Tuesday, December 22, 2015

बलात्कार महिलेवर होत नाही

Nothing is more destructive of respect for the government and the law of the land than passing laws which cannot be enforced.   - Albert Einstein



मंगळवारी घाईगर्दीने राज्यसभेत धुळ खात पडलेले बालकन्याय विषयक विधेयक संमत करण्यात आले. मागले काही दिवस आणि महिने ज्या राज्यसभेत कुठलेही कामकाज फ़ालतू कारणासाठी होऊ दिले जात नव्हते, तिथेच तमाम मतभेद गाडून बहुसंख्य पक्षांनी शिळ्या झालेल्या विधेयकावर उथळ चर्चा करून त्याला मान्यता दिली. ज्यांनी अनेक दुरूत्या देवून अडवणूक करायचा मनसुबा व्यक्त केला होता, त्यांनीही माघार घेऊन मान्यता दिली. कारण स्पष्ट होते. निर्भयाचे जन्मदाते रस्त्यावर आले आणि त्यांनीच या विषयाला वाचा फ़ोडली होती. प्रत्यक्षात मुलीचा बळी पडला तेव्हाही बाहेर न आलेल्या त्या जन्मदात्यांना आता आपल्या अब्रुलाच हात घातला गेल्यासारख्या यातना झाल्या असणार. म्हणून आजवर निर्भयाचे लपवलेले नाव आणि ओळखही तिच्याच मात्यापित्यांनी जाहिरपणे सांगून टाकली. त्यामागची यातना जनतेत पसरू लागली, तेव्हा मागल्या काही महिन्यात चाललेली असंहिष्णूतेची नाटके पुरती उघडय़ावर येण्याच्या भयानेच ही तत्परता दाखवण्यात आलेली आहे. कारण हे विधेयक मागल्याच अधिवेशनात मंजूर होऊ शकले असते. जर संसदेत कामकाज होऊ शकले असते तर! पण आपल्या अहंकाराला चुचकारात बसलेल्या राजकीय पक्ष व नेत्यांना सामान्य जनतेच्या भावना यातना याची किंचीतही फ़िकीर उरलेली नाही. म्हणूनच निर्भयाच्या बलात्कार्‍याच्या सुटकेपर्यंत तो विषय धुळ खात पडला होता. त्यावर आताही विचार होऊ शकला नसता. सुदैवाने या देशातले बुद्धीमंत जितके बेअक्कल आहेत त्यापेक्षा सामान्य लोक व्यवहारी शहाणे आहेत, संवेदनाशील आहेत. म्हणूनच त्यांना आईनस्टाईन सांगतो त्याचा अर्थ समजू शकला. त्यांनी त्याचीच प्रचिती सरकार व राजकारण्यांना रस्त्यावर उतरून दिली. त्याच्या परिणामी हे विधेयक संमत होऊ शकले आहे.

‘जो कायदा राबवता येत नाही असा कायदा संमत करण्यातून सरकार व कायद्याचीच प्रतिष्ठा रसातळाला जात असते’, असेच आईनस्टाईन म्हणतो. ते खरे म्हणजे मोठे जटील सत्य आहे. पण शहाण्यांना बुद्धीचे अजिर्ण झाल्याने त्यांना ते कळू शकत नाही, सामान्यांना कळते. म्हणून सामान्यांनीच संतप्त प्रतिक्रीया दिल्या. त्या प्रक्षोभक प्रतिक्रीया एका विधेयकासाठी नव्हत्या. कारण हा कायदा संमत होऊन आता निर्भयाला न्याय मिळू शकत नाही, की त्यातल्या अल्पवयीन आरोपीला शिक्षाही होऊ शकत नाही. मग निर्भयाची आई कोणासाठी रस्त्यावर आलेली होती? ‘आणखी किती निर्भयांचा बळी जायला हवा आहे’ असा सवाल त्या माऊलीने केला होता. त्याचा अर्थ काय होता? लोकभावना कशासाठी इतकी प्रक्षुब्ध झाली होती? एका अफ़रोज नामक बालवयीन गुन्हेगाराला फ़ाशी देण्याचा आग्रह त्यामागे नव्हता. कारण अशी कितीही कठोर शिक्षा कोणालाही दिल्याने बळी पडलेल्यांना भरपाई मिळत नसते. झालेले नुकसान भरून येत नसते, की विस्कटलेले जीवन पुर्ववत होत नसते. ती जखम तशीच्या तशी कायम रहाते. त्यापेक्षा पुढल्या कोणाच्या वाटेला तशा यातना वा वेदना येऊ नयेत, हीच उदात्त अपेक्षा असते. ‘आणखी किती निर्भया’ या वाक्यातली वेदना समजून घ्यायला हवी. त्याचा अर्थ आणखी कुणावर निर्भयासारखा प्रसंग येऊ नये, ही भावना आहे. आणि त्यासाठी कायदा नुसता शब्दातला नको तर राबवला जाणारा कायदा हवा, अशी अपेक्षा आहे. आज कुठला कायदा राबवला जातो? कुठल्या कायद्याचा धाक उरलेला आहे? नुसते कायदे संमत करून कुणाला न्याय मिळत नाही, की सुरक्षा लाभत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीने ती हमी मिळत असते आणि लोकांचा त्यावर विश्वास असतो, तिथपर्यंतच कायदा व सरकार नावाच्या वस्तू टिकून रहातात. ज्याला कायदा राबवता येत नाही, ते सरकार टिकत नसते.

बशर अल असद याचे सिरीयात सरकार आहे आणि अफ़गाण वा इराकमध्येही सरकारे आहेत. पण म्हणून तिथे कायद्याचे राज्य नाही. कारण त्यांनी केलेले कायदे वा राबवलेल्या सत्तेला कुणी जुमानत नाही. म्हणून तिथले काही लोक बंडखोर वा अतिरेकी झालेत; तर काही लोक निर्वासित होऊन पळत सुटले आहेत. तिथेही पुस्तकात वा शब्दातले कायदे खुप आहेत. पण त्यांना कोणी विचारत नाही, की त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. कारण तो कायदा संरक्षण देणार नाही, की शिक्षाही देण्याची त्या कायद्यात क्षमता राहिलेली नाही, हे लोकांना ठाऊक झाले आहे. कायद्याची शक्ती वा ताकद, बंदुका वा गणवेशात नसते. अथवा कायद्याच्या पुस्तकात वा शब्दात नसते. ज्याच्यावर लोकांचा विश्वास असतो, त्या विश्वास व श्रद्धेमध्ये कुठल्याही कायदा वा सरकारचे बळ सामावलेले असते. ज्या सत्ताधार्‍यांना वा राजकारण्यांना त्याच वास्तवाचा विसर पडतो, तिथे कायदा संपुष्टात येतो. मग तिथल्या कायदे मंडळाने कुठले कायदे संमत केले वा दुरूस्त केले, म्हणून त्याचा उपयोग नसतो. कारण कायद्याची महत्ता त्याच्या अंमलबजावणीत असते. जो कायदा राबवण्याची म्हणजे लादण्याची कुवत राजकारण्यात नसते, ते असे नपुंसक कायदे बनवणारेच सत्तेची बेअब्रू करत असतात. कायद्याच्या राज्यावरचा विश्वास संपवत असतात. जिथून अराजकाचा प्रांत सुरू होतो. कुणाला काय शिक्षा द्यावी हा कायद्यातला दुय्यम भाग असतो. मुळात कायद्याने शिक्षा द्यायची वेळच येऊ नये, इतका कायद्याचा धाक असावा लागतो. पर्यायाने कायदा सामान्य जनतेला सुरक्षेची हमी देत असतो. म्हणून लोक कायद्याला वचकून असतात, तसेच कायद्यावर विसंबून असतात. त्या विश्वासाला जपणे म्हणजे राज्य करणे होय. ज्या राज्यकर्त्यांना व राजकारण्यांना त्याचे भान रहात नाही, त्यांची सत्ता टिकत नाही तर रसातळाला जात असते.

लॉ मस्ट बी एन्फ़ोर्स्ड! कायदा ही लादण्याची बाब आहे. कायद्याचा धाक असला पाहिजे. कायद्याशी खेळ केला तर चटके बसतात, याची लोकसंख्येतील जाणिव म्हणजे कायद्याचे राज्य होय. ‘कायद्याचे राज्य’ हा शब्दच स्पष्ट आहे. प्रत्येकाने कायद्याला जुमानले पाहिजे आणि त्याच्यापुढे नतमस्तक असले पाहिजे. जुमानणार नाही त्याला क्षमा नाही, असा कायद्याचा धाक असतो. तेव्हा बंदूकही दाखवावी लागत नाही. कोणीही उठून बालिका वा तरूणी एकाकी सापडली म्हणून अपहरण करतो, वा बलात्कार करतो, हीच मुळात कायद्याची विटंबना असते. बलात्कार मुलीवर असहाय्य म्हणून होत नाही. तिचे संरक्षण करण्याची हमी दिलेला कायदा असहाय्य झाला म्हणून त्या समाजातल्या महिलाला बलात्काराचे बळी व्हावे लागत असते. तिच्यावर शारिरीक हल्ला होतो. शारिरीक इजा महिलेला-मुलीला होते. पण त्याहीपेक्षा मोठी हानी कायद्यावरील विश्वासाला होत असते. जेणे करून मुलींना राज्यघटनेने नागरी स्वातंत्र्याने बहाल केलेले अधिकार उपभोगण्यावर भयापोटी स्वेच्छेने प्रतिबंध लादले जात असतात. महिलेच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण करण्यातून तिच्या घटनात्मक अधिकाराचा संकोच केला जात असतो. म्हणूनच बलात्कार साधारण वा व्यक्तीगत गुन्हा मानला जाणेच गैर आहे. त्यात वयाचाही विषय गैरलागू आहे. ते कायद्याच्या राज्यालाच दिलेले आव्हान आहे. याचे कुठलेही भान याप्रकारचे कायदे बनवताना ठेवले गेलेले दिसत नाही. म्हणून असे गुन्हे वाढत आहेत आणि कितीही कठोर कायदे केले तरी त्याला लगाम लावला जाऊ शकत नाही. बलात्कार ही रानटी मानसिकता आहे आणि त्याचीच जाणिव आपण हरवून बसलो आहोत. म्हणून आपण टाहो फ़ोडतो. निर्भयाबद्दल सहानुभूती दाखवतो. बेटी बचावचे नाटकही छान रंगवतो. पण त्यावर उपाय शोधला जात नाही की सापडत नाही. म्हणून एक माणूस राक्षस होतो आणि अवघ्या समाजाच्या सदभावनेवरच बलात्कार करतो.


5 comments:

  1. लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध वक्तव्य : स्नान करून मोकळे होतात.
    त्याचप्रमाणे वर्तमान राज्यकर्ते " कायदे करून मोकळे होतात."
    अंग झटकून नामानिराळे होण्याचा याहून सोयीस्कर मार्ग दुसरा नाही.

    ReplyDelete
  2. इंग्रजानी बनवले कायदे आणि काळानुसार बद्दल केला गेला पण इंग्रजानी आपला जसा हेतु साध्य करण्यासाठी कायदे बनवले तसेच आपल्या राजकिय पुढार्‍यानी त्याचा हेतु साध्य होण्यापुरता बद्दल केला.
    हिच वस्तुस्थिती आहे.
    म्हणून एक माणूस राक्षस होतो आणि अवघ्या समाजाच्या सदभावनेवरच बलात्कार करतो.
    भाऊ ...सुंदर विशलेष.

    ReplyDelete
  3. भाऊ सुंदर; राजकिय कुटुंबियांवर बलात्कार झाले तरच कायदे कडक होतील

    ReplyDelete
  4. Very well said about the santity and integrity of the law.

    ReplyDelete