Thursday, August 11, 2016

बेअब्रूच अब्रुदारीचे लक्षण

इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्या पार्टीत मागे एनडीटीव्हीचा प्रणॉय रॉय दिसतोय?



कालपरवा गोरक्षक म्हणून ज्यांनी हिंसाचार केला, त्यांचे विविध भाजपा किंवा संघ नेत्यांच्या सोबतचे फ़ोटो माध्यमांनी अगत्याने दाखवले. त्यातून काय सिद्ध करण्याचा तथाकथित पत्रकारांचा हेतू असावा? तर उना गुजरात किंवा अन्य कुठे गोरक्षा नावाने जी हुल्लडबाजी किंवा अत्याचार झाले, त्यामागे भाजपाचीच प्रेरणा आहे. किंबहुना तोच तर भाजपाचा अजेंडा आहे. हेच सिद्ध करण्यासाठी असे फ़ोटो पुरावे म्हणून सादर केलेले असतात ना? याचा अर्थ कोणाचा कोणासोबत कुठल्याही प्रसंगीचा फ़ोटो उपलब्ध असेल, तर त्यापैकी कोणावरही गंभीर आरोप झाल्यास उरलेला दुसरा तिसराही त्याच गुन्ह्यातला गुन्हेगार असतो. असाच तर्क माध्यमे वा पत्रकार मांडत असतात ना? तसे फ़ोटो शोधून लोकांना दाखवणारेही त्याचे हेतू्ने प्रेरीत झालेले असतात ना? हरकत नाही! हेच तर्कशास्त्र मग प्रत्येक बाबतीत लावले गेले पाहिजे. कुठलाही गुन्हा घडला वा गुन्ह्यातला आरोपी पकडला गेला, मग त्याच्या सोबत अन्य ज्यांचे फ़ोटो उपलब्ध असतील, त्यांनाही त्याच गुन्ह्यातले आरोपी मानावे. त्यातही अडचण असायचे कारण नाही. आणि असे फ़ोटो शेकड्यांनी नेते प्रतिष्ठीतांच्या आयुष्यात टिपले गेलेले असू शकतात. किंबहूना असतातही. मग त्याच तर्काने त्यांनाही सामाजिक गुन्हेगार म्हणून प्रकाशात आणायला हरकत नसावी. असे कित्येक फ़ोटो हिरानंदानी इस्पितळाच्या विविध समारंभात सहभागी झालेल्या नेते वा मान्यवरांचे मिळू शकतील. त्यांनाही प्रत्येकाला मुत्रपिंड व्यापारातले आरोपी म्हणून सादर करायला हरकत नसावी. कारण ज्या पैशाने त्या भानगडीत सहभागी असलेल्यांना प्रतिष्ठा मिळाली आहे वा ज्या पैशावर असे समारंभ योजले गेले आहेत, त्यात सहभागी झालेले तितकेच गुन्हेगार मानायला हवेत. दुर्दैवाने तितके न्याय्य वर्तन होत नाही आणि म्हणूनच बदमाशांना आपल्या समाजात उजळमाथ्याने वावरण्याची मोकळीक मिळाली आहे.

आता हिरानंदानी इस्पितळात मुत्रपिंड भानगड चव्हाट्यावर आलेली असताना, त्याचे तपशील पुढे आणण्याची स्पर्धा चालेल. पण त्यात गुंतलेल्या महान मान्यवर डॉक्टर मंडळींशी ज्यांचे घनिष्ठ संबंध यापुर्वी आलेले आहेत, त्यांचे काय? अगदी सहजगत्या तिथल्या डॉक्टर वा अन्य अधिकारी वर्गाने चोरट्या मुत्रपिंड वा मानवी अवयवांचा व्यापार मांडलेला होता. त्यामागे किंचीतही भितीचा लवलेश नव्हता. आपण बेकायदा व गुन्हेगारी अमानवी कृत्य करीत आहोत, याची चिंताही त्यापैकी कुणाच्या मनाला शिवलेली नव्हती. कायद्याला बगल देऊन गुन्हे करण्याची ही प्रतिष्ठीत वर्गातली मानसिकता बघितली, मग प्रसिद्ध माफ़िया कादंबरीचे स्मरण होते. त्यातला ‘गॉडफ़ादर’ आपल्या मानसपुत्राने वकील व्हायचे ठरवल्यावर त्याची पाठ थोपटून म्हणतो, यासारखा सुरक्षित गुन्हेगारी धंदा नाही. दहा डाकू पिस्तुल बंदुका घेऊन जितके पैसे लुटू शकत नाहीत, तितकी रक्कम एक वकील नुसती ब्रिफ़केस हातात घेऊन करू शकतो. हिरानंदानी सारखी प्रकरणे बाहेर येतात, तेव्हा त्याची साक्ष मिळत असते. या इस्पितळात गरीब गरजूंच्या अगतिकतेचा लाभ उठवून आणि रुग्णांच्या तिजोरीतले पैसे मोजून मानवी अवयवांचा गुन्हेगारी स्वरूपातला बाजार बिनधास्त चालू होता. मानवी अवयवाचे प्रत्यारोपण हे मानवतेला मिळालेले मोठे वरदान आहे. पण त्यात गरजू व व्यापारी यांनी मानवी जीवनाला धोक्यात आणू नये, म्हणून काही कायदेशीर सावधानता उभारण्यात आलेली आहे. माणसाला अशाप्रकारे लुटण्याची कल्पना हे तंत्र विकसित होत असतानाच एका साहित्यिकाने केलेली होती. त्याने लिहीलेल्या ‘कोमा’ नामक कादंबरीला जगभर प्रचंड लोकप्रियता लाभलेली होती. मात्र तेव्हा तो नुसता कल्पनाविलास वाटला होता. आज तेच किती भीषण सत्य होऊन बसले आहे, त्याची ग्वाही या भानगडीने दिली आहे.

त्यात एका इस्पितळात बेसावध रुग्णांना जाणिवपुर्वक चुकीचे उपचार देऊन अर्धमेल्या अवस्थेत ढकलले जाते. मग त्यांची रवानगी तशा विभागात केली जाते. पुन्हा शुद्धीत येऊ न शकणार्‍या अशा रुग्णांकडे आप्तेष्टांचे दुर्लक्ष होत जाते आणि त्यांचे एक एक अवयव काढून गरजूंना मोठ्या किंमतीत विकले जातात. ती भीषण कथा इथे वेगळ्या मार्गाने वास्तवात आणली गेली आहे. गरजू लाचारांना पैशाचे आमिष दाखवून अवयव मोठ्या किंमतीला विकायला प्रवृत्त करायचे. मग कायद्यातून पळवाट म्हणून त्यांनाच रुग्णाचे नातलग असल्याचे भासवून, त्यांचे अवयव जाणतेपणी काढून घ्यायचे. त्याची मोठी किंमत श्रीमंत रुग्णाकडून वसुल करायची. त्यातला किरकोळ हिस्सा गरीब लाचाराच्या तोंडावर मारायचा. असा उद्योग इथे चालू होता. कारण रक्ताच्याच नातलगाला अवयव दान करण्याची मुभा कायद्याने दिलेली आहे. पण प्रत्येक गरजूला वा श्रीमंताला तसा दानशूर आप्तेष्ट उपलब्ध असेलच असे नाही. आणि असला तरी त्याचा रक्तगट जमून अवयवाचे प्रत्यारोपण शक्य असेलच असे नाही. त्यातून काढलेली ही पळवाट होती. मात्र त्यात लाचार व गरजू श्रीमंत यांना एकत्र आणण्याचा एक धंदा होऊ शकतो, हे जाणून अतिशय काळजीपुर्वक हे कारस्थान राबवले जात होते. त्यात कुठेतरी माशी शिंकली म्हणून ते चव्हाट्यावर आलेले आहे. ती माशी म्हणजे अशारितीने अवयव विकला असताना त्याची अपेक्षित असलेली किमान किंमत देण्यातही घासाघीस झाली. म्हणून तो अवयव विकणार्‍याने कायद्याचे दार ठोठावले आणि हे तमाम प्रतिष्ठीत उघडे पडले. एका मान्यवर इस्पितळाचा मुख्याधिकारी व विशेषज्ञ डॉक्टरांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाला आहे. सवाल इतकाच, की त्यांच्याबरोबर कधीतरी कुठे समारंभात सहभागी झालेल्यांचे काय? आपल्याशी मैत्री दोस्ती असलेल्यांच्या अशा गुन्ह्याची किती प्रतिष्ठीतांना लाज शरम वाटली आहे?

रस्त्यावर दोन दगड मारणार्‍या किंवा कुठे गोरक्षा नावाने गुंडगिरी करणार्‍यांचा निषेध करीत आपली महत्ता सिद्ध करणार्‍यांपैकी कित्येकजण, अशा डॉक्टरांच्या जवळपास प्रतिष्ठेने वावरलेले आहेत? त्यांच्या अशा कमाईच्या पैशावर पार्ट्या झोडणारेही कमी नसतील. शिना बोराच्या हत्येचे आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी वा इंद्राणी मुखर्जी यांची तर अशा पार्ट्या देण्यासाठी ख्यातीच होती. तिच्याशी आपले संबंध होते, म्हणुन किती मान्यवरांनी खेद व्यक्त केला होता? गोरक्षकांचे नेत्यांसोबत असलेले फ़ोटो दाखवून त्यांच्यावर शिंतोडे उडवणार्‍यांचेही शिना बोराच्या मारेकर्‍यांसोबतचे फ़ोटो उपलब्ध आहेत. तसेच हिरानंदानी इस्पितळातील नामवंतांच्या सोबतचे फ़ोटो मिळू शकतील. कोणी आज आपले त्यांच्या सोबतचे फ़ोटो समोर आणायला राजी आहे काय? आपणही अशा गुन्हेगारांच्या संगतीत कशाला होतो, त्याचे खुलासे कोणी करणार आहे काय? आठवते, फ़रारी झालेल्या विजय मल्ल्यावर शिंतोडे उडवले गेले; तेव्हा त्याने खुलेआम माध्यमातले मुखंड व मान्यवर आपल्याच पैशाने मजा मारीत होते, असा जाहिर आरोप केला होता. त्याला धमकी ठरवत पळवाट शोधली गेली. पण आपण त्याच्या दरोडेखोरीच्या पैशावर मौज केल्याचा खेद कोणीही कधी व्यक्त केला नाही. आजच्या प्रतिष्ठीतांची ही इज्जत आहे. शोभा डे त्यापैकीच एक आहे. समाजात असा एक नवी अजब प्रतिष्ठीत वर्ग तयार झाला आहे, की त्याला बेअब्रू म्हणजेच प्रतिष्ठा वाटू लागली आहे. पकडला जाईपर्यंत असे लोक प्रतिष्ठीत असतात आणि त्यांच्या इर्दगिर्द वावरणार्‍यांना प्रतिष्ठीत म्हणून पेश केले जात असते. हिरानंदानी इस्पितळ अशाच प्रतिष्ठीतांच्या आशीर्वादाने चालत असेल, तर त्यातल्या गुन्हेगारांनाच आरोपी ठरवण्यात काय हरकत आहे? प्रतिष्ठा म्हणजेच गुन्हेगारी झाली नाही का? ललित मोदी, विजय मल्ल्या, इंद्राणी मुखर्जी, हिरानंदानीचे डॉक्टर आणि गोरक्षक म्हणून गुंडगिरी अत्याचार करणारे, यांच्यात गुणात्मक फ़रक तो कितीसा उरतो?

3 comments:

  1. मस्तच भाऊ अगदी बरोबर एक मोठा mard नेता काही काळअधी तेलगीसोबत फोटोत दिसला होता नंतर हानेता कशा काखा वर करत होता

    ReplyDelete
  2. Anil Kapoor che Daud barobar photo aahet..

    ReplyDelete
  3. Enlighten poorer were fucked these so called bastured.

    ReplyDelete