Wednesday, November 11, 2015

कोणी काय मिळवले, काय गमावले?

यश टिकवण्याची गरज किती जिकीरीची आहे?



बिहार विधानसभा निकालाचे प्रत्येकजण आपापल्या परीने निरीक्षण व परीक्षण करतो आहे. राजकीय विश्लेषकांचे तेच तर काम आहे. पण अशा संघर्षात जे लोक प्रत्यक्ष उतरतात, त्यांनाही भविष्यातल्या वाटचालीसाठी आत्मपरिक्षणाची खरी गरज असते. कारण अशा निकालाचे परिणाम त्यांनाच भोगावे लागत असतात. मग त्यात यश मिळालेले असले, तरी परीक्षणातून सुटका नसते. कारण मिळालेले यश टिकवणे ही मोठी जबाबदारी बनते. याच्या उलट ज्यांना अपयश मिळालेले असते, त्यांनाही कुठे चुकले, त्याचा अभ्यास करून भविष्यात त्या चुका टाळण्यासाठी अभ्यासाची गरज असतेच. यापैकी कुठले पक्ष तितक्या गंभीरपणे निकालांच अभ्यास करतात, हे कोडे आहे. कारण फ़ार थोडे नेते वा पक्ष अशा निकालातून धडा शिकून पुढल्या राजकारणात सुधारणा करताना दिसतात. शिवाय सहसा राजकीय अभ्यासकही वास्तविक चिंतन करून विश्लेषण मांडत नाहीत. म्हणून राजकीय कार्यकर्त्याला वा पक्षांना योग्य मार्गदर्शन होत नाही. उदाहरणार्थ बिहारमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला हे दिसतेच आहे. पण तो जिंकण्या हरण्याच्या जागेपुरता मर्यादित आहे. आणि तोच निकष वापरला तर लालू नितीश वा कॉग्रेस यांनी मोठे यश संपादन केलेले दिसते. पण पक्षाच्या मतांकडे बघितले, तर या मोठ्या यशातही त्यांनी काय गमावले, त्याचे चित्र स्पष्ट होत नाही. राहुल गांधी यांनी तर आपण पुन्हा देशाची सत्ता कमावली अशा सूरात प्रतिक्रीया दिल्या आहेत. पण आधीच्या निवडणूकीत स्वबळावर लढताना मिळवलेली मतेही आपला पक्ष टिकवू शकला नाही, याचा थांगपत्ता या तरूणाला लागलेला नाही. २०१० मध्ये कॉग्रेस नव्याने उभी करण्याच्या इर्षेने सर्व जागा लढवताना चारच आमदार पदरी पडले होते, त्याच्या सहापटीने आमदारसंख्या वाढल्याने कॉग्रेस खुश आहे. त्यातला धोका त्यांना किती समजला आहे?

११९३ सालात भाजपाचे आव्हान पेलताना पक्षाध्यक्ष पंतप्रधान नरसिंहराव यांनी उत्तर प्रदेशात कांशिराम यांच्याशी युती केली आणि देशातील त्या राज्यात कॉग्रेस कायमची संपली. नंतरच्या चारपाच विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला ४०० पैकी ३० पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्याच्याही आधी भाजपाने रथयात्रा अडवली गेली म्हणून मुलायमचा पाठींबा काढून घेतला. तेव्हा पुरोगामी मुलायमना कॉग्रेसने पाठींबा देवून वाचवले होते. तेव्हा पक्षाचे ९० आमदार विधानसभेत होते. आता पंचवीस वर्षे व पाच निवडणुकांनंतर पक्षाला तितकाही पल्ला उत्तर प्रदेशात गाठता आलेला नाही. थोडक्यात १९९० पर्यंत स्वबळावर तिथे सत्ता गाजवणार्‍या कॉग्रेसला आता नगण्य पक्ष होऊन रहाण्याची वेळ आली आहे. बिहार उत्तरप्रदेश या दोन राज्याच्या बळावर कॉग्रेस कायम देशातली सत्ता मिळवत वा गमावत राहिली. १९९० नंतर तिथे पाय रोवून उभे रहाण्या इतकेही यश कॉग्रेस संपादन करू शकलेली नाही. त्याचे एक कारण तिथे पक्षाला प्रादेशिक खंबीर नेता मिळू शकलेला नाही की पिढीजात असलेला मतदार परत मिळवला आलेला नाही. उलट एकदा कॉग्रेसचा मतदार आघाडीतून आपल्या पंखाखाली घेतलेल्या मायावतींनी तो माघारी जाऊ दिलेला नाही. ही बाब लक्षात घेतली तर बिहारमध्ये २४ जागा मिळवताना कॉग्रेसने काय गमावले, ते लक्षात येऊ शकेल. २४३ पैकी ४० जागा लढवताना कॉग्रेसने २०० जागी अजून टिकून असलेला आपला पिढीजात मतदार लालू-नितीशच्या गोठ्यात नेवून बांधला आहे. त्यातला किती मतदार परत कॉग्रेसला आपल्या स्वबळाच्या लढाईत माघारी आणता येईल? त्यातला बहुतांश मतदार कायमचा पर्याय म्हणून दुसर्‍या गोटात गेला आहे. पुन्हा बिहारमध्ये स्वबळावर उभे रहाण्याचा विचारही आता कॉग्रेस करू शकणार नाही. काहीशी तीच कहाणी नितीशची होणार आहे.

या अटीतटीच्या लढाईत नितीशनी आपले मुख्यमंत्रीपद टिकवले हा विजयापेक्षाही बोनस आहे. कारण त्यांच्यासाठी मोदींचे नाक कापणे हे ध्येय होते आणि ते साधले गेले आहे. पण त्यासाठी दोन दशके ज्या लालूंवर जंगलराज असा आरोप केला, त्यांचे पाप नितीशनी पदरात घेतले आहे. लालूंना विरोध करताना मिळवलेल्या ११६ जागांपैकी ३०-३५ जागा नितीशनी गमावल्या. पण त्याचवेळी दिडशे मतदारसंघात आपल्या पाठीराख्यांना गमावलेले आहे. म्हणजेच बिहारच्या निकालांनी सर्वाधिक लाभ लालूंचा झाला आहे. त्यांनी नुसत्या सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत. कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा दिलेली असली, तरी लालूंनी मतदानातून आपले पापक्षालन झाल्याचे सिद्ध करण्यापर्यंत मजल मारली आहे. तो मोठा पल्ला आहे. आता कोणी त्यांच्यावर चाराघोटाळा वा जंगलराज असा आरोप करून अपप्रचार करण्यात अर्थ राहिलेला नाही. शिवाय नितीशला मुख्यमंत्रीपदी कायम ठेवून सत्तेची ‘रबडी’ खायला लालू मोकळे आहेत. नितीश मात्र वेगळे होऊन लालूंना गुन्हेगार ठरवू शकणार नाहीत. दुसरी बाब लालूंनी हा सगळा खेळ यशस्वी करताना कॉग्रेसमध्ये आपण सोनियांना मोजतो आणि राहुल आपल्या खिजगणतीत नाही, हे कृतीनेच सिद्ध केले. राहुल स्वेच्छेनेच लालूंपासून फ़टकून वागले. पण त्याकडे दुर्लक्ष करून लालूंनी सोनियांशी व्यवहार केले आणि ते कॉग्रेसला लाभदायक ठरल्याने निदान सोनियांना लालूंच्या शब्दाला पुढे किंमत द्यावीच लागेल. डावे पुरोगामी असलेल्या पक्षाच्या राजकारणात आता मुलायम इतकी लालूंची उंची वाढली आहे. म्हणजेच मुलायमना शह देण्यात लालू यशस्वी झाले. जुन्या जनता परिवाराचे पुनरूज्जीवन करण्यात पुढाकार घेऊन लालू राष्ट्रीय राजकारणात पुन्हा उभारी घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यात थोडीफ़ार यश आले तरी मुलायमच्या हातून जनता नेतृत्वाचा पुढाकार निघून जातो.

इतके विवेचन केल्यावर भाजपाने काय गमावले त्याचीही मांडणी अगत्याची आहे. वरकरणी बघितले तर भाजपाने असलेल्या ४० जागा गमावल्या आहेत. सत्ता मिळवणे जिकीरीचे काम होते. पण ती हुकली म्हणून फ़ार काही गमावले असे म्हणायला अर्थ नाही. लालू नितीश कॉग्रेस यांनी एकत्र आल्याने भाजपासाठी बहुमताचा पल्ला गाठणे सोपे नव्हते. म्हणूनच असलेल्या ९१ जागा टिकवणेही मोठे यश ठरले असते. त्यातल्या जवळपास निम्मे जागा गेल्या हे नुकसानच आहे. पण त्याहीपेक्षा मोठे नुकसान राजकीय पुढाकाराचे आहे. बिहारमधील भाजपा-जदयु आघाडी मोडल्यावर तिथल्या राजकारणाचा पुढाकार भाजपाकडे आलेला होता. लोकसभा निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. तोच पुढाकार हिरावून घेण्यासाठी लालू नितीश एकत्र आलेले होते. म्हणजेच सत्तेपेक्षा बिहारमधला राजकीय पु्ढाकार आपल्यापाशी ठेवणे, हे भाजपासाठी मोठे उद्दीष्ट असायला हवे होते. आज सत्तेबाहेर राहूनही लालूंनी तो पुढाकार आपल्या हाती ठेवला आहे. उलट महाराष्ट्रात सत्ता हाती असूनही भाजपाला इथे राजकीय पुढाकार हाती घेता किंवा राखता आलेला नाही. पुढाकार म्हणजे तुम्ही काय करता, त्यावर इतर पक्षांची धोरणे व भूमिका ठरतात. आता बिहारमध्ये लालू काय करतात, यावर तिथले राजकारण हलेल डोलेल. पण त्याचा लाभ उठवून लालू राष्ट्रीय राजकारणात मोदीविरोधी राजकारणाचा पुढाकार आपल्या हाती घेणार आहेत. तशी त्यांनी घोषणाही केलेली आहे. किंबहूना आपला अजेंडा व पुढाकार सिद्ध करताना सोनियांना सोबत ठेवून राहुलला नामोहरम करण्याची रणनिती लालू राबवतील आणि कॉग्रेसला काही काळतरी त्यामागे फ़रफ़टावे लागेल. इतर नामोहरम डाव्या पुरोगामी पक्षांनाही लालूंच्या मदतीला सक्तीने जावे लागेल. भाजपाने फ़क्त जागा बिहारमध्ये गमावल्या नाहीत, तर राजकीय पुढाकार गमावला आणि लालूंनी तो कमावला आहे.

4 comments:

  1. Seriously Complete Analysis
    यथायोग्य आणि संपूर्ण विवेचन. मला कळंत नाही की जे पक्ष राजकारणात इतकी वर्ष सक्रीय आहेत त्यांच्याकडे अशी जयापजयाची मिमांसा करणारे मुळातच नसतील? की त्यांच्याकडे सत्तापिपासू नेते लक्ष देत नसतील?

    ReplyDelete
  2. योग्य मूल्यमापन. भाजपा मध्ये सत्ता आल्यावर अहंकार बळावला हे मुख्य पराभवाचे कारण आहे. त्यापायी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. एक तर बिहार मध्ये एक स्थानिक नेता उभा करता आला नाही. मोदींसारखा नेता जो देशाचा पंतप्रधान आहे तो बिहार या राज्यासाठी झुंजतो आहे असे चित्र उभे राहिले. मिडियाने अनेक वादविषय उकरून काढले पण त्याला तोंड देण्यात भाजपा अयशस्वी ठरला. आणि भागवतांना अनेक मुद्दे नको तेव्हां आठवले. इतकी वर्षे काँग्रेसचे राज्य होते तेव्हां गप्प असणारे भागवत अचानक मदर टेरेसा, हिंदूंची संतती व आरक्षण या मुद्द्यांवर आताच का बोलले हा मोठाच प्रश्न आहे.

    ReplyDelete
  3. मदर टेरेसा, हिंदूंची संतती ह्यात बिहारच्या ग्रामीण जनतेला अजिबात स्वारस्य नाही. हे सगळे शहरी/ महानगरी मानसिकतेचे प्रसार माध्यमांनी उभे केलेले विषय आहेत.
    भाजप निवडणुका जिंकेलही पण सरकारी अधिकारी / कर्मचारी म्हणजे "नोकरशाहीचा बुरखा" घालून वावरणारी व काँग्रेसने आरक्षण व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पोसलेली काँग्रेसचीच फौज आहे, ती बदलण्यास मोदींसारखे नेते प्रत्येक राज्यात, प्रत्येक नगर पालिकेत, प्रत्येक ग्राम पंचायतीत असणे गरजेचे आहे पण तसे होणे फार कठीण आहे.

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    अतिशय नेटकं आणि नेमकं विवेचन केलंत. गंमत बघा, ज्या नीतिशकुमारांना राष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रतिस्पर्धी बनायचं होतं, ते बिहारमध्येच अडकून पडणार. आणि जे लालूप्रसाद स्वत:च्या कर्माने अडगळीत जाऊन अडकले होते, ते स्वत:स राष्ट्रीय स्तरावर प्रक्षेपित करणार. लालूंच्या पांचो उंगलिया घी में. फक्त मुलायमसिंहाना खच्ची करावं लागेल. त्यासाठी भले भाजपशी आतून हातमिळवणी करावी लागली तरी बेहत्तर. मुलायमना पाडायचं राजकारण येत्या उप्र विधानसभा निवडणुकांत लालू खेळणार असं दिसतंय.

    आ.न.,
    -गा.पै.

    ReplyDelete