Monday, December 7, 2015

तिसरा पर्याय असेल तर सांगा



 'An appeaser is one who feeds a crocodile, hoping it will eat him last.', Winston Churchill

काही गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत नाहीत. पण म्हणून त्या टाळता येत नाहीत. त्यांच्यापासून पळता येत नाहीत. नाकारल्या तरी त्या आपला पाठलाग करतच रहातात आणि एके दिवशी नेमक्या कोंडीत पकडतात. हा इतिहास आहे. पण त्यापासून आपण काहीही शिकत नाही. दुसरे महायुद्ध होण्याची काही गरज होती काय? थोडा शहाणपणा व तारतम्य तात्कालीन मोठ्या जागतिक नेत्यांनी दाखवले असते, तर ते युद्ध टळले असते आणि त्यात जे लक्षावधी निरपराध हकनाक मारले गेले त्यांना जीवदान मिळाले असते. कोट्यवधी लोकांचे जीवन उध्वस्त होऊन गेले, तेही टाळता आले असते. पण वास्तवापेक्षा आपल्या मुत्सद्देगिरीच्या आहारी गेलेल्यांनी त्यांच्यावर विसंबलेल्या कोट्यवधी लोकांचा विश्वासघात केला आणि त्यांना विनाश व मृत्यूच्या खाईल लोटून दिले. याचे कारण त्याच महायुद्धाचा एक सेनानी विन्स्टन चर्चिल नेमक्या शब्दात सांगतो, जे त्याचे विधान वर उधृत केले आहे. मगर आपल्याला सर्वात शेवटी खाईल म्हणून तिला खाऊ घालत रहातो, तोच खुशामतखोर असतो, असे चर्चिल म्हणतो आणि हिटलर नावाच्या नाझी भस्मासूराला असेच प्रसन्न करण्याच्या नादात तेव्हाच्या बड्या नेत्यांनी अवघ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटले होते. हा भस्मासूर आज ना उद्या आपल्यालाही खाणार, कारण त्याची भूक शमणारी नाही, हे स्पाष्ट दिसत होते. पण दुसर्‍याला ठार मारून त्याचा चट्टामट्टा करणार्‍या त्या पशूला खुश राखण्याची मुत्सद्देगिरी तेव्हा चालली होती आणि आजही चालू आहे. तेव्हा सर्व सभ्यतेला तिलांजली देवून हिटलरने पोलंडवर हल्ला केला आणि तशा स्थितीत जर्मनीशी लढण्याचा केलेला करार विसरून फ़्रान्सने तिकडे पाठ फ़िरवली. तिथेच न थांबता ब्रिटन व फ़्रान्सने हिटलरशी युद्धबंदीचा करार केला. म्हणजे प्रत्यक्षात युरोपातला कुठलाही देश गिळंकृत करण्याची युद्धखोर जर्मनीला मोकळीकच दिली होती. त्याचे परिणाम त्या देशांना लौकरच भोगावे लागले. तेव्हा सोवियत रशियाच्या स्टालीनने तोच मार्ग चोखाळत हिटलरशी दोस्ती केली होती. पुढे त्याच सोवियत रशियावरही हिटलर चाल करून गेला आणि पोलंडला टांग मारणार्‍या फ़्रान्सलाही हिटलरने धडा शिकवला होता. युरोप आफ़्रिकेत भडकलेल्या युद्धाचा आपल्याशी संबंध नाही, म्हणून अलिप्त राहिलेल्या अमेरिकेला लौकरच जपानने दणका दिला आणि त्यांनाही उशिरा अक्कल आली.

तो सगळा इतिहास ज्यांनी वाचला वा अभ्यासला आहे, त्यांना एकविसाव्या शतकाच्या आरंभापासून त्याच इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होताना दिसत असेल. कारण आजही तसाच एक भस्मासूर त्याच परिसरात धुमाकुळ घालतो आहे आणि त्यातून दार ठोठावणारा धोका आजच्या जगाचे नेतेही बघायला तयार नाहीत. डोळ्यांना धोका दिसतो आहे. घटनातून कळतो आहे. पण बुद्धी मान्य करायला धजावत नाही. २००१ सालात अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील जुळे मनोरे उडवण्यातून ज्याला सुरूवात झाली, त्याची व्याप्ती दिसू शकत होती. पण ती मानायची कोणी आणि ते संकट थोपवायची पावले उचलायची कोणी, ही समस्या आज १५ वर्षे अवघ्या जगाला भेडसावते आहे. तो हल्ला इस्लामचे वर्चस्व अवघ्या जगावर प्रस्थापित करण्यासाठी झपाटलेल्या काही मुठभर लढवय्या धर्मवेड्यांनी केलेला होता. पण त्यातले हल्लेखोर कुठल्या एका देशाचे नव्हते, तर जगातल्या कुठल्याही देशातून एका ध्येयाने भारावून एकत्र आलले जिहादी होते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना अनेक इस्लामी देशांचा पाठींबा किंवा सहानुभूती असलेली लपून राहिलेली नव्हती. विविध देशात विखुरलेल्या मुस्लिम लोकसंख्येचा त्याला असलेला पाठींबाही लपलेला नव्हता. इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार आपण हे काम हाती घेतल्याचे ओसामा बिन लादेन व त्याचे अनुयायी सांगत होते. पण त्यांना माथेफ़िरू ठरवून सत्यापासून पळ काढण्यातच धन्यता मानली गेली. म्हणून ती समस्या संपली नाही की धोका टळला नाही. मुंबई, स्पेन, लंडन, बाली, पॅरीस असे हल्ले होतच राहिले आणि त्यामागची प्रेरणा नाकारत जगाचे राजकारण चालत राहिले. कोणी या भस्मासूराला संपवण्याचा विचार केला नाही. उलट असे हल्ले झाल्यावर कोरडे सहानुभूतीचे शब्द बोलून दुसर्‍या प्रत्येक देशाने त्यापासून पळ काढलेला दिसेल. म्हणून त्या देशाची सुटका जिहादी हिंसेपासून झाली काय?

मुस्लिम धर्मवेडे आपल्या धर्माचा वरचष्मा निर्माण करण्यासाठी हा उद्योग करत होते आणि आहेत, यात शंका नाही. त्यामागे कुठलाही एक देश वा त्याची अधिकृत सेना नाही, हेही शंभर टक्के खरे आहे. पण म्हणून लढाई व त्यातली हानी खोटी नाही ना? प्रत्येक देशाला सुरक्षेसाठी युद्धसज्ज असल्यासारखा खर्च करावा लागतो आहे आणि पाण्यासारखा पैसा त्यावर ओतावा लागतो आहे. बदल्यात व्हायची ती हानीही टाळता आलेली नाही, की नागरिकांना सुरक्षा प्रदान करता आलेली नाही. कारण हे संकट वेगळे आहे आणि त्याचा भौगोलिक सीमा वा एखाद्या देशाच्या साम्राज्यवादी भूमिकेशी संबंध नाही. ज्यांनी हा उद्योग चालविला आहे, त्यांच्यापाशी शस्त्रास्त्रे, पैसा वा साधनसामग्रीचा अजिबात तुटवडा नाही. किंबहूना अखंड युद्धसज्जता व त्यातून संपादन केलेली भूमी, इतके त्याचे काम चोख योजनाबद्ध चालू आहे. मात्र त्यांचे भयंकर हेतू अवघ्या जगाला हिंसक युद्धाच्या खाईत ओढून नेत चालले आहेत. हे सत्य मान्य करायला जगातला कुठलाही नेता तयार नाही. म्हणूनच तो धोका टळलेला नाही, उलट प्रतिदीन सोकावत चालला आहे. चर्चिल त्यालाच मगरीला खुश राखणे म्हणतो. खरे तर अफ़गाण तालिबान व त्यांच्या आश्रयाने अमेरिकेत हल्ला झाला तेव्हाच अवघ्या जगाने एकत्र येऊन तालिबानांचा बंदोबस्त केला असता, तर एव्हाना जग खुप सुरक्षित होऊन गेले असते. अशा लोकांना हिंसेची व निष्ठूर भाषा समजते आणि त्याच भाषेत त्यांच्याशी संवाद करावा लागतो, जसा राजपक्षे नावाच्या श्रीलंकन राष्ट्राध्यक्षाने करून दाखवला. तीन दशके तिथे यादवी चालू होती आणि प्रत्येक वेळी तामिळी वाघांचे कंबरडे मोडायची वेळ आली, मग शांततावादी त्यात हस्तक्षेप करून तडजोड घडवून आणित. मग वाघ त्यातून सावरले की पुन्हा हल्ले सुरू करीत आणि अवघी श्रीलंका युद्धाच्या खाईत लोटली जाई. हा सिलसिला तीन दशके सुरू राहिला. पण राजपक्षे यांनी युद्धनिती बनवून त्यावर कायमचा उपाय काढला.

एक ठराविक मुदत देवून त्यांनी जाफ़ना परिसरातील सामान्य नागरीकांना सुरक्षित जागी येण्याचा इशारा दिला. त्यानंतर जे कोणी त्या भागात उरतील, त्यांना सैनिक वा गनिम समजून निकाल लावला जाईल, असे स्पष्टपणे बजावले होते. अधिक त्यात मानवाधिकारी कुठल्याही संस्था संघटनेला लुडबुडू दिले नाही. मुदत संपल्यावर वाघांच्या बालेकिल्ल्यावर थेट सैन्याने चहूकडून हल्ला केला आणि एक एक संशयित ठार मारून टाकला. कोणालाही दयामाया दाखवली नाही. त्यात अनेक निरपराध लोकही मारले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मागल्या तीन दशकात जितके निष्पाप बळी गेले होते, त्याच्या तुलनेत लष्करी कारवाईत मारले जाणार्‍यांची संख्या खुपच नगण्य होती. त्यातून गेल्या पाच वर्षात श्रीलंकेतील दहशतवाद व हिंसेचा पुरता खात्मा झालेला आहे. नेमकी तीच योजना ९/११ नंतर अमेरिकेने तालिबान जिहादींच्या बाबतीत केली असती, तर आज त्याचा फ़ैलाव इतका जगभर झाला नसता. तमाम देशांनी अमेरिकेला तेव्हा पाठींबा देवून मदत केली असती, तर आज कित्येक हजार लोक हकनाक मेले नसते आणि आपले जीवन सुखाने जगताना दिसले असते. कित्येक लाख लोकांचे जीवन उध्वस्त झाले नसते, की लक्षावधी लोकांना घरदार सोडून निर्वासित म्हणून देशोधडीला लागायची वेळ आली नसती. ही स्थिती शांततावादाने व मानवधिकाराने आणलेली आहे. जिहादी घातपात्यांचे खरे आश्रयदाते मानवतावादी आहेत. किंबहूना आता या मानवतावादाने मगरीला आपल्याच देहाचे लचके खाऊ घालणे म्हणजे शांतते़ची सुरक्षेची शक्यता, असले खूळ जगाच्या डोक्यात भिनवले आहे. त्याचे परिणाम जगभर दिसू लागले आहेत. म्हणून संकट संपलेले नाही, संपणारही नाही. उलट ते आणखी रौद्ररूप धारण करून सामोरे येत चालले आहे. या हिंसाचार व दहशतवादाचा धर्माशी संबंध नाही हे खोटे कितीही बोलले गेले, म्हणून सत्य ठरण्याची शक्यता आता पुरती संपलेली आहे. कारण?

कारण आता तुमच्या हातात युद्ध पुकारणे वा नाकारणे शिल्लकच उरलेले नाही. स्वत:ला इस्लामचे योद्धे समजणार्‍यांनी उर्वरीत जगाच्या विरोधात जिहाद म्हणजे युद्ध आधीच पुकारलेले आहे. त्यामुळे त्याला शरण जाणे किंवा सामोरे जाऊन त्याच्यशी दोन हात करणे; इतकेच पर्याय आपल्यासमोर आहेत. अगदी मुस्लिम म्हणून जे कोणी जगाच्या पाठीवर आहेत, त्यांचीही यापासून सुटका नाही. कारण त्यांनी कधी अशा घोषणेचा विरोध केलेला नाही वा इस्लामला युद्ध नको असल्याचा विश्वास बिगर मुसिमांना देण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे जागतिक नेत्यांनी मान्य करो किंवा न करो, आता जागतिक युद्धाची सावली गडद होत चालली आहे. हे युद्ध कुठल्या देशांमध्ये वा भूमीसाठी होणार नसून इस्लामची सत्ता हवी की नको, यासाठी होणार आहे आणि ते नाकारण्याची मुभा कोणालाही शिल्लक उरलेली नाही. तुम्ही मुस्लिम असा किंवा बिगर मुस्लिम असा, तुम्हाला त्यापासून मुक्ती नाही. कडवे मुस्लिम असाल तर तुम्हाला इसिसच्या बाजूने उभे रहाणे भाग आहे. नाही राहिलात तर तुमचीही खैर नाही. कारण इसिसने इस्लामसाठी युद्ध पुकारले आहे आणि त्यात सहभागी होणार नाही, तोही त्यांच्यासाठी मुस्लिम नसतो, याविषयी त्यांनी कृतीतून भूमिका स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात मुस्लिम विरोधात बिगर मुस्लिम अशा महायुद्धाचा प्रस्ताव अवघ्या जगावर लादला गेलेला आहे. जगभरचे नेते त्याकडे पाठ फ़िरवून बसलेले असले म्हणून तो संपणार नाही. युरोपात ज्यांना आश्रय दिला अशा मुस्लिमांनी तिथे आपला कल कृतीतून दाखवला आहे. म्हणून तिथेही जागोजागी मुस्लिम विरोधात चकमकी झडू लागल्या आहेत. जिथे प्रथमपासून मुस्लिम आहेतच तिथेही विविध मुस्लिम पंथ व गटातच हिंसक चकमकी चालू आहेत. त्याचा जागतिक भडका उडालेला नाही, कारण बिगरमुस्लिम देशांतील सरकारे व जनतेच्या सोशिकतेचा बांध अजून फ़ुटलेला नाही. पण कुठल्याही क्षणी तो फ़ुटलेला दिसेल आणि ती प्रत्यक्ष महायुद्धाची सुरूवात असेल. ज्यांना नेमके संकेत हवेत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे इशारे व शब्द काळजीपुर्वक समजून घ्यावेत.

युद्ध नको आणि विध्वंस वा जिवीतहानी तर अजिबात नको आहे. कोणालाच नको आहे हे अर्धसत्य आहे, कारण कुठलीही हानी वा विध्वंस बाकीच्या प्रस्थापित जगाला नको असली तरी इसिस व जिहादी मानसिकतेला ती हवी आहे. कारण त्यांना यातून स्वर्गाचे दरवाजे खुले होतात, अशी त्यांची ठाम समजूत व श्रद्धा आहे. त्यावरच ज्यांना ठाम विश्वास आहे. त्यांना त्यात सहभागी होऊन धर्माचा झेंडा उंचवावा लागेल. उलट त्यावर विश्वास नसलेल्यांना याच पृथ्वीतलावर सुखरूप जगण्याही शाश्वती हवी असेल, तर अशा मानसिकेतचा नायनाट करायला एकत्र यावेच लागणार आहे. जन्नतच्या प्राप्तीसाठी झपाटलेल्यांना शरण जाऊन या पृथ्वीतलाचा नरक होऊ द्यायचा, की त्यांचाच नायनाट करून याच पृथ्वीतलाचा आधुनिक सुरक्षित स्वर्ग कायम राखायचा, यातून निवड करणे आपल्या हाती आहे. कितीही नाकारले तरी सत्य समोर आहे. अक्राळविक्राळ गडगडाट करीत हसते आहे आणि कानठळ्या बसवणार्‍या आवाजात सांगते आहे. एका धर्माच्या श्रद्धेच्या अतिरेकाने उर्वरीत जगावर हे युद्ध लादले गेले आहे. त्याला शरण जाणे किंवा खंबीरपणे उभे राहून त्याचा सामना करणे. तिसरा पर्याय नाही! बघा विचार करून आहे का पर्याय?

11 comments:

  1. वाळूत तोंड खुपसून बसलेल्यांनी हे समजून घेतलं तर उत्तम. काही लोक घेतील. इतरांना बहुधा मान कापली गेल्यावरच जाग यायची. एक मोदी, पुतीन यांसारखे राजकारणी आणि दुसरे आपल्यासारखे, तारेक फताह सारखे लेखाक, यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  2. या संदर्भात,ज्या लोकांना खरोखरीच जगाची काळजी वाटते अशा सर्व लोकानी एकत्र येऊन सर्वसामान्य मुस्लिम जनतेमध्ये जागृति आणावयास हवी.अर्थात् हे फक्त लोकशाही देशातच शक्य आहे.

    ReplyDelete
  3. http://youtu.be/-peDPBmbiOw भाऊ काका हि लिंक बघा आणि प्लीज तुमचे ओपिनियन सांगा ह्या असहीशीनुते बद्दल थँक्स

    ReplyDelete
  4. भाऊ, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन! तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय.. जग जेव्हा तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाईल तेव्हा त्यावेळच्या जागतिक नेत्यांसमोर 'इंद्राय तक्षकाय स्वाहा' हा एकंच पर्याय असेल. दुसऱ्या महायुद्धाशी साद्यापारीस्थितीची सांगड घालून 'History repeats itself.' हा मांडलेला मुद्दा खूपच पटला.

    ReplyDelete
  5. "कारण आजही तसाच एक भस्मासूर त्याच परिसरात धुमाकुळ घालतो आहे आणि त्यातून दार ठोठावणारा धोका आजच्या जगाचे नेतेही बघायला तयार नाहीत. डोळ्यांना धोका दिसतो आहे. घटनातून कळतो आहे. पण बुद्धी मान्य करायला धजावत नाही."

    भाऊ, तुमच्या वरच्या वाक्यावर माझा असा विचार आहे की...धोका डोळ्यांना दिसतो, घटनातून कळतो, कदाचित बुद्धी माण्यासुद्धा करत असेल...पण काही राजकीय स्वार्थ जपण्यासाठी मोठे देश/नेते त्यावर कानाडोळा करत असावेत.

    असं असू शकतं का?

    ReplyDelete
  6. bhau,

    Aam admi party sarkar ne MLA chi salary 400% wadhawali tyabaddal apale mat kay ahe....
    please amahala apala view sanga

    ReplyDelete
  7. Bhau Adolf Hitler chi tulna isis barobar karne chuk ahi to khara desh bhakt hota.ani wistan charchil ha Bharat ani jagachya drishtine ghatak hota fakt Hitler ani Japan mule English va etar empire nashta zaleahit Bhartane isis Taliban Pakistan Yana chiradnyat wata gheon aple samarthya wadavale paije

    ReplyDelete
  8. भाऊ आधी देशामधील secular लोकाना हे समजत नसेल तर हिटलरने सांगितले आहे तसे आधि House Cleaning केले पाहिजे

    ReplyDelete
  9. There is a third way. Defeat the sickulars. Remember 1948, remember what freed Hindus from foolish thoughts of sickularism.

    ReplyDelete
  10. कैनडाच्या पंतप्रधानांनी ४ दिवसांपूर्वी परराष्ट्र सचिव ची नेमणूक केली जो कि 'हमास ' संघटनेचा एक अधिकारी होता. ..........सर्वच आश्चर्य जनक. तसेच युनायटेड नेशन्स मध्ये ' मानव अधिकार ' संघटनेच्या अध्यक्षपदी सौदी माणसाची निवड यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकतो.

    ReplyDelete