Wednesday, May 25, 2016

इंदिराजी आणि सोनिया गांधी


लोकसभेनंतर आणखी दोन राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली आणि उरलेल्या कर्नाटकातही कॉग्रेसची सत्ता औटघटकेची उरलेली आहे. तेव्हा त्यांच्या गोटात तारांबळ उडाली तर नवल नाही. नेते वा श्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍या कोणामध्येही पक्षाला सावरण्याची इच्छा व हिंमत नाही आणि राहुल गांधी चमत्कार घडवतील, ह्या आशेचा चकनाचुर झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर सोनियांनीच काही करून दाखवावे, ह्या एका आशेवर कॉग्रेस नेते तग धरून आहेत. यापैकी काहींनी सोलापूरात आजच्या कॉग्रेसची खरी दुर्दशा अधिक सुस्पष्ट करून मांडलेली आहे. विधानसभांचे निकाल लागण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता ॠषिकपूर याने नेहरू-गांधी खानदानाचीच स्मारके देशभर करण्यावरून आक्षेप घेतला होता. अन्य देशभक्त व नेत्यांवर सरकारी बहिष्कार कशाला, असा सवालही त्याने विचारला होता. गांधी खानदानाला देश आंदण दिला आहे काय, हा त्याच खोचक प्रश्न बहुतेक कॉग्रेसजनांना बोचरा वाटला, तरी वास्तव होता. म्हणूनच त्याविषयी गप्प बसणे योग्य ठरले असते. पण पक्षाविषयी निष्ठा दाखवण्यापेक्षा घराण्याविषयी आस्था दाखवण्याला प्राधान्य असल्याने, सोलापूरच्या कुणा कॉग्रेस नेत्याने सार्वजनिक शौचालयाला ॠषिकपूरने नाव देऊन मोठाच पराक्रम केला. असे कृत्य करणार्‍यांना पक्ष कशामुळे रसातळाला चालला आहे, त्याचेही भान राहिलेले नाही आणि सोनिया वा इंदिरा गांधी यांच्यातला फ़रकही त्यांना उमजलेला नाही. त्यामुळेच पक्षाची अशी दुर्दशा झालेली आहे. सोनिया त्या इंदिराजींची सुन असतील, पण इंदिराजी नाहीत. कारण सासूतले गुण व कुवत त्या सुनेमध्ये नाही. पण आव किंवा आवेश मात्र तसा असतो. खुद्द सोनियांनाच सासू कळलेली नसेल, तर इंदिराजीचा पराक्रम त्यांच्याकडून अपेक्षिणेच मुर्खपणाचे आहे. १९७७ च्या पराभवातून इंदिराजींनी कॉग्रेसचा जिर्णोद्धार कसा केला होता?
तेव्हाही जनता पक्षाकडून कॉग्रेस भूईसपाट झाली होती आणि इंदिराजी तर आपल्या लाडक्या पुत्रासह धाराशायी झाल्या होत्या. तरी त्यांनी लोकसभेत दिडशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या आणि जनतेचा कौल मान्य करून नव्या सरकारला कारभार करू दिला होता. उठसूट संसदेचे कामकाज बंद पाडणे किंवा प्रत्येक बाबतीत जनता सरकारला विरोध करण्याचा नकारात्मक पवित्रा इंदिराजींनी कधीच घेतला नव्हता. दुसरीकडे मोदी सरकारप्रमाणे तेव्हाचे जनता सरकार संयमानेही वागत नव्हते. इंदिरा गांधी यांच्यामागे अनेक चौकशी आयोगांचा ससेमिरा लावण्यात आला होता आणि त्यांना अटक करण्यापर्यंत घाईगर्दी करण्यात आली होती. तसे होईपर्यंत इंदिराजींनी कुठलाही आक्रमक पवित्रा घेतला नव्हता. आपल्याला जनतेने नाकारले असताना यशस्वी पक्षाला जनतेचा कल मिळत असतो. त्याच्या पाठीशी लोकांच्या शुभेच्छा असतात. त्याला अपशकून करणे, जनतेला अमान्य असते, याचे भान इंदिराजींना होते. म्हणून त्यांनी जनता सरकारच्या कारभारात कुठलाही अडथळा आणला नाही, की संसदेत व्यत्यय आणण्याचे नकारात्मक राजकारण केले नाही. उलट जनतेच्या अपेक्षा सरकारने पुर्ण कराव्या, म्हणुन इंदिराजी अलिप्त राहून सरकारला कामासाठी मोकळीक देत होत्या. त्या सरकारने काम करावे आणि त्यांच्याकडून चुका व्हाव्यात, याची प्रतिक्षा त्यांनी चालविली होती. चुकांवर बोट ठेवून जनता सरकार कसे नाकर्ते आहे, त्याचा साक्षात्कार मतदाराला घडवण्याचे काम त्यांनी मोठ्या यशस्वीरितीने पार पाडले होते. किंबहूना कुठलाही राजकीय व्यत्यय न आणता इंदिराजींनी जनता पक्षातील उपजत बेबनाव आणि विरोधाभास उघड व्हायला हातभार लावला होता. त्यामुळे जनता पक्षाविषयी लोकांचा भ्रमनिरास व्हावा, असा त्यांचा प्रयत्न राहिला. तेच आज होताना दिसत नाही. मोदी सरकारला सोनिया कामच करू देत नाहीत. म्हणून मग त्यांच्याकडून चुकाही व्हायची शक्यता नाही. मग कशाचा राजकीय फ़ायदा कॉग्रेस उठवू शकणार व सोनिया त्याचे लाभ पक्षाला कसे देणार?
इंदिराजींनी तेव्हा अतिशय धुर्तपणे जनता पक्षाला मोकाट रान दिले होते. त्यांच्याकडून चुका व्हाव्यात, हेच त्यांचे राजकारण होते. कारण लोकप्रियतेवर स्वार झालेल्या नेते व पक्षाला एक झिंग चढलेली असते. पर्यायाने त्याच नशेत त्यांच्याकडून गंभीर चुका वा अतिरेक होण्याची कायम शक्यता असते. त्यांना चुका करू देणे उपकारक असते. त्या चुका नाकारून भागत नाही आणि सत्ताधार्‍यांनी कितीही नाकारले तरी त्या चुका सामान्य जनतेच्या नजरेतून सुटत नसतात. परिणामी सत्ताधार्‍यावर मतदार नाराज होत जातो. तो आपल्या मताचा फ़ेरविचार करू लागतो. उलट विरोधकांनी सतत कोंडी केली व कामच करू दिले नाही, तर सरकारला विरोधकांमुळे कामे अडली त्याचे खापर फ़ोडण्याची पळवाट मिळत असते. अधिक सतत विरोधकांचा ससेमिरा पाठीशी असला, मग सत्ताधार्‍यांना लगाम लागत असतो आणि बेफ़ाम वागताच येत नाही. पर्यायाने सत्ताधार्‍यांचे काम संयमाने व तुलनेने चांगले होऊ शकते. त्याचे श्रेय कधी विरोधकांना मिळत नाही, तर सत्ताधार्‍यांनाच मिळते. मागल्या दोन वर्षात मोदी सरकारने कोणती चुक केली वा कुठे बेतालपणा झाला असे विचारले तर त्याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. निर्णायक बहूमत पाठीशी नसताना युपीए सरकारने केलेला कारभार आणि मोदींच्या कामाची तुलना केल्यास, मोदी सरकारने उत्तम काम केल्याचीच जनभावना आज आढळते. त्याचे खरे श्रेय सोनिया किंवा विरोधकांच्या आक्रमक विरोधाला द्यावे लागेल. पण ते कधीच मिळत नाही. कारण विरोधकांनीच मोदींना अतिरेक वा बेफ़ाम वागण्याची मुभाच दिलेली नाही. पर्यायाने लोकांचा किंवा मतदाराचा भ्रमनिरास होण्याची वेळच आली नाही किंवा सोनियांनी ती येऊ दिलेली नाही. ही सोनियांसह राहुल यांची व विरोधकांची राजकीय चुक आहे. इंदिराजींनी तसे होऊ दिले नाही, तर सत्ताधारी जनता पक्षाला चुका करण्याची मस्त मोकळीक दिली होती. हा मोठा फ़रक आहे.
इंदिराजींनी १९८० सालात चमत्कार घडवला, असे राजकीय अभ्यासक मानतात आणि कॉग्रेसजन त्याच चमत्काराची अपेक्षा सोनियांकडून करीत आहेत. पण इंदिराजींनी त्यासाठी काय केले व त्यांचे डावपेच कोणते होते, याचा कधी उहापोह होत नाही. तो डावपेच अतिशय सोपा व सकारात्मक होता. लोकसभेत पराभूत झालेल्या इंदिरा गांधी चिकमंगळूर येथून पोटनिवडणूकीत लोकसभेत निवडून आल्या होत्या. तेव्हा कुठलेतरी कारण शोधून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्दबातल करण्याची कृती जनता सरकारने बहूमताने घडवून आणली होती. तिथून इंदिराजींच्या बाबतीत सहानुभूतीची प्रतिक्रीया उमटू लागली. याच्या उलट सोनियांना कुठलाही राजकीय त्रास सरकारी अधिकारात सूडबुद्धीने दिला जाणार नाही, याची काटेकोर काळजी मोदींनी घेतली आहे. खाजगी खटले व कोर्टाच्या निकालातून सोनिया व त्यांचे अन्य सहकारी फ़सले असतील, तर त्याचे खापर मोदी सरकारवर सूडबुद्धीची कारवाई म्ह्णून फ़ोडणे निव्वळ कांगावा आहे. तिथेच सोनिया फ़सल्या आहेत. तर कांगावा करण्यापेक्षा इंदिराजी जनता सरकारला चुकांची संधी देत राहिल्या. सासू सुनेमध्ये हा मोठा लक्षणिय फ़रक आहे. म्हणून परिणामही उलटे येत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर इंदिराजींनी पक्ष फ़ोडला. तरी त्यांच्याच बाजूने कर्नाटक व आंध्रच्या जनतेने कौल दिला होता. पुढे तोच कौल देशव्यापी मिळाला. सोनियांच्या कारकिर्दीत लोकसभेच्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभांमध्ये होत आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसा कॉग्रेसचा जिर्णोद्धार होण्यापेक्षा तो पक्ष नामशेष होत चालला आहे. आपण इंदिराजींची सून आहोत आणि कोणाला घाबरत नाही, हे बोलणे सोपे असले, तरी इंदिराजी होणे किती अवघड आहे. ते तेव्हाच्या संयमी राजकारणात व धुर्तपणात हे सत्य बघता येते. पण ज्यांना ते सत्य बघण्यापेक्षा खुळ्या आशावादातच रममाण व्हायचे आहे, त्यांना भवितव्य कधीच नसते.

3 comments:

  1. मोदीजीची काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा स्वबळावर आधारित नव्हती, तर ती त्या काँग्रेसी "गाय-वासराच्या" नादानपणावरच आधारित होती.
    मोदीजीना सासु-सुनेतला फरक नक्की कळला आहे.

    ReplyDelete
  2. या देशात येवून ४० वर्षे झाली. अजून हिंदी भाषा बोलता येत नाही न बघता भाषण करता येत नाही. या देशातल्या जनतेचे तरीपण काही खरे नाही. २००४ नंतर दोनवेळा निवडून दिले ना तरीपण. कॉंग्रेसची ताकद जनतेच्या अडाणीपणात,आपमतलबीपणातच आहे.उपजत गुलामी सहजासहजी जात नाही.वातावरण बदलले की पुन्हा येरे माझ्या मागल्या.दहा वर्षात मार्गदर्शक मंडळ काय दिवे लावत होते.

    ReplyDelete
  3. भाऊंनी उत्तम लेख सादर केला.एक होते यशाच्या शिखरावर आणि आताचे त्यांना साधे पायथ्याशी ही जाता येत नाही.

    ReplyDelete