरोप करणाऱ्यांविरोधाचे पुरावे तो देत होता आणि विचार करण्याची गोष्ट आहे कि, जेव्हा ललित मोदी ने आयपीएल सुरु केला होता त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार स्वतःहून मोठ्या इमानाने शामिल झालेले बघितले आहे. अशा लोकांसोबत शरद पवारांचे सबंध दिसून येतात पण त्याबद्दल काही बोल्या जात नाही या बद्दल पण आश्चर्य आहे.

    ReplyDelete
  13. लोकशाहीतला मिडिया हा चौथा स्तंभ नेतेमंडळीवर नजर ठेवणारा असतो पण तोच आंधळा झालाय भाऊ म्हणतात तसे काही निर्भीड पत्रकार अजूनहि आहेत आणि ते सत्याचा विजय नक्कीच करतील

    ReplyDelete
  14. सडेतोड पत्रकारिता अशी असते निपक्ष

    ReplyDelete
  15. सडेतोड लेख. देशाला लबाड,चोर, सौदागर,छुपा गुन्हेगार म्हणून माहीत असलेल्याची चड्डी पिवळी झाली असेल.

    ReplyDelete