Sunday, January 6, 2019

खोट्या चकमकीची खरी झगमग

व्यापक कटाचा भाग (२)  

isharat के लिए इमेज परिणाम

पाकिस्तानकडून भारतात व भारतीय हद्दीत होणारे घातपात किंवा जिहादी हल्ले, आता आपल्याला नव्या घटना राहिलेल्या नाहीत. पण अशा घटना घडवून आणण्यासाठी व त्याच्या जबाबदारीतून नामानिराळे रहाण्यासाठी पाकिस्तानला खुप कसरती कराव्या लागत असतात. त्या देशातील वा भारतातील काही हळव्या मुस्लिम तरूणांना हाताशी धरून धर्माच्या नावाने भडकावणे चिथावणे आणि मृत्यूला कवटाळण्यात काही महान उदात्त कार्य करीत असल्याचे त्यांच्या मनात ठासून भरवण्याचे काम करावे लागतेच. पण त्याखेरीज अशा घातपाती हल्ल्यानंतर त्या मारेकर्‍यांच्या बचावाचा युक्तीवाद उभा करू शकणारे व भारतात उजळमाथ्याने वावरणारे पंचमस्तंभीयही निर्माण करावे लागत असतात. हे काम चुटकीसरशी होत नाही. त्यासाठी एकाचवेळी अनेक पातळीवर अनेक योजना आखून गुपचुप मार्गी लावाव्या लागत असतात. त्यात सहभागी असलेल्यांना एकमेकांविषयी काहीही थांगपत्ता लागणार नाही, किंवा या कानाचे त्या कानाला कळणार नाही, इतकी गोपनीयता पाळावी लागत असते. यातले अनेकजण पैसे देऊन आमिष दाखवून कामाला जुंपावे लागतात, तर काही लोकांच्या निव्वळ भावना किंवा ठराविक धारणा-निष्ठांचा खुबीने वापर करावा लागत असतो. अनेकदा तर अन्य कशाविषयीची भारतीयांची घॄणा वा द्वेषभावनाही पाकिस्तान वा देशाच्या शत्रूंना साधन म्हणून वापरता येत असते. इतक्या विखुरलेल्या गोष्टी सहजासहजी जुळून येत नसतात, तर जुळवून आणल्या जात असतात. मात्र अशा व्यापक पसरलेल्या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या अनेकांना आपण अशा काही कृत्यात थेट सहभागी आहोत, याचाही कधी थांगपत्ता लागत नसतो. पकडले गेले नाहीत, तर तसा त्यांना थांगपत्ता कधीच लागत नाही. तर काही लोक जाणिवपुर्वक त्यात सहभागी झालेले असतात. त्यालाच व्यापक कारस्थान वगैरे म्हटले जाते.

उदाहरणार्थ भारतात ज्यांनी कोणी याकुब मेमन वा अफ़जल गुरूच्या फ़ाशी विरोधात आक्षेप घेतले वा त्याला विरोध करण्यासाठी आटापिटा केला; त्यातले सर्वजण त्यांच्या जिहादी कृत्याचे समर्थक नसतात आणि नाहीत. पण त्यांचा अशा बाबतीत जिहादी कारस्थानी सहज वापर करून जातात. कालपरवा नासिरुद्दीन शहा नावाच्या कलावंताने केलेले विधान, भले त्याच्या व्यक्तीगत भावनांचा हुंकार असेल, पण इमरान खानने त्याचा आपल्या राजकीय हेतूसाठी वापर करून घेतला. नंतर नासिरनेही इमरानला त्यासाठी फ़टकारले. पण मुळात आपल्या असल्या विधानाचा गैरवापर होऊ शकतो, हे नासिरला कळत नसेल तर त्याची बुद्धी निकामी झाली, असेच म्हणावे लागेल. कारण आधीच्या विधानाने केलेली हानी नंतरच्या फ़टकारण्याने भरून निघत नसते. तेच याकुब अफ़जलच्या फ़ाशीला आक्षेप घेणार्‍यांच्या बाबतीत असते. आपण भलत्याच घातक हेतू व कारणासाठी वापरले जात आहोत, याचेही त्यांना भान नसते. इतके असे लोक आपल्या तथाकथित निष्ठा वा वैचरिकतेच्या आहारी गेलेले असतात. जगण्यातले वा वैचारिक तारतम्य हरवून बसलेले असतात. पाकिस्तान वा अन्य शत्रू देश व घातपाती त्यांच्या बौद्धीक मुर्खपणचा खुबीने वापर करीत असतात. मुंबईत याकुब वगैरेंनी १९९३ सालात जे बॉम्बस्फ़ोट घडवून आणले, त्यात ठाण्याच्या शेखाडी बंदरात स्फ़ोटके उतरवणार्‍या हमालांनाही दोषी ठरवून शिक्षा झालेली आहे. पण खरेच त्यापैकी कितीजणांना आपण घातपाताला हातभार लावतोय, याची जाणिव होती? न्हावाशेवा बंदरातून स्फ़ोटके व हत्यारांचा कंटेनर काही लाख रुपयांच्या लाचेसाठी बंदोबस्तामध्ये मुंबईत आणून सोडण्याचे पाप करणार्‍या थापा नामक अधिकार्‍याला त्याचा गुन्हा कुठे ठाऊक होता? त्याच्या लाचखोर वृत्तीचा कारस्थानामध्ये चतूराईने वापर करून घेण्यात आला होता. ज्याने ते घातक साहित्य पाठवले आणि ज्याला ते पोहोचवले गेले, त्यांच्या हेतूविषयी संबंधित अधिकारी पुर्ण अंधारातच होता. त्यापेक्षा याकुबच्या फ़ाशीसाठी उर बडवणारे वकील वा संपादक तीळमात्र वेगळे नसतात. पण तेही व्यवहारात कारस्थानाचे भागिदार होत असतात.

व्यापक कारस्थान वा कट वगैरे शब्द आपण सहजगत्या वापरत असतो, पण त्याची व्याप्ती वा धागेदोरे किती दुर पसरले आहेत, त्याचा आपल्यालाही थांगपत्ता नसतो. म्हणूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे, हा व्यापक आंतरराष्ट्रीय कटकारस्थाचा भाग होता, किंवा पहिला अंक होता, असे विधान कुमार केतकर यांनी केल्यावर सर्वत्र काहूर माजले. टिकेची टिंगलीची रणधुमाळी माजली. पण त्याचे धागेदोरे शोधण्याचा कुठेही विचार झाला नाही. प्रयत्नही झाला नाही. त्यातले तथ्य वा सत्य शोधण्याचा कोणी विचार केला नाही. किंबहूना त्यानंतर कुमार केतकर चिडीचुप का होऊन गेले, त्याचीही चौकशी करावी असा प्रयत्न कोणी केला नाही. कारण आपल्याला केतकरांचे नेमके म्हणणे समजलेले नसते, किंवा इतक्या मोठ्या गौप्यस्फ़ोटाची व्याप्तीच कळलेली नसते. म्हणून तो विषय केतकरांच्या टवाळीपर्यंत येऊन थाबतो आणि त्यापुढे त्यावर पांघरूण घातले जाते. केतकरांची ती़च अपेक्षा असते. त्यांनी ज्या कारस्थानाचा उल्लेख केलेला असतो, ते शिजवणार्‍या बोलवित्या धन्याची तीच अपेक्षा असते. त्यांना कोणालाही त्याचा अधिक उहापोह नको असतो. त्यातून अशा शिजलेल्या वा राबवल्या जाणार्‍या कारस्थानाला किरकोळ भगदाड पडलेले असले, तरी फ़क्त डागडुजी करून अधिक नुकसान त्यांना टाळणे शक्य होत असते. त्यांना कारस्थानाचा पर्दाफ़ाश नको असतो. तुलनेने टवाळी वा टिंगल ही मोजावी लागलेली किंमत अगदीच नगण्य असते. अन्यथा केतकरांसारखा बुद्धीमान वक्ता लेखक टिकेचे आसूड सोसून निमूट शांत झाला नसता. त्यांना व्यक्तीगत बदनामीपेक्षाही शिजलेल्या व कार्यरत असलेल्या कारस्थानाची गोपनीयता अधिक मोलाची असते. त्यात गुंतलेल्या शेकडो हजारो भागिदारांचे लपलेले चेहरे झाकलेले रहाण्यात सुखरूपता असते. म्हणून मग केतकर चिडीचूप होऊन जातात. हा नासिरुद्दीन व केतकरांमधला फ़रक असतो. नासिरूद्दीन अनवधानाने बोलून फ़सलेला असतो आणि केतकर बेसावध आपला मुखवटा फ़ाडून फ़सलेले असतात. मग आपल्यापेक्षा कारस्थानाचा मुखवटा टिकवण्याला प्राधान्य देण्याला पर्याय उरत नाही. तसे नसते तर कुमार केतकर सोहराबुद्दीन खटल्याचा निकाल लागल्यानंतरही मुग गिळून गप्प बसले नसते. आपल्या त्या कार्यक्रमाच्या भाषणात केतकरांनी केलेले विधान कोणाच्या लक्षात आहे?

‘मोदी आणि अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. सत्ता परिवर्तनानंतर पुरावे उघड झाल्यास त्यांना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होवू शकते.’ असेच केतकरांनी म्हटलेले होते ना? ते कुठले आरोप होते? सीबीआय कोर्टाने दिलेला ताजा निकाल त्याच संदर्भातला आहे ना? त्यासाठी सत्ता परिवर्तनाची भाषा केतकरांनी कशासाठी वापरलेली आहे? तर हे खटले मोदी पंतप्रधान होण्यापुर्वीचे व युपीए सत्तेत असतानाचे आहेत. जे खटले युपीए म्हणजे व्यवहारत: सोनिया गांधींच्या इशार्‍यावर भरण्यात आलेले होते आणि त्याचे निकाल लागण्यापुर्वीच सोनियांच्या हातून सत्ता निसटलेली होती. त्याच्या परिणामीच मोदी पंतप्रधानपदी आले आणि त्यांचे विश्वासू सहकारी अमित शहा भाजपाचे अध्यक्ष बनलेले आहेत. जेव्हा हे खटले भरण्यात आले वा त्यासाठी सगळी माध्यमे व तपास यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था कामाला जुंपण्यात आल्या होत्या, तेव्हा हेच दोघेजण त्या पदावर नव्हते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि अमित शहा गृहराज्यमंत्री होते. देशात त्या कालखंडात सोळाशेहून अधिक पोलिस चकमकी घडलेल्या होत्या आणि उत्तरप्रदेशात तो आकडा सर्वात मोठा होता. तुलनेने गुजरात खुपच मागे व कमी चकमकीचे राज्य होते. पण गुजरातची प्रत्येक पोलिस चकमक म्हणजे संशयितांची हत्या करणारी खोटी चकमक, असा एक सिद्धांत तयार करण्यात आला. त्यातून हे खटले उभे करण्यात आलेले होते. त्यातली गाजलेली पहिली चकमक म्हणजे मुंबईनजिकच्या कळवा उपनगरातील मुस्लिम तरूणी इशरत जहानची होती. अहमदाबादच्या सीमेवर दोघा पाकिस्तानी तोयबांच्या संगतीत असलेली इशरत मारली गेली. ती तोयबांची मुजाहिदीन होती असा खुलासा युपीएचे गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी संसदेत केलेला होता. पण नंतरच्या काही दिवसात चक्रे उलटी फ़िरू लागली आणि इशरत ही निरपराध निष्पाप तरूणी मोदी-शहांनी पोलिसांकरवी ठार मारली, असा गवगवा सुरू झाला.

देशाचा गृहमंत्री एक घोषणा करतो आणि काही दिवसातच त्याच जिहादी घातपाती पाकिस्तान्यांच्या संगतीत मारल्या गेलेल्या इशरतला निरपराध मुलगी ठरवण्यातून खर्‍या व्यापक कारस्थानाला सुरूवात होत असते. इथे केतकर आणि व्हीआरएस मणि यांचे कारस्थानाचे धागेदोरे येऊन एकत्र मिळतात. नेमक्या त्याच कालखंडात मणि अशा घातपाती जिहादी व पाकिस्तान विषयक विभागाचे केंद्रीय गृहखात्याचे अवरसचिव होते. त्यांनाच मग तोयबा इशरतला निरागस मुलगी ठरवण्याचे काम सोपवण्यात आले. हे कारस्थान असते. जी मुलगी जिहादी उचापतीमध्ये सहभागी होती, तिला निष्पाप ठरवून दोन राज्याच्या पोलिसांना तिचे मारेकरी ठरवण्याचा कट सुरू झाला. अर्थात एखादा कट मुळात शिजवला जात असतो आणि मगच त्याची अंमलबजावणी केली जात असते. पण इशरतची घटना घडवलेली नव्हती, तर घडलेली होती. करस्थानी लोकांना ती आपल्याला सोयीनुसार वापरायची होती. ही केतकर म्हणतात, त्या कारस्थानातली त्रुटी आहे. कारस्थान पुर्णपणे शिजण्यापुर्वीच त्यातले पदार्थ खाण्याची घाई करण्यात आली. त्यामुळे मग इथूनतिथून कुठल्याही घटना उचलून कारस्थानाची गोधडी विणण्याचा अव्यापारेषू व्यापार सुरू झाला आणि सगळीच शासकीय प्रशासकीय व कायदा यंत्रणा वापरूनही तोंडघशी पडत गेला. इशरत जहान आणि सोहराबुद्दीन या दोन्ही चकमकी गुजरातमध्ये घडल्या होत्या. मग त्यामध्ये गृहमंत्री म्हणून अमित शहा आणि मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना गुंतवण्याचे आदेश जारी झाले. हे आदेश कुणाचे होते? तितकेच यातले कारस्थान आहे. त्यामध्ये देशाचा पंतप्रधान वा गृहमंत्री सहभागी नव्हता, तर घटनात्मक सरकारला धाब्यावर बसवून सर्व यंत्रणा घटनाबाह्य केंद्राने वापरण्याचा आगावूपणा केलेला होता. त्याचीच साक्ष मणि आपल्या पुस्तकात देतात. कसेही करून या दोघांना चकमकीत गुंतवून देण्याचा हट्ट धरण्यात आला होता. त्याचा निर्वाळा आता कोर्टानेही दिलेला आहे.

न्यायाधीश निकालात म्हणतात, ‘या खटल्याच्या तपासकामात सीबीआय सत्यापर्यंत जाण्यासाठी तपास करण्यापेक्षाही आधीच ठरवून दिलेल्या गोष्टी सिद्ध करण्याच्या कामात गर्क असल्याचे नमूद करताना माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. किंबहूना सीबीआयला त्यातच रस होता. राजकीय विरोधकांना त्या गुन्ह्यात गोवण्यासाठी ठरलेल्या हेतूने तपास करण्यात आला आणि त्यासाठी हवे तसे पुरावेही निर्माण करण्यात आले.’ याला कारस्थान म्हणतात. मात्र त्या कारस्थानाचा भाग म्हणून कुणा इशरत वा सोहराबुद्दीनला ठार मारण्यात आले नाही. किंवा नंतर त्यांच्या न्यायासाठी इतका मोठा द्राविडी प्राणायाम करण्यात आलेला नाही. जेव्हा अशा रितीने मोदी व शहांना हत्याकांडाचे गुन्हेगार ठरवण्याची कल्पना मॅडमच्या डोक्यात आली; तेव्हा त्यांनी आपल्या हुकूमाच्या ताबेदारांना त्या कामाला जुंपले. ते काम शिवराज पाटिल यांच्याकडून होणार नसेल, तर मुंबई हल्ल्याचे निमीत्त शोधून पाटलांना बाजूला करण्यात आले. मोस्ट ओबिडीयंट सर्व्हंट वर्गातील चिदंबरम यांना गृह मंत्रालयात आणून बसवले गेले. हे गृहस्थ तिथे आल्या्नंतर हालचाली वेगाने सुरू झाल्या. शिवराज पाटिल हटवलेले असले तरी ज्याने मुळ अहवाल तयार केले वा पुरावे तपासून विविध कागदपत्रे तयार केली, ते मणि आपल्या जागी कायम होते. आता सवाल असा होता, की त्यांच्याच माध्यमातून नवी कागदपत्रे बनवणे भाग होते. कुठलाही अधिकारी सहसा अशा मोहाला वा दडपणाला बळी पडत असतो. कारस्थानाची अंमलबजावणी सुरू झाली त्यापुर्वी मणि यांनाही शिवराज यांच्याप्रमाणेच बाजूला करायला हवे होते. पण ती त्रुटी राहून गेली. कारस्थानाचा अंमल सुरू झाल्यावर तसा बदल संशयास्पद ठरला असता. म्हणूनच मग मणि यांना दबाव आणुन वा भयभीत करून नवे अहवाल व प्रतिज्ञापत्रे बनवण्याचा आततायीपणा सुरू झाला. तिथे कारस्थानाला भगदाड पडण्य़ाला पर्याय उरला नाही.

आधी हे काम स्वयंसेवी संस्थांवर सोपवण्यात आलेले होते. त्यांच्याकडून पुरेशा ताकदीने काम होईना व न्यायालयात खटला टिकण्याची शक्यता दुरावू लागली; तेव्हा मग सीबीआय आणि गृहखात्यावर दबाव आणायला आरंभ झाला. राजकीय सुडबुद्धीने शासकीय यंत्रणा कशी वापरावी आणि वाकवावी; त्याचा जणु वस्तुपाठच त्यातून निर्माण केला जात होता. आधी नुसती दाद मागितली गेली. मग गुजरातमध्ये न्याय मिळू शकत नाही, असा गाजावाजा सुरू करण्यात आला. बघता बघता थेट सुप्रिम कोर्टातून असे खटले मुंबईत वा गुजरातबाहेर आणले गेले. गुजरातमध्ये कार्यरत असलेल्या डझनभर वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना गुन्हेगार ठरवून अटका झाल्या आणि आता त्यातल्या प्रत्येकाला कोर्टाने निर्दोष सोडून दिलेले आहे. अगदी आयबी या गुप्तचर खात्याच्या सहसंचालकांनाही त्यात ओढले गेले. या सर्वांचा गुन्हा एक़च होता, ते त्या चकमकी खोट्या असल्याचे मान्य करीत नव्हते, की त्यात मोदी-शहांना गुंतवून देत नव्हते. मग त्यासाठी दोनशेहून अधिक खोटे साक्षिदार जमा करण्यात आले, शेकाडो खोटीनाटी कागदपत्रे तयार करण्यात आली. कुठूनही मोदी-शहांना अशा गुन्ह्यात गोवायचे आणि जन्मठेपेच्या शिक्षेसाठी पाठवून द्यायचे, हेच कारस्थान होते. फ़क्त त्यात एक चुक राहून गेली होती. मॅडमच्या घाईगर्दीने घटना घडवून आणण्यापेक्षा रेडीमेड घडलेल्या घटनेत त्या दोघांना गुंतवण्याचा मुर्खपणा झालेला होता. आपल्या हाती देशाची सत्ता आहे आणि सत्तेत बसलेले पंतप्रधानही कळसुत्री बाहुले आहेत, तर आपण सूर्याला चंद्रही ठरवू शकतो; असा पुरोगामी आत्मविश्वास मॅडमने आत्मसात केला तिथे चुक झाली. त्याहीपेक्षा मॅडमच्या कुठल्याही खुळेपणात धुर्तपणा शोधून टाळ्या पिटणार्‍या केतकरांसह सिब्बल सारख्या दिवाळखोरांनी मोठा घात केला. घटना घडवून आणायच्या व त्यासाठी नियोजन करण्यापेक्षा घडलेल्या घटनांचा वापर आपल्या कारस्थानासाठी करण्याचा मुर्खपणा झाला. तोच व्यापक कटाचा पहिला अंक होता. ज्याची समाप्ती कालपरवा न्यायालयातच झाली. सवाल इतकाच आहे, की सोनिया वा त्यांचे तमाम पुरोगामी सवंगडी सहकारी गुजरातच्या या दोघा सामान्य नेत्यांना इतके घाबरलेले कशाला होते? त्यांना संपवायला इतके मोठे कारस्थान कशाला शिजवले गेले? हळुहळू त्याचेही धागेदोरे समोर आल्याशिवाय रहाणार नाहीत. आपणही संगतवार मांडणी करीत गेलो, तर त्याचा उलगडा अवघड नाही. खर्‍या पोलिस चकमकीची ही अशी खोटी झगमग न्यायालयाने पुरती विवस्त्र करून टाकलेली आहे.

15 comments:

  1. Ekdam kharay Bhau pan tala kuthe Tari vacha phutayla pahije

    ReplyDelete
  2. अप्रतिम भाऊ.
    थापा बद्दल जे लिहिले आहेत त्याशी मी १००% सहमत आहे. पहिल्यापासून आजपर्यंत माझं ही हेच म्हणणं राहिलं आहे की यांच्या आंधळ्या लाचखोरीचा फायदा घेतला गेला. काय आहे आणि त्याने काय होणार आहे हे माहिती असतं तर कदाचित थापा ने सहकार्य केलं ही नसतं. त्याचे परिणाम काय झाले असते ते सांगता येत नाही. पैशासाठी आपल्याकडे माणसे कोणत्याही थराला जातात.

    आज पहिल्यांदा पाहतोय तुमच्यासारख्या प्रतिष्टीत पत्रकाराने हा मुद्दा निर्भीडपणे मांडताना. अभिमान वाटला.

    ReplyDelete
  3. भाउ तुमचनिरीक्षण खरच खुप खोलवर आहे घटनेनंतर त्याचा कटासाठीु उपयोग केला गेला त्यामुळ कट फसला घटना घडवुन आणायला हवी होती कट करायचचाच होता

    ReplyDelete
  4. भाऊ, अप्रतिम विश्लेषण. मला या खालील विधानाबद्दल जास्त उत्सुकता आहे.

    सोनिया वा त्यांचे तमाम पुरोगामी सवंगडी सहकारी गुजरातच्या या दोघा सामान्य नेत्यांना इतके घाबरलेले कशाला होते? त्यांना संपवायला इतके मोठे कारस्थान कशाला शिजवले गेले? हळुहळू त्याचेही धागेदोरे समोर आल्याशिवाय रहाणार नाहीत.

    ReplyDelete
  5. १० नव्हे ११ स्फोट झालेत मुंबईत,दर दंगलीवेळी एका ठराविक समुदायाला‌ लक्ष्य करणे चुकीचेच असं म्हणून तपास फिरवणारा बारामतीकर पण जिहाद्यांचा हस्तकच की....भाऊ याबद्दल काय म्हणालं

    ReplyDelete
    Replies
    1. https://bhautorsekar.blogspot.com/2013/01/blog-post_30.html?m=1

      जरूर वाचा..

      Delete
  6. भाऊ राणा अय्यूबचे 'गुजरात फाईल्स' हे पुस्तक नुकतेच वाचले आहे. गुजरात दंगल, हरेन पंड्या आणि सोहराबुद्दीन-कौसरबी हत्याकांड बाबतीत तिने त्यात लिहिलंय. त्या पुस्तकाच्या आणि राणा अय्यूब संदर्भात आपण लिहावं अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ, इशरत मुंब्र्या ची होती कळव्याची नाही

    ReplyDelete
  8. असे खोटे आरोप करणारे, त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणारे आणि त्यासाठी बळजबरीने निरपराधी व्यक्तींचा छळ करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?

    ReplyDelete
  9. येव्ठे वाचु शकत नाही थोद्क्यत जयाना फाशी झाली ती बरोबर परन्तु निर्भया काण्ड दिल्ली किव्हा चन्दन दस्कर virpaan च्या साथी किव्हा राजीव गांधी चा ह्त्यरना फाशी अजून परन्त का नही ?लेख झोटे लिहा । हिच विनंती ।

    ReplyDelete
    Replies
    1. Aho yalach vishleshan mhantat....





      Lekh chote Kay liha...

      Te Kay gitasar aahe ka?
      Tumhala gita vachayla vel nahi mhanun sar lihayla

      Delete
  10. 2006 च्या रेल्वे बॉम्ब स्फोटानंतर काही वेळानंतर लगेच प्रेशर कुकर थिअरी पुढे आणण्यात आली. याच कूके नी त्याचा जोरात प्रचार केला फेकसत्तेतून,स्वतः संपादक असताना. संघ - बिजेपी वाले वाळूत तोंड घालून बसले होते नेहमीप्रमाणे अपराध्यासारखे.प्रत्यक्ष पोलिसांनी तपासाला सुरुवात केली नसतानाही ह्या कुके ना प्रेशर कुकर ठेवले गेले होते हे कोणी सांगितले. शिवाय,फेकसत्तेतून याच बॉम्ब स्फोटांचे निर्लज्ज पणे समर्थन केले होते गुजरात दंगलीचे निमित्त करून. इतका हरामखोरपणा पांडू हिंदूंनी नेहमी प्रमाणे पचवला. काही जणांना वाईट वाटेल पण नेहमीप्रमाणे टरक्या बाळ ठाकरेंनी फक्त तोंडाच्या वाफा दवडल्या. मोसादच्या, आईकमनच्या संदर्भातल्या कथा लिहून,वाचून आणि नंतर नाट्यमय पद्दत्तीने रंगवून कंडशमन करण्याच्या सवयी जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत असेच चालायचेच.

    ReplyDelete
  11. भाऊ आपण खुपच छान लिहतात . वाईट एकाच गोष्टीचे वाटते कि आपलीच लोकं आपला घात करतात . अब की बार हर बार मोदी सरकार

    ReplyDelete