Tuesday, May 24, 2016

‘ममता’ पुरे झाली, ममता आणा

कॉग्रेसच्या आजच्या दुर्दशेला राहुल गांधी व पर्यायाने सोनियांची ‘ममता’ कारणीभूत झाली आहे, याविषयी तमाम राजकीय अभ्यासकांचे एकमत आता होत आहे. अर्थात त्यात नवे काहीच नाही. खरे तर राहुल गांधी यांना पक्षात महत्वाचे स्थान देऊन निर्णयही त्यांच्याकडे सोपवले गेल्यानंतर त्याची लक्षणे दिसू लागली होती. पण असे सत्य बोलण्याची वा ऐकण्याची हिंमत असलेल्यांना पक्षात स्थान नव्हते. वेगवेगळ्या प्रसंगी विविध कॉग्रेस नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. त्यांची पक्षातून म्हणून हाकालपट्टी झाली. किंबहूना तोच अन्य नेत्यांना इशारा असतो. गांधी कुटुंबिय किंवा वारस यांना दोष देण्याला कॉग्रेसमध्ये गुन्हा मानला जातोच. पण पक्षाचे कितीही नुकसान झाले तरी त्याची वाच्यता करणेही गुन्हा ठरवला गेल्यावर, यापेक्षा वेगळे काही घडू शकत नसते. म्हणूनच ही अवस्था आलेली आहे. पण कॉग्रेसजनांप्रमाणेच काही नेहरूनिष्ठ अभ्यासकही आहेत, त्यांनाही राहुलविषयी सत्य पचत नव्हते. आता त्यांनाही त्याची जाणिव झाली आहे. त्यामुळे कॉग्रेस टिकवायची असेल तर अन्य कोणी नेता म्हणून पुढे आला पाहिजे आणि त्याला स्विकारण्याचे धाडस अन्य कॉग्रेसजनांनी दाखवले पाहिजे, असे अनेकजण उघडपणे बोलू लागले आहेत. पण गेल्या चार दशकात आपल्यातील गुणवत्ता किंवा क्षमताच कॉग्रेसजन विसरून गेले असतील, तर नेतृत्व करायला पुढे यायचे कोणी? भाजपात जसे नरेंद्र मोदी पुढे आले, तसा कोणी नेता कॉग्रेसमध्ये आहे काय? जो पक्षाला कात टाकून नव्याने उभा करू शकेल? देशव्यापी पक्षाला खंबीरपणे हाताळून अधिकारवाणीने आपले निर्णय पक्षाच्या गळी उतरवू शकेल, असा कोणी नेता कॉग्रेसमध्ये आहे काय? जितक्या निमूटपणे इंदिराजी ते सोनिया-राहुलचे निर्णय इतरांनी पत्करले, तितकी हुकूमत गाजवू शकेल, असा कोणी चेहरा कॉग्रेसपाशी आहे काय? सोनियांच्या ममतेला झुगारण्याची कुणामध्ये क्षमता आहे?
आज जे कोणी नेते कॉग्रेसमध्ये आहेत किंवा सोनियांच्या वर्तुळात आहेत, त्यापैकी कोणामध्ये तितकी हिंमत नाही, की कुवतही नाही. असती तर एव्हाना त्यानेच पुढे येऊन पक्षामध्ये स्थित्यंतर घडवून आणले असते. कधीकाळी राजीव गांधींना आव्हान देणारे प्रणब मुखर्जी कधीच बाजूला झाले आहेत. इंदिराजींना आव्हान देणारे तरूण नेते अन्थोनी व शरद पवारही सोनियांना केव्हाचे शरणागत झाले आहेत. सोनियांच्याच कृपेने ज्येष्ठ झालेले गुलाम नबी आझाद, चिदंबरम इत्यादींकडून तशी अपेक्षाही बाळगता येत नाही. पण कॉग्रेसपासून बाजूला होऊन आपला तंबू यशस्वीपणे मांडणारे अनेक कॉग्रेसजन आजही आहेत. त्यांच्यावर कॉग्रेसचे संस्कार झालेले आहेत आणि कॉग्रेसी विचारसरणी घेऊन देशाला नेतृत्व देऊ शकण्याची त्यांची क्षमता नाकारता येणार नाही. बंगालमध्ये आज मोठे यश संपादन केलेल्या ममता बानर्जी मूळच्या कॉग्रेसजन आहेत. किंबहूना अठरा वर्षापुर्वी बंगालमध्ये कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करण्याच्या आग्रहामुळेच त्यांना पक्षातून बाहेर पडण्याची पाळी आली. सीताराम केसरी पक्षाध्यक्ष असताना ममता खासदार होत्या आणि डाव्यांसोबत जाण्यातून त्या विचलीत झाल्या होत्या. बंगालमधून कम्युनिस्टांच्या डाव्या आघाडीचे वर्चस्व कमी करण्याचा अट्टाहास घेऊन त्यांनी श्रेष्ठींना आव्हान दिले आणि अनेक तरूण नेते कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यापासून हिंमत घेऊन अखेरीस ममतांनी वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि भाजपालाही साथ देत बंगालमध्ये नव्याने कॉग्रेसचे पुनरुज्जीवन केले. आरंभी त्यांच्या पाठीशी कॉग्रेसचाच निराश कार्यकर्ता एकत्र येत गेला. १९९८ सालात त्यांनी जवळपास कॉग्रेसी मतदार आपल्या मागे वळवला होता आणि मग डाव्यांना कंटाळलेला मतदारही त्यांच्यामागे एकवटत गेला. त्यामुळे आजचा तृणमूल पक्ष हे मुळच्या कॉग्रेसचे बंगालमधील पुनरूज्जीवनच आहे.
आजच्या पातळीला पोहोचताना ममता एकाकी पडल्या तरी झुंज त्यांनी सोडली नव्हती. भाजपाची साथ सोडून त्यांनी २००१च्या विधानसभेत कॉग्रेसशी संगनमत केले. ते यशस्वी झाले नाही, तेव्हा पुन्हा त्या वाजपेयी सरकारमध्ये सहभागी झाल्या. २००४ सालात भाजपा सत्तेतून गेल्यावर त्या कॉग्रेस बरोबर होत्या. पण डाव्यांचा पाठींबा सोनियांनी घेतला आणि ममता वेगळ्या झाल्या. पण २००८ मध्ये डाव्यांशी सोनियांनी फ़ारकत घेतली, तेव्हा पुन्हा ममता कॉग्रेस सोबत आल्या. २००९ सालात त्यांनी डाव्यांना खरी लढत दिली आणि एक मोठा बंगालव्यापी पक्ष म्हणून पुढे आल्या. मग दोनच वर्षात पुन्हा कॉग्रेसला सोबत घेऊन तृणमूल पक्षाला त्यांनी एकहाती सत्तेत आणले व बहूमताचा पल्ला गाठून दिला. सत्ता टिकवण्यासाठी त्यांना कॉग्रेसचीही गरज उरली नाही आणि सोनियांची हुकूमत झुगारण्याचेही धाडस त्यांनी दाखवले होते. शेवटी यावेळी लोकसभा व विधानसभा एकट्याच्या बळावर जिंकण्याची त्यांची क्षमताही सिद्ध झालेली आहे. पण वैचारिक पातळीवर बघितले, तर तृणमूल कॉग्रेस हा बंगालची कॉग्रेस शाखाच आहे. ज्या आक्रमकतेने व सहजतेने ममता आपल्या पक्षाला प्रादेशिक पातळीवर उभ्या करू शकल्या, तितक्याच समर्थपणे राष्ट्रीय पातळीवर त्या कॉग्रेसचे नेतृत्व करू शकतील. सोनिया-राहुल यांच्या हुकूमतीखालीच जगायची सवय असलेल्या कॉग्रेसजनांना तितकाच ठामपणे आपले निर्णय लादणारा पुढारी आवश्यक आहे आणि ती क्षमता असलेला पक्का कॉग्रेसी नेता ममताच एकमेव आहे. मग अखील भारतीय कॉग्रेसी सांगाडा पुनरुज्जीवित करायचा असेल, तर आहे तो तसा ममताच्या हवाली करायला काय हरकत आहे? मोदींइतके अहोरात्र राजकारण खेळण्यात गर्क असलेल्या नेत्याची कॉग्रेसला गरज आहे आणि ती कुवत ममताला सोडून अन्य कोणा कॉग्रेस नेत्यामध्ये नसल्यास, हा प्रयोग व्हायला काय हरकत आहे?
राहुल किंवा सोनिया सवडीचे म्हणजे त्यांना सवड असेल तितके राजकारण करतात. राष्ट्रीय पक्ष त्यावर चालू शकत नाही. राहुलना तर दर दोनतीन महिन्यांनी परदेशी विश्रांतीला जावे लागते. उलट ममता कुठेही केव्हाही पक्षासाठी धाव घेणारी नेता आहे. राहुलमुळे पक्षाचे भवितव्य धोक्यात असल्याची जाणिव झालेल्या कॉग्रेसनेते व कार्यकर्त्यांनी ममताचा धावा केला, तर पक्षात नवी संजीवनी फ़ुंकली जायला वेळ लागणार नाही. ममता ह्या आगामी राजकारणात मोदींना कितपत आव्हान ठरतील, ते आताच सांगता येणार नाही. पण निदान मृतावस्थेत गेलेल्या कॉग्रेसला जीवदान देण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. तृणमूलच्या मुख्यमंत्री म्हणून त्या कोलकाता येथून अखील भारतीय पक्षाचे नेतृत्व करू शकणार नाहीत. पण विश्वासू सहकार्‍याला कोलकात्यात सत्तेवर बसवून, त्यांना कॉग्रेसचे अखील भारतीय नेतृत्व करणे अशक्य नक्कीच नाही. कुठेही मुसंडी मारून धाव घेणारा व अतिशय आक्रमकपणे विरोधावर तुटून पडणारा नेताच कॉग्रेसला नवी संजीवनी देऊ शकणार आहे. बंगालमध्ये ममता बानर्जी यांनी तो प्रयोग यशस्वीपणे करून दाखवला आहे. मात्र त्यासाठी कॉग्रेसजनांना व नेत्यांना सोनियांच्या जंजाळातून बाहेर पडावे लागेल आणि राहुलविषयीची ‘ममता’ विसरून ममता नावाच्या खर्‍या कॉग्रेसी नेत्याला शरण जावे लागेल. ज्यांना अननुभवी सोनियांच्या आज्ञेत जगणे वागणे अवघड झाले नाही, त्यांना ममतांना शरण जाण्यात कुठली अडचण असू शकेल? राहुल पक्षाला संजीवनी देतील किंवा अन्य कोणी प्रेषित पक्षाला नव्याने उभारी देईल, अशा भ्रमात जगण्यापेक्षा दोन दशकातल्या यशस्वी नेत्याला डोक्यावर घेण्याचा जुगार सोपा व लाभदायक नसेल काय? बंगाली कॉग्रेसजन व नेत्यांनी तसे धाडस केल्याचे भरघोस परिणाम समोर आहेत. त्यातून अन्य प्रांतातील कॉग्रेसजन काही धडा शिकणार आहेत काय?

5 comments:

  1. Bhannat Vichar ahet. Pan Mamtadidi aadhi congress madhe yayla havyat aaani congress valyana pan ha vichar patayla hava nahi tar ya congressch kay khar nahi

    ReplyDelete
  2. Bhannat Vichar ahet. Pan Mamtadidi aadhi congress madhe yayla havyat aaani congress valyana pan ha vichar patayla hava nahi tar ya congressch kay khar nahi

    ReplyDelete
  3. छान भाऊ उत्तम

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    लेख नेहमीप्रमाणे विचारप्रवर्तक आहेच. फक्त एक महत्त्वाची बाब लेखाच्या परीघाबाहेरची आहे.

    ती म्हणजे काँग्रेसमधल्या इतर नेत्यांच्या झालेले अकाली मृत्यू. माधवराव शिंदे, राजेश पायलट, जितेंद्र प्रसाद यांचे अनैसर्गिक मृत्यू इतर नेत्यांच्या उरात धडकी भरवतात. ममता दीदींनी उगाच काँग्रेसमध्ये जाऊन स्वत:च्या जिवाची बाजी का लावायची? दीदींच्या दृष्टीकोनातून काँग्रेसचे पुनरुज्जीवन म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहारच होय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. काँग्रेसची परिस्थिति पाहून मला गीत रामायणातल भरताचं गाीत आठवलं.

    माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी।

    शाखेसह तू वृक्ष तोडला, फला इच्छीसी वाढ।

    आता काँग्रेसची शाखा कुठेही नाही. मग पंतप्रधानपद कुठले?
    हा हा हा. . . .

    ReplyDelete