Sunday, May 15, 2016

मालेगाव स्फ़ोटातले सत्य काय?



घोडा घाससे दोस्ती करेगा, तो खायेगा क्या? अशी हिंदी भाषेतील उक्ती आहे. हिंदू दहशतवाद किंवा मालेगाव प्रकरण हे कॉग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांसाठी तसाच ‘घास’ आहे. मागल्या सात वर्षात त्याच घास-गवतावर हे सेक्युलर घोडे चरत राहिले. पण त्यापैकी कोणीही या विषयाचा न्यायालयिन निचरा करण्याचा विचारही केला नाही, की तसा प्रयत्न केला नाही. जवळपास त्याच दरम्यान मुंबईत कसाब टोळी येऊन शेकडो लोकांना ठार मारून व जायबंदी करून गेली. त्यातला जिवंत सापडलेला अजमल कसाब कोर्टाकडून दोषी ठरून फ़ाशीही गेला. मग अजून मालेगाव स्फ़ोटातील खटल्याचे चर्वितचर्वण कशाला चालू आहे? आपल्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत कॉग्रेस आणि युपीए यांना मालेगावचे गुन्हेगार वा संशयितांना दोषी ठरवून घेण्यात कुठली अडचण आली होती? आता पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर याची सुटका झाल्यावर सेक्युलर कल्लोळ सुरू झाला आहे. मग त्यात मोदी सरकारने लबाडी केल्याचा आरोप होणे स्वाभाविकच आहे. पण दिर्घकाळ खटला खोळंबून ठेवत देशातील सत्ता मोदींच्या हाती जाण्याची प्रतिक्षा कोणी केली? त्याला तर मोदी वा भाजपा-संघ जबाबदार नाहीत ना? वेळच्या वेळी साक्षी पुरावे कोर्टात सादर करून मालेगावच्या ‘हिंदू’ अतिरेक्यांना कॉग्रेस फ़ाशी देऊ शकत होती. कसाबला जसे तमाम कोर्टातून दोषी ठरवले गेले. सामान्य कोर्ट, हायकोर्ट व सुप्रिम कोर्ट अशा तिन्ही पातळीवरच्या कोर्टातली कसाबची प्रक्रिया पार पडू शकते, तर साध्वी व पुरोहित यांच्यावरचा खटला कशाला वेळेत चालविला गेला नाही? त्यात पुरावे असते, तर कोणी इतका विलंब केला असता? पुरावे असते, तर कुठल्याही खास कायद्याची गरज नव्हती. साध्या दंडविधानाच्या आधारे हिंदू दहशतवादाला इंगा दाखवता आला असता. पण कुठलाही पुरावा नसला, मग निव्वळ नाटके व आरोपाची आतषबाजी करण्याला पर्याय उरत नाही.

मोदी सरकार आल्यानंतर तडकाफ़डकी ह्या आरोपींची मुक्तता करण्यात आली असती, तर गोष्ट वेगळी होती. तेव्हाही यातल्या वकीलांना वेगाने खटले चालविणे शक्य होते. पण अशा खटल्यातले वकीलही पुरोगामी असल्यावर त्यांना कोर्टात बोलण्यापेक्षा माध्यमातून मुक्ताफ़ळे उधळण्यात जास्त रस असतो. म्हणून तर सरकारी वकील असलेल्या रोहिणी सालियन यांनी वर्षभरापुर्वी वादग्रस्त विधान केले होते. मालेगाव प्रकरणात आपल्याला सौम्य पवित्रा घेण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याची खास मुलाखत त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेली होती. वादासाठी त्यांचे म्हणणे मान्य करू. पण मोदी सरकार आल्यानंतर हा खटला भरलेला नाही किंवा त्याचा तपास झालेला नाही. २००८ च्या आक्टोबर महिन्यात त्यातल्या आरोपींना अटक झाली आणि तपास अधिकारी हेमंत करकरे यांनी भक्कम पुरावे हुडकून काढल्याचा दावा केला होता. मग इतकी वर्षे तेच पुरावे कोर्टात सादर करून संशयितांना दोषी ठरवण्यात सालियन यांना कोणी रोखून धरले होते? आधीच्या युपीए सरकारने त्यांची अडवणूक केलेली होती काय? नसेल तर कालापव्यय करण्याचा उद्योग वकीलाचा होता की सरकारचा होता? नवे सरकार सौम्य भूमिका घ्यायला सांगते, तर आधीच्या सरकारने कोणते कठोर उपाय योजायला सांगितले होते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सालियन यांनी द्यायला हवी. सात वर्षे एका कोर्टातून दुसर्‍या कोर्टात खटला व तपास पिटाळण्याचे काम सरकारने केलेले आहे. यातल्या आरोपींच्या वकीलाने कुठे वेळकाढूपणा केला नाही. उलट बचाव पक्षानेच सतत लौकरात लौकर खटला निकालात काढायचा आग्रह धरलेला आहे. म्हणजे ज्यांनी वेळकाढूपणा केला, तेच यातले लबाड ठरतात. कारण आपण म्हणतो, ते पुरावे कोर्टात टिकणारे नाहीत, याची खात्री असल्याने कालापव्यय होत राहिला आणि आज राजकीय हस्तक्षेपाचा कांगावा चालू आहे.

कॉग्रेसने तमाम प्रकरण सुप्रिम कोर्टाकडे सोपवण्याचा आग्रह धरला आहे. त्यातही भामटेगिरी आहे. खुद्द कॉग्रेस सत्तेत असताना मालेगावचा खेळ सुरू झाला. तेव्हाच आपल्या निरपेक्षतेची साक्ष देत युपीए सरकारने त्याचा तपास सुप्रिम कोर्टाकडे कशाला सोपवला नाही? इशरत वा अनेक विषयात बचाव पक्षानेच सुप्रिम कोर्टात धाव घेतली. पण मालेगाव प्रकरणात असे झाले नाही. कुठलाही आरोप सिद्ध झाला नसताना व साक्षीपुरावे सादर केले नसताना, आरोपींना सात वर्षे आत डांबून ठेवण्यात आले. सालियन वा कॉग्रेस यांना तोच न्याय वाटतो काय? आता तर पुरावेच नसल्याचा दावा तपास अधिकार्‍यांनी केला आहे. तेवढेच नाही, तर कर्नल पुरोहित यांच्या घरी धाड घालणार्‍या पोलिसांनीच तिथे स्फ़ोटके पेरली आणि खो्टा पुरावा निर्माण केल्याचा खुलासा तपास यंत्रणेकडून होतो आहे. याचा अर्थ दिर्घकाळ भक्कम पुराव्याची थाप ठोकली गेली. पण त्यातला कुठलाही पुरावा कोर्टाला सादर करण्यात आला नाही. केलाच असता तर तो टिकला नसता, याची पुरेपुर खात्री होती ना? आता तेच कॉग्रेसवाले म्हणतात, सरकार बदलताच पुरावे गायब करण्यात आले. ते पाप असेल तर कोणाचे? कोर्टाला वेळीच पुरावे सादर केले असते, तर कोर्टाच्या ताब्यातल्या पुराव्यांना नष्ट वा गायब करणे सरकारला शक्य झाले असते काय? तपास यंत्रणेकडे पुरावे ठेवायचे कारण काय होते? पुरावेच नसतील, तर कोर्टाला सादर करायचे काय आणि नसतील तर ते तपास यंत्रणेच्या दफ़्तरीही नसणारच. मग गायब काय होणार? याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मुळातच पुरावे नव्हते आणि नुसते तसे दावे केले जात होते. कुठेही त्याचे सादरीकरण झाले नव्हते. आज त्याचीच कबुली तपास यंत्रणा देते आहे. कॉग्रेसपाशी पुरावे असतील, तर त्यानीही आजच सुप्रिम कोर्टात धाव घेऊन सादर करावे. त्यांना कोणी रोखलेले नाही. पण पुरावे असायला तर हवेत ना?

युपीए वा कॉग्रेस यांचा कारभार कसा होता? ऑगस्टा वेस्टलॅन्डची कागदपत्रे इटालियन कोर्टाने मागितली, तर दडपून ठेवली गेली. त्यामुळे लाच दिली गेल्याचे सिद्ध झाले. पण घेणारे कोण ते गुलदस्त्यात राहिले. ते शोधावे लागते आहे. त्याचे पुरावे कुणापाशी आहेत, त्याचा खुलासा कॉग्रेस प्रवक्ता करीत नाही. गृहखात्याचा अवर सचिव तीस्ताच्या प्रकरणाची फ़ाईल गायब करतो म्हणून अटक झाली. हे उद्योग कोणाच्या काळातील आहेत? गुजरात दंगल पेटायला मोदींनी चिथावणी दिल्याचा आरोप बारा वर्षे होत राहिला. तो कोणाच्या साक्षीवरून झाला? जो संजीव भट नावाचा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थितच नव्हता, त्याच्या खोटेपणावर विसंबून बारा वर्षे मोदींना बदनाम करण्यात आले आणि तो निखळ खोटारडा असल्याचे सुप्रिम कोर्टानेच अखेरीस निकाल देऊन स्पष्ट केले. त्यावेळी युपीए सरकारने सुप्रिम कोर्टाकडे तपास सोपवला नव्हता. संजीव भटचे खोटे निवेदन वा साक्ष हाच पुरावा घेऊन मोदी विरोधात बारा वर्षे गदारोळ झाला आणि साडेसात वर्षे पुरावा नाही, तरी मालेगावच्या हिंदू दहाशतवादाचे राजकीय भांडवल करण्यात आले. पण कोर्टात कुठलाही पुरावा आणला गेला नाही. पुराव्याअभावी पुरोहित साध्वीला जामिन मिळेल म्हणून मोक्का लावून डांबून ठेवले गेले. सगळाच बुनबुडाचा कारभार! आता ते नसलेले पुरावे गायब केल्याचा नवा आरोप आणि नसलेले पुरावे, सादर करण्याची सक्ती मोदी सरकारवर! कसा खेळ आहे ना? खरोखर खटला चालला आणि पुरावे द्यायची नामुष्की आली असती तर? म्हणून नुसते आरोप व कालापव्यय करण्यात आला. पण खटला चालवायचा पवित्रा घेतला गेला, तेव्हा सत्य बाहेर आले. पुरोहित वा साध्वी विरोधात कुठलाही पुरावा नाही, हेच निखळ सत्य आहे. पण त्यांना खोट्यानाट्या आरोपात गुंतवल्याचे बालंट येणार म्हणून कॉग्रेसने कांगावा चालविला आहे. थोडक्यात कॉग्रेसवाले खरे बोलू लागले, तर राजकारण खेळणार कशाच्या आधारे?

9 comments:

  1. हे आर्टिकल थोडे मोठे आहे, मात्र जे लोकं स्वतःला जागरूक नागरिक समजतात त्यांनी हा लेख जरूर वाचावा.

    How to brainwash a nation?

    'रावणाचे ग्लोरिफिकेशन' ह्या विरोधात मी फेसबुकवर दोन पोस्ट्स केल्या होत्या. त्यानंतर एका ग्रुपवर ह्या विषयावर चर्चा चालू होती. एकंदरीतच रामाला आपल्या देशात विरोध कसा काय होऊ शकतो हा मुद्दा होता. त्या ग्रुपवर सौरभ वैशंपायनने त्यावेळी 'सबवर्जन' हा विषय काढला. सबवर्जन सोबत जोडून नाव आलं - 'युरी बेझमेनोव्ह' उर्फ 'टॉमस शुमन'.

    युरी बेझमेनोव्ह ह्या माणसामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याविषयी अव्हेलेबल असलेले सर्व व्हिडीओज शोधून काढले, डाउनलोड करून बघितले.

    युरीने जे काही मांडले आहे, त्याने डोकं चक्रावून गेलं. 
    "ऑ!! असंही असू शकतं? हे सर्व इतकं प्लॅनड असू शकतं?" ह्या प्रश्नाने भंडावून जायला झालं. 

    भारतात सध्या जे चालू आहे आणि आधी जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्व आहे.

    त्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडसं.

    युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.

    कॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.

    नंतर १९६० च्या दशकात युरी रशियाच्या केजीबी ह्या गुप्तहेर संस्थेत रुजू झाला. भारताविषयी अभ्यास असल्यामुळे केजीबीतर्फे त्याची नेमणूक भारतात करण्यात आली.

    गुप्तहेरी करण्यासाठी युरी भारतात संपादक बनून आला. नंतर भारताच्या, इथल्या माणसांच्या, संस्कृतीच्या प्रेमात पडला. केजीबी जगभरात आणि भारतात जर काही करते आहे ते खूप चुकीचं आहे, कम्युनिस्टांच्या स्वार्थासाठी इतर देशांचा, तिथल्या लोकांच्या बळी जात आहे, ह्या जाणिवेने त्याने केजीबीला सोडचिठ्ठी दिली. जीव वाचवण्यासाठी भारतात हिप्पी बनून राहिला आणि नंतर कॅनडाला पळून गेला. १९९३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कसा ते कुणालाच समजलं नाही.

    "

    ReplyDelete
  2. Deception was my job" गुप्तहेर म्हणून तो करत असलेल्या कामाचं स्वरूप युरीने एका वाक्यात मांडलं आहे.

    खोटं असलेलं खरं बनवून दाखवणं, समाजाला भुरळ पाडणं, आपल्या बोलावत्या सरकारला हवं ते चित्र उभं करणं आणि परक्या राष्ट्रांमध्ये जनमत आपल्याला हवं त्या बाजूला वळवणे, हे काम युरी आणि त्याच्यासारखे अनेक गुप्तहेर करत होते आणि आजही करत आहेत.

    ह्या सर्वाला त्याने 'सबव्हर्ट' हा शब्द वापरला आहे.  
    सबवर्जन हेच युरी आणि अनेक गुप्तहेरांचं काम आहे.

    हि सबवर्जनची थिअरी 'सुन त्झे' ह्या एका चायनीज विद्वानाने २००० वर्षांपूर्वी मांडली. 
    रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शत्रूला काबीज करणं, त्याच्या देशात आपल्याला अनुकूल मत पैदा करणं आणि मग हळूहळू शत्रूला काबीज करून घेणं हा ह्या थिअरी मागचा गाभा आहे.

    ReplyDelete
  3. आता हे सर्व करायचं तर त्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी, त्याची एक मेथेडॉलॉजी असायला हवी. इतर देशांवर कंट्रोल करण्यासाठी केजीबी जे काही करत होती, किंवा आजही अनेक देश जे काही करत आहेत त्याची तपशीलवार माहिती युरीने त्याच्या मुलाखतीत दिली आहे. इंटेरेस्टिंगली सबवर्जन हि एक लॉंग प्रोसेस आहे आणि ह्या सर्व देशांकडे ती अमलात आणण्यासाठी लागणारा संयम आहे.

    एखाद्या देशात राजकीय, आर्थिक वा सामाजिक अस्थैर्य निर्माण करणं हा सबवर्जनचा उद्देश आहे. गुप्तहेर संघटनांच्या बजेटपैकी ८५% निधी ह्यासाठी वापरला जातो.

    जिथे सामाजिक सीमारेषा फार मजबूत नसतात, जिथे समाज हा फार जास्त विचारी नसतो, जिथे देशाचे राज्यकर्ते स्खलनशील असतात,  राजकीय नियंत्रण फार कमी असतं, त्या देशांना अश्या पद्धतीने नियंत्रणात आणणं फार सोपं असतं.

    सबवर्जनमध्ये असणारी एकेक पायरी बघितली तर कोणत्याही सजग नागरिकाला ती पायरी उदहरणासाहित उमजून जाईल.

    ReplyDelete
  4. Demoralisation अर्थात समाजाचं खच्चीकरण करणे, हि एक पायरी त्यात आहे.
    ह्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी आहे. एवढाच का? कारण ह्या कालावधीत एक पिढी शाळा कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडते. त्यावेळी आपल्याला हवे असलेली मूल्य त्यांच्यावर बिंबवली तर त्यांचा कल बदलता येतो. कोवळ्या मनांवर आपली मतं लादणे आणि आपल्याला हवा तो प्रोपोगंडा राबवणं हे ह्या पायरीत केलं जातं. मग त्यांच्या पुस्तकात चुकीची माहिती छापणे हाही त्यातलाच एक भाग. उदाहरण डोळ्यासमोर आलं असेलच.

    ह्याशिवाय समाजाचे असे जे आदर्श आहेत, ज्यांच्यावर सामान्यजन श्रद्धा ठेवून आहेत, त्यांना धक्का देणं, त्यांच्याविरुद्ध चुकीची विद्रोही माहिती पसरवणे हाही एक अजेंडा. असं झालं कि मग कर्ण चांगला वाटू लागतो, रावण हाही भाऊ असावा असा वाटतं आणि महिषासुर दिन साजरा केला जातो. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणं हा हेतू साध्य होऊ लागतो.

    धार्मिक मान्यता, शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, अडमिनिस्टरेशन सिस्टीम, कायदा आणि सुव्यवस्था, कामगार यंत्रणा गढूळ करून असंतोष पैदा करणं हा देखील ह्याच पायरीचा भाग. मग त्यात आजूबाजूला चालू असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी, समाजघातक चळवळींना पाठिंबा दिला जातो. 
    वैचारिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांपेक्षा अविचारी, आततायी, प्रसिद्धीलोलुप लोकांना हेरून मोठं केलं जातं. 
    त्यात 'मीडिया' हा एक मोठा भाग हातात घेतला जातो. सर्वसामान्य दर्जाचे पत्रकार समाजाचा आणि देशाचा आवाज बनवले जातात. खोट्या आणि एकसुरी बातम्या मीडियामधून वारंवार प्रसारित केल्या जातात. समाजात अस्थैर्य निर्माण होईल असे सर्व प्रयत्न मिडियाद्वारे करवले जातात.

    ReplyDelete
  5. राजकीय सत्ता आणि न्यायव्यवस्था गढूळ केल्या जातात. पद्धतशीर रित्या गुंडांचं ग्लॅमरायझेशन केलं जातं. गुंड प्रवृत्तीची माणसं हीच हिरो वाटायला लागतात. सत्शील, सदप्रवृत्त माणसाला बावळट आणि कुचकामी ठरवलं जातं. गुंड हे समाजशोषक नसून त्यांच्या परिस्थितिचे बळी आहेत, असं भासवलं जातं.

    अतिसामान्य वकुबाची माणसं समाजाचं नेतृत्व हातात घ्यायचा प्रयत्न करतात.

    शिक्षणाचं केंद्र असणारी कॉलेजेस अथवा विद्यापीठं ह्यात शिक्षण दुय्यम केलं जातं आणि प्राचार्य आणि विद्यार्थी, सरकार आणि विद्यार्थी ह्यांच्यात बेबनाव माजवला जातो.

    स्त्रीवादि, समलिंगी, विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या राहतात. समाजाला अचानकरीत्या त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते.

    एकंदरीत समाजात अशांतता माजवण्याचे, परकीय विचारसरणी बिंबवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले जातात.
    ह्यालाच युरी 'Destabilization' असं म्हणतो. 
    Destabilization नंतर राजकीय कंट्रोल आणि मग आपल्याला हवा असलेला अजेंडा त्या देशात राबवणे.

    एकदा समाजाचा कंट्रोल हाती आला कि समाजातील जी काही प्यादी अशांतता माजवण्यास उपयोगी पडलेली असतात त्यांनाच पद्धतशीररीत्या संपवलं जातं.  नवीन राज्यकर्त्यांना त्या व्यक्तींची वा चळवळीची गरज राहिलेली नसते.

    सबवर्जनसाठी उपयोगी पडणार्या सामाजिक घटकांची एक यादीच युरीने एका दुसरया इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे.  हि यादी ऐकली/ वाचली तर धक्काच बसेल.

    चित्रपटक्षेत्रातली मंडळी, स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारे लोकं, स्वत:भोवती वलय उभं करून स्वत:चं  महत्व समाजात वाढवणारे स्वार्थी खोटारडे लोकं ह्यांचा उपयोग समाजात अस्थैर्य  निर्माण करण्यासाठी केला जातो.

    युरी म्हणतो, ह्या सर्वाला थांबवायचा उपाय आहे. आणि तो म्हणजे हे चालू होत असतानाच थांबवणे. ज्यावेळी समाजाची बेसिक मुल्य परदेशीमूल्यांच्या पंखाखाली जाऊ लागतात त्या आधीच ते थांबवणं महत्वाचं असतं.

    भारतात लहान मुलांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास छापून येतो, त्यांच्या कोवळ्या मनावर आणि बुद्धीवर फुटीरतेचे संस्कार केले जातात, अचानक कुणीतरी कोलेजातली मुलं एकदम मोठी होतात, त्यांना समाजाचं नेतृत्व मानलं जातं, मीडियातून एकाच बाजूच्या बातम्यांचा मारा होतो, चित्रपट क्षेत्रातली मंडळींना देश आपला वाटेनासा होतो- ह्या आणि अशा अनेक घटनांचं जणू भाकीत युरीने आपल्या मुलाखतीत मांडलं आहे.

    आपल्या देशातल्या घटना असो वा इजिप्तमधली सो कॉल्ड राज्यक्रान्ति- सर्वांचा क्रम एकसारखा आहे.

    रशियासारख्या देशाच्या एका एजंटने हि माहिती उघड उघड मांडली आहे. ह्यापलीकडे चालणार्या अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे असतील आणि त्या आपल्याला उभ्या आयुष्यात समजणार देखील नाहीत.

    एखादा माणूस जीव तोडून सत्य लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो पण आपल्यावर असलेल्या खोट्याच्या प्रभावामुळे आपण सत्य स्वीकारत नाही. ह्याच गोष्टीला युरीने ideological subversion असं म्हंटलं आहे.

    त्यामुळे समाजात घडणाऱ्या घटनांनी आपण जर भारावून जात असू किंवा त्याच बरोबर आहेत हे आपल्याला वाटत असेल तर आपण 'सबवर्ट' झालो आहोत, असत्याचा

    References- युरी बेझमेनोव्हच्या मुलाखती
    आंतरजालावरील माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Venkyji thanks for giving this very important information.All this is beyond imagination. Thanks also for Bhau who is running this blog and compelling our citizens to further elaborate the matters.
      Thanks Bhau for publishing such important information by Vyanky.
      Amool
      9769887707

      Delete
  6. भाऊ यांचा तळतळाट लागला आहे यामुळे काहि खपले काही वाटेत आहेत

    ReplyDelete
  7. अभिनंदन भाऊ आपण आधिपासुन हा विषय लाऊन धरला होतात

    ReplyDelete
  8. भाऊ धन्यवाद आणखी एक डोळे उघडणारा लेख.गेल्या 15-20 वर्षात समाजाची दिशाभूल करीत सभाऊ धन्यवाद आणखी एक गेल्या 15-20 वर्षात समाजाची दिशाभूल करीत सत्ता मिळविण्याची व राखण्यासाठी पध्दतशीर पणे राबविण्यात आलेल्या अनेक चाली पैकी एका चालीचा आपण पर्दाफाश केला आहे. समाजाने हंसा प्रमाणे पाणी आणि दुध वेगळ करण्याची कला आपल्या सारख्या कडुन समजुन आत्मसात करुन सतत जागृत रहाणे आवश्यक आहे.त्ता मिळविण्याची व राखण्यासाठी पध्दतशीर पणे राबविण्यात आलेल्या अनेक चाली पैकी एका चालीचा आपण पर्दाफाश केला आहे. समाजाने हंसा प्रमाणे पाणी आणि दुध वेगळ करण्याची कला आपल्या सारख्या कडुन समजुन आत्मसात करुन सतत जागृत रहाणे आवश्यक आहे.

    ReplyDelete