Wednesday, March 13, 2019

मोदींना हरावंच लागेल

opinion poll के लिए इमेज परिणाम

आता पुढले ७० दिवस असे आहेत, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोजच्या रोज पराभव पत्करावा लागणार आहे. मागल्या सतरा वर्षाचा तोच इतिहास आहे. जेव्हा निवडणुकांचे निकाल लागतात, तेव्हाच एकदा मोदी जिंकतात. त्यानंतर पुढल्या निवडणूकांसाठी मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंत मोदींना सतत पराभूत व्हावे लागत असते. यातला फ़रक समजून घेतला पाहिजे. ज्या मतांची कधी मोजणी होत नाही वा निवडणूक आयोग ज्या मतांची दखलही घेत नाही; असे मतप्रदर्शन सतत चालू असते आणि त्यात नेहमी मोदींच पराभूत होत असतात. लोकांना आणि मोदींना आता त्याचीही सवय अंगवळणी पडलेली आहे. निवडणूका मतदानाने जिंकायच्या असतील, तर त्या मत‘प्रदर्शनात’ हराव्या लागतात. हे मोदींच्या राजकीय वाटचालीचे सुत्र बनून गेलेले आहे. सहाजिकच आता पुढल्या सत्तर दिवसात आणि सात फ़ेर्‍यांमध्ये जे मतदान व्हायचे आहे, त्याची मोजणी होईपर्यंत मोदींचा रोजच्या रोज पराभव होण्यालाही पर्याय नाही. ह्या मत‘प्रदर्शनात’ नेहमी जिंकणार्‍यांचे दुर्दैव असे आहे, की निवडणूक आयोग प्रदर्शनातली मते मोजत नाही. किंवा त्यावर निवडणूकांचे निकाल लावीत नाही. सहाजिकच मतप्रदर्शनात मोदींना हरावे लागते आणि त्यांना हरवायला टपलेल्यांना जिंकावेच लागते. ह्यात आता नवे काहीच राहिलेले नाही. गंमत म्हणून मागल्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी जानेवारी-मे अशा प्रदिर्घ साडेचार महिने चाललेल्या मतप्रदर्शन वा मतचाचण्यांचे अडगळीत पडलेले अहवाल काढून मी तपासत होतो. अगदी एक्झीट पोलचेही आकडे तपासले, तेव्हा भाजपा वा नरेंद्र मोदींना कोणी एनडीए म्हणूनही बहूमताच्या जवळपास फ़िरकू देत नव्हता. त्यामुळे १६ मे २०१४ पर्यंत मोदी निमूट पराभव पत्करत चालले होते आणि १६ मे रोजी मतमोजणी होऊनच त्यांना विजयी व्हावे लागलेले होते. मग आता २३ मेपर्यंत मोदींनी पराभूत होण्याला पर्याय आहे काय?

सध्या मार्च महिना चालू आहे आणि पाच वर्षे मागे काय स्थिती होती? तेव्हाही नुकत्याच लोकसभा निवडणुका जाहिर झालेल्या होत्या आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले होते. मग ते वाजपेयी ठरतील का? वाजपेयी होऊन भाजपाला सत्तेपर्यंत घेऊन जातील का? मोदींमुळे भाजपाचा सुपडा साफ़ होईल, की एनडीएला सत्ता मिळेल असे नानाविध प्रश्न विचारले जात होते. पण स्वप्नातही कोणी राजकीय विश्लेषक एनडीएला बहूमत मिळण्याची भाषा बोलत नव्हता. मग भाजपाला एकहाती बहूमत मिळण्याची गोष्ट दुरची होती. मार्च २०१४ च्या सुमारास ज्यांनी मतचाचणी करून भाकिते वर्तवली होती, त्यांचे तेव्हाचे आकडे आजही तपासून बघायला हरकत नसावी. एनडीटिव्ही हंसा यांनी तेव्हा एनडीएला फ़ार तर २३० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर आयबीएन लोकनिती यांनी एनडीएला २४५ पर्यंत मजल मारण्याची मुभा दिलेली होती. टाईम्स नाऊ सी व्होटर यांनी महिनाभर आधी २२७ जागा एनडीएला देऊ केल्या होत्या. थोडक्यात कोणालाही भाजपा अडीचशेचा पल्ला ओलांडण्याची शक्यता दिसत नव्हती की एनडीएलाही बहूमत मिळण्याची खात्री वाटत नव्हती. मग दोनतीन महिने असे मतप्रदर्शन चालले होते. कोण सत्तेत येईल वा कुठल्या आघाडीला सत्ता मिळेल, अशी चर्चा फ़ारशी होतच नव्हती. सगळे मतप्रदर्शन, विश्लेषण वा चाचण्या मोदीचे भवितव्य ठरवत होते. अखेरीस मतदान संपून गेले आणि १२ मे रोजी सगळ्या चाचणीकर्ते व वाहिन्यांनी झालेल्या मतदानाचे एक्झीट पोल जाहिर केले. तेव्हा चाणक्य नावाची संस्था व न्युज २४ ही नगण्य वाहिनी वगळता कोणी एनडीएला बहूमत दिले नव्हते. इंडीयाटुडे वाहिनीने कसेबसे एनडीएला बहूमताच्या दारात आणून उभे केलेले होते. बाकीच्या दिग्गजांना एनडीए वा मोदींच्या अपयशाची पक्की खात्री होती.

आताही रविवारी सतराव्या लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर झाले, त्याच दिवशी दोनतीन वाहिन्यांनी आपापल्या मतचाचण्यांचे अहवाल सादर केलेले आहेत. त्यापैकी कोणालाही एनडीए वा भाजपाला बहूमत देण्याची हिंमत झालेली नाही. सहाजिकच पाच वर्षापुर्वी जे राजकीय अभ्यासक व विश्लेषक छाती ठोकून एनडीएलाही बहूमत हुकण्याची हमी देत होते, तेच आजही मोदींचे दिवस कसे भरले; त्याची ग्वाही देऊ लागलेले आहेत. ही मोदींसाठी नेहमीची लक्षणे आहेत. २००२ सालात गुजरात दंगलीनंतर विधानसभा बरखास्त करून मोदींनी मध्यावधी निवडणूका घेतल्या; तेव्हापासून त्यांना पराभवाची भाकिते ऐकूनच निवडणुका जिंकण्याची सवय लागली आहे. त्याला मागल्या लोकसभेत अपवाद झाला नाही तर आता तरी कसा होईल? त्यामुळेच वेळपत्रक जाहिर झाल्यानंतरचे मतचाचण्य़ांचे आकडे ऐकून मोदी कमालीचे खुश असतील. कारण त्यांना अशा अपशकुनी गोष्टी नेहमीच शुभशकून ठरलेले आहेत. या अनुभवातून एक गोष्ट मोदी शिकलेले आहेत. जोपर्यंत राजकीय विश्लेषक आणि पुरोगामी पत्रकार संपादक मोदींच्या पराभवाची भाकिते करणार आहेत, तोपर्यंत आपण योग्य मार्गाने चाललो आहोत, याची मोदींना नेहमी खात्री वाटते. उलट ज्यादिवशी असे लोक मोदींचे गुणगान करू लागतील, त्यादिवशी मोदींना घाम फ़ुटल्याशिवाय रहाणार नाही. अशा लोकांनी भाजपा वा मोदींना बहूमत मिळण्याची हमी तातडीने दिली, तर अमित शहांची झोप उडून जाईल. (बिहार विधानसभा निवडणूक आठवा) पुरोगामी अभ्यासक आपली पाठ थोपटतात, म्हणजेच काही तरी चुकते आहे, असे या दोघांना वाटू शकेल. कारण मोदींच्या पराभवाची भाकिते ही आता मोदींच्या विजयाची मोजपट्टी झालेली आहे. याचा अगदी ताजा पुरावा आपल्याला विधानसभा निवडणूकांच्या निकालातही मिळालेला आहे. छत्तीसगडला कोणी भाजपाच्या पराभवाची खात्री देत होता?

छत्तीसगडमध्ये कॉग्रेसला निर्णायक बहूमत मिळाले आणि राजस्थान मध्यप्रदेशात मात्र कॉग्रेसला तितके निर्णायक यश मिळू शकले नाही. राजकीय विश्लेषणाची अशी शोकांतिका होऊन गेलेली आहे. त्रिपुरात भाजपाला इतके मोठे यश कोणाला वर्तवता आले होते का? हाच निवडणूकीतले मतदान आणि राजकीय मतप्रदर्शनातला मूलभूत फ़रक असतो व आहे. मतदार आणि अभ्यासक यांच्या मतांमध्ये जमिन अस्मानाचा फ़रक असतो. अभ्यासकांचे दुर्दैव असे, की त्यांच्या मतांवर आयोग निवडणूकांचे निकाल लावत नाही आणि सामान्य मतदार अभ्यासकांइतका बुद्धीजिवी नसतो. त्याला राज्यशास्त्रानुसार जगायचे नसते, तर आपल्या इच्छेनुसार जग चालवायचे असते. मोदी हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी वा अभ्यासक नाही. तोही एका सामान्य घरातून आलेला सामान्य बुद्धीचा माणूस आहे. म्हणूनच तोही सामान्य माणसाच्या पातळीवर विचार करतो आणि समोरचे सत्य निमूटपणे स्विकारतो. ते सत्य मतमोजणी व निकालाच्या दिवशी जगाला मान्य करावे लागत असते. म्हणूनच येणार्‍या सत्तर दिवसात मोदी एक गोष्ट बिनतक्रार करणार आहेत. ती म्हणजे मतप्रदर्शन व विश्लेषणात पराभव पत्करण्याची. त्यालाही पर्याय नाही. दोन महिन्यापुर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्याचीच कबुली दिलेली होती. स्मिता प्रकाश हिने मोदींना अखेरचा प्रश्न विचारला होता. पाच वर्षात काय करायचे राहून गेले? मोदी उत्तरले, दिल्लीच्या बुद्धीमंतांचे अभ्यासकांचे समाधान करू शकलो नाही. तेच असमाधानी असंतुष्ट आत्मे आज मोदींच्या पराभवाची भाकिते रंगवित असतील, तर निकालाच्या दिवशी काय माहोल असेल? त्याचा आपण अंदाज करू शकतो. तोपर्यंत मोदी रोजच्या रोज नित्यनेमाने प्रत्येक चाचणीत पराभूत होतील, याविषयी कोणीही मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. चाचणीत पराभूत होणे, हीच मोदी विजयाची पहिली पायरी ठरली आहे ना?


22 comments:

  1. तुम्ही बरोबर आहात भाऊ...
    तुम्ही देखील राज्यशास्त्राचे विद्यार्थी नाही, कदाचित म्हणूनच तुम्हाला त्रयस्थपणे सगळे पाहता येते...

    ReplyDelete
  2. भाऊ, अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही. आम्हा मोदी आणि भाजप चाहत्यांना धीर आला कारण पेपर, मिडिया, फेसबूक यांंच्यामते मोदींच्या इतका अयशस्वी पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाही

    ReplyDelete
  3. त तुमच भाकित खर ठरो नेहमीप्रमाणे.

    ReplyDelete
  4. Wah Bhau नेहमी प्रमाणे अप्रतिम

    ReplyDelete
  5. "Tactics without strategy,” as Sun Tzu wrote in the Art of War, “are the noise before defeat.”

    Lack of understandable strategy from opposition is what I am deriving from...

    हाच प्रकार तर नसेल चालू ?🤔

    ReplyDelete
  6. अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही, भाऊ, आम्हा मोदी आणि भाजप चाहत्यांना धीर आला कारण पेपर, मिडिया, फेसबूक यांंच्यामते मोदींच्या इतका अयशस्वी पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाही, नेहमीप्रमाणे तुमचे भाकात खरे ठरो. जय हिंद

    ReplyDelete
  7. भाऊ सगळ्या पोल पंडितांनी उत्तर प्रदेशात अखिलेश आणि मायावती आघाडीला 80 पैकी 65 जागा देऊन टाकल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मते मोदींना बहुमत मिळणार नाही हे नक्की,23 मे पर्यंत त्यांना या आनंदात राहू द्यायला काय हरकत आहे? छत्तीसगड मध्ये सगळ्यांनी भाजपला बहुमत देऊन टाकले होते त्याची चिरफाड आपण एकदम मस्त केली आहे.

    ReplyDelete
  8. भाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय करावे?

    ReplyDelete
  9. हे भाकीत खरेच होणार यात शंकाच नाही भाऊ. ..मी फटाके खरेदी करून ठेवले. .

    ReplyDelete
  10. श्री भाऊ काही दिवसांपूर्वी तुम्ही भाकीत केलं होतं मोदी 300 पार आता खर वाटायला लागलंय

    ReplyDelete
  11. मोदी पुढील काळात गरज आहे

    ReplyDelete
  12. भाऊ, तुम्ही २००२ सालची गुजराथ विधानसभा निवडणूक विसरलात का? २००२ च्या दंगलीनंतर आणि नरेंद्र मोदींच्या नेतृतवाखाली झालेली निवडणूक होती. त्यावेळी एक-दोन अपवाद वगळता सर्व वाहिन्यांनी परत भाजप सत्तेवर येईल असा opinion poll आकडेवारीनिशी दाखवत होते. त्यावेळी सट्टाबाजारातील कल दाखवत असत. तो कल भाजपच्या विरुद्ध कॉन्ग्रेसच्या बाजूने होता. निवडणूकीपूर्वी १५ दिवस आधी सर्व वाहिन्यांनी बाजू बदलली. सर्वांनी opinion poll कॉन्ग्रेसच्या बाजूने व भाजपच्या विरुद्ध दाखवायला सुरुवात केली. निवडणुकीनंतर केलेल्या exit poll मध्येपण असेच दाखवले गेले. प्रत्यक्षात भाजपने दणदणीत विजय मिळवला. तेव्हा या वाहिन्यांवर किती विश्वास ठेवायचा?

    ReplyDelete
  13. या निवडणुकीत भाजप स्वतः २/३ जागा घेईल असं मला खूप आधीपासून वाटतंय. रालोआ च्या एकूण जागांबद्दल मात्र मला मत व्यक्त करायचं नाही.

    मोदी / शहा या जोडगोळीला एक चांगलं समजतं. कोणतीही गोष्ट करायची ती सत्तेच्या बाहेर राहून फार संथगतीने होते. सत्तेत्तूनच ते लवकर साधते. त्यामुळे जे जे शक्य ते सर्व करून बाजी मारायची हे त्यांना माहित आहे. ठकास ठक हीच भाषा ते वापराताहेत. त्यामुळे आता हे योग्य का अयोग्य हा प्रश्नच उरत नाही. गटार साफ करणारा स्वतःचे पाय बरबटले म्हणून गटारात उतरायचं थांबत नाही.

    आत्तापर्यंतच्या अनुभवाने एवढे तरी आपण नक्कीच समजू शकतो की ही जोडगोळी एकदा झालेली चूक शक्यतो पुन्हा होऊ देत नाही. त्यांना नक्की कल्पना असणार की आपल्या कुठून आणि किती जागा कमी होतील.. त्याबरहुकुम तेवढ्या जागा इतरत्र भरून काढाव्या लागणार. ते बरोबर ते करताहेतच. ईशान्यभारत आणि प. बंगाल ह्यांत मिळून ४० जागा घेण्याचं ते ध्येय ठेवतील असं दिसतंय. असो.

    ReplyDelete
  14. नमस्कार भाऊ,

    थिंक बँक युट्युब चॅनल वरचे तुमचे व्हिडियोज पाहिले, त्या चॅनल वर एकूण ६० व्हिडियोज अपलोड झाले आहेत ते सगळे व्हिडियोज एकूण १ लाख ४८ हजार लोकांनी पहिले आहेत. त्या ६० व्हिडियोज पैकी ५ व्हिडियो तुमचे आहेत आणि केवळ त्या ५ व्हिडियोज ना १ लाख ५ हजार जणांनी पहिले आहे. म्हणजे त्या चॅनल वर केवळ ८ टक्के कन्टेन्ट तुमचा असूनही एकूण ७२ टक्के प्रेक्षक तुमच्या व्हिडियोज मुळे तिथे आले आहेत. तुम्ही स्वतःचे चॅनल सुरु केल्यास कोट्यवधी लोकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी मदत होईल.

    तुलना करू नये पण वृत्तवाहिन्यांवर रोज दिसणाऱ्या पत्रकारांपेक्षा ५०० टक्के जास्त प्रेक्षक तुमच्यामुळे तिथे आले आहेत, आम्ही टीव्हीवर वृत्तवाहिन्या पाहण्यापेक्षा तुमचे व्हिडियोज पाहू.

    कृपया तुम्ही स्वतःचे युट्युब चॅनल सुरु करा म्हणजे त्यावर तुमचे नियंत्रण राहील आणि इतरांचा संभाव्य हस्तक्षेप होणार नाही, बाकी काळजी आम्हा प्रेक्षकांवर सोडा. कृपया इतर वाचकांनी ह्याला समर्थन द्यावे आणि हा संदेश भाऊंपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी.

    ReplyDelete
    Replies
    1. Agree... I have revisited Facebook after many years only to follow Bhau...

      Delete
    2. भाऊ..यावर नक्की विचार करावा.

      Delete
    3. You are right.we want bhaus channel

      Delete
    4. khar aahe youtube channel suru kara

      Delete
    5. भाऊचा धक्का हे चॅनेल You Tube वर शोधा.

      Delete
    6. माझ्या मनातील ही कल्पना आपण अगदी योग्य शब्दात शब्दबद्ध केली आहे...

      Delete
  15. भाऊ काका, एखादा लेख राज ठाकरेंचं जे काही राजकारण चालू आहे सध्या त्यावर कृपया लिहा। आणि आम्हाला मार्गदर्शन करा।

    ReplyDelete