Saturday, November 28, 2015

मिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षे मागे जा

As our enemies have found we can reason like men, so now let us show them we can fight like men also. -Thomas Jefferson

आपल्या शत्रूंना उमगले आहे की आपण सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलणी करू शकतो. आता आपण मर्दासारखे लढूही शकतो, हे शत्रूला दाखवू या! -थॉमस जेफ़रसन



सध्या जे रणकंदन सिरीया व इराकच्या परिसरात माजले आहे, त्याला इसिस ही जिहादी संघटना कारणीभूत आहे आणि त्याला अर्थातच पाश्चात्य प्रगत देश जबाबदार आहेत. कारण या श्रीमंत देशांचा डोळा तिथल्या अरबी वा मुस्लिम प्रदेशातील भूगर्भात दडलेल्या खनीज तेलावर आहे. मागल्या दोनतीन दशकात आपल्या मनावर हे विश्लेषण इतके ठसवण्यात आले आहे, की जिहाद वा मुस्लिम धर्मयुद्धाचे वास्तविक संकट आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही आणि खुल्या मनाने ती समस्या समजून घ्यायलाही राजी नसतो. आज ज्याला आधुनिक जगात दहशतवाद (जिहाद) म्हटले जाते, त्याचा आरंभ तब्बल सव्वा दोनशे वर्षापुर्वीचा आहे. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आसपास हा आधुनिक जिहाद सुरू झाला आणि तेव्हा कुठेही खनीज तेलाचा शोध लागला नव्हता, की तेलाच्या खाणी अरबी प्रदेशात सापडलेल्या नव्हत्या. अमेरिकेने या अरबी प्रदेशात नाक कशाला खुपसावे, असा सवालही विचारला जातो. पण हा प्रश्न विचारणार्‍या कितीजणांना जिहादमुळेच अमेरिकेला दोन शतकांपुर्वी अरबी प्रदेशात घुसावे लागले, याची माहिती असते? आज जगाच्या सागरी क्षेत्रावर अमेरिकेचे वर्चस्व आहे, कारण अमेरिकेपाशी जगातले सर्वात सुसज्ज व पुढारलेले भेदक आरमार आहे, असेही मानले जाते. त्या अमेरिकेन नौदल वा आरमाराचा जन्मच मुळात अरबी देशातील जिहादचा बंदोबस्त करण्यासाठी झाला, ह्याची किती लोकांना जाणिव आहे? आज ज्याला अवघे जग दहशतवाद विरोधी युद्ध म्हणून ओळखते, त्याचा आरंभ तब्बल सव्वा दोनशे वर्षापुर्वी झाला आणि त्याला बार्बरी युद्ध म्हणून ओळखले जाते. त्या बार्बरी युद्धातून सुटका मिळावी म्हणून अमेरिका आपल्या अर्थसंकल्पात चक्क २० टक्के रक्कम खंडणीसाठी संसदेत मंजूर करत होती. ऐकून धक्का बसला ना? बसणारच, कारण यातले काही आपल्याला कोणी सांगत नाही, की संदर्भही समजावत नाही. कुठे त्याचा उल्लेखही येत नाही. वर अमेरिकन राज्यघटनेचा एक शिल्पकार थॉमस जेफ़रसन याचे एक विधान दिले आहे. त्याचा उदभव तिथूनच आला असावा.

हा जेफ़रसन व जेम्स अडाम्स हे दोघे पुढे अमेरिकेचे अध्यक्षही झाले. पण तेव्हा म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीस व अमेरिका हे नवजात राष्ट्र म्हणून रांगत असताना ते दोघे युरोपातील राजदूत म्हणून काम करत होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची लढाई संपल्यावर ते राष्ट्र वेगळे म्हणून उभे रहात होते. तेरा राज्यांनी मिळून आपल्याला सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित केले होते आणि अमेरिकन व्यापारी प्रामुख्याने युरोपशी व्यापार करत होते. त्यांच्या मालवाहू नौका व जहाजे आफ़्रिकेच्या उत्तर बाजूने युरोपात येजा करायची. त्यांना उत्तर आफ़्रिकेच्या समुद्रात गाठून काही चाचे त्यांची लूट करीत. त्यातला सर्व माल लूटला जाई आणि जहाजावरच्या गोर्‍या खलाशी आणि अन्य कर्मचार्‍यांना पकडून गुलाम म्हणून विकले जात असे. त्यापासून मुक्ती हवी असेल, तर व्यापारी कंपनीला खंडणी मोजावी लागत असे. असे सातत्याने होऊ लागले, तेव्हा जेफ़रसन व अडाम्स यांनी त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला. हे काम तुर्कस्थानच्या आटोमान साम्राज्याचे मांडलीक असलेल्या चार छोट्या देशातील सागरी चाचे म्हणजे दरोडेखोर करायचे. अर्थात त्याचा हिस्सा तिथल्या सुलतानांना दिला जायचा. हा सुलतान ट्रायपोली या बंदरी शहराचा राजा होता. त्याचा राजदूत लंडनमध्ये होता. अमेरिकेच्या फ़्रान्स व ब्रिटनमधील दूतांनी या ट्रायपोलीच्या दुताकडे लूटमारीविषयी तक्रार केली आणि खुलासा मागितला. त्याचा खुलासा वाचला तर आज काही चालले आहे, त्याचे योग्य व नेमके उत्तर आपल्याला मिळू शकेल. सिद्दी हाजी अब्दुल रहमान अडजा असे त्याचे नाव आणि त्याने जेफ़रसन व अडाम्स यांना लुटीचे कारण काय सांगितले, ते अमेरिकन कॉग्रेसच्या दफ़्तरात आजही नोंदलेले आहे. तो म्हणतो,

‘आमचे राज्य प्रेषिताच्या आज्ञेवरून स्थापन झालेले आहे आणि कुराणामध्ये हे लिहीलेले आहे, की ज्या कुठल्याही देशांनी (अल्लाहचे) वर्चस्व स्विकारलेले नाही, ते पापी आहेत. म्हणूनच इस्लाम स्विकारलेल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे, की जिथे कोणी असे पापी सापडतील, त्यांच्या विरोधात युद्ध पुकारावे, त्यांची संपत्ती लुटावी, त्यांना गुलाम करावे आणि असे युद्ध करताना जो मुसलमान मारला जाईल, त्याला जन्नत (म्हणजे स्वर्ग) प्राप्त होईल.’

थोडक्यात जो कोणी मुस्लिम नाही वा जो समाज-देश मुस्लिम नाही, त्याच्या विरोधात युद्ध पुकारणे, त्याला लुटणे वा गुलाम करणे; हे प्रत्येक मुस्लिमाचे धर्मकर्तव्य आहे. किती सोपे धर्मकर्तव्य आहे ना? कुठल्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला हे कर्तव्य आवडले नाही तरच नवल! सहाजिकच त्याही काळात असे जे कोणी लुटारू वा दरोडेखोर होते, त्यांनी आपापल्या परिसरात वा सागरी मार्गावर लुटमारीचा (पवित्र धर्मकर्तव्याचे पालन म्हणून) जिहाद आरंभला होता. त्याला अर्थातच ट्युनिशिया, मोरक्को अशा मुस्लिम देशातील सत्ताधीशांचे समर्थन होते. कारण लुटीतला हिस्सा सुलतानाला मिळत होता. त्यापासून मुक्ती वा सुरक्षा हवी असेल, तर संबंधित सुलतानाला एकरकमी मोठी खंडणी आणि वार्षिक ठराविक रक्कम भरणा करावी लागत असे. अर्भकावस्थेतील अमेरिकेपाशी अन्य कुठला मार्ग होता? त्यांच्यापाशी आधुनिक युद्धसामुग्री नव्हती की नौदल नव्हते. सहाजिकच या सुलतानांना काही लाखाची वार्षिक खंडणी देण्याचे मान्य करून तडजोड करण्यात आली. त्यासाठी मग अमेरिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातही तशी तरतुद केली जात असे. ही बाब अठराव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील आहे. तेव्हा अरबी प्रदेशात किंवा जगात खनीज तेलाचा शोध लागला नव्हता, की अमेरिका जगातली महाशक्ती वगैरे झालेली नव्हती. पण १७९२ सालात अमेरिकेने ४० हजार डॉलर्सची खंडणी अल्जिअर्सच्या सुलतानाला मोजली आणि १७९६ सालात ती खंडणी दहा लाख डॉलर्सपर्यंत गेली. तेव्हा अमेरिकेचा एकूण वार्षिक अर्थसंकल्प अवघा ५७ लाख डॉलर्स इतका होता. यातून लक्षात येईल, की एकूण अमेरिका-अरबी संघर्षाची सुरूवात कधी व कशी झाली. दिवसेदिवस अमेरिकेला हा बोजा अवघड असह्य होत चालला होता. पण त्यापासून सुटका नव्हती. एक मार्ग होता तो नौदलाची उभारणी करून या अरबी जिहादी चाचेगिरीचा कायमचा बिमोड करणे. पण तितका पैसा व साधनसंपत्ती अमेरिकेकडे तेव्हा नव्हती.

पण जे चालले होते ते अपमानास्पद होते आणि असह्यही होते. म्हणूनच १७९३ सालात राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाले होते, ‘आपल्याला अपमान सहन करायचा नसेल तर तशी परिस्थिती येऊ देता कामा नये. आपल्याला शांतता हवी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कायमस्वरूपी युद्धसज्ज व्हावे लागेल.’  मग पुढल्याच वर्षी म्हणजे १७९४ सालाच्या मार्च महिन्यात अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आपले स्वतंत्र नौदल उभे करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात आज सर्वच सागरी क्षेत्रावर जी अमेरिका आरमारी वर्चस्व गाजवते, त्याचा आरंभच मुळी जिहादचा बंदोबस्त करण्यासाठी झालेला होता. त्याचा खनीज तेलाशी काडीचा संबंध नव्हता. कारण तेव्हा खनीज तेलाचा शोधही लागलेला नव्हता. तर धर्माचा मुखवटा लावून चाललेल्या जिहादी चाचेगिरीचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेला आरमार उभे करायची पाळी तेव्हाच्या जिहादींनी आणली होती. आज अमेरिका व आजचे तिचे नेते आपलाच हा जुना इतिहास पुरता विसरून गेले आहेत आणि म्हणूनच त्यांना युद्धसज्ज असूनही अपमानित व्हावे लागते आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असूनही शांतता संपादन करता येत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती आलेली आहे. अर्थात १७९४ सालात जरी नौदलाची उभारणी सुरू झाली तरी त्यातून जिहादला वेसण घालण्यासाठी पुढली दोन दशके खर्ची पडली. एकामागून एक युद्धे व चाचेगिरीशी दोन हात करताना अमेरिकन नौदलाला खुप पराभव पचवावे लागले आणि त्याची मोठी किंमतही मोजावी लागली. पण चिकाटीने लढत १८१५ सालात म्हणजे नेमक्या दोन शतकापुर्वी अमेरिकेला अरबी वा मुस्लिम जिहादी चाचेगिरीचा बिमोड करणे शक्य झाले होते. त्यातून प्रेरणा घेऊन मग अनेक प्रगत युरोपियन राष्ट्रांनीही या आफ़्रिकन व अरबी मुस्लिम देशांचा पुरता बंदोबस्त केला आणि तिथल्या लुटारू वृत्तीला गुलामीच्या पातळीवर आणुन जगात शांतता निर्माण केली होती.

अर्थात केवळ अरब मुस्लिमच लुटारू वा चाचेगिरी करत होते आणि बाकीच्या जगात शांतता व सुरक्षा होती, असे मानायचे कारण नाही. जगात सगळीकडे अशी लुटमार दरोडे व चाचेगिरी तेव्हाही चालू होती. पण त्यातला एक महत्वाचा फ़रक लक्षात घ्यायला हवा. इस्लामने मुस्लिम गुन्हेगारांच्या तशा कृत्याला धार्मिक मुखवटा चढवला होता. सहाजिकच गुन्हा हे पवित्र धार्मिक कार्य होऊन बसले आणि राजरोस त्याला तिथले मुस्लिम सत्ताधीश व सुलतान मान्यता देत होते. धर्माचे कार्य म्हणून अशा अन्य धर्मियांच्या नशीबी येणार्‍या लुटमार व अत्याचारावर धार्मिक कर्तव्याच्या उदात्ततेचे पांघरूण घातले जात होते. पण अमेरिकेने तेव्हा ती हिंमत करून त्याचा मुकाबला करण्याचे धाडस दाखवले आणि मगच अन्य युरोपियन समर्थ राष्ट्रे त्यात पुढाकार घेऊ लागली. ब्रिटन, इटाली अशा देशांनी आपापले आरमार सज्ज करून ही चाचेगिरी मोडून काढली. पण त्याचे संयुक्त प्रयत्न झाले नाहीत आणि जिहाद नावाची चाचेगिरी उजळमाथ्याने चालूच राहिली. ज्या देशांनी आपले आरमार सज्ज करून त्याचा पुरता बिमोड केला, त्यांना अशा चाचेगिरीपासून मुक्ती मिळू शकली. तरी बाकीच्या देशाची व्यापारी जहाजे त्याला बळी पडतच राहिली. त्यावर अखेरचा बोळा फ़िरवला तो फ़्रान्सने! १८१७ सालात फ़्रान्सने अल्जिअर्सची सुलतानी सत्ताच संपवली आणि तिथे आपले राज्य लादले. उत्तर आफ़्रिकेत मग फ़्रान्सची वसाहत सुरू झाली आणि गुलामीत जाऊन पडलेल्या मुस्लिम समाजाला चाचेगिरी करण्यापासून संरक्षण मिळणे बंद झाले. तेव्हाच अमेरिका वा युरोपात होणारे नौकानयन सुरक्षित झाले. पुढल्या काळात एकामागून एक युरोपियन देशांनी आफ़्रिका व पश्चिम आशियातील अराजकाची स्थिती युद्ध पुकारून नियंत्रणाखाली आणली. तिथले टोळीवाले व टोळ्यांचे सुलतान संपवले आणि आपले साम्राज्य अरबी आफ़्रिकन व पश्चिम आशियाई प्रदेशात स्थापन केले. विसाव्या शतकापर्यंत हे साम्राज्य टिकले. पण दुसर्‍या महायुद्धानंतर अशा वसाहती टिकवणे युरोपियन देशांना शक्य झाले नाही, म्हणून पुन्हा तिथे पुन्हा इस्लामी सत्ता उदयास आल्या. कुठे टोळीचे राजे सत्तेवर आले, तर कुठे लष्करशहा मुजोर झाले. सुलतान वा गुलाम अशी मानसिकता असलेल्या या समाजाला कधी लोकशाही वा पुढारलेल्या युगात आणणे कोणाला शक्य झाले नाही. म्हणूनच आज आपण बघतो वा अनुभवतो आहोत, ती अवस्था नवी नाही. तर दोन अडीचशे वर्षापुर्वीचीच आहे. फ़रक असेल तर त्यांच्या हातातल्या तलवारी व प्रवासाला लागणारे घोडे नाहीत, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व तोफ़ा क्षेपणास्त्रे आलेली आहेत. बाकी चाचेगिरी तशीच व त्यांचे आश्रयदातेही तेव्हासारखेच आसपासचे शेख सुलतान आहेत. मानसिकताही जशीच्या तशी रानटी, क्रुर व अमानुष आहे. आणि जिहादचे तेच तसेच तत्वज्ञान पुन्हा जगाला भेडसावते आहे.

इसिसचा बगदादी वा अलकायदाचा ओसामा समजून घ्यायचा असेल, किंवा पलिकडे पाकिस्तानच्या सईद हाफ़ीजची प्रेरणा समजून घ्यायची असेल, तर बार्बरी युद्धाची अब्दुल रहमान अडजा याने जेफ़रसनला सांगितलेली व्याख्या आधी उमजून घ्यावी लागेल. ती जाणली तरच त्यातून उदभवलेल्या समस्येवर उपाय शोधता येतील. जसे तेव्हाच्या नवजात अमेरिका नावाच्या राष्ट्राने शोधले व अंमलात आणले होते. शांतता, संहिष्णूता वा उदारमतवादी संवादाने असे प्रश्न सुटत नसतात. कारण ती भाषा अरबी मानसिकतेला समजत नाही. त्यांच्या लेखी ते उदात्त पवित्र धर्मकार्य करत असतात. तुम्ही भले त्याला पाप समजून आत्मघातकी वागलात, म्हणून त्यांना फ़रक पडत नाही. कारण खंडणी मोजून जी समस्या दोनशे वर्षापुर्वी संपली नाही, ती मेणबत्त्या पेटवून वा हिंसेच्या जागी पुष्पगुच्छ ठेवून सुटत नसते..

(पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर)
रविवार  २९/११/२०१५

15 comments:

  1. सॉलीड इतिहास आहे

    ReplyDelete
  2. कुमार केतकर हे वाचतील का?

    ReplyDelete
    Replies
    1. ते कशाला वाचतील?
      तुम्ही पगार करणार का त्यांचा?
      न परवडणारे काम आहे.
      त्यांना फुकटातली देशभक्ती नको आहे.
      यांनी डोकी कधीची गांधी नेहरू खानदानाच्या पायावर वाहिलीत!!

      Delete
    2. कुमार केतकर hyanchi hujregiri karnyat aayushya gelay

      Delete
  3. दुर्दैवानी अमेरिका, रशिया व त्यांच्या मित्र देशांतील शस्त्र निर्माते हा इतिहास त्यांचाच असून वाचत नाहीत. शस्त्रविक्री त्यांच्या कॅपिटलिझम मध्ये जिहाद इतकेच पवित्र कार्य आहे. रसद बंद होत नाही म्हणून लढाई चालूच आहे.

    ReplyDelete
  4. भाऊ तुमचे ज्ञान आणि माहिती संग्रह खरोखरच अगाध आहे. हा ब्लॉग आवर्जून पुस्तक किंवा ई बुक स्वरुपात प्रकाशित करा, आमच्या सारख्या पामरांना ह्या वैचारिक खाद्याची गरज आहे. धन्यवाद !

    मयुर कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. मयुर कुलकर्णी आपले मनोगत अगदी बरोबर आहे । भाऊन्चे माहीती सन्ग्रह आवर्जून पुस्तक तसेच ई बुक रुपात प्रकाशित होण्याची या पिढीची गरज आहे कारण असे वैचारिक खाद्य आता मिळत नाहीं। राजकीय लोक आपल्या पक्ष कार्यकर्ता पदासाठी तरुणाईला नुस्ते भटकवत आहेत ।
      मयुर धन्यवाद !

      Delete
  5. it is not only important to know the history but one should study islam , koran and hadis to understand the minds behind, it is high time to understand islam does not mean peace but has other meanings!

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यास करून काय करणार. पीचडी करायची का? एवढी शीते बघितल्यावरून आता भूतं बघणार का

      Delete
  6. मयुर अगदी बरोबर!

    ReplyDelete
  7. भाऊ, तुम्ही इतिहास समोर आणून या विषयाची दूसरी बाजूही उलगडलीत. पण एक शंका तुमचे याच विषयावरचे आधीचे लेख वाचल्यामुळे मनात येऊन गेली. तुमच्या २४ नोव्हेंबरच्या 'मुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे? ' या लेखात असे लिहीलेलं होतं - ' जगातली आजची समस्या मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी नसून, त्यांच्या कडव्या धर्मश्रद्धांनी उभी केलेली समस्या आहे. कारण एक मुस्लिमच दुसर्‍या पंथाच्या मुस्लिमाच्या विश्वास व श्रद्धा नाकारून त्याच्या जीवावर उठलेला असल्याचे सातत्याने दिसते आहे ' - याचा संदर्भ सिद्दी हाजी अब्दुल रहमान अडजाच्या जेफ़रसन व अडाम्स यांना दिलेल्या लुटीच्या कारणाशी कसा लावायचा हा गोंधळ झालाय...

    ReplyDelete
  8. Bhau yachi copy udarmatwadi secular na dya manje Kay farak padto ka te pahu

    ReplyDelete
  9. खरच खूप माहितीपूर्ण लेख आहे. जिथे धर्म येतो तिथे सगळ्याच गोष्ठी अवघड होतात. लोक धर्माच्या नावाखाली काहीही करतात. कितीही नाही म्हंटल तरी दहशतवाद आणि धर्माचा संम्बध आहेच.

    ReplyDelete