Friday, March 1, 2019

महागठबंधनाचे चिटफ़ंड

lalu के लिए इमेज परिणाम

जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे महागठबंधन म्हणून चाललेले नाटक विस्कटू लागलेले आहे. हा सगळा मुळातच दिवाळखोर प्रकार आहे. कुठल्या पक्षाला आपले प्रभावक्षेत्र निर्माण करूनच राजकारणात आपला जम बसवता येत असतो. त्याच बळावर निवडणूकाही जिंकता येत असतात. भले मते कमीअधिक असू शकतात. पण निष्ठावान अनुयायी असलेल्या पक्षालाच बाजी मारता येत असते. तशी कुठलीही मेहनत घ्यायची नाही आणि नंतर माध्यमात बातम्यांचा गलबला करून इतर पक्षांच्या आघाडीतून आपल्या पोळीवर तुप ओढून घेण्याचा प्रकार नेहमी चालत नाही. हा जुनाच अनुभव आहे. पण आपापल्या क्षेत्रात प्रभावशाली असलेल्या अनेक पक्षांना मोदी-शहा जोडीने गोंधळून टाकलेले आहे. २०१४ मध्ये त्यांनी उत्तरप्रदेश वा बिहारमध्ये नगण्य मानल्या जाणार्‍या प्रादेशिक पक्षांची प्रभावक्षेत्र अभ्यासून त्यांनाही सोबत घेतले आणि त्यांच्याच मतांवर ७१ लोकसभा जागा जिंकल्यापासून पराभूत कॉग्रेस व अन्य पक्षांनाही तीच रणनिती आपल्याला जिंकून देईल असे वाटू लागले. त्यातूनच मग महागठबंधन नावाची संकल्पना गोंधळ घालू लागली. बिहारमध्ये नितीश लालूंनी महागठबंधन केले आणि भाजपाचा पराभव घडवून आणला हे सत्य आहे. पण त्यात फ़ुकटे वा दिवाळखोर पक्ष कोणी नव्हते. लालू वा नितीश यांनी आपल्या कुवतीनुसार जागावाटप केले आणि सगळी ताकद झोकून देत मोठा विजय संपादन केला होता. तेव्हा त्यात जितन मांझी नव्हते की राष्ट्रीय लोकसमता पक्षाचा समावेश नव्हता. ते भाजपाच्या सोबत होते आणि त्यांच्या नसलेल्या शक्तीसाठी अधिक जागा घेऊन त्यांनी भाजपाचा पराभव ओढवून आणला होता. आता असेच लोक महागठबंधनाला ग्रहण लावून बसले आहेत. त्यांना फ़ुकटात अधिक जागा हव्या आहेत आणि त्यांचे नखरे संभाळताना लालू, शरद पवार, कॉग्रेस किंवा तत्सम पक्षाच्या नाकी दम आलेला आहे.

भाजपाने जिथे युत्या आघाड्या केल्या तिथे जागावाटप कधीच उरकून घेतले आहे. पण सहाआठ महिन्यापुर्वी महागठबंधनाची गुढी रोवून अखंड गर्जना करणार्‍या कॉग्रेस किंवा तत्सम पक्षांना अजून आपापल्या राज्यातलेही जागवाटप करता आलेले नाही. ताज्या बातमीनुसार लालूंच्या राजद पक्षाच्या नेतॄत्वाखाली जॊ बिहारमधे आघाडी उभी राहिली आहे, तिला सर्व मित्र पक्षांना समाधानी राखायचे असेल तर ७० जागा तरी हव्या आहेत. पण बिहारमध्ये फ़क्त ४० जागा आहेत. मग खुद्द लालूंच्या पक्षाने कुठल्या व किती जागा लढवायच्या? उदाहरणार्थ दोन महिन्यापुर्वी मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले उपेंद्र कुशवाहा यांना लोकसभेच्या चारसहा जागा तरी हव्यात. म्हणून ते लालूंच्या गोटात आलेले आहेत. त्यांना भाजपा दोनपेक्षा अधिक जागा देत नाही म्हणून रोष होता. दुसरीकडे जीतनराम मांझी यांना किमान ४ जागा हव्यात. नितीशकुमार यांच्यावर रागवून बाजूला झालेले शरद यादव यांच्या पक्ष संघटनेचा अजून पत्ता नाही आणि त्यांनाही निदान चारपाच जागा हव्याच आहेत. याखेरीज त्या आघाडीतला महत्वाचा पक्ष कॉग्रेस आहे. त्यांनाही बारासोळा जागा हव्यात. अशी सगळी बेरीज करायला गेल्यास ४० च्याही पुढे जाते आणि त्यांच्या मागण्यांची पुर्तता करायची तर लालूंच्या पक्षाला एकही जागा शिल्लक उरत नाही. की आघाडी व मोदींच्या पराभवासाठी कुठलीही जागा न लढवता मित्र पक्षांचे खासदार लोकसभेमध्ये निवडून पाठवण्यासाठी लालूंनी महागठबंधन केलेले आहे? यातला एक मजेशीर किस्सा वाचायला मिळाला. मांझी चार जागा मागण्यासाठी तुरूंगात असलेल्या लालूंना भेटायला गेलेले होते. त्यांची मागणी ऐकून लालूंनी चार उमेदवारांची नावे सांगा म्हटले तर मांझी एकही नाव सांगू शकले नाहीत. मग ते कोणासाठी जागा मागत होते? यातून एक गोष्ट लक्षात येते, की अशा मित्रपक्षांचा कुठलाही प्रत्यक्ष उपयोग नसून त्यांना अधिकाधिक लाभ मात्र हवा आहे.

जी कहाणी बिहारमध्ये आहे तीच महाराष्ट्रातही आहे. दोन्ही कॉग्रेसची आघाडी झालेली आहे. पण तेवढ्या बळावर डझनभर जागा जिंकण्याची दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला अजिबात शाश्वती नाही. म्हणूनच त्यांना कुठलेही बाजारबुणगे सोबत आले तर हवे आहेत. सहाजिकच असे भुरटे वा किरकोळ पक्ष त्यांना हुलकावण्या दाखवित आहेत. शेतकरी संघटना आता तीन जागा मागते आहे. मागल्या खेपेस त्यांना एनडीएने दोन जागा दिल्या होत्या आणि राजू शेट्टींची हातकणंगले सोडल्यास त्यांना माढ्यातली जागा मोदी लाट असूनही जिंकता आलेली नव्हती. पण त्यांना तीन जागा हव्या आहेत., विधानसभेतही त्या पक्षांनी अशाच अधिक जागा मागून एकही जिंकून दाखवली नव्हती. प्रकाश आंबेडकरांनी मुळात आपल्या भारीप म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जोडीला आदिवासी वगरे विविध संघटना जोडून घेत मागल्या काही काळामध्ये भारीप बहूजन महासंघ नावाचा पक्षच बनवला आहे. पण डझनभर विधानसभा व एखादी लोकसभा वगळल्यास त्यांना त्या महासंघाचा प्रभाव कुठेही दाखवता आलेला नाही. त्यांनी आता हैद्राबादच्या ओवायसींच्या मुस्लिम पक्षाला हाताशी धरून वंचित आघाडी स्थापन केलेली आहे. ते राज्यातल्या सर्व जागाही लढवण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. आघाडीत यायचे तर त्यांनी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे १२ जागांची मागणी केली आहे. कमीतकमी ८ जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. याखेरीज राज ठाकरे यांच्या मनसेलाही त्याच आघाडीत एकदोन तरी जागा मिळाव्यात, असा प्रयत्न आहे. इतक्या सगळ्याना भागवले तर कॉग्रेस राष्ट्रवादीसाठी कितीशा जागा शिल्लक रहातील? आणि त्यातून किती जिंकूल लोकसभेत जातील? की त्या मोठ्या दोन पक्षांनी इतरांना निवडून आणण्यासाठी स्वार्थत्याग करायचा आहे? आमच्यात या, लौकर या, असला डंका पिटणे वेगळे आणि असे गिर्‍हाईक आल्यास त्याच्या अपेक्षा पुर्ण करणे वेगळे असते.

भाजपाला सोडून येणारे पक्ष वा भाजपापासून दुर ठेवायचे असे लहानमोठे पक्ष; आता शिरजोर झाले आहेत. आपण मतांचे पंख छाटण्याची किंमत मिळू शकते म्हणूनच अडवणूकीची भूमिका ठामपणे घेतली पाहिजे, अशी त्यांनी समजूत करून घेतली आहे. म्हणून उत्तरप्रदेश बिहार वा महाराष्ट्र अशा राज्यात या छोट्या पक्षाच्या नेत्यांनी कॉग्रेस किंवा महागठबंधनाची टिमकी वाजवणार्‍या पक्षांना ओलिस ठेवण्याचा पवित्रा घेतलेला दिसतो. एकप्रकारे हा सगळा प्रकार राजकीय उरला नसून चिटफ़ंड होऊ लागला आहे. चिटफ़ंडात पैसे गुंतवणार्‍यांना आरंभी वाटेल तशी आश्वासने व आमिषे दाखवली जातात ना? त्यापेक्षा मोदी द्वेषाचे राजकारण किंचीतही वेगळे उरले नाही. जो कोणी मोदींना शिव्याशाप देईल, त्याचे बाहू पसरून स्वागत करताना उभे राहिलेले महागठबंधन आता आपल्याच ओझ्याखाली कोसळण्याची परिस्थिती आलेली आहे. कारण या मोठ्या पक्षांनी मोदींना हरवण्यापुर्वीच त्यांचेच मित्रपक्ष त्यांना जागावाटपात हरवायला कटिबद्ध झालेले आहेत. चंद्राबाबूंनी एनडीए सोडली तशीच उपेंद्र कुशवाहांनी भाजपाची साथ सोडली. आता ज्या विरोधी आघाडीत ते सहभागी आहेत, त्यात त्यांना अपेक्षित लाभ मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे ते पक्ष व नेते नाराज होत चालले आहेत. त्यांची समजूत घालण्यातच मोठ्या पक्षांचा वेळ खर्ची पडत असून, जागावाटप उरकून प्रचारकार्याला लागणे महागठबंधन चालवणार्‍यांना शक्य झालेले नाही. एकूण काय महागठबंधनाचे जागावाटप व्हावे आणि सर्व मित्र पक्षांना समाधानी राखायचे असेल, तर हाताशी लोकसभेच्या ९००-१००० जागा असायला हव्या. पण तितक्या जागा नाहीत आणि अशा पक्षांना हुसकावून लावणेही शक्य नाही. त्यामुळे चिटफ़ंडाचे चालक जसे देण्याची वेळ आल्यावर कालापव्यय व टाळाटाळ करू लागतात, तशी अवस्था महागठबंधनाच्या म्होरक्यांची होऊन गेली आहे.


10 comments:

  1. शरद पवारांची परिस्थिती तर पाहवत नाही. परवा एका चॅनेल वर, राहुल गांधीच्या पाठीमागे ऊभे होते. एकेकाळी काँग्रेसला लाथ मारून राष्ट्रवादी ऊभी केलेले हेच का ते ?

    ReplyDelete
  2. Very apt and to the point analysis.
    I am a great fan.
    Thank you.

    ReplyDelete
  3. चिटफंड ? चीट(फसवणारा ) की मराठी चीत (हरलेला) फंद ( उद्योग ) !

    ReplyDelete
  4. भाऊ बरोबर विश्लेषण काल कोल्हे साहेब ncp मध्ये गेलेत . ते आणि मनसे ( मना पासून नको असलेली सेना ) यांच्या वर लेख लिहाना

    ReplyDelete
  5. भाऊ सध्या मिडीया फक्त भारत पाकिस्तान घडामोडींना स्थान दैत आहे. रामजन्माभूमि, महागठबंधन,प्रियांका गांधि हे विषय मागे पडले आहेत.पंतप्रधान मोदी अगदी सामान्य स्थिती असल्याप्रमाणे बैठका,ऊद्घाटन,निवडणुक प्रचार यासाठी दौरे व भाषणे ईत्यादी ठरल्या प्रमाणे करत आहे. विरोधक व महागठबंधन मधिल नेत्यांना मोदी विरोधात निवडणूक प्रचार करणे अवघड होऊन बसले आहे व मोदी विरोध करण्याचे धाडस होत नाही. सध्या मोदी विरोधि काहीही ऐकायला जनता तयार नाही.मोदी
    विरोधकांचे सगळे मुद्दे आता अडगळीत गेले आहेत. महा गाठबंधनाचे भवितव्य काय आसणार हे सांगायला ज्योतिषाची गारज नाही. भाऊ सध्या काश्मिर मध्ये हुरियतचौया विरोधात बर्याच हालचाली व घडामोडी चालल्या आहेत पण त्याला प्रसिद्धी दिली जात नाहिये. कलम 35आ व 370 काढण्या साठी हीच वेळ आहे अमला वाटते.

    ReplyDelete
  6. भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला ताकदीपेक्षा खूप जास्त जागा देऊन घोडचूक केली आहे. लोकसभेसाठी सेनेला जास्तीत जास्त ८-१० जागा व विधानसभेसाठी जास्तीत ९०-९५ जागा द्यायला हव्या होत्या. विधानसभेसाठी १२२ जागा जिंकणारा भाजप १३०-१३५ जागा लढविणार व ६३ जागा जिंकणारी सेना सुद्धा १३०-१३५ जागा लढविणार. २०१४ नंतर सेनेचे अस्तित्व नगण्य झाले आहे. भाजपने सेनेशी युती करायला नको होती व युती करायचीच होती तर सेनेला ताकदीच्या प्रमाणात अगदी थोड्या जागा द्यायला हव्या होत्या.

    ReplyDelete
  7. Long live bhau. Whay next with pakiPaki?


    Love from hyHyderab

    ReplyDelete
  8. मोदीला रोखणारे आता नाही कोणीच.
    भाऊ आता कलम ३७० व ३५ अ वर लेख लिहा कारण पाकीस्तान या कलमाचा जोरदार वापर करत काश्मीर मध्ये
    जोपर्यंत ईतर धर्मीय लोकसंख्या वाढत नाही तोपर्यंत पाकीस्तान तेथे स्थानिक लोकांच्या मदतीने धिंगाणा घालणार.
    गंमत पहा
    जमिन म्हणजे काश्मीर आपले काश्मिरी आपले आत्मघातकी आपलेच मरतय कोण आपले जवान मजा कोण मारतय पाकीस्तान
    जगातील हे एकमेव ऊदाहरण असावे.

    ReplyDelete
  9. भाजपाने शिवसेनेला 23 सोडुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. एकट्याने लढवल्या तर आताही किमान 35 जागा सहज जिंकतील. सेनेबरोबर युती करून सहानुभूती गमावून बसला आहे आणि सेनेच्या जेमतेम 10 आणि स्वतःच्या सेनेबरोबर असल्यामुळे 17-18 अशा 28-30 पर्यंत मजल मारेल. सेनेला युती केल्याने फायदाच होणार आहे ज्या एकट्याने लढून 3-4 मिळाल्या असत्या त्या आता भाजपामुळे 10 पर्यंतच मिळतील त्यापेक्षा नाही . सेनेने भाजपाचा बकरा केला आहे.स्वतला फायदा होणार नाही हे लक्षात आले आहे आणि म्हणूनच भाजपाला द्यायचा नाही

    ReplyDelete
  10. भाऊ,,खर म्हणजे भाजपने शिवसेनेबरोबर. युती करायला नको होती . माझ्या मते खुप मोठी चूक झालीय.लोकांनी याचा विचार करायला हवा.

    ReplyDelete