Tuesday, January 30, 2018

चोराच्या उलट्या बोंबा



कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला आता पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पण अजून त्याच्या खुन्याला पकडण्यात कर्नाटकच्या पोलिसांना यश आले नाही. किंबहूना त्या दिशेने कुठलीही प्रगती झालेली नाही. बहुधा यापुर्वीच्या तीन वादग्रस्त हत्यांप्रमाणेच गौरीच्याही हत्ये़चे आता रहस्य बनुन जाणार आहे. कारण गौरीसाठी आक्रोश करणार्‍या कोणालाही खराखुरा मारेकरी शोधायचा नसून अन्य कुणाला तरी बदनाम करण्यासाठी या हत्येचा उपयोग करून घ्यायचा आहे. अन्यथा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरीच्या हत्येचे इतके रहस्य होण्याचे काहीही कारण नव्हते. यातले योगायोग मोठे चमत्कारीक आहेत. या प्रत्येक प्रकरणात हत्याकांड घडल्यानंतर विनाविलंब त्यातल्या मारेकर्‍यांविषयी राजकीय संशयकल्लोळ माजवण्यात आलेला आहे. प्रत्येक हत्येचे पाप हिंदूत्ववादी संघटनांच्या माथी फ़ोडण्याची स्पर्धा पहिल्या क्षणापासून सुरू झाली होती आणि पहिल्या हत्येपासून त्यात सहभागी झालेला एकच ठराविक विचारांचा घोळका असलेला दिसेल. तिसरा योगायोग म्हणजे यात कोणालाही खरा मारेकरी शोधला जावा आणि न्याय व्हावा; याच्याही अजिबात कर्तव्य असल्याचे केव्हाही स्पष्ट झालेले नाही. त्यापैकी कोणालाही त्या हत्याकांडाचे दु:ख झाल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसलेले नाही. उलट या निमीत्ताने एकाहून एक समारंभ व सोहळ्याचा आनंदोत्सव सुरू होताना आपण बघितलेले आहे. सहाजिकच गौरीची गणना अशा रहस्यमय प्रकरणात व्हावी, असाच त्यातला हेतू आहे. कारण तिला मरणोत्तर न्याय देण्यापेक्षा अशा जमावाला त्या हत्येचा राजकीय लाभ उठवण्यात खरा स्वार्थ आहे. गौरीचा भाऊ इंद्रजित त्याला अपवाद असावा. म्हणूनच त्याने पुढाकार घेऊन आता या बदमाशांचे मुखवटे फ़ाडण्याचे काम हाती घेतलेले आहे. त्याने स्वत: हायकोर्टात धाव घेऊन ह्या नाटकाचा पर्दाफ़ाश करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकताच गौरीचा जन्मदिवस झाला आणि त्याचा मोठा सोहळा बंगलोर येथे साजरा करण्यात आला. त्यासाठी लाखो रुपयांचा खुर्दा करून या टोळीतले देशभरचे महान सदस्य बोलावण्यात आले. त्यासाठी त्यांना विमानप्रवास, वास्तव्याची पंचतारांकित सुविधा, फ़िरायला वहाने देण्यात आली होती. कर्नाटक सरकारनेच त्याचा खर्च उचलला, हे आता लपून राहिलेले नाही. गौरीचे खुनी पकडण्याला महत्व असून, तिच्या जन्म वा मृत्यूदिनाचे सोहळे करण्याला तिच्या हत्येची विटंबना म्हणावे लागेल. पण कोणाला त्याची पर्वा आहे? गुजरातच्या जिग्नेश मेवानीपासून नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार, उमर खालिद आणि गुजरात दंगलीला पोटपाण्याचा व्यापार बनवणारी तीस्ता सेटलवाड; अशा तमाम भामट्यांची तिथे गर्दी झाली होती. त्यांची येजा व उठबस करायला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार अगत्याने उपस्थित होते. तिथे सोहळ्यात झालेली भाषणे ऐकली, तर कोणालाही नवल वाटेल. कारण त्यात गौरीचे मारेकरी शोधण्याचा विषयच नव्हता. विधानसभा निवडणूकीत भाजपा व मोदींना कसे पराभूत करायचे, यावरच जोरदार भाषणे झाली. गौरीची हत्या आणि मोदी वा भाजपा यांचा नेमका संबंध काय? ज्या कर्नाटक प्रशासनाने अजून त्या तपासात कुठलीही प्रगती केलेली नाही, त्याला जाब विचारण्याची गरज नाही काय? पण कोणाला व कसला जाब विचारणार? ज्याच्या पैशाने इतकी चैन चालली आहे, ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या व कॉग्रेस यांना जाब विचारणार कुठल्या तोंडाने? किंबहूना गौरी लंकेशची हत्या किंवा वाढदिवस हे निमीत्त होते आणि विधानसभेसाठी कॉग्रेसचा प्रचार हा मुळचा हेतू होता. म्हणून त्या हत्याकांडाचा तपास करण्यात नाकर्ते ठरलेल्या सिद्धरामय्या सरकारविषयी मौन आणि संबंध नसलेल्या मोदी भाजपा यांना शिव्याशाप देऊन हा सोहळा आटोपला. 

दाभोळकर ते गौरी लंकेश या चार रहस्यमय झालेल्या हत्याकांडाविषयी म्हणूनच आता उघडपणे काही गोष्टी बोलणे आवश्यक झालेले आहे. ह्यांचे कोणी राजकीय हत्याकांड केलेले आहे? की त्यांना राजकीय मोहरे म्हणून पुरोगाम्यांनीच बळी दिलेले आहे? म्हणजे असे की, या गुन्हे वा हत्याकांडाचे लाभार्थी कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर त्यातले रहस्य उलगडणे अवलंबून आहे. कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना त्यातला लाभार्थी व त्याचा हेतू शोधण्यावर उत्तर अवलंबून असते. दाभोळकर ते गौरी यांच्या हत्येचा कुठलाही हेतू हिंदूत्ववादी संघटनांपाशी असलेला आढळत नाही. त्याचप्रमाणे त्या हत्यांचा लाभ त्यांना मिळालेला दिसत नाही. पण राजकीय क्षेत्रात नामोहरम झालेल्या काही लोकांना व पक्षांना अशा हत्याकांडाचा मोठाच राजकीय लाभ, गेल्या चार वर्षात मिळालेला दिसतो आहे. आपल्या राजकीय विरोधकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी अशी घटना या लोकांना हवीच होती. आपण विसरलो नसू, तर मुंबईत कसाब टोळीने हल्ला केल्यावर त्यात मारले गेलेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे, यांच्याही बाबतीत असाच कांगावा करून त्यांना हिंदूत्ववादी प्रवृत्तीने मारल्याचा दावा झालेला होता. त्यावर पुस्तके लिहून वेगवेगळे समारंभ मेळावे भरवले गेले होते. आता तर सुप्रिम कोर्टानेच तशा संशयासाठी तपास करण्याची याचिका फ़ेटाळली आहे. याही चार हत्याकांडामध्ये कुठलाही पुरावा साक्षिदार नसताना सातत्याने व पहिल्यापासून हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरवण्याची स्पर्धा झालेली होती. याचा अर्थ एकच होतो, की आपल्यातल्या कुणाची तरी हत्या घडवायची व त्याचे खापर हिंदू संघटनांवर फ़ोडायचे; असे पुरोगामी कारस्थान असू शकते. जे एका हत्येने साधले नाही, तर पुढल्या पुढल्या हत्या होतच राहिल्या आहेत. प्रत्येक हत्येचे रहस्य अधिकाधिक गुंतागुंतीचे होत गेले आहे आणि कशाचाही उलगडा होऊ शकलेला नाही.

मालेगाव स्फ़ोटात साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित यांना गोवण्यापासून सुरू झालेले हे कारस्थान असण्याची दाट शक्यता आहे. त्यात आधी जिहादी घातपात व हिंसेला हिंदूत्ववादी दहशतवाद ठरवण्याचा घाट घातला गेला. त्यात यश आले नाही, तेव्हा हेमंत करकरे यांच्या हत्येचे आरोपी हिंदूत्ववादी ठरवण्याचे डाव खेळले गेलेले आहेत. त्याचाही जनमानसावर परिणाम झाला नाही, त्यातून मग आपल्यातल्याच कुणाला तरी बेफ़िकीर गाठून मारायचे आणि त्याचे खापर हिंदू संघटनांवर फ़ोडायचा खेळ चालला आहे. तसे नसते तर याच भामट्यांच्या टोळीने बंगलोरमध्ये जमा होऊन सिद्धरामय्या सरकारला जाब विचारला असता. कारण गौरी हत्याकांडाचा तपास त्याच सरकारची जबाबदारी आहे. पण मागल्या पाच महिन्यात त्याच सरकारने काहीही केलेले नाही. मग त्याची कॉलर पकडायचे सोडून, या तमाम पुरोगामी रुदाल्यांनी मोदींवर तोफ़ा डागण्याचे कारण काय होते? कारण त्यांनाही ह्या हत्या आपणच केल्याचे पक्के ठाऊक आहे. सहाजिकच खराखुरा तपास त्यांना नकोच आहे. त्यापेक्षा अशा हत्यांचे राजकीय भांडवल करण्याची मूळ योजना आहे. बहुधा त्याचा वास लागल्यानेच गौरीचा भाऊ इंद्रजित लंकेश याने त्या सोहळ्यात जाण्यापेक्षा हायकोर्टात याचिका देऊन सीबीआय तपास मागण्याची भूमिका घेतली आहे. या चारही हत्यांमागे माओवादी सुनियोजित कारस्थान असू शकते. कारण ज्या प्रकारे हत्या झाल्या व मारेकरी सहजगत्या निसटले आहेत, ती कृती सामान्य मारेकर्‍यांना साधणारी नाही. कदाचित अशा हिंसक राजकारणाला नामोहरम झालेली कॉग्रेसही आता मदत करू लागलेली असावी. तसे नसते तर हा सोहळा बंगलोरमध्ये झालाच नसता. त्यात नेमकी ह्याच भामट्यांची टोळी एकत्र आली नसती. किंवा त्यात गौरीचा न्याय बाजूला पडून राजकीय प्रचारसभा रंगली नसती.

7 comments:

  1. कसाब च्या हाताला भगवा दोरा गुंडाळुन त्याला हिंदु दाखउ इछ्चिणारी मंडळी ही. ह्यांच्या कडून काय अपेक्षा ठेवणार..

    ReplyDelete
  2. पूर्वी पुण्याच्या शांतिदुत धर्मीय टांगेवाल्यांमध्ये व इतर टांगेवाल्यांमध्ये राक्षसी चुरस असायची. दुसऱ्या टांग्यास सवारी मिळाली आणि टांगा सुरू झाला की हे शांतिदुत टांगेवाले हळूच त्या चालत्या टांग्याच्या चाकाची खिळ काढीत असत. आपल्या आसुरी चुर्षीपायी मग पाशीनजर मरेनात का अपघात होऊन!!
    काँग्रेस सध्या करत असलेली चुरस या दुष्ट टांगेवाल्यांपेक्षा कमी पाशवी नाही!

    ReplyDelete
  3. भारतीय मीडिया ही निष्पक्षपाती नसून ती अत्यंत कम्युनिस्ट प्रोपोगंडा आणि leftist खुनी विचारांनी भरली आहे
    एकदा अल्पसंख्य किंवा दलित मेला असता ही मीडिया दंगा घालते पण एकदा देशभक्त भारतीय मेला असता एक तर जाणीव पूर्वक दुर्लक्ष करते किंवा उलटे हिंदुत्ववादी कसे चूक हे शोधते

    ReplyDelete
  4. भाऊ गौरी प्रकरणी आपल्या पूर्वीच्या लेखाच्या आधारे ती "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ". म्हणून उडवली की काय असे काही ट्विट्स वरून तरी अनुमान होते.
    प्रस्तुत लेखात मंडलेली भूमिका नेमकी खरी आहे.
    गुन्हेगारी टोळी त्यांच्यातल्या कोणाला कधी ढगात पाठवेल ह्याचा नेम नाही. इथं तर सर्व निर्ढावलेले सुशिक्षित गुन्हेगार आहेत.
    सगळं थंड डोक्याने करतात.

    ReplyDelete
  5. कोण लंकेश? काय घेणे देणे? मोदी यांच्या विरोधात बोंबलायला आम्हाला एक व्यासपीठ हवे असते ते मिळाले बस आणखी काय हवे?

    ReplyDelete
  6. आता तर म. गांधीना नथुरामने मारलेच नाही,असाही युक्तिवाद सुरू आहे. आणि बाबरीतले दोषी म्हणून ज्या आडवाणींच्या नावाने बोंब होती तेही निर्दोष सुटले.कोर्टाने काळवीट प्रकरणी सलमानलाही निर्दोष सोडले. कोर्ट कुठे नी न्याय कुठे?

    ReplyDelete