Tuesday, January 2, 2018

अशीही इशरत जहान

Image result for isharat joins BJP

कालपरवा जे तिहेरी तलाक विरुद्धचे विधेयक लोकसभेत संमत झाले, त्यामागे सुप्रिम कोर्टाची प्रेरणा होती. त्यासाठी त्या कोर्टात दाद मागणार्‍या ज्या अनेक मुस्लिम तलाकपिडीत महिला होत्या, त्यामध्येही एक इशरत जहान होती. हे नाव आपल्याला अहमदाबादच्या वेशीवर एक तपापुर्वी झालेल्या चकमकीमुळे लक्षात राहिलेले आहे. पण ती पाकिस्तानी जिहादींच्या सोबत मारली गेलेली इशरत आणि आता प्रकाशात आलेली इशरत, यांच्यात मोठा फ़रक आहे. जाणता राजा शरद पवारांना पोटच्या पोरीगत वाटलेली इशरत ठाण्यजवळच्या कळव्याची आणि कॉलेजात शिकत असतानाही जिहादच्या धर्मांध हिंसेला प्रवृत्त झालेली मुलगी होती. उलट आज नावारुपाला आलेली इशरत जहान कोलकात्याच्या हावडा भागातील तलाकपिडीत मुस्लिम तरूणी आहे. तिच्या नवर्‍याने २०१४ सालात तिला दुबईतूनच फ़ोनवर तिहेरी तलाक देऊन वार्‍यावर सोडलेले होते. तर हिने कोर्टात दाद मागून नवर्‍याला धडा शिकवण्याचा चंग बांधला. त्याचेही कारण आहे. आता देशात कॉग्रेस वा पुरोगामी सरकार नसल्याने आपल्याला न्याय मिळू शकेल आणि मिळालेल्या न्यायाला दडपून टाकले जाणार नाही, अशी तिला खात्री वाटलेली होती. तिच्यासारख्या अनेक मुस्लिम महिलांना आज देशात खंबीर पंतप्रधान असल्याने किती दिलासा मिळाला आहे, त्याचे वेगळे उदाहरण द्यायला नको. अशा इशरतने आता थेट भाजपात येऊन राजकारण प्रवेश केला आहे. हावडा येथील भाजपाच्या कार्यालयात जाऊन तिने रितसर सदस्यत्व स्विकारले आणि तिचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी स्वागत केले. अर्थात असे तोंडी लावण्यापुरते मुस्लिम भाजपात आहेत वा दाखवले जातात, अशी पुरोगामी टवाळी अखंड चालू असते. पण म्हणून ती सत्य नसते. इशरत त्याचाच दाखला आहे. पण तिची महत्ता तितकीच नाही. तिची ताकद ममतांनाही भयभीत करून टाकणारी आहे.

गुजरात विधानसभा कालखंडात अकस्मात कॉग्रेसला पंडित नेहरू हे जानवेधारी हिंदू असल्याचा शोध लागला होता आणि त्याचा लाभ राहुलनी मंदिरांना भेटी देऊन उचलण्याचा खेळ केला. त्यातून बहुधा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जींनाही त्या हिंदू असल्याचा शोध लागला आहे. कारण मागल्या सहासात वर्षात त्यांनी सातत्याने मुस्लिम धर्मांधांचे लांगुलचालन करण्याचा अतिरेक केलेला होता. पाकिस्तानचा गायक गुलाम अलीचा कार्यक्रम मुंबईत बंद पाडला गेल्यावर त्याला मुद्दामच सरकारी खर्चाने बंगालमध्ये आमंत्रित करण्यात आलेले होते. तिथल्या कडव्या धर्मांध बरकती नावाच्या मौलवीला महत्व देण्यात आले आणि मदरश्याच्या मौलवींना सरकारतर्फ़े अनुदान देण्यातही ममता पुढे होत्या. पण दुर्गापुजेच्या विसर्जनावर निर्बंध घालून व मोहरमच्या मिरवणूकांना सुविधा देण्यातून त्या अधिक बदनाम झाल्या. त्यांचे असले उपदव्याप बघून बंगालचा पुरोगामी हिंदू मतदारही थक्क झाला आणि त्याचे परिणाम मतांवर होताना दिसले. तेव्हा ममतांना आपण जन्माने हिंदू असण्याचा अचानक साक्षात्कार झालेला आहे. त्या साक्षात्काराची जागा सबंग नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१६ च्या आरंभी झालेल्या विधानसभा निवडणूकीत तिथून कॉग्रेसचा आमदार निवडून आला होता आणि त्याच्याच मृत्यूमुळे तिथे पोटनिवडणूक झाली. या पावणे दोन वर्षात मतांमध्ये किती फ़रक पडला? आधी कॉग्रेसचा उमेदवार जिंकला होता आणि आता ती जागा तृणमूलने जिंकली. पण पावणे दोन वर्षापुर्वी भाजपाला तिथे अवघी ६ टक्के मते होती आणि आता ३७ टक्के मते मिळालेली आहेत. त्या गडबडीत कॉग्रेस व डाव्या आघाडीचे नामोनिशाण पुसले जाते आहे. इतकी म्हणजे ३२ हजार मते अकस्मात पुरोगामीची हिंदूत्ववादी होत नसतात. तर पुरोगामी ढोंगाला कंटाळून तो मतदार भाजपाकडे झुकत असल्याची ती साक्ष आहे.

बंगाल हे देशातील सर्वाधिक प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य आहे. तिथे मुस्लिमांचा आशीर्वाद असेल त्यालाच सत्ता राखता येते आणि म्हणूनच भाजपातर्फ़े गेल्या दोनतीन वर्षात कटाक्षाने मुस्लिमांना पक्षाकडे आणण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात प्रामुख्याने तलाकपिडीत महिला व सुशिक्षीत मुस्लिमांना हाताशी धरण्याचे धोरण पद्धतशीर राबवले जात आहे. तिथे भाजपाची जी मुस्लिम आघाडी कार्यरत आहे, त्यातल्या महिला कुठेही तरूण विवाहितेला तलाक दिला गेला, की धाव घेतात. त्या तलाकपिडीतेला मदत देण्यापासून जनजागृतीचे काम हाती घेतले जाते. सहाजिकच मोठ्या संख्येने तलाकपिडिता किंवा तलाकच्या भयाखाली जगणार्‍या मुस्लिम महिला, भाजपाकडे ओढल्या गेल्या आहेत. तेवढेच नाही. आपल्या तरूण मुलीच्या असल्या यातनांनी व्यथित झालेले मातापिता व कुटुंबीयही त्यात ओढले जात आहेत. इशरत हे त्यातले लक्षणिय नाव आहे. किंबहूना गेल्या वर्षभरात तिहेरी तलाक विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उघड भूमिका मांडायला आरंभ केल्यापासून अनेक राज्यातील अशा तलाकपिडीता भाजपा व मोदींकडे मोठ्या अपेक्षेने बघत होत्या. त्याचा लाभ उठवून पक्षानेही तिथे आपले बस्तान बसवण्यात पुढाकार घेतला. त्याला प्रामुख्याने बंगालमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला व मिळतो आहे. महिलाच नव्हेतर मुस्लिम तरूण व पुरूषही भाजपात येताना दिसत आहेत. तसेच होत राहिले तर मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोरीत जाऊन ममता बानर्जी याचा विजय मल्ल्या होऊ शकेल. म्हणूनच मुस्लिमांच्या लांगुलचालनाला बाजूला ठेवून त्या आता हिंदूमतांची बेगमी करण्याकडे वळल्या आहेत. कारण इशरत जहानची महत्ता त्यांना नेमकी उमजलेली आहे. तलाकचा खटला सुप्रिम कोर्टात लढवणारी इशरत व मोदी यांचे एकत्रित पोस्टर यापुढल्या निवडणूकीत मतांना इकडून तिकडे फ़िरवण्यास चालना देऊ शकणार आहे.

पुरोगामी राजकारण्यांचे इथेच दिवाळे वाजलेले आहे. किंबहूना मुस्लिम व्होटबॅन्केच्या मागे धावण्याच्या अशा दिवाळखोरांच्या उतावळेपणाचा मोठा लाभ मुस्लिम मौलवी धर्ममार्तंडांनी उचलला आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेले मुस्लिम पुरूष वा महिला संतापत गेलेले आहेत. म्हणून तर इशरत म्हणते मोदींमुळे आम्हाला न्याय मिळाला आणि यापुढे कुठल्या मुस्लिम विवाहितेला भयाच्या दडपणाखाली जगावे लागणार नाही. मुस्लिम महिला याचा अर्थ व्होटबॅन्केतील अर्धी ठेव आहे आणि तीच बुडीत जाणार असेल, तर अन्य बॅन्क शोधायला हवी ना? त्यातून राहुलना मंदिरात जाण्याची चटक लागली आणि आता ममता त्यांचे अनुकरण बंगालमध्ये करीत आहेत. खरे तर त्याची अजिबात गरज नाही. हिंदूंच्या धर्मांधतेच चोचले करण्याची काहीही गरज नाही. कारण हिंदू धर्माच्या नावाने कधी मतदान करत नाही. पण तुम्ही हिंदूविरोधी मानसिकतेतून अन्य गटांच्या धर्मांधतेचे चोचले करणार असाल, तर लोक तुमच्या विरोधात मताचे हत्यार उपसतात. पण फ़क्त धर्माच्या लांगुलचालनालाच पुरोगामीत्व समजून बसलेल्या दिवाळखोरांना हे कोणी समजवायचे? मोदी वा भाजपाला मुस्लिमांचे धार्मिक चोचले न करता मुस्लिम मतदार मिळवता येत असेल, तर हिंदूचे चोचले तरी कशाला हवेत? त्यालाच सबका साथ सबका विकास म्हटलेले आहे. पण ते समजण्यासाठी पुरोगामीत्वाच्या भ्रमातून बाहेर पडावे लागेल. इशरतसारख्या मुली व तलाकपिडीता भाजपाच्या मदतीला पुढे येत असतील, तर बंगालमधला तृणमूलचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. डाव्यांचे साम्राज्य कसे कोसळत गेले, त्याच्या ममतादिदींच साक्षीदार आहेत. अंगावर पांघरलेली पुरोगामीत्वाची झुल उतरवून त्या समानतेच्या न्यायाने वागल्या, तरी त्यांना भाजपाच काय अन्य कोणी हरवू शकणार नाही. पण ढोंगीपणा चालूच ठेवला तर हावड्याची इशरत जहानही ममता संपवायला पुरेशी आहे.

9 comments:

  1. भाऊ खरच आश्चर्य आहे
    आपल्यातच फुट पाडणे सहज शक्य आहे. अफाट, बेसुमार लोकसंख्या वाढ व अशिक्षीत, बेरोजगार, भुकमार, असंस्कारी अपरिमित भारतीय ही एक मोठी शोकांतिका आहे. काही ही असले तरी शिक्षण काही प्रमाणात समाजाला सुसस्क्रुंत करते व व झुंड शाही पासुन वाचवु शकते. बेरोजगार सहज राजकारणात घुसलेत व तेच गब्बर होऊन असंस्क्रुत बेरोजगाराची झुंड बनवतात व आक्रमक पशुंची झुंड काही ही करायला तयार असते.
    खरच जाती पाती मध्ये रुतलेला समाजाला काँग्रेस ने पुर्वी भिंद्रनवाले बनवला आजही त्याची फळे निवडणूकीत काँग्रेस चाखत आहे. शिख धर्मी आजही हिंदू पासुन अलग समजत आहेत. व फटकुन वागत आहेत व धर्माधारित वागत आहेत दरार कायम आहे.
    आता कन्हैया प्रमाणे मशरुमी ठरतो का हे काळ ठरवेल. नेवाणी, हार्दिक गुजरात मध्ये काँग्रेसने भिद्रनवाले प्रमाणे जन्माला घातलेत आणि असेच घालत रहातील मिडियावाले काँग्रेसला अशीच साथ देतील. व जाती पाती धर्म यावरुनच देशाची सरकारे बनतील. मिडियावाले जो पर्यंत असे वागतील व मशरुमी लीडर बनवतील तो पर्यंत देश असाच गटांगळ्या खात राहिल असे दिसते आहे.

    जगातील सर्वात मोठी लोकशाही अशीच कांदा बटाटे महागाई व जाती पाती च्या राजकारणने हेलकावे खाणार.. व खरंच विकास पगला गया है हे काँग्रेसचे खरे ठरणार?

    मोदी पुढील आवहाने देवाच्या पण आवाक्या बाहेरील आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य लिहिलंय

      Delete
  2. खुप छान भाऊ

    ReplyDelete
  3. आजच कुबेरने केवळ मोदीजीना विरोध म्हनुन पाक धारजिना लेख लिहिलाय. हद्द आहे कुठे चालले आहेत हे पुरोगामी

    ReplyDelete
  4. आता वेळ आलीय आपण च कायदा हातात घेऊन ह्या भडव्यांना अन त्यांची लाळ घोटू सरकार ला पण धडा शिकवावा

    ReplyDelete
  5. भाऊ भीमा कोरेगाव प्रसंगबद्दल तुमचे विचार अपेक्षित आहेत नेहमी प्रमाणे तटस्थ भूमिकेतून आपल्या मनातून जातीयता कधी संपेल का अजून आपण त्यासाठी तयार नाही आहोत

    ReplyDelete
  6. आज प्रिंट , आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावाल्यानी स्वतःची लायकी दाखवून दिली. उमर खलिद, मेवानी , ओवैसी , राहुल गांधी या सारखे लोक जर उद्या देश चालवणार असतील तर या देशाचे काही खरे नाही . देशाला शत्रूंची गरजच नाही. आणि त्यात साथीला आपले कुमार बुद्धीचे , सुमार दर्जाचे पत्रकार, विचारवंत आणि धुडगूस घालणाऱ्या टोळ्या , नेते असल्यावर पाकिस्तान , हाफिज सैद साहेबांच्या कामाला पण गती मिळेल.

    ReplyDelete
  7. भाऊ भीमा कोरेगाव बद्दल ज्या मारामाऱ्या चालू आहेत त्याबद्दल मोदी चकारशब्द बोलत नाहीयेत. नेहमी प्रमाणे नको त्या गोष्टींचा बाऊ करून हे पुरोगामी लोकंच भाजपा ला मदत करतायत. लोकांना (ज्यांना थोडीफार तरी अक्कल आहे) आता या गोष्टींचा कंटाळा आला आहे.

    उदाहरण द्यायचं झालं तर जेष्ठ श्रेष्ठ आणि आक्रस्ताळेपणा करण्यात पटाईत असणारे पुरोगामी पत्रकार निखील वागळे घ्या. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवावरून दंगलीच्या बातम्या लगेच पसरतात हे माहिती असूनही ते ट्विटरवर फक्त तेवढे च ट्विट करत आहेत. आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मोदींना अश्याच लोकांनी जिंकायला मदत केली आहे.

    ReplyDelete
  8. आपले लेख खुपच प्रेरणादायी आहेत भाऊ साहेब
    सतीश सरवदे मिरज

    ReplyDelete