Friday, October 4, 2019

कुठे गेला कॉग्रेस पक्ष?

हुड्डा ahmed पटेल विडियो के लिए इमेज परिणाम

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ खुप व्हायरल झाला आहे. त्यात कॉग्रेसचे तीन दिग्गज नेते एकमेकांशी गुफ़्तगु करीत असून त्यातला एक पक्षातला सर्वशक्तीमान नेता मानला जातो. किंबहूना दहा वर्षाच्या युपीएच्या कालखंडात त्याच्याच इशार्‍यावर भारत सरकार चालत असल्याच्या वदंताही होत्या. त्याचे नाव अहमद पटेल. असा नेता दुसर्‍या तितक्याच वजनदार नेता भूपिंदरसिंग हुड्डा यांचा विचारतोय, की ‘कहा गयी कॉग्रेस पार्टी?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ त्याच्यावर का आली असेल? खरे तर हा प्रश्न मागल्या पाच वर्षात माध्यमांनी अभ्यासकांनी व विरोधी पक्षांनी सातत्याने विचारलेला आहे. तेव्हा हिरीरीने कॉग्रेस पक्ष सव्वाशे वर्षाचा जुना असून तो असा एकदोन निवडणूकातल्या पराभवाने संपणार नसतो, असे अगत्याने जाणकारही म्हणत होते. पण आता हाच प्रश्न अहमद पटेल विचारत आहेत आणि त्याचे उत्तर दुसरे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्यापाशीही असल्याचे दिसत नाही. कारण त्या चित्रणात त्यांचाही समावेश असून हरयाणात निकालाच्या वेळी कॉग्रेसची अवस्था कशी असेल, या विषयावर त्यांचे बोलणे चाललेले आहे. कुठल्या गटाला किती उमेदवार्‍या दिल्या आणि किती आमदार निवडून येतील, या प्रश्नाला उत्तर देताना हुड्डा फ़ारतर १४ असे उत्तर देतात. त्यामुळे उद्विग्न झालेले पटेल हा सवाल करीत आहेत. त्यांचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण पाच वर्षापुर्वी कॉग्रेस हाच पक्ष हरयाणामध्ये सलग दहा वर्षे सत्तेत होता आणि भजनलाल यांच्यासारखा दिग्गज नेता बाजूला झाला असताना आणि चौटाला यासारखा दांडगा नेता विरोधात असतानाही दोनदा कॉग्रेसने विधानसभेत बहूमत जिंकलेले होते. तेव्हा हरयाणात भाजपाला फ़ारशी ताकद नव्हती, किंवा दखल घेण्याइतकाही तो पक्ष तिथे नव्हता.

पाच वर्षापुर्वी भाजपाने स्वबळावर विधानसभा जिंकली आणि ताज्या लोकसभा निवडणुकीत सर्व दहा जागाही पादाक्रांत केल्या. खुद्द हुड्डा यांनाही पराभूत व्हावे लागले आणि २०१४ मध्ये एकमेव जागा जिंकलेला त्यांचा सुपुत्रही यंदा पराभूत झाला. मग कॉग्रेसला तिथे झाले आहे तरी काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण त्याचे उत्तर मात्र सोपे असले तरी समजून घ्यायला अवघड आहे. तिथेच कशाला देशभर कॉग्रेसची अवस्था रुग्णावस्थेची झालेली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी भाजपाचे नेतृत्व पत्करल्या नंतर लोकसभा प्रचारात कॉग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केलेली होती. त्याची अनेक शहाण्यांनी टिंगल केली होती आणि मोदींचा उर्मटपणा ठरवलेला होता. पण आपण कॉग्रेस संपवणार असे मोदी कधीच म्हणाले नव्हते. त्यांनी देश कॉग्रेसमुक्त होईल असे भाकित केलेले होते आणि ते सत्कार्य कॉग्रेसचा वारसदारची करील, अशी मोदींना खात्री होती. अर्थातच फ़क्त मोदी कशाला, अनेक कॉग्रेस नेत्यांना व पुरोगामी राजकीय भाष्यकारांनाही तशीच खात्री होती. पण ते सत्य बोलण्याची हिंमत कोणाला होत नव्हती. मोदींनी तितकेच धाडस केलेले होते. ते समजून घेण्यापेक्षा मोदींची टवाळी करण्यात राजकीय विश्लेषकांनी धन्यता मानली आणि असल्या उथळ शहाण्याच्या विश्लेषणावर सोनियासहीत अहमद पटेलही विसंबून राहिले होते. इतकेही दुर जाण्याची गरज नाही. कॉग्रेसचेच जाणकार नेते जयराम रमेश यांनीही तेव्हा २०१४ च्या निवडणूकीत राहुल कॉग्रेस बुडवित असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितलेले होते. पक्षाला २०१४ ची लोकसभा जिंकायची आहे आणि राहुल मात्र २०१९ च्या लोकसभेच्या तयारीत गुंतलेत, असा उपरोधिक शेरा तेव्हा त्यांनी मारला होता. त्याचा अर्थ कॉग्रेस पक्ष नामशेष होतोय असाच होता. पण रमेश यांची भविष्यवाणी ऐकायला अहमद पटेल यांना सवड कुठे होती? अगदी कालपरवा म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वीही रमेश यांनी अशी भविष्यवाणी केलेली होती. पक्षासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न असल्याचे रमेश यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या जाहिर मुलाखतीत म्हटले होते. पटेलांना ते ठाऊकच नाही काय?

राहुल गांधी व त्यांचे नेतृत्व कॉग्रेस रसातळाला घेऊन चालले आहे, असाच रमेश यांनी धोक्याचा इशारा दिलेला होता ना? रसातळाला म्हणजे नरक असतो, हे पटेल वा कॉग्रेसश्रेष्ठींना ठाऊकच नाही काय? पार्टी कहा गयी, असा प्रश्न विचारण्यापेक्षा पक्ष असा नामशेष कोणी केला? किंवा पक्ष असा रसातळाला कोणी नेला, हा सवाल योग्य ठरेल. त्याचे उत्तर राहुल गांधी व सोनियांचे पुत्रप्रेम असेच आहे. पण ते ऐकायची हिंमत कुणा कॉग्रेसवाल्यापाशी आहे काय? जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्‍यांची पाठ थोपटायला राहुल गांधी पोहोचले, तिकडेच कॉग्रेस पक्ष गेला आहे. टुकडे भारताचे कधी होत नसतात. असल्या वल्गना करणार्‍यांचे व त्यांचीच पाठराखण करणार्‍यांचे टुकडे होत असतात आणि झाले आहेत. कारण हरयाणा असो किंवा महाराष्ट्र असो, तिथे आज कॉग्रेस इतक्या गटातटात विखुरली गेली आहे, की मुळची कॉग्रेस कुठे आहे, तेच कॉग्रेसजनांना समजेनासे झाले आहे. तिथे हरयाणात हुड्डा विरुद्ध तन्वर विरुद्ध शैलजा असे अनेक गट आहेत. त्यातही सुरजेवाला किंवा तत्सम उपगटही आहेत. त्यातला श्रेष्ठींचा आशीर्वाद असलेला गट कोणता? कारण त्यालाच कॉग्रेस पार्टी म्हणतात ना? जे कोणी तुरुंगात जातील वा ज्यांच्यावर गुन्हेगारीचे गंभीर दखलपात्र आरोप असतील, त्यांच्या निरपराधीत्वाचा डंका पिटण्याला आजकाल कॉग्रेसचे कार्य मानले जाते. सोनिया राहुलना कोर्टात जातमुचलका लिहून द्यायचा असला, मग तिथे जमा होऊन त्यांचा जयजयकार करण्याला कॉग्रेसकार्य म्हणतात. रॉबर्ट वाड्रा यांच्या आर्थिक गफ़लती वा अफ़रातफ़रीचे समर्थन करण्यालाच कॉग्रेसचा कार्यक्रम मानला जातो. अटकेला घाबरून फ़रारी होणार्‍या आरोपी चिदंबरम यांच्या समर्थनाला रस्त्यावर येण्यातून पक्ष चालविला जातो. शिवकुमार यांच्याही अटकेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्याला कॉग्रेसची मोहिम मानले जाते. याचा अर्थ कॉग्रेस पक्ष लोकांमध्ये राहिलेला नसून तुरूंगात गेला असाच होतो ना?

जयंती नटराजन वा हेमंतो विश्वशर्मा अशा अनेक नेत्यांनी डबघाईला आलेल्या कॉग्रेसला सावरण्यासाठी अनेक सुचना केल्या आणि कोणी ऐकतच नाही, म्हणून पक्षाला रामराम ठोकला. तेव्हा त्यांच्या जाण्यातून कॉग्रेस पक्ष हळुहळू संपत चालला होता. खर्‍याखुर्‍या पक्षनिष्ठांना कॉग्रेसमध्ये स्थान उरले नाही आणि गांधी घराण्याच्या पापांवर पांघरूण घालण्याचा एककलमी कार्यक्रम कॉग्रेस पक्षाने स्विकारला. तिथून जनतेतला कॉग्रेस पक्ष संपुष्टात येऊन तो गुन्हेगार तुरूंगवासियांचा पक्ष होऊन गेला. मग त्याचा मतदाराशी व पर्यायाने जनतेशी संपर्क संपत गेला. त्यामुळे अहमद पटेल यांच्या प्रश्नाचे साधे सोपे सरळ उत्तर असे आहे. कॉग्रेस पार्टी राहुलनिष्ठा वा सोनियानिष्ठेत अंतर्धान पावलेली आहे. तिला बाहेरून कोणी संपवलेले नाही. तर गांधी खानदानाची गुलामीच कॉग्रेसला नामशेष करीत गेली आहे आणि म्हणून जनतेला त्या पक्षाही कुठले कर्तव्य उरलेले नाही. ही वास्तविकता जसजशी तळागाळापर्यंत पोहोचते आहे, तसा कॉग्रेस पक्ष काळाच्या पडद्याआड चालला आहे. सोनियांच्या रायबरेली मतदारसंघाच्या एक तरूण कॉग्रेस आमदार अदिती सिंग यांनीच त्याची साक्ष दिली आहे. नुसता मोदी वा भाजपा विरोध पक्षाला संपवत चालला आहे, असे सांगत त्यांनी पक्षादेश झुगारून विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला. महात्माजींच्या दिडशेव्या जयंतीनिमीत्त उत्तरप्रदेश विधानसभेचे एक खास अधिवेशन बोलावण्यात आलेले होते. त्यात प्रत्येक आमदाराने आपल्या भागात तुंबलेल्या लांबलेल्या योजनांची जंत्री सांगावी, इतकाच कार्यक्रम होता. तर कॉग्रेसने त्यावर बहिष्कार घातला. त्यातला विरोधाभास वा मुर्खपणा ओळखून अदितीसिंग त्याला उपस्थित राहिल्या. त्यांना सोनियनिष्ठेपेक्षा गांधी विचारांवरील निष्ठा मोठी वाटली. हा फ़रक आहे. अदिती या तरूणीला कॉग्रेस पक्ष कुठे होता व रहावा हे कळते. पण गांधी खानदान वा त्याचे खास भाटहुजरे यांना त्याचा थांगपत्ता नाही. म्हणून तर पक्षाचे श्रेष्ठी असून पटेल विचारतात, कहा गयी कॉग्रेस पार्टी?


7 comments:

  1. सर महाराष्ट्राच विश्लेषण तुमच्या कडून अपेक्षित आहे. ज्या प्रकारे पवारांना हाताशी धरून महाराष्ट्र कॉंग्रेस नेस्तनाबूत करण्यात आली, मराठा शिरोमणी पवार साहेबांना यांचे भालदार चोपदार भाजपमध्ये विलीन झालेत, कॉंग्रेस राकॉं साठी अनुकूल जागांवर मुद्दाम पडिचे उमेदवारांना उभे करण्यात करण्यात आले, यामागे नेमके कारण काय? सत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेत पवार माघार का घेताहेत? अशोक चव्हाण यांना का डावलण्यात येत आहे? या प्रश्नाचे स्वयंस्पष्ट निराकरणासाठी आपली एक स्वतंत्र पोस्ट आवश्यक आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ, आदिती सिंग चे कौतुक वाटते. निदान तिने विचार केला असे वाटते. आज दुपारी (4.10.19)संजय निरुपमची पत्रकार परिषद पाहत होतो, तो पण वैतागला होता. त्याने चार नवे निवडणुकीसाठी सांगितली होती व पार्टी वरिष्ठांनी ती विचारात सुद्धा घेतली नाहीत असे म्हणाला. माझ्या या प्रस्ताव बद्दल काहीच न विचारता यावर फुली मारली. आणखी वरच काही म्हणाला. मी आता प्रचार करणार नाही असे म्हणाला. असे वाटते की हे नेते आता राहुल व सोनिया पेक्षा काँग्रेसला विचारात घेतात असे दिसते आहे. असे असेल तर काँग्रेसला परत चांगले दिवस येतील.

    ReplyDelete
  3. भाऊ, महात्मा गांधीचे स्वप्न गांधीच पूर्ण करणार, यात शंका नाही.

    ReplyDelete
  4. छान लिहिले आहे. खानदान म्हणजे पक्ष, असे झाले की, इतरांना तेथे स्थान रहात नाही. राज्य पातळीवरील पक्षांचेही असे होते. त्यात नेत्यांमध्ये थोडीफार लोकशाही असली तर बरे.भाजपनेही हा धडा लक्षात ठेवावा

    ReplyDelete
  5. काँग्रेस पार्टी/वृत्ती चा असाच शेवट झाला पाहिजे.
    त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा वाटत नाही.
    राहुल गांधी यांनी आजीवन अध्यक्ष राहून मोदी आणी पर्यायाने भारताची मदत करावी👍....

    ReplyDelete
  6. तंतोतंत भाऊ, खरंय या काँग्रेसी बांडगुळांना कोण सांगेल, आणि या बांडगुळांना अंगाखांद्यावर स्थान देणाऱ्या गांधी घरातले असेच संपतील

    ReplyDelete
  7. कोणातरी वाकसिद्ध संताने 1966च्या दरम्यान इंदिरा आणि कॉंग्रेसला शाप दिला होता की हिमालयातील गुहेतून एक सन्याशी येईल आणि कॉंग्रेसला नेस्तनाबूत करेल. त्या संताचे नाव होते स्वामी करपात्री! गोहत्येचा कायदा करण्याचे वाचन या साधूळा 1966 मध्ये इंदिरा गांधीने दिले होते पण विस्मायकारक रीतीने इंदिरा गांधी जिंकल्या आणि दिलेले वचन विसरल्या. पप्पुसाहेबांच्या अवतरणाने तो शाप फलिभुत झाला.

    ReplyDelete