Monday, April 20, 2015

सईद हाफ़ीजच्या भारतीय भावंडांचे काय?



जमात उद दावा किंवा लष्करे तोयबा अशा संघटनांवर पाकिस्तानातही आता प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. कारण जागतिक मोठ्या संस्था व राष्ट्रांनी त्यांना दहशतवादी घोषित केले आहे. मात्र त्याचा म्होरक्या वा प्रणेता मानला जाणारा हाफ़ीज सईद तिथे मोकाट फ़िरतो आहे. त्याला अधूनमधून नजरकैदेत ठेवल्याचे नाटक रंगवण्यापेक्षा पाक सरकार अधिक काही करीत नाही. त्यामुळेच जिहादी, दहशतवादी वा पाकिस्तानी राज्यकर्ते यांची मिलीभगत आहे, हे जगभरचे उघड गुपित आहे. म्हणून हफ़ीजने त्याची जाहिर वाच्यता केली, म्हणजे काही नवे केलेले नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर त्याचे सज्जड पुरावेच भारताने कोर्टात हजर केले आणि कसाबला फ़ासावर लटकवला आहे. त्याला ग्राह्य मानून अमेरिकेने संबंधित गुन्हेगार म्हणून लखवीला भारताच्या हवाली करावा, असेही पाकिस्तानला बजावले होते. म्हणजेच हफ़ीज जो दावा करतो, त्यात नवे काहीच नाही. म्हणूनच आपल्या हाती काही मोठा पुरावा लागल्याचा माध्यमातून होत असलेला गवगवा, अत्यंत उथळ आहे. कारण जे जगजहिर आहे, त्याची कबुली हफ़ीजने दिल्यामुळे कुठलाही फ़रक पडलेला नाही. त्यामुळे पकिस्तान आपल्या पापाची कबुली देणार नाही किंवा हफ़ीज वा लखवीला भारताच्या हवाली करणार नाही. तिथल्या कोर्टातही भारताने दिलेले पुरावे सादर करणार नाही, की त्यांना मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तानात शिक्षा मिळण्याची शक्यता नाही. खरे तर पाकिस्तानात बसलेल्या वा तिथल्या सत्तेच्या मदतीने इथे भारतात हल्लागुल्ला करणार्‍या हफ़ीज लखवीपेक्षा भारताला धोका आहे, तो इथेच असलेल्या त्यांच्या साथीदारांचा. जे उजळमाथ्याने भारतात वावरत असतात आणि आतून घरभेदीपणा करीत असतात. भारतीय माध्यमांनी कधी त्यांना उघडे पाडायचा प्रयत्न तरी केला आहे काय? कोण आहेत हे हफ़ीजचे इथले भाईबंद?

हफ़िजचे भाईबंद म्हटले, की लगेच आक्रस्ताळेपणा करणार्‍या भारतातल्या अनेक मुस्लिम नेत्यांकडे वा काश्मिरमधल्या काही फ़ुटीरवाद्यांकडे भुवया उंचावून बघितले जाईल. त्यात अर्थ नाही. कालपरवा मशरत आलमच्य अटकेनंतर काश्मिरात जे काहूर माजले, त्यातून पुन्हा दंगली व गोळीबाराची स्थिती उदभवली आहे. ते झाल्यावर आगीत तेल ओतायला तिकडे दोघेजण निघाले होते, त्यांना पोलिसांना रोखावे लागले. यासिन मलिक व स्वामी अग्निवेश अशी त्यांची नावे आहेत. अफ़जल गुरूच्या फ़ाशीनंतर पाकिस्तानात जो दुखवट्याचा कार्यक्रम झाला, त्यासाठी यासिन मलिक अगत्याने तिकडे गेला होता. हफ़ीजच्या मांडीला मांडी लावून बसला होता. आज त्याच यासिनसोबत अग्निवेश उजळमाथ्याने फ़िरत असतात. त्याच यासिनच्या खांद्याला खंदा लावून अरूंधती रॉय नावाची महिला भारत सरकारला शिव्याशाप देत असते आणि पुढे जाऊन काश्मिरला आझादी देण्याची भाषाही इथे भारतात बोलत असते. आपले सरकार वा कायदा त्यांच्या मुसक्या बांधू शकला आहे काय? नसेल, तर मग हफ़ीज वा लखवी यांच्याविषयी आक्रोश करून काय फ़ायदा? ज्यांना घरभेद्य़ांचा बंदोबस्त करता येत नाही, त्यांनी बाहेरच्या देशातून कुणाला इथल्या कायद्याच्या हाती देण्याची भाषा करावीच कशाला? इथला कायदा न्यायनिवाडा करू शकला असता, किंवा योग्य वेळेत कुणाला दोषी ठरवून शिक्षा फ़र्मावू शकला असता, तर अझहर महमुद या अतिरेक्याची राजरोस सुटका कशाला करावी लागली असती? विमानाचे अपहरण करून अशा खतरनाक जिहादींना भारतीय तुरूंगातून मुक्त करण्याची सोय आपणच केलेली आहे. तर अशा कोणाला इथे भारतात आणुन उपयोगच काय? सगळे गुन्हे सिद्ध केल्यावर दहा वर्षे आपण अफ़जल गुरूला फ़ाशी देताना, फ़ासाची दोरी ओढायलाही भेदरतो. तर उगाच छाती बडवण्याचे कारण आहे काय?

मागल्या तीन चार दशकात काश्मिरातल्या फ़ुटीरवादाला लगाम लावण्यात आपण अपेशी ठरलो आहोत आणि श्रीनगरमध्ये पाकिस्तानी झेंडा फ़डकावण्यापर्यंत मजल गेली आहे. दुसरीकडे प्रतिष्ठीत समाजात वावरणारे अनेकजण खुलेआम पाकिस्तानच्या अतिरेकी भूमिकेचे समर्थन करण्यापर्यंत पोहोचले आहेत. वेदप्रताप वैदिक हे प्रकरण आपण विसरलो काय? काही महिन्यांपुर्वी भारतातले काही मान्यवर पत्रकार पाकिस्तानात तिथल्या गुप्तचर संस्थेची मेजवानी झोडायला गेले होते ना? वैदिक त्यापैकीच एक होता. तो थेट हफ़ीजला भेटला व त्याविषयी मुलाखती देत सुटला, म्हणून गवगवा झाला. बाकीचे गुपचुप राहिले. हे लोक कुठल्या संस्थेच्या आमंत्रणावरून पाकिस्तानला कशासाठी गेलेले होते? ज्या संस्थेचा म्होरक्या व दोन संचालक पाक हेरसंस्थेचे माजी प्रमुख आहेत, ती संस्था भारताच्या मैत्रीसाठी असू शकते काय? त्या पाकमित्रांमध्ये बरखा दत्त, सिद्धार्थ वरदराजन, दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी, वैदिक, सलमान खुर्शीद अशा लोकांचा समावेश होता. त्यातलाच एक हफ़ीजला भेटला. ज्या संस्थेचे दोन संचालक पाक हेरसंस्थेचे म्होरके होते, त्यांनीच मागल्या दोन दशकात हफ़ीज-लखवी असे भस्मासूर निर्माण केलेले आहेत ना? मग त्यांच्याशी मैत्रीच्या गप्पा मारणारे भारतीय पत्रकार, भारताचे हितचिंतक असू शकतात काय? मेजवानीचे आयोजक एका बाजूला अशा भारतीय पत्रकारांचे मित्र असतात आणि दुसरीकडे हफ़ीजचे यजमानही असतात. मग हे नामवंत भारतीय पत्रकार आणि हफ़ीज यांच्यात नेमका फ़रक कोणता? तो पाकिस्तानी नागरीक आणि हे भारतीय नागरिक इतकाच ना? पण दोघांचा बोलविता धनी एकच असेल, तर दोघांच्या हेतूमध्ये कितीसा फ़रक असू शकतो? हे नामवंत पाकिस्तानात कशाला गेले याचा तपास होऊ शकला काय? कुठल्या माध्यमाने हा सवाल कशाला विचारलेला नाही?

जी माध्यमे हफ़ीज लखवीच्या नावाने गळा काढतात, त्यांनी अशा पाकधार्जिण्या भारतीय नामवंतांना कधी जाब विचारला आहे काय? त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गदारोळ केला आहे काय? नासिरुद्दीन शहापासून महेश भट्टपर्यंत आणि पाडगावकर, अरुंधती रॉयपासून वैदिकपर्यंत शंकास्पद मंडळी भारतातच उजळमाथ्याने वावरत असतील, तर हफ़िज लखवीने पाकिस्तानी भूमीत राहुन भारतविरोधी कारवाया केल्यास बोंबा कशाला मारायच्या? ते उघड वा जाहिर शत्रू आहेत. त्यांनी भारताविरुद्ध युद्धच पुकारलेले आहे. पण जे इथे भारतीय म्हणून उजळमाथ्याने वावरतात, तेच भारताविरुद्ध भूमिका मांडून घातपाती पाकिस्तानचा उदो उदो करीत असताना, त्यांच्या विरोधात कारवाई होऊ नये, हे कशाचे लक्षण आहे? जे पत्रकार व माध्यमे इथल्या प्रतिष्ठीत पाकमित्रांना त्यांच्या वागण्याचा जाब विचारत नाहीत, त्यांना हफ़ीजच्या विरोधात भूई धोपटण्याचा अधिकार तरी पोहोचतो काय? की अशी माध्यमेही ढोंगी व पाखंडी झाली आहेत? हफ़ीजने इतक्या उघडपणे पाक सरकार व सेना आपल्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला, म्हणून उड्या मारण्याचे अजिबात कारण नाही. उद्या तोच हफ़ीज भारतीय बुद्धीमंत संपादकही आपलेच पाठीराखे असल्याचीही ग्वाही देऊ शकेल. इतकी भयंकर स्थिती आज आलेली आहे. नासिरुद्दीन शहा किंवा उपरोक्त नावे घेतलेले भारतीय नामवंत कोणाची भलावण करीत असतात, त्याची बारकाईने छाननी केली, तरी त्याची साक्ष मिळेल. म्हणूनच ज्यांना हफ़ीजचे वक्तव्य इतके मातब्बर वाटले, त्यांनी जरा आपल्या भोवताली आपल्यातलेच घरभेदी काय मुक्ताफ़ळे उधळतात, तेही काळजीपुर्वक ऐकावे, समजून घ्यावे. त्यांच्या मुसक्या बांधल्या तरी हफ़ीजला भारतात आणायची व शिक्षा देण्याची गरज उरणार नाही. आपले घर साफ़ ठेवले, तर बाहेरच्या किडामुंगीचे भय बाळगण्याचे कारण नसते.

2 comments:

  1. Reference link:
    http://jagatapahara.blogspot.in/2014/07/blog-post_16.html

    Thanks Bhau

    ReplyDelete