Friday, August 26, 2016

प्रत्येक युगातले मंबाजी

rohit vemula के लिए चित्र परिणाम

रोहित वेमुला याचे आता फ़ारसे कोणाला स्मरण राहिलेले नाही. कशाला असेल? कारण त्याची आत्महत्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या यातना, याविषयी कोणालाच कधी फ़िकीर नव्हती. जोवर त्याने आत्महत्या केलेली नव्हती, तोवरच त्याला कवडीची किंमत नव्हती. हैद्राबाद विद्यापीठातील तो एक सामान्य विद्यार्थी होता आणि इतरांची जी दुर्दशा असेल, तसाच जगत होता. सहाजिकच त्याला तशा अवस्थेतून बाहेर काढण्याची कोणाला गरज वाटली नाही. कारण त्यासाठी खुप संघर्ष करावा लागला असता आणि त्यापासून कुठलाही राजकीय लाभ होण्याची शक्यता नव्हती. शिवाय अशा कामातून कुठलीही सहानुभूती मिळत नाही, की मतांची बेगमी करता येत नाही. पण रोहितने आत्महत्या केल्यावर एकदम त्याचा शेअरबाजार वधारला. कारण मोदींच्या किंवा भगव्या राजकारणाला झोडपण्यासाठी एक हत्यार रोहितच्या मृत्यूने पुरोगामी राजकारणाच्या हाती आलेले होते. मग इतका कल्लोळ माजवण्यात आला, की त्या संदर्भात दोन केंद्रित मंत्र्यांनी केलेल्या विधानांसाठी त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्याने गुन्हाही दाखल करण्यात आला. हा कायदा दलित अत्याचार विरोधी कायदा आहे. त्यामुळे अर्थातच त्यातला पिडीत हा दलित असावा लागतो. सहाजिकच रोहित दलित असल्याची बोंब ठोकली, की त्याची काठी बनवून संघापासून मोदींपर्यंत सर्वांना झोडपण्याची मुबलक सोय होणार हे उघड होते. मग कोण कशाला सत्याचा शोध घेतो वा रोहितच्या अन्यायाचा तरी तपास घेतो? प्रत्येकजण उठून हैद्राबादला धावत सुटला आणि दलितांच्या न्यायासाठी अश्रू ढाळण्याची स्पर्धाच सुरू झाली. पण रोहित खरेच दलित आहे किंवा नाही, याचा तपास करायची कोणाला गरज वाटलेली नव्हती. कारण अशा रुदाल्यांना पिडिताविषयी सहानुभूती नसते, की त्याच्यावरच्या अन्यायावर दाद मागण्याची इच्छाही नसते. त्यांना असे पिडीत फ़क्त हत्यार वा साधन म्हणून उपयुक्त असतात.

पण त्यात दोन केंद्रीय मंत्र्यावरच गुन्हा दाखल असल्याने रोहितची व्यक्तीगत माहिती गोळा करणे सरकारला भाग होते. त्याचा राजकीय लाभ उठवणार्‍यांना रोहितची फ़िकीर नव्हती, तशीच कायदेशीर बाबींचीही पर्वा नव्हती. आरोप करायचा, धुरळा उडवायचा आणि आपली राजकीय लुटमार करून फ़रारी व्हायचे, याला आजकाल पुरोगामी चळवळ म्हणतात. सहाजिकच ती आत्महत्या किंवा त्यामागची यातना, यापेक्षा रोहितच्या दलित असण्याचे भांडवल करण्यात आले. त्या दबावाखाली स्थानिक प्रशासन यंत्रणाही किती ढेपाळली असावी? बिनदिक्कत कुठल्याही तपासाशिवाय थेट मंत्र्यांवरही गुन्हा दाखल करावा लागला. पोलिसांनी तो केलाही. ही पुरोगामी खोटपणाची किमया आहे. खोटे बोलावे आणि इतके रेटून बोलावे, की खर्‍यालाही स्वत:वरच संशय यावा. याला पुरोगामी रणनिती म्हणतात. शेकड्यांनी त्याचे दाखले देता येतील. मालेगाव स्फ़ोटा्च्या तपासापा्सून इशरतच्या चकमकीपर्यंत खोटे आरोप व खोटे पुरावे निर्माण करण्यापर्यंत पुरोगामी चमत्कार या देशाने अलिकडल्या काही काळात अनुभवले आहेत. त्यात रोहितची आत्महत्या अतिशय छोटी बाब आहे. कुठलाही पुरावा नसताना कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांना खटला चालवल्याशिवाय आठ वर्षे तुरूंगात कुजवून ठेवलेले आहे. ही कसली किमया आहे? इशरत प्रकरणाचे पितळ कधीच उघडे पडले आहे. आधी अफ़वा पिकवायची आणि मग त्याच्याच बातम्या रंगवून इतका गदारोळ करायचा, की कोणाला सत्याचा शोध घेण्याची हिंमतही होता कामा नये. लोक त्यालाच कंटाळले म्हणून देशात सत्तांतर झाले. त्याला मोदींची लोकप्रियता कारणीभूत नाही, इतकी पुरोगामी खोटारडेपणाविषयीची नकारात्मकता कारण झालेली आहे. पण म्हणून पुरोगामी खोटारडेपणाला लगाम लागेल अशी कोणी अपेक्षा करू नये.

रोहितच्या जातीविषयीचा अहवाल त्याची साक्ष आहे. त्यात केंद्रीय मंत्री गुंतले असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याविषयी चौकशी नेमली. एका निवृत्त न्यायाधीशावर काम सोपवले आणि त्याचा अहवाल आता समोर आला आहे. त्यानुसार रोहित दलित नाही. पण सवाल त्याने दलित असण्याचाही नाही. तो दलित नसला म्हणून एका प्रज्ञावंत विद्यार्थ्यावर अशी आत्महत्येची वेळ यावी का? देशाचा एक सुपुत्र हकनाक बळी जातो, याची कोणाला फ़िकीर होती काय? कल्लोळ झाला तो दलित म्हणून. पण एक हुशार तरूण आत्महत्येपर्यंत नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे दु:ख कोणाला नव्हते. त्याचा दलित म्हणून वापर करण्यामध्ये प्रत्येकाला आपला राजकीय लाभ दिसत होता. म्हणून त्याला दलित ठरवून इतका गदारोळ माजवण्यात आला. खोटे बोलायचे. त्यावरून वादळ उठवायचे आणि मग त्यालाच पुरावा म्हणून आणखी राळ उडवायची; ही एक गुन्हेगारी पुरोगामी मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. त्याची साक्ष हिटलरने दिलेली आहे. जेव्हा द्वेष करण्यासारखे काही नसेल, तेव्हा तसे काही खोटे बुजगावणे उभे करायचे आणि कुणाला तरी फ़ाशी द्यायचे, यातलाच प्रकार आहे ना? असे शेकडो दाखले पुरोगामी राजकारण व समाजकारणाचे देता येतील. त्यातून काय साधले जाते? याकडेही बघण्याची गरज आहे. समाजातील सामंजस्य बिघडवणे आणि त्या होळीवर आली पोळी भाजून घेणे; हाच त्यामागचा हेतू असतो. त्यासाठी मग रोहितला दलित घोषित करायचे आणि धुरळा उडवून द्यायचा. कधी तो संघचालक मोहन भागवत यांच्या विरोधातला असतो, तर कधी केंद्रीय मंत्री जावडेकरांच्या विरोधातला असतो. कधी शिवसेना तर कधी सनातनच्या विरोधातला असू शकतो. पण त्या मोडस ऑपरेन्डीचे कर्ते करविते इथून तिथून पुरोगामी असल्याचेच दिसून येईल.

मोदी यांना पंतप्रधान होण्यापुर्वी बारा वर्षे असल्या जाचातून जावेच लागले आहे. हे अर्थात नवे नाही. मानवी इतिहास अशा भंपकबाजीने कायम भरलेला दिसेल. सत्याला नेहमीच खोटारड्यांच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडावे लागलेले आहे. मग ते पुराणकाळातले असोत किंवा अत्याधुनिक एकविसाव्या शतकातले असोत. जगातल्या नितीमत्तेची मक्तेदारी आपणच घेतलेली आहे, अशी ठाम समजूत असलेला एक वर्ग जगातल्या कुठल्याही देशात, युगात अस्तित्वात असतो आणि आपली नसलेली महत्ता सिद्ध करण्यासाठी तो सतत कांगवखोरी करीतच असतो. त्याच्या अशा कांगाव्याला खोटे पाडण्यातच सत्यवादी लोकांची तारांबळ होत असलेला इतिहास आपल्याला वाचावा लागेल. स्वातंत्र्य चळवळीत संघाचे योगदान काय, असे कम्युनिस्ट विचारतात. पण त्यांच्याच कम्युनिस्ट चळवळीचे तरी स्वातंत्र्य लढ्यातले योगदान किती व कोणते? या प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत. आज गळ्यात गळे घालणारे समाजवादी व कम्युनिस्ट १९६० च्या दशकात एकमेकांच्या उरावर कोणते आरोप करून बसलेले होते? आज जे आरोप संघावर होतात, तेच स्वातंत्र्यपुर्व काळात कॉग्रेस पक्षावरही झालेले आहेतच. तेव्हा कॉग्रेस हिंदूचा पक्ष ठरवला जात होता आणि आज भाजपा हिंदूंचा पक्ष आहे. हा सगळा भुलभुलैया त्रिकालाबाधीत असतो. त्यात खोट्याला आपले चरित्र कधीच सिद्ध करावे लागत नाही. पण सत्याला मात्र अग्निदिव्य सादर करून आपली वास्तविकता सिद्ध करावी लागत असते. मंबाजी फ़क्त तुकारामाच्याच काळात जन्माला येत नसतात. मंबाजी प्रत्येक युगात प्रत्येक समाजात असतातच. समाजाची दिशाभूल करण्यासाठीच आपला अवतार झाला असल्याची ठाम समजून असलेल्या, अशा लोकांनी प्रत्येक समाजाचे संस्कृतीचे भयंकर नुकसान केलेले असते. रेटून खोटे बोलण्याचे कौशल्य हीच त्यांची सर्वात मोठी पात्रता असते.

5 comments:

  1. ढाेंगीच वाे हे...

    ReplyDelete
  2. खरआहे भाऊ यामुळेच हे घरात आहेत काहीदिवसात हे लोक देशात दिसणार नाहीत

    ReplyDelete
  3. भाऊ अत्यंत सहि लेख
    ज्या वेळी एका विदेशी व्यक्तीकडे राजकीय पक्षाची सुत्रे सुत्रब्ध पद्धतीने ( गांधी घराण्यापाशी देशाची सत्ता घुटमळल्या पासुन शास्त्रींचा अकस्मात मृत्यू, संजय गांधी चा अपघाती मृत्यू, इंदिरा व राजिव गांधींचा अतिरेकीहल्ला मृत्यू व सुत्रे अलगद पणे विदेशी व्यक्ती कडे गेली) गेल्या सुमारे अडिच दशकाच्या आसपास पिटर मुखर्जी च्या मार्फत विदेशी मिडिया व मिडियातील पैश्याने भारतात प्रवेश केला व एक सुत्री पणे (जरी चानल वेगवेगळी असली तरी ती सर्व सुसुत्रीत पणे) एका ठराविक घराण्याला या मिडियाने प्रमोट केले व सत्ता सतत त्यांना मिळेल यासाठी पोशक वातावरण निर्माण मिडिया च्या दलालांनी केले.

    एका वेळी तर भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा सत्तेवर येऊ दिले गेले नाही. (पुरोगामी/ठरावीक लेखक/विचारवंत/सोशल वर्कर नामवंत बनवुन त्यांच्या मदतीने जनमत एकाच पक्षाच्या बाजुने झुकवले व त्याला पैशाची जोड देऊन गरीब मतदारांना विकत घेतले. व दशकानु दशके देशाची लुट करणारी सत्ता उपभोगली./राबवली. (ऊद्या जरी याच घराण्याचा देशभक्त नेता जन्मला तर हेच मिडिया वाले उलटे फिरतील किंवा त्याला अलगद संपवुन टाकतील.
    आत्ता पण बिहार मध्ये भाजप विरोधात एका बाजुने सर्व पक्ष एकत्र येऊन व मोदिं च्या बिहार मधिल सभांना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असुनही बिहार राज्यातील निवडणूकीत पराभव होतो हे आश्चर्यच वाटत नाही कारण हाच मिडिया एका बाजूने दादरी अखलख व दुसऱ्या बाजूने मोहन भागवत यांच्या मागास जाती च्या वक्तव्याचा विपर्यास करुन मते व भाजपच्या Think tank निवडणुकीतील पराभवाची कारण मीमांसा करण्यात / बुद्धी फिरवण्यात यशस्वी झाला. (Voting मशिन मध्ये (काऊंटीग मध्ये ) मते फिरवता येतात हे अनेक वेळा सिद्ध करणाऱ्याला तुरूंगात डांबुन (तो साऊथ इंडियन जिवंत आहे का याचा शोध व सत्तेवर असताना या बाबत सखोल पोलखोल करण्याची बुद्धी भाजप सरकारला होत नाही )

    आपण म्हणाला त्याप्रमाणे मिडिया सातत्याने एका पक्षाच्या सरकार वर टिका करत नागरिकांना निष्क्रिय करत आहे. त्यामुळे देशाची लुट करणे सहज शक्य होते.
    व मिडियाला पाहिजे ते घराणे शाहिचे सरकार आले की विरोधी पक्षाला टारगेट करते. यामागे कोणत्या तरी जागतिक शक्ती काम करत आहेत पण भारतिय आपल्याच स्वार्थात मश्गुल आहे. व शतकानुशतके मुसलमानी सत्तेने राज्य केल्या मुळे हेच आता भारत तुमचा देश नाहीच हे म्हणण्या पर्यंत मजल गेली आहे.

    आज देखिल मोदि सारख्या मुरब्बी नेत्याला पण केवळ Times Now ला मुलाखत देऊन इतर मिडिया पासुन वेगळा पाडण्यात यश मिळविले आहे. हिच वाहिनी व अरणब गोस्वामी सरकारीपक्षाच्या प्रवक्त्याची पिसे काढण्याची ऐक हि संधी सोडत नाही व अशा प्रवक्त्या वर पाशवी अत्याचार करत आहे व याच वाहिनी चा टिआरपी सर्वात जास्त आहे. हिच नागरिकता भारतात मिडियाने रुजवलेली आहे.
    प्रथम काहि दशकात सुशिक्षित मध्यम वर्गीय नागरिकांना मतदाना पासुन परावृत्त करण्यात मिडिया यशस्वी झाला ( कारण एकदाका हा वर्ग मतीमंद झाला की मतदान करायचे थांबवतो व गरिब जनतेची मते विकत घेता येतात व आता सोशल नेटवर्किंग मुळे काही मध्यमवर्ग परत मतदान करु लागल्या वर गुमराह करण्यात यशस्वी होत आहे.)
    ही नागरिकांची निष्क्रियता फारच घातक आहे.

    आणि त्याचाच फायदा मिडिया वाले घेतात व भारता सारख्या खंडप्राय देशात धुडगूस घालत आहेत. अनेक वेळा नव्हे प्रत्येक वेळी मिडियाने नेहमीच एका ठराविक राजकीय पक्षांना टारगेट केले आहे.

    याच मिडियाने ज्या वेळी एका पाठोपाठ एक कैक लाख कोटीचे भ्रष्टाचार होत होते तेव्हा यडुरप्पांचे काय असे प्रतिप्रश्न विचारुन एक प्रकारे प्रचंड भ्रष्टाचार करणार्‍यांना का कव्हर ऑपरेशन दिले होते व आता हे सर्व दाखवणारी शोध पत्रकारिता कोणाचे पाणी भरत होती की लोणी खात होती हे भारता सारख्या देशात केवळ दैवच जाणु शकते. कारण आपले देशबांधवच यात सामील असल्याने हे सामान्यांना कधीच समजणार नाही. व दिशाभूल मात्र होत राहील.....

    ReplyDelete
  4. आपण वाहिनीवरील चर्चांत कधी देशाच्या विकासा संबंधित चर्चां करताना कधी ऐकले आहे का? मोदिनी परदेश दौऱ्यात देशाच्या विकासाला दिशा देणार्‍या कित्येक करारा वर चर्चा केली आहे का?
    कि मिडिया ढोल वाजवताना व व्हाइट हाऊसमध्ये म्युझियम मध्ये फिरताना दाखवुन भारतीयांची दिशाभूल करुन कोणाचा अजेंडा मिडिया चालवतो आहे? तसाच हे मिडियाला विचारण्या एवढा आधीकार भारतीय संविधानाने नागरिकांना दिलाय का?

    ना खाऊगां ना खाने दुंगा या मोदी धोरणा मुळे % भागीदारीला सोकावलेल्या मिडियाची मोठी कोंडी झाली आहे.
    डोळस सामान्य माणूस हे न जाणण्या एवढा दुध खुळा नाही हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.
    परंतु गोरक्षा, दलित, महागाई, विकास 15 लाख रु राममंदिर या विषयावर मोदी सरकारची आश्वासने कितपत पुर्ण केली यावरुन हाच मिडिया जस जशा 2019 च्या निवडणूका जवळ येतील तशे सरकारवर धारदार हल्ले चढवेल व 2004 प्रमाणे या सरकारने काम चांगले केले पण लोकांन पर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले व निवडणूक हरले किंवा बहुमत मिळेवु शकले नाही ही सारवासारव करेल.

    एका बाजूने सरकारची चुकीची धोरणे लोकांना दाखवून त्यात बदल करावयास भाग पाडणे व
    सरकारचे चांगले काम लोकांन पर्यंत पोहोचवणं हे मिडिया कडुन आपाक्षित आहे. व वाईट कामाचा समाचार घेणे व त्या विरोधात जन जागृती करणे हे पण काम आहे. परंतु यात केवळ सद्य सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा बर्‍याच चानलनी चालवला आहे. व देशमत विरोधी फिरवणे हाच हेतु यामागे आहे.
    व पाराचा कावळा करुन देशवासियांना दाखवत आहे. व आमच्या सर्वांकडे हे हतबल पणे पहाणे एवढाच पर्याय सध्या तरी आहे. हाच मिडिया जयललिता यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न का करत नाही?

    विदेशी मिडियाला नामोहरम करण्याची ताकत ना शासकीय मिडीयात आहे व सोशल मिडियाची पोहोच भारतासारखा अर्ध क्षिक्षीत देशात आहे.
    मिडिया हि कोणाची डिप अॅसेट आहे हे वरिल व अण्णां च्या आंदोलनातुन लक्षात येईल.( परंतु या मिडियाचा लोकशाही मार्गाने बंदोबस्त जर झाला नाही/ होणार नाही मग क्रांती होणे अपरिहार्य आहे फक्त याची मशाल प्रथम कोण पेटवतो हे बघणे महत्वाचे आहे ).

    मोदी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे व पुढील निवडणुकीत कसे सामोरे जातात हे फारच रोमहर्षक राहिल. धन्यवाद भाऊ
    आपल्या सारख्यांच्या लेखा मुळे होणारी जन जागृती हा आशेचा किरण आहे.

    ReplyDelete
  5. रोहित वेमुला दलित नाही म्हटल्यावर त्याच्या मृत्यूचे भांडवल करणारे भामटे बिळात नाहीसे झाले असणार, असल्या तथाकथित सेक्युलऱ भामट्यांवर जनतेची दिशाभूल केली म्हणून खटले चालविले पाहिजेत म्हणजे पुन्हा असली नाट्यबाजी होणार नाही.

    ReplyDelete