Saturday, December 16, 2017

हार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्या

Image result for hardik pandya

मी नवखा पत्रकार होतो तेव्हा ज्येष्ठांकडून अनेक गोष्टी ऐकत होतो आणि समजून घेत होतो. १९७० च्या आसपासची गोष्ट आहे. तेव्हा इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकीची घोषणा केलेली होती. सहाजिकच दैनिक ‘मराठा’च्या संपादकीय विभागात तेव्हा सतत निवडणूकांचीच चार्चा रंगलेली असायची. त्यात एका ज्येष्ठ सहकार्‍याने बहुधा १९५२ वा १९५७ च्या सार्वत्रिक निवडणूकीतला किस्सा कथन केला होता. त्या आरंभीच्या काळामध्ये पुण्याचे थोर कॉग्रेसनेते म्हणून काकासाहेब गाडगीळ ओळखले जात. तर त्यांचे तरूण सुपुत्र विठ्ठलराव गाडगीळ प्रजा समाजवादी पक्षाचे उर्जावान नेता होते. त्या काळात समाजवादी पक्षाचा दबदबा होता आणि बहुतांश कॉलेज जीवनातील तरूणांना त्या समाजवादी विचारांचे आकर्षण असायचे. स्वाभाविकच विठ्ठ्लराव गाडगीळ समाजवादी पक्षात दाखल झाले असल्यास आश्चर्य नव्हते. त्या निवडणूकीत आक्रमक भाषण करणारे म्हणून विठ्ठलरावांना अनेक सभांमध्ये आमंत्रण असायचे. तशीच एक सभा म्हणे पिंपरी चिंचवड भागात कुठेतरी होती आणि आपल्या आवेशपुर्ण भाषणात विठ्ठलरावांनी कॉग्रेसचे पुरते वाभाडे काढलेले होते. आज ज्या आवेशात कुणीही भाजपावाला तावातावाने कॉग्रेसवर टिकास्त्र सोडतो, तो नजरेसमोर आणला; तर विठ्ठ्लरावांचे भाषण ऐकल्यासारखे वाटेल. पुढे विठ्ठलरावच कॉग्रेसमध्ये दाखल झाले आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील तॊच एक राजकीय प्रचलीत परंपरा होती. समाजवादी पक्षांने चिखलातून मडकी तयार करायची आणि भाजायला कॉग्रेसच्या भट्टीत पाठवायची, असाच शिरस्ता होता. सुपुत्राचे भाषण आदल्या दिवशी झाले, त्याच जागी दुसर्‍या दिवशी पिताश्री काकासाहेब गाडगीळांचे भाषण ठेवलेले होते. काकासाहेब अतिशय कुशाग्र बुद्धीचे व नेमस्त पुढारी होते. आपल्या भाषणाची सुरूवातच त्यांनी अशी केली, की बाप कोण आहे, ते काही मिनीटातच श्रोत्यांना समजून गेले. त्यांचे शब्द काहीसे असे होते,

‘बंधूभगिनींनो, कालही इथे प्रचारसभा होती आणि आजही निवडणूकीची प्रचारसभा आहे. कालही इथे गाडगीळ आले होते आणि आजही गाडगीळच बोलायला उभे आहेत. फ़रक इतकाच आहे, की काल नुसताच उत्साही उथळ उतावळा आवेश आलेला होता. आज इथे दुरगामी जीवनाकडे बघणारा सुबुद्ध विचार आलेला आहे.’ बाकी पुढल्या भाषणात काकासाहेब काय बोलले त्याला महत्व नाही. पण आरंभीच्या एका वाक्यात त्यांनी जे काही सांगितले, त्याचा अर्थ मतदारांना वा श्रोत्यांना नेमका उमजला होता. ही तब्बल साठ वर्षापुर्वीची गोष्ट इतक्यासाठी आठवली, की मागल्या दीड महिन्यात भारतीय माध्यमातून व चर्चांमधून हार्दिक, अल्पेश, जिन्गेश व राहुल गांधी यांच्या आवेशपुर्ण गर्दी खेचणार्‍या सभा व भाषणांची चर्चा खुपच रंगलेली होती. पण शेवटच्या दहा दिवसात तिथेच येऊन नरेंद्र मोदी यांच्यासारखा पोक्त व मुरब्बी नेता काय करून गेला, हे माध्यमांना अजून उलगडलेले नाही. म्हणून तर दीड महिना जो फ़ुगा सर्व शक्ती पणाला लावून फ़ुगवला, तो आपल्याच तोंडावर कशाला फ़ुटला. त्याचे उत्तर गेले दोन दिवस माध्यमातले शहाणे शोधत आहेत. नोटाबंदी व जीएसटी यांच्याखेरीज राहुल गांधींनी उध्वस्त करून टाकलेले विकासाचे गुजरात मॉडेल; निदान एक्झीट पोलमध्ये तरी जसेच्या तसे शाबूत असल्याचेच दिसते आहे. किमान अशा पोलमध्ये तरी त्या गुजरात मॉडेलच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडालेल्या बघायला ऐकायला मिळतील, अशी या तमाम राजकीय विश्लेषक संपादकांची अपेक्षा होती. पण त्याचा मागमूसही एक्झीट पोल दाखवत नसेल, तर त्यांना साठ वर्षापुर्वी काकासाहेब गाडगीळ काय म्हणाले, तेही समजू शकणार नाही. कुठल्याही गंभीर लढाईत वा संघर्षात उथळ उत्साही उतावळेपणा कामाचा नसतो. इतकाच त्यातला आशय असून गुजरातमध्ये धुमशान घालणार्‍या अननुभवी चौकडीला त्याचा थांगपत्ताही लागलेला नव्हता.

अर्थात सवाल हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश यांच्या अपुर्‍या अनुभवाचा नव्हता वा नाही. ते नवे तरूण आहेत आणि लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी मस्ती अंगात असताना त्यांनी असेच वागले पाहिजे. पण अशा मस्तीत पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या राहुलनी किती झोकून द्यावे? राहुल बोलतात म्हणून पत्रकार संपादकानी किती वहावत जावे, याला मर्यादा असली पाहिजे. गल्लीतल्या चार पोरांनी उठून सचिन किंवा विराटला कसोटी सामन्यात धुळ चारण्याची भाषा करायला हरकत नसते. पण ज्यांचे आयुष्य क्रीडा समालोचन करण्यात खर्ची पडलेले असते, त्यांनी अशा शेफ़ारलेल्या पोरांच्या आव्हानावर जुगार किती खेळावा, याला नक्कीच मर्यादा असते. ती मर्यादा माध्यमांनी अभ्यासकांनी व जाणत्यांनी गुजरात निवडणुकीत ओलांडली. म्हणून आता त्यांच्या तोंडावरच त्यांनी फ़ुगवलेला फ़ुगा फ़ुटलेला आहे. फ़ुग्यात हवा भरली मग फ़ुगतो आणि त्याच्या खर्‍या आकारापेक्षाही मोठा दिसू शकतो, हे जगाला मान्य आहे. पण त्या फ़ुग्यात पोकळी असते आणि इवलीशी वास्तवाची टाचणी लागली तरी फ़ुगा फ़ुटण्याची कायम शक्यता असते. किंबहूना फ़ुगा फ़ुगवणार्‍यांनीही तो आवाक्याबाहेर गेल्यास आपल्याच तोंडावर फ़ुटू नये याची काळजी घ्यायची असते. त्याचे भान शहाण्या पत्रकारांनी किती सोडले आहे, त्याची साक्ष या निमीत्ताने मिळाली. उठलासुटला प्रत्येक शहाणा हार्दिक पटेल कसा मोदी व भाजपाला लोळवणार, त्याची ग्वाही देत होता. पण त्यापैकी कोणालाच अलिकडे क्रिकेटच्या संघात अवतीर्ण झालेला आणखी एक हार्दिक अजिबात आठवला नाही, त्याचे नाव हार्दिक पंड्या असे आहे. तो प्रचलीत नियम वा प्रथेनुसार क्रिकेट खेळत नाही. मूळात संघात गोलंदाज म्हणून दाखल झालेला हार्दिक पंड्या मधल्या फ़ळीत फ़लंदाजीला जातो आणि असा काही धुमाकुळ घालतो, की खेळाची व सामन्याची दिशाच बदलून टाकतो.

हार्दिक पंड्या हा फ़लंदाजीला आला, मग समोरच्या संघातील भल्या भल्या गोलंदाजांना भिती वाटते. कारण हा फ़लंदाज कसाही बॅट फ़िरवत असतो. कुठल्याही चेंडूवर तो पुढे येऊन वा मागे जाऊन फ़टका हाणतो. कुठल्याही अभिजत क्रिकेट शैलीत बसणार नाही अशी त्याची फ़लंदाजी आहे. पण त्याने चारपाच षटकात घातलेल्या गोंधळामुळे संघाच्या खात्यात ५०-७० धावांची मोक्याच्या क्षणी भर पडते आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला धावांचा दर वा गती यांचे समिकरण विस्कटून जाते. आजच्या भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी हा असाच एक खेळाडू आहे. तो कुठल्या शब्दावर, विषयावर किंवा आरोपावर कसा उलटा फ़टका हाणणार, याचाही विचार विरोधकांना आधीपासून करता येत नाही. सामना खेळायचा असतो तसाच जिंकायचाही असतो. त्यामुळे नुसत्या आवेश वा उत्साहाने काहीही होऊ शकत नाही. तर विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचे आणि त्यासाठी आपल्या विकेट जाण्याची फ़िकीर न करता समोरच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांना पुरतेब नामोहरम करून टाकायचे; ही हार्दिक पंड्याची शैली आहे. नरेंद्र मोदी यांची निवडणुकीच्या आखाड्यातली शैली त्यापेक्षा तसूभर वेगळी नाही. पण राजकीय अभ्यासक मोदींनी शिष्टाचार पाळला नाही म्हणून बोलतात आणि क्रिकेटचे समालोचक हार्दिक पंड्याने चुकीचा फ़टका मारला म्हणतात. मुद्दा खात्यात धावा जमण्याचा असतो, तसाच निवडणूकीत जागा जिंकण्याचा असतो. पण हार्दिक पटेलच्या आरक्षण आंदोलनाच्या गर्दीत हरवलेल्या अभ्यासक विश्लेषकांना राजकारणात अवतरलेल्या हार्दिक पंड्याची दखल घ्यावी असेही वाटले नाही. मग त्याच राजकीय हार्दिक पंड्याने हाणलेला एखादा चेंडू षटकार येऊन त्यांच्या नाकावर आदळला तर चुक कोणाची? दोन गाडगीळातला फ़रक ज्यांना ओळखता येत नाही, त्यांची स्थिती कायम अशीच होत आलेली आहे.

4 comments:

  1. भाऊ फार छान..
    मिडियावाले गेले दोन-तिन महिने गुजरात मधील जनता नाराज आहे असा डंका पिटत होते अगदि दुसर्या फेरीतील मतदान होई पर्यंत हिच कोल्हेकुई चालू होती. हे सर्व केवळ एका पन्नास वर्षे राज्य करणार्यां पक्षा च्या हितासाठी चालले होते व राहिल.. कारण यांना अवहान करणारा मायका लाल अजुन जन्म घ्यायचाय/ किंवा आजुन पुर्ण जनाधार घ्यायचाय/ समाज आजुन सुधारायचा/ सुशिक्षीत व्हायचा/ ईतर अनंत गंभीर समस्या (दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार शेतकरी पाणी विज, खते, बाजारभाव, न्यायालयीन अन्याय) बरोबरच मिडियावाले हि एक मोठी समस्या पण आहे परंतु इतर जिवन मरणाच्या समस्या पुढे या मुद्द्यावर जनमत मागुन निवडणूक कौल घेण्याची रिस्क कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे या भारत वर्षांत/खंडप्राय देशात शापीत भुमी असल्या प्रमाणे देव सुद्धा हतबल झाले आता सुपर देव जन्मायचाय किंवा जन्म घेइल की नाही हि हजारो वर्षा पासुनची अपुर्ण गोष्ट आहे.. व सामान्य माणसाला तशीच राहिल असे वाटत असते.. त्यामुळे तो तसाच जिवन कठंत असतो व या परदेशी व देशी राष्ट्रवीरोधी शक्ती बरोबर लढण्याचे बळ त्याल नसते..
    परंतु या मिडियावाले असे करतात हे पण विविध मिडिया वरील चर्चांत भाजपचे प्रवक्त्ये शालजोडीतील मारुन दाखवून देत नाहीत. कारण मिडियावाले ची ताकद व देशवासियांची बुद्धी याची पुर्ण खात्री यांना असते. व टिव्हीचे प्रेक्षक यांची संघटना कुठे अस्थीतीत्वात असल्याचे दिसत नाही. की सरकार बदलून पण असे काही प्रयोग करण्याचे सत्तेत मश्गुल/ विरोधी पक्ष सत्तेवर असतानाच्या दबावाखाली सुचत नसावं.
    तसेच नेहमी प्रमाणे न्युज पेपर किमती या चार- पाच रुपये च्या वरती काही जात नाहीत त्यामुळे वृत्तपत्रे चालवणार कशी असा युक्तिवाद केला जातो ( तसाच युक्तिवाद 20-25 वर्षां पुर्वी सरकारी नोकर व पोलिस न्यायालये यांच्या बाबतीत केला जात होता त्यामुळे ते भ्रष्टाचार करतात असा युक्तिवाद रोज होत होता आता त्यांच्या पगारात 20 पटीने वाढ झाली तरी भ्रष्टाचार जोरात चालुच आहे म्हणजे दोन्ही कडुन लुट) तसेच मिडिया/न्युज पेपर च्या किमती वाढवल्या तरी त्यांची पार्शीलीटी/भ्रष्टाचार चालूच रहाणार.
    यांची चाचणी गेले काही दिवस चालू होती तसेच मिडियावाले बुमर मन गुजरात पिंजून काढत होते त्यामुळे भाजप जिंकणार हेही माहिती असणार परंतु यामुळे भाजपाला अणखी जास्त मते मिळणार ह्या मुळे भाजपला गुजरात निवडणूक जड जात आहे असे वारंवार सांगत होते. हि शुद्ध फसवणूक आहे.
    आता कणखर किंवा तसे नेतृत्व असलेला भाजपच्या विरोधात नेतृत्व नाही असे म्हणुन इतके दशके सत्तेवर असताना भ्रष्टाचार, जातीयवादी, गरिबी बेरोजगारी, अशिक्षीत मागासलेली लोकसंख्या वाढ स्पोट, राजेशाही प्रमाणे अध्यक्ष/पंतप्रधान होणारा काँग्रेस पक्ष या समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरलेल्या पक्षाच्या या समस्या सोडवण्यातील अपयशा कडुन लक्ष उडवण्यात मिडियावाले व आपण सर्व यशस्वी झालो आहोत.
    काय या समस्या मुळच सामान्य माणसाने काँग्रेस ला हटवले नाही काय? आणि भारतीयांची आठवण किती सहज आणि पटकन 3.5 वर्षे मध्ये विसरली.
    त्याचमुळे ह्या देशात असेच हेलकावे खात जगत रहावे लागणार. कधी तरी एखादा वाजपेयी, मोदी 2-5 वर्षे राज्य करणार व त्याचा उपयोग पण काही वेळा अनेक काँग्रेस सत्तेवर असताना करु शकणार नाहीत असे निर्णय करुन घेणार. जसे व्होटींग मशीन, याच मिडियावालेना भारतात पाउल ठेवण्याची परवानगी, GST, नोटबंदी, आणखी किती तरी निर्णय पण करुन घेतील जसे राज्य व लोकसभा एकदम निवडणूका.
    हे असेच चालणार का भाऊ.
    तुम्हीच अशा गोष्टी वर खोलवर विचार करु शकता/ मोदीजी पर्यंत नेऊ शकता या बाबत संशय नाही.
    एकेएस

    ReplyDelete
  2. हार्दिक पंड्या ची तुलना मोदींशी हे काही पटले नाही

    ReplyDelete
  3. लोकसभेत मोदी टेस्ट मँच सारखे खेळले.
    मात्र आत्ता 20-20 मधील पांड्या सारखे खेळले
    येवढेच भाऊंना म्हणायचे असावे

    ReplyDelete
  4. हाहाहा, भाऊराव ! पण अशा मस्तीत पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या राहुलनी किती झोकून द्यावे म्हणून विचारताय? अहो याचसाठी तर त्याला पप्पू म्हंटलं जातं.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete