Monday, May 12, 2014

कॉग्रेसचे भवितव्य

   कॉगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतमोजणीपर्यंत धीर धरलेला नाही. त्याच्या आधीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ‘शाल श्रीफ़ळ’ देण्याचा समारंभ योजला आहे. मोजणीच्या दोन दिवस आधीच सिंग यांना निरोप समारंभाची मेजवानी दिली जाणार आहे. त्याखेरीज पंतप्रधानासह अन्य डझनभर मंत्र्यांनी आपापले सरकारी बंगले मोकळे करीत असल्याचे केंद्राच्या नगरविकास खात्याला कळवले आहे. एका बाजूला दोन वर्षापुर्वीच मंत्रीपद सोडलेल्या तृणमूलच्या माजी मंत्र्यांनी अजून बंगले मोकळे केलेले नसताना, अजून मंत्रीपद कायम असलेल्या कॉग्रेस नेत्यांनी बंगले सोडण्याची घाई करावी, ही बाब चमत्कारीक नाही काय? कित्येक वर्षे मंत्रीपद नसताना बंगले अडवून बसण्याची परंपरा असलेल्या पक्षाच्या इतक्या मंत्र्यांना सरकारी आवास सोडायचा उतावळेपणा इतकेच सांगतो, की पुन्हा सत्तेवर येण्याची त्यांना किंचित सुद्धा अपेक्षा उरलेली नाही. पण त्यासाठी इतक्या घाईगर्दीने बंगले सोडण्याचे कारण उमगत नाही. सत्ता गमावल्यानंतरही महिन्याभर सरकारी आवास राखण्याची मुभा असते. मग ही घाई कशाला? सलग सत्ता भोगताना ज्या गडबडी केल्यात त्याचे पुरावे किंवा कागदपत्रे हलवण्याची तर घाई नसेल? मोदींसारखा हेकट माणूस सत्तेवर आला आणि जबरदस्तीने बंगले रिकामे करायला गेल्यास पापाचे पुरावे उघड होण्याचे भय त्यामागे असेल काय? पण तोही विषय महत्वाचा नाही. गंभीर मामला आहे तो कॉग्रेस पक्षाच्या भवितव्याचा. यावेळी सत्ता गमावली तर ती पुन्हा मिळवता येईल. त्यामुळे सत्ता गमावणे ही बाब महत्वाची नाही. सत्ता पुन्हा मिळवायची तर त्यासाठी पक्ष शाबुत रहायला हवा. म्हणजेच कॉग्रेस पक्षाचे या निवडणूकीतील पराभवानंतरचे भवितव्य काय, हा खरा चिंतेचा विषय आहे. सत्तेशिवाय कॉग्रेस नेत्यांची घुसमट होते, असे इतिहासच सांगतो. म्हणूनच ही बाब मोठी चिंतेची आहे.

   एक राहुल गांधी व त्यांचे काही तोंडपाटिलकी करणारे प्रवक्ते सोडल्यास कॉग्रेस जिंकण्याची भाषा कोणीही सध्या बोलत नाही. प्रत्येक कॉग्रेसवाला पराभवाच्या भितीने पछाडलेला आहे. कारण ज्या गाळात हा पराभव त्या पक्षाला घेऊन जाणार आहे, त्यातून त्याला बाहेर काढू शकणारा कोणीही नेता त्यांना आता दिसेनासा झालेला आहे. पंधरा वर्षापुर्वी नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांनी रसातळाला नेलेल्या कॉग्रेसला सेक्युलर नाटक रंगवून सोनिया गांधींनी एकदा जीवदान दिले. भाजपाच्या नाकर्त्या नेतृत्वाच्या ‘सहकार्याने’ व सेक्युलर पक्षाच्या आत्मघातकी मुर्खपणाने, पुन्हा दहा वर्षाची सत्ता कॉग्रेसला उपभोगता आली. त्याला सेक्युलर मुर्खपणा जितका कारणीभूत होता, तितकेच भाजपाचे लेचेपेचे नेतृत्वही हातभार लावत होते. पण ती सवलत मोदींनी भाजपाची सुत्रे हाती घेतल्यापासून रद्दबातल झाली आहे.  मरगळल्या पक्षाला नवी संजीवनी देऊन मोदी थांबलेले नाही. गेल्या वर्षभरात त्यांनी प्रचार व सभांचा झंजावात निर्माण करून भाजपाचा राजकीय प्रभाव नसलेल्या राज्यातही पक्षाचे स्थान निर्माण करण्याची जिद्द दाखवली आहे. थोडक्यात मोदी पंतप्रधान पदासाठी झूंजत असल्याचे चित्र रंगवले गेले, त्याला फ़सलेल्या कॉग्रेस पक्षाने येऊ घातलेल्या धोक्याकडेच पाठ फ़िरवली होती. मोदींची योजना वा कल्पना केवळ दिल्लीची सत्ता बळकावण्याची अजिबात नव्हती. त्यांचे उद्दीष्ट स्वातंत्र्योत्तर काळातील देशव्यापी कॉग्रेस पक्षाचे स्थान मिळवण्याची होते. तीच महत्वाकांक्षा मोदींनी बाळगलेली होती व आहे. म्हणूनच ते नुसत्या सत्तेची भाषा बोलत नव्हते, तर ‘कॉग्रेसमुक्त भारत’ म्हणजे देशव्यापी भाजपा, असा त्याचा गर्भितार्थ होता. लोकसभेच्या निवडणूकीतला पराभव कॉग्रेसची सत्ता काढून घेणारा असेल. पण त्यापेक्षा मोठा धोका पक्षाचे देशात सर्वदूर असलेले अस्तित्व संपण्याचा आहे.


   दिल्लीतली केंद्रीय सत्ता दहा वर्षे हाती असलेल्या कॉग्रेसपाशी आज स्थानिक प्रादेशिक स्वयंभू नेते नाहीत. म्हणूनच बिहार, बंगाल, उत्तरप्रदेश, तामिळनाडू. मध्यप्रदेश इत्यादी राज्यात स्वबळावर सत्ता आणू शकणारा कोणी नेता कॉग्रेसमध्ये उरलेला नाही. आसाममध्ये तरूण गोगोई हा तसा एकमेव नेता शिल्लक आहे. पण इतरत्र कुठल्या राज्यात त्याचा मागमूस नाही. आंध्राचे राजशेखर रेडडी तसे होते. भाजपाचा एका राज्याचा मुख्यमंत्री थेट पंतप्रधान पदावर दावा करण्यापर्यंत पुढे येऊ शकला. कॉग्रेसमध्ये आपल्या बळावर राज्याचे मुख्यंत्रीपद मिळवण्याची इच्छा, हिंमत वा नेतृत्वगुण असलेले तरी एकदोन नेते दाखवता येतील काय? सोनिया, राहुल, प्रियंका यांच्या लोकप्रियतेवर जगायची सवय लागलेले कॉग्रेसजन स्वत:च्या गुणवत्तेवर उभे रहायची इच्छाही गमावून बसले आहेत. त्यामुळेच गांधी घराण्याचे वारस अपेशी ठरल्यावर कॉग्रेसच भवितव्य काय, ही बाब म्हणूनच त्या पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. यावेळी राहुल पक्षाचे नेतृत्व करीत आहेत आणि पराभवानंतर पुन्हा यशस्वी होण्यासाठी त्यांच्यात किती जिद्द असणार याची शंकाच आहे. कारण बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातल्या पराभवानंतर तरी राहुलनी तशी हिंमत वा पुढाकार दाखवलेला नाही. शिवाय इतक्या दारूण पराभवानंतर निराश कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची क्षमता राहूल कितीशी दाखवू शकतात, त्यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल. पराभव, टिका व प्रतिकुल मतप्रदर्शनातही ठामपणे उभे रहायची कुवत त्यांनी अजून तरी सिद्ध केलेली नाही. आणि गांधी वारस कोणी नसेल, तर पक्षाला नव्याने उभारी देणारा वा गाळातून बाहेर काढू शकणारा मोदींसारखा ताज्या दमाचा नेता आजतरी त्या पक्षात कोणी दिसत नाही. अनेकजण आतापासून प्रियंकाकडे आशाळभूतपणे बघू लागले आहेत. पण अमेठीत बेताल बोलून तिनेही आपल्या मर्यादा आधीच दाखवल्या आहेत. म्हणूनच येत्या शुक्रवारी मतमोजणीत पक्ष दिवाळखोरीत गेल्यावर कॉग्रेसचे भवितव्य काय, हा प्रश्न मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असतील यापेक्षा गहन प्रश्न आहे.

1 comment:

  1. Aasa kuthalahi paksh kadhi sampat nasato Shivsene babat hi aasech bolale jat hote pan pratyksh kay jale. Tumacha ha lekh jara aatich modimaay jala aahe aase vatat aahe. eak lakshat theva jya jannate ne Modina PM karayache tharvale aahe tich janata tyana gahrisuddha basavu shakate jar ka tyanchi paulae chukichya dishene padalai tar.

    ReplyDelete