Thursday, May 8, 2014

कॉग्रेसचा विस्कळीत घोळका

   यावेळच्या लोकसभा निवडणूकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा किंवा एनडीए, सत्ता वा बहूमत मिळवू शकेल काय, या प्रश्नाचे उत्तर कुठलाच राजकीय अभ्यासक आज देऊ शकत नाही. पण तितक्याच ठामपणे हे राजकीय जाणकार कॉग्रेस व युपीए सत्ता गमावणार याची हमी देत आहेत. त्यामुळे कॉग्रेसच्या अशा दारूण पराभवाला जबाबदार कोण, याचाही विचार करावा लागणार आहे. आज नाही तरी उद्या नक्कीच करावा लागणार आहे. कारण एका निवडणूकीतला पराभव इतकेच, या निकालाचे महत्व नसेल. त्यामुळे कॉग्रेसमध्ये जी पडझड होणार आहे, त्यातून नव्याने पक्षाची संघटना उभी करावी लागणार आहे. ही संघटना अत्यंत कष्टाळू व उत्साही नेता व कार्यकर्त्यांच्या बळावर उभारली जात असते. दुर्दैवाने कॉग्रेसमध्ये अशाच लोकांचा दुष्काळ दिर्घकाळ पडलेला आहे. उलट आयत्या बिळावर येऊन बसणार्‍या नाकर्त्या लोकांच्या हाती पक्षाची सुत्रे गेलेली आहेत. त्याचाच भीषण दुष्परिणाम आज कॉग्रेसला भोगायची पाळी आलेली आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे स्नुपगेट. सहा महिन्यांपुर्वी गुजरातच्या एका तरूणीवर पोलिसांनी पाळत ठेवली, तिचे फ़ोन चोरून ऐकले असा आक्षेप होता. त्यात मोदी वा त्यांचे निकटवर्तिय अमित शहा यांना गोवण्यासाठी युपीए सत्तेने आटापिटा केला. त्याची चौकशी करायचाही निर्णय घेतला. पण पुढे काही झाले नाही. मग निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यासाठी न्यायमुर्ती नेमण्याचा पवित्रा घेतला. त्याला भाजपाने विरोध केलाच. पण युपीएतील अन्य पक्षांनी व काही कॉग्रेसमंत्र्यांनीच विरोध केला. मग असा निर्णय वा घोषणा कोणी केली? कुठल्या अधिकारात केली? त्याचे दुष्परिणाम पक्षाला भोगावे लागतील याकडे पाठ फ़िरवणारे हे दिवटे कोण? त्यांचे पंख कोण व कसे छाटणार? या निवडणूकीत त्याच कॉग्रेसजनांनी व तोंडाळ नेत्यांनी पक्षाला गोत्यात आणून सोडले आहे. कपील सिब्बल, सलमान खुर्शीद, सुशीलकुमार शिंदे, मनिष तिवारी, चिदंबरम अशी डझनभर नावे सांगता येतील.

   भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा सात महिन्यात अखंड युपीए सरकार व कॉग्रेसवर टिकेची झोड उठवली आहे. परंतु त्यांच्या टिकास्त्राने जितके पक्ष व सरकारचे नुकसान केलेले नसेल, त्याच्या कितीतरी पटीने कॉग्रेसच्या उथळ व तोंडाळ नेत्यांच्या वक्तव्यानी पक्षाचे नुकसान केले आहे. गेला महिनाभर तरी राहुल गांधी हे मोदींना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या गुजरात मॉडेलची टवाळी करीत आहेत. त्यासाठी अदानी नावाच्या उद्योगपतीला सरकारची व शेतकर्‍यांची जमीन कवडीमोलाने दिल्याचे आरोप राहुल यांनी केले. सरकारी खजीना एका मालकासाठी मोदींनी रिता केल्याचा सरसकट आरोप राहुल व अगदी प्रियंका सोनियांनीही केला. पण बुधवारी मतदान चालू असताना युपीए सरकारच्याच व्यापार खात्याने एक अभ्यासपुर्ण अहवाल प्रसिद्ध करून, देशात सर्वात उत्तम जमीन अधिग्रहण गुजरातमध्ये होते व तिथेच शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळत असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. मग आपल्याच सरकारी अहवालात मोदींच्या मॉडेलचे झालेले समर्थन खोडताना व्यापारमंत्री आनंद शर्मा व इतर कॉग्रेस नेत्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती. ही वेळ त्यांच्यावर कशाला यावी? कॅमेरा समोर चमकायला उतावळ्या नेत्यांनी आपल्याच पक्ष व राष्ट्रीय नेत्यांना तोंडघशी पाडून मोदींना मोठा हातभार लावलेला आहे. पत्रकारांची मोदींकडून मुस्कटदाबी, भाजपाच्या उमेदवारात गुन्हेगारीचे प्रमाण; असल्या गोष्टी वकीली थाटात मांडणार्‍या कपील सिब्बल यांना त्यांच्याच पक्षातल्या गुन्हेगार उमेदवार व पत्रकारांवरील हल्ल्याचे उत्तर देण्याऐवजी पत्रकार परिषद सोडून पळ काढावा लागला.

   मागल्या सहा महिन्यात मोदी यांनी सगळीकडून सतावला गेलेला एकमेव नेता, अशी आपली प्रतिमा मुद्दाम जनमानसात ठसवण्याच्या प्रयास केलेला आहे. त्यातून मग सहानुभूती मिळत असते. त्याची मते करणे सोपे असते. २००४ सालात सोनियांनी ‘एक महिला’ असे शब्द वापरून नेमके तेच केले होते. यावेळी त्यासाठी मोदींना मुद्दे व विषय पुरवण्याचे काम कॉग्रेसच्या सर्वच तोंडाळ नेत्यांनी केले. त्यांना आवरण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता. मणीशंकर अय्यर वा सलमान खुर्शीद अशा नेत्यांच्या व्यक्तीगत हेटाळणीस्वरूप टिकेबद्दल खुद्द राहुलनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात राहुलच त्या सापळ्यात फ़सत गेले आणि पाठोपाठ प्रियंकाही प्रसिद्धीसाठी त्याच सापळ्यात फ़सली. मोदींनी त्याचा भरपूर लाभ उठवला. आपल्यावर होणार्‍या प्रत्येक हल्ल्याला बुमरॅंग करण्यात त्यांनी यश मिळवले. सहा महिन्यात मोदींना लक्ष्य करण्यात कॉग्रेसने आपली शक्ती खर्ची घातली. आज मोदींचे पारडे जड दिसते, त्याचे एकमेव कारण मोदी हे दिवसाचे चोविस तास आठवड्याचे सातही दिवस राजकारणी असतात. उलट त्यांच्याशी झुंजीला उभा ठाकलेला कॉग्रेसचा प्रमुख नेता राहुल गांधी, पुर्णवेळही राजकारणी नाही. जेव्हा निवडणूका नसतात तेव्हा राहुल गांधी कुठे असतात? काय करतात? दिल्लीत सामुहिक बलात्कार झालेला असो किंवा उत्तराखंडात निसर्गाने थैमान घातलेले असो. राहुल गांधी कुठे होते? युरोपात सुट्टीची मजा घेत होते ना? ही कॉग्रेसची खरी समस्या आहे. दुसरी समस्या कॉग्रेसपाशी कुठलीही सुसंघटित संघटना नाही. नुसत्याच नेत्यांचा व त्यांच्या भाट भक्तांचा घोळका आहे. डुमरीयागंज येथे नुकतेच कॉग्रेस सोडून आलेले जगदंबिकापाल हे भाजपाचे उमेदवार मोदींच्या भाषणाच्या प्रसंगी त्यांच्या शेजारी उभे होते आणि अमेठीत स्मृती इराणी शेजारी बसलेल्या होत्या. गुजरातच्या दाहोद येथे राहुल गांधींचे भाषण चालू असताना स्थानिक महिला उमेदवार व्यासपीठावर जायला धडपडत होत्या. त्यांना पोलिस व अंगरक्षक वर जाऊच देत नव्हते. आपण कोणासाठी प्रचार करतोय, त्याचा राहुलनाच पत्ता नव्हता. इतका विस्कळीतपणा इतक्या अटीतटीच्या लढतीमध्ये असेल, तर परिणाम काय होऊ शकतो? जोपर्यंत समोर तितके स्पष्ट आव्हान नव्हते, तोवर हा विस्कळीतपणा खपून गेला. मोदींच्या सुसंघटित प्रचार व मोहिमेसमोर कॉग्रेसी प्रयास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळत गेले. त्यामुळेच यातून नव्याने पक्षाची उभारणी करायची असेल, तर राहुल व कॉग्रेस यांना पुढले काही महिने मोदींच्या प्रचार मोहिम, त्यामागे उभी केलेली संघटना यांचे बारकावे शिकून घ्यावे लागतील आणि तळापर्यंत पसरलेल्या संघाच्या संघटनात्मक शक्तीचे निरीक्षण करून उपाय योजावे लागतील. कारण यावेळी निवडणूक निकाल हा एक सुसंघटीत प्रयास विरुद्ध विस्कळीत हौशी लढवय्ये, यांच्यातल्या संघर्षाचा परिणाम असणार आहे.

No comments:

Post a Comment