Thursday, January 30, 2020

विरोधी पक्ष बदलायला हवाय

Image result for abhijit banerjee jaypur

जयपूर फ़ेस्टिवल किंवा विविध सेमिनार नावाचा वांझोटा प्रकार आपल्या देशात खुप चालतो. विविध कंपन्यांच्या सांस्कृतिक निधीमधून अशा समारंभावर खर्च करण्याची मोकळीक असल्याने उपटसुंभ शहाण्यांना मेजवान्या झोडण्याची मौज करता येत असते. अशाच एका कार्यक्रमातून ‘टहलका’ मासिकाच्या संपादकाचे लैंगीक प्रकरण चव्हाट्यावर आलेले होते. जिथे असले प्रकार सहजसाध्य असतात, तिथे वैचारिक मंथन होण्याची कल्पना किती चमत्कारीक आहे ना? पण उच्चभ्रू समाजात किंवा सिव्हील सोसायटीमध्ये अशी नाटके नित्यनेमाने चालतात. तशा चर्चा उहापोहातून समाजाला नेमके काय मिळते; त्याचा गोषवारा कधीच दिला जात नाही. निरूपयोगी वादविवाद मात्र उकरून काढले जातात. काही वर्षापुर्वी याच जयपूर फ़ेस्टीवलमध्ये महान पुरोगामी विचारवंत चिंतक भारत कर्नाड यांनी जरा मनमोकळे केले आणि त्यांच्याच पुरोगामी गिधाडांनी त्यांचा पुढल्या काही दिवसात फ़डशा पाडलेला होता. ‘जसजसे तळागाळातील वर्ग प्रशासनात उच्चस्थानी येत आहेत, तसतसा भ्रष्टाचार अधिक बोकाळत गेलेला आहे’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. मग त्यांना पुरोगाम्यांनीच पळता भूई थोडी केली होती. आपल्यातला हा महान विचारवंत कसा जातीयवादी आहे, त्याचे लचके तोडून बिर्यान्या शिजवल्या व परोसल्या गेल्या होत्या. अखेर कर्नाड यांना तोंड लपवून अनेक महिने बिळात दडी मारून बसावे लागलेले होते. मुद्दा इतकाच, की अशा सेमिनार वा विचारमंथनातून काहीही निष्पन्न झाल्याचे अजून तरी कोणी सांगू शकलेला नाही. कारण समाजहित वा लोककल्याणाचा मुद्दा तिथे मोलाचा नसतो. तर फ़ुकट मौज करायची पिकनिक असेच त्याचे स्वरूप झालेले आहे. या वर्षीच्या तशा फ़ेस्टीवलमध्ये पुरोगाम्यांचे लाडके नवे नोबेल विजेते अभिजित बानर्जी सहभागी झालेले होते आणि त्यांनीच विद्यमान विरोधी पक्षाचे कान उपटलेले आहेत. बहूधा त्यामुळे अनेकांचा मुखभंग झाला असावा. कारण त्यांच्या त्या मतप्रदर्शनाची माध्यमात फ़ारशी चर्चा झालेली नाही.

तसे बानर्जी हे पुरोगामीच आहेत. कारण त्यांनी वारंवार आर्थिक मते मांडताना मोदी सरकारवर तोफ़ा डागलेल्या आहेत. हल्ली तोच पुरोगामीत्वाचा मापदंड झालेला असल्याने त्यांच्या पुरोगामीत्वावर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. किंबहूना अनेकांना ठाऊक नसेल, तर राहुल गांधींचे ते सल्लागारही होते म्हणतात. लोकसभेपुर्वी राहूलनी जी सबको ‘न्याय’ म्हणून वार्षिक ७२ हजार रुपये असेच खिशात टाकण्याची महान क्रांतीकारी योजना मांडलेली होती, ते बानर्जींचेच अपत्य होते म्हणतात. देशातील पाच कोटी कुटुंबांना प्रतिवर्षी सरकारने थेट ७२ हजार किंवा दरमहा १२ हजार रुपये द्यायचे; अशी ती कल्पना होती. पण त्या पाच कोटी कुटुंबांच्या दुर्दैवाने देशातील उर्वरीत गरीब मतदाराने राहुल यांच्यावर विश्वास टाकला नाही आणि न्याय योजना बारगळली. त्यामुळे राहुल गांधीच इतके विचलीत झाले, की त्यांनी कॉग्रेसचे अध्यक्षपद सोडून आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्या योजनेच्या वेळी राहूलनी जागतिक किर्तीच्या अर्थशास्त्रींनी योजनेला हिरवा कंदिल दाखवला असल्याचे म्हटलेले होते. ते किर्तीवंत म्हणजे बानर्जीच असल्याचे म्हणतात. असो, त्यांना नंतर नोबेल पारितोषिक मिळाले आणि आता भारतात त्यांचे गुणगान जोरात सुरू आहे्. प्रामुख्याने पुरोगामी जगताचे ते नवे हिरो आहेत. पण यापुर्वीचे हिरो अमर्त्य सेन यांची झालेली दुर्दशा बघितल्यावर बहुधा बानर्जी सावध असावेत. म्हणून की काय, आरंभी मोदी सरकारच्या अर्थकारणावर टिका करून झाल्यावर त्यांनी आपला ट्रॅक बदलला आहे. मोदींना शिव्याशाप देण्यापेक्षा मोदी नवे काही प्रयोग करीत असल्याचे प्रशतीपत्र बानर्जींनी दिलेले होते. आता त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून त्यांनी आपल्या चहात्यांनाच सणसणित चपराक हाणलेली आहे. मोदींपेक्षा चांगल्या व भाजपापेक्षाही वेगळ्या सरकारची देशाला गरज आहे, असे विधान त्यांनी करावे; ही अपेक्षा आहे व असणार. पण त्यांनी आपला तोफ़खाना विरोधी पक्षाकडे वळवला. हा काहीचा चमत्कारीक प्रकार झाला ना?

नवे नोबेलविजेते म्हणून बानर्जींना आमंत्रण होते आणि जयपूर फ़ेस्टीवलमध्ये बोलताना त्यांनी देशाला चांगला विरोधी पक्ष हवा असल्याचे प्रतिपादन केले. याचा साधासरळ अर्थ आजचा जो काही विरोधी पक्ष आहे, त्याची विरोधी पक्ष म्हणून गुणवत्ता शून्य आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे. जर गुणवत्ता शून्य असेल, तर परिणामही शून्यच असणार ना? तो आहेच, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण वादाचा मुद्दा बाजूला ठेवून अभिजित बानर्जी यांच्या विधानाचा आशय शोधता येईल. लोकशाहीत विरोधी पक्ष म्हणजे तरी काय असते? ज्यांना बहूमत वा सत्ता मिळालेली आहे वा मतदाराने सत्ता दिलेली आहे, त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष असतो काय? सत्ताधार्‍यांचे बहूमत संपवून वा फ़ोडून त्यांना सत्ताभ्रष्ट करणे; हे विरोधकांचे मतदाराने सोपवलेले कर्तव्य असते काय? लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय असते? बानर्जी यांनी त्याच दुखण्यावर नेमके बोट ठेवलेले आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष हेच हृदय असते आणि सत्तेवर वचक रहावा म्हणून विरोधी पक्ष चांगला असावा; असे बानर्जी म्हणतात. त्याचा अर्थ चांगला म्हणजे संख्याबळाने धडधाकट नव्हेतर गुणवत्तेने प्रभावशाली व कर्तव्यदक्ष विरोधी पक्ष, असेच त्यांना म्हणायचे आहे. ते कर्तव्य कोणते? सत्ताधारी पक्षाला हुसकावून सत्तेवर आरुढ होणे, असे विरोधी पक्षाचे काम नाही. तर सत्तेत बसलेल्या पक्षाला सत्तेचा माज चढू द्यायचा नाही आणि लोकहितासाठी कारभार हाकायला भाग पाडायचे, असे स्वरूप आहे. सध्याचा विरोधी पक्ष खरोखर तसा नाही किंबहूना तो विरोधी पक्षच नाही. तर सत्तेला आसुसलेला व हपापलेला मतलबी लोकांचा गोतावळा आहे, असाच त्यातला आशय काढता येऊ शकतो. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायला वा निर्णयाला अपशकून करण्यासाठी नसतो. लोकशाहीत तशा विरोधी पक्षाची गरजही नसते. तर सत्ताधारी पक्षाला बेताल होण्यापासून रोखण्याइतका विरोधी वचक असला पाहिजे, असेच बानर्जींना म्हणायचे असावे.

या संदर्भाने भारतीय लोकशाहीची थोर परंपरा सांगितली पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून व संसदीय लोकशाही प्रणाली स्विकारली गेल्यापासून आरंभीच्या काळातला संख्येने दुबळा पण कर्तव्यदक्षतेने मोठा असलेला विरोधी पक्ष भारताला मिळालेला आहे. पंडित नेहरू व इंदिराजी अशा दिग्गज पंतप्रधानांच्या समोर विरोधी पक्ष संख्येने अगदीच दुर्बळ होता. सत्तेच्या पाठीशी लोकसभेत साडेतीनशेहून अधिक खासदारांचे पाठबळ होते आणि राज्यसभा देखील हुकमी बहूमताची असायची. तुलनेने विरोधी पक्ष डझनावारी लहानसहान गटात विभागलेले होते. त्यांची एकूण संख्याही कॉग्रेसशी तुल्यबळ होऊ शकत नव्हती. अधिकृत विरोधी नेता नेमायचा तर पन्नासही खासदार असलेला एक पक्ष कधी तितकी मजल मारू शकलेला नव्हता. इतके दुबळे म्हणजे ३०-४० खासदाराच्या पुढे मजल न जाणारे एकदोन पक्ष विरोधात होते. सर्व विरोधकांची एकत्रित संख्याही दोनशेच्या आसपास जायची नाही. पण समोर बसलेल्या किरकोळ संख्येच्या विरोधी पक्षाचा नेहरू इंदिराजींना मोठा वचक होता. विरोधी नेते बोलायला उभे रहायचे, तेव्हा पंतप्रधान आपल्या आसनावर बसून अगत्याने त्यांची टिका ऐकायचे. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. राममनोहर लोहिया, मधू लिमये, जॉर्ज फ़र्नांडिस, बॅ. नाथ पै, सोमनाथ चॅटर्जी वा इद्रजित गुप्ता अशा नेत्यांच्या पाठीशी नजरेत भरणारेही संख्याबळ नसायचे. पण त्यांची भाषणे पंतप्रधानाला धडकी भरवित असत. कारण ती भाषणे मुद्देसुद असायची. नुसती उथळ टिकाटिप्पणी नसायची. सरकारी दावे किंवा दस्तावेजांना खोटे ठरवण्याकडे अशा नेत्यांचा कल नसायचा. त्यापेक्षा सरकारने दिलेले कागदपत्र व आकडेवारी घेऊनच सरकारचे थेट पोस्टमार्टेम करणारे ते दिग्गज नेते होते. बहुधा त्यालाच बानर्जी चांगला विरोधी पक्ष म्हणत असावेत. तितक्या ताकदीचा कोणी नेता आज विरोधी पक्षात दिसत नाही. आज नामवंत मानले जातात ते बोलण्यापेक्षा संसदेचे कामकाज ठप्प करण्यातले जाणकार वा कुशल आहेत.

चांगला विरोधी पक्ष म्हणजे सत्तेसाठी आसुसलेला वा सरकार पाडून सत्तापद बळकवण्यासाठी उतावळा झालेला पक्ष नव्हे. कुणा पक्षाला सत्तेबाहेर बसवण्याचे मनसुबे करून विरोधात उभा ठाकलेला पक्ष म्हणजे विरोधी पक्ष नसतो. तर जनतेने सत्ताधार्‍यांना जसा कारभार सोपवलेला असतो, तशीच एक जबाबदारी विरोधी पक्षावरही सोपवलेली असते. ती सत्ताधार्‍यांना बेताल होईपर्यंत माज चढू न देण्याची. राज ठाकरे म्हणतात आपल्याला विरोधी पक्षात बसायला मतदाराने कौल द्यावा. जुने विरोधी पक्ष असे कधी बोललेले नसतील, पण त्यांना आपल्या जबाबदारीची जाणिव होती. म्हणून ते मुद्दे घेऊन सभागृहात यायचे व सभा गाजवायचे. आजकालचे विरोधी पक्ष सभागृहात कामकाज बंद पाडायला येतात आणि सभागृहाबाहेर बसून सरकार पाडण्याचे मनसुबे रचत असतात. सरकारकडून चांगले काम करून घेण्याच्या कर्तव्याचे भानही कुठल्या विरोधी पक्षाला राहिलेले नाही. परिणामी सरकारचे दोष दाखवले जात नाहीत. कामातील त्रुटी झाकल्या जातात आणि कारभारातील उणिवा खपून जातात. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे विरोधी पक्ष निकामी व नाकर्ता होऊन गेला आहे. देशातील मोदी सरकार बदलून भागणार नाही, तर आधी विरोधी पक्ष बदलला पाहिजे; असे म्हणूनच बानर्जी सांगत आहेत. सरकारच्या कुठल्याही निर्णय धोरणाच्या विरोधात बसणे म्हणजे विरोधी पक्ष नसतो. तर सरकार आपल्या अजेंडानुसार निर्णय व धोरणे योजणार. कारण त्याच अजेंडासाठी त्यांना मतदाराने सत्ता दिलेली आहे. तो अजेंडा जनतेला मान्य असतो. म्हणून त्या अजेंडा़च्या अंमलात येणार्‍या त्रुटी वा राहिलेल्या उणीवांवर बोट ठेवून सरकारला कामाला जुंपणे, ही विरोधी पक्षांची खरी जबाबदारी आहे. त्यात विरोधी पक्ष साफ़ अपेशी ठरल्याचे प्रमाणपत्रच बानर्जी यांनी दिले आहे. खरे तर हे सर्व विरोधी पक्ष नाकर्ते ठरलेले असल्याने कुणा नव्या विरोधी पक्षाचा उदय होण्याची गरज असल्याचेच प्रतिपादन त्यांनी केले आहे. कॉग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडायला नालायक पक्ष आहे; इतकाच बानर्जी यांच्या विधानाचा आशय आहे.

13 comments:

  1. पुन्हा एकदा अप्रतिम! आपल्या देशाला आता हुकूमशाहीची गरज आहे असे वाटण्याइतपात आपली लोकशाही कुचकामी ठरताना दिसू लागली आहे. १०-१५ वर्षे एखाद्या क्रूर हुकूमशाहाच्या हाताखाली काढल्यानंतरच बहुधा आपण भारतीय आहोत म्हणजे काय आणि लोकशाही कशाशी खातात त्याची अक्कल येथीलso called liberals ना येईल बहुतेक...

    ReplyDelete
  2. ते lit festival नाही, shit festival असतात

    ReplyDelete
  3. मजबूत विकासाचा कोणताही अजेंडा विरोधी पक्षांकडे नाहीये. १२० कोटी लोकांच्या भविष्याचे कोणतेही व्हिजन
    विरोधी पक्षांकडे नाहीये. जनतेच्या कोणत्याही प्रश्नाचे
    आकलन होण्याची क्षमता विरोधी पक्ष घालवून बसले आहेत. भारताची राज्यघटना मोदीजींना दाखवून वेंगाडणे एव्हढेच बिनडोक काम विरोधी पक्ष करतात. मोदींना हिटलर म्हणून
    हिणवणे, अमित शहा ना तडीपार म्हणून हिणवणे. बी जे पी
    ला नाझी पार्टी म्हणून हिणवणे, खोटे बोलणे, चौकीदार चोर
    आहे असं बोंबीलणे व चौकीदार चोर आहे असं बोंबललो त्याबद्दल कोर्टात सपशेल माफी मागणे, राफेल वरून खोटारडा पणा करणे रोहित वेमुला आत्महत्येवरून जातीयवाद माजवणे, एक उदाहरण द्यायचे तर हजार उदाहरणं देता येतील. असं म्हणतात Ideology cannot explain everything, but ignoring ideology is its own form of blindness. विरोधी पक्षांना स्वतःची अशी
    आयडॉलॉजी नाहीच. स्वतःला आयडॉलॉजी नाही अन सत्ताधार्यांना ते सत्तेवर असताना त्यांची आयडॉलॉजी राबवतात म्हणून ते घटना विरोधी अशी बोंब ठोकणारे घराणेशाही ने पोखरलेले विरोधी माकडं काय उदाहरणं ठेवतात त्या वर न बोललेच बरं. जसे मोदीजी सत्तेवर आले
    तसे मोदीजींकडे पंतप्रधान म्हणून न बघता विरोधी पक्षांनी
    मोदींकडे एक existential threat म्हणून बघितलं. काँग्रेस
    सत्तेबाहेर कधीच patient self-control; restraint and tolerance दाखवू शकत नाही. काँग्रेस सत्तेवर असताना
    mutual toleration नव्हते पण घराण्याची चड्डी मोदीजींनी
    उतरवली व घराण्याला mutual toleration आठवू लागले
    मोदींना ते राजकीय प्रतिस्पर्धी न मानता काँग्रेस त्यांना नीच
    म्हणून हिणवून शत्रू मानायला लागला. राफेल च उदाहरण
    घ्या नाही तर CAA च उदाहरण घ्या विरोधी पक्षानी सोशल
    मीडियाचा उपयोग massive डिसइन्फॉर्मशन केम्पेन चालवण्याकडे वाटचाल सुरु केलेली आहेच वर CAA बद्दल
    False and damaging information देत राहणे म्हणजे
    विरोधी पक्षांचं कर्तव्य आहे असे वाटायला लागले आहे. unsupported conspiracy theories मांडणे म्हणजे विरोध नव्हे हे बिनडोकांना कोण समजावणार. मोदीजी का
    निवडून आले? BJP इतका का विस्तारला?
    याची एक ‘बिगर-BJPवादी’ कारणमीमांसा: केल्यास हे
    आढळेल कि प्रत्यक्ष राजकीय-आर्थिक कार्यक्रमांचे समानीकरण झाल्यामुळे कॉंग्रेस, ‘तिसरे’, प्रांतिक व डावे-पुरोगामी या पक्षांना आयडेंटिटी क्रायसिस आला. (एंड ऑफ आयडियॉजी) आपण मोदीपेक्षा वेगळे कसे? हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडे मोदीविरोध हे ‘एकच लक्षण शिल्लक उरले’. मोदीविरोध या एकाच आधारावर जमलेल्या आघाड्यांना दुसरा प्रतिद्वंद्वी ध्रुव साहजिकच मोदीवाद हा बनला त्यामुळे जे कोणी खासकरून मोदीविरोधी नव्हते
    त्यांना मोदीवादी ही ओळख दिली गेली.
    ‘मोदीवादी’ ही शिवी म्हणूनच घेण्याची मानसिक गरज
    ज्यांना ज्यांना नव्हती ते आपोआप मोदीवादी बनले!. भाऊ
    विरोधी पक्ष बदलायला हवाय? नाही.. विरोधी पक्ष नकोच.

















































    ReplyDelete
    Replies
    1. एखादा ब्लॉग तुम्हीपण सुरु करा! भावना आवरत नाहीत तुमच्या प्रतिक्रिया देताना😂! उपहासात्मक पणाने नाही तर कौतुक करून सांगतोय तुमच्यामध्ये क्षमता आहे लिहिण्याची विचार करायला हरकत नाही ब्लॉग सुरु करण्याचा🙏 भयविस्तारामुळे जास्त काही लिहीत नाही! सुज्ञास सांगणे न लगे!

      Delete
    2. Your every comment is as good as the main article. Thank you for such good analysis.

      Delete
    3. शंतनुजी, भाऊंचा लेख नेहेमी सारखा अप्रतीम आहेच पण तुमची प्रतिक्रियाही सुंदर, वाचनीय.

      Delete
  4. भाऊ, बँनर्जींचे खरे आहे. पवार बेभरवशी शिवाय देशात सोडा महाराष्ट्रात सुध्दा फार ताकद नाही. राहूल हा तद्दन मूर्ख, डाव्यांना विरोध काय कोठे करावा याचे भान नाही. इतर पक्षाचे नेते राष्ट्रीय म्हणावे असे कोणही नाही मग ताकदवान विरोधी पक्ष कसा मिळणार?

    ReplyDelete
  5. निसर्गतःच आलेल्या झोपेतून मनुष्य जागा होऊ शकतो. पण झोपेचं सोंग घेतलेला मनुष्य ज्याला जागं व्हायचंच नाहीये तिथे कितीही प्रयत्न केले तरी अपयशच येणार.

    ReplyDelete
  6. 'पुन्हा मोदीच का' या पुस्तकात आपण तेच म्हटलंय.

    ReplyDelete
  7. भाऊ,
    फार चांगला लेख! या गोष्टी गृहित असल्या तरीही आवर्जून सांगितल्या, शिकविल्या गेल्या पाहिजेत. लहानपणी पासून शिकविल्या गेल्या पाहिजेत. लहान मुलांच्या अभ्यासक्रमात आणि दैनंदिन शालेय जीवनात युक्तीने समाविष्ट केल्या गेल्या पाहिजेत. तर त्या समाजाच्या अंगवळणी पडतील. लोकशाहीची मूल्ये बुद्धीत मुरतील.


    संसदेत विरोधात बसणे हे एक फार मोठे आणि महत्त्वाचे उत्तरदायित्व आहे. हारलेल्यांनी कटुता धारण करून सूडबुद्धीने, विघ्नसंतोषी वृत्तीने सत्ते साठी दबा धरुन बसण्याची ती जागा नाही. "आमच्या हातून सत्ता जातेच कशी" अश्या मस्तवाल ईर्ष्ये ने पेटून देशाची समाजाची जनतेच्या हिताची यत्किंचितही गणना न करता बेभान होऊन वाटेल त्या मार्गाने पुन्हा सत्ता बळकावणे हे ध्येय समोर ठेवून जगणारी जनता निरलस निकोप राजकारण करणे शक्य नाही.


    स्वार्थ केंद्रित लोकं फार काळ सत्तेत राहिली. त्यांनी त्यांची पुढची पिढी सुद्धा सत्तेच्या महत्वाकांक्षेचे बाळकडू देऊन तयार केली. पुढच्या पिढीला कोवळ्या वयातच जनतेशी वर्चस्वाचे नाते शिकविले. त्या पिढीला जनतेच्या, मानवतेच्या सुख दुःखा विषयी सहानुभूती कशी असणार?


    असे म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट त्याच्या तरुणपणी आरश्यात पाहून स्वतःला बजावायचा की तू सम्राट आहेस, सम्राट होण्या करता तुझा जन्म आहे. तीच कथा अलेक्झांडर ची. अशी लोकं पुढे कसे जीवन जगणार? अलेक्झांडर नेपोलियन आदी जसे जगले तसेच. अशी लोकं मानवतेचे सर्वात मोठे अपराधी आहेत. परंतु त्यांचा गौरव करून इतिहासाच्या माध्यमातून त्यांचे विध्वंसक जीवन कार्य मुलांसमोर ठेवले जाते. त्यातून मुले काय धडा घेणार?


    मुलांना लहानपणी पासून तू मोठा हो - अर्थात सत्ता मिळव, गरजे पेक्षा हाव आणि विलास प्रमाण मानून धन मिळव, इतरांच्या पुढे तू जा, सर्वांशी स्पर्धा कर आणि स्पर्धेत विजयच मिळव, पर्यायाने सर्वांना हरव, तर तू यशस्वी, असे घरा घरात शिकविले तर त्यातून निर्माण होणाऱ्या समाजाचे राजकारण या पेक्षा वेगळे असणार नाही.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  8. Devdatta Naik. BadlapurFebruary 3, 2020 at 10:53 PM

    Wah wah ... Lokshahi kashi aste, sattadhari aani virodhi paksha kase wagle pahijet yaacha faar sundar ulgada kelaat. Ha lekh Naagarik Shastra pustakaat ghalawa. Mhanje mulanchi rajkaaranachi jaan wadhu shakel.

    ReplyDelete