Wednesday, June 3, 2015

तोता मिरच खा गया


चार दशकांपुर्वी मनोजकुमारचा ‘उपकार’ नावाचा चित्रपट खुप गाजला होता. त्यात शेतकरी असलेल्या मनोजचा सुशिक्षित धाकटा भाऊ प्रेम चोप्राने रंगवला होता. सावकाराची भूमिका करणारा  खलनायक  मदन पुरी पोपटाला मिरची भरवतानाचा मजेशीर प्रसंग रंगवला आहे. एकीकडे प्रेम चोप्राचे कान फ़ुंकत हे मिरची भरवणे चालू असते. मग एका क्षणी तो प्रेम चोप्रा तिथून तणतणत निघून जातो आणि पोपट मिरची खातो. तर खलनायक म्हणतो, ‘तोता मिरच खा गया’. त्यावर त्याचा नोकर विचारतो, मतलब क्या मालिक? त्यावर खलनायक म्हणतो, ‘मतलब, भारत के घर महाभारत’. त्यात मनोजकुमारचे नाव भारत असे दाखवले आहे आणि दोन भावातले भांडण म्हणजे महाभारत. मिसबाह व झीशान यांच्या निमीत्ताने वाहिन्यावर जे काहुर माजवले गेले आणि हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा जो सेक्युलर तमाशा रंगवला गेला; तेव्हा त्या खलनायकाचे शब्द आठवले. अशा चर्चा व ब्रेकिंग न्युजमधून दुसरे काय साधले गेले? तोता मिरच खा गया ना? आधीचे दोन लेख ज्यांनी वाचले आहेत, त्यांच्या लक्षात एव्हाना आलेच असेल, की झीशान खान याने फ़क्त मुस्लिमांवर अन्याय होते असे नाही, तर हिंदूनाही या देशात भेदभावाची वागणूक मिळते, याची ग्वाही दिलेली आहे. म्हणजेच त्याच्या मनात हिंदूविषयी कुठले किल्मीष नाही किंवा त्याच्या मित्रांच्या मनात मुस्लिमांविषयी कुठली अढी नाही हे सिद्ध होते. मिसबाहचे प्रकरणच निव्वळ कांगावा होता आणि तिचा संधीसाधू सेक्युलर अजेंडाने बळी घेतलेला आहे. मग सवाल इतकाच उरतो, की अशा गोष्टींचे सेक्युलर शहाणे इतका गाजावाजा कशाला करतात? त्यांना दोन भिन्न समाजात सौहार्द निर्माण करायचे असते, की त्यांच्यात द्वेष भावना रुजवून हिंसाचार माजावा असा सेक्युलर अजेंडा आहे? निदान पुरावे तरी तसेच समोर येतात.

मिसबाहने ज्या इमारतीमध्ये मुस्लिम म्हणून जागा नाकारल्याचा दावा केला, तिथे आधीपासून दोन मुस्लिम कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे मिड-डे वृत्तपत्रानेच पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. मग त्या इमारतीसह एकुणच बिल्डर व इमारतीच्या रहिवाश्यांबद्दल असे खोटेनाटे काही पसरवण्याचा माध्यमांचा कुठला पवित्र हेतू असू शकतो? काही जागी असा भेदभाव नक्कीच होतो आणि तो धर्मापेक्षा शाकाहारी व मांसाहारी लोकांमधला वाद आहे. त्यात कुठेही धर्माचा लवलेश नाही. जैन प्राबल्य असलेल्या अनेक भागात मांसाहारी हॉटेलांची संख्या घटत चालली आहे. त्यावरून अगदी हिंदू असलेल्या मांसाहारींनीही तक्रारी केलेल्या आहेत. त्याला धर्माचा रंग यातून चढवण्याचा उपदव्याप माध्यमांनी केलेला नाही काय? योगायोगाने त्यात हिरीरीने भाग घेणारे बहुतेक लोक सेक्युलर म्हणून मिरवणारे आहेत. मिसबाहने आपली तक्रार सोशल मीडियातून मांडली होती, तिला कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचे डावपेच सेक्युलर म्हणवणार्‍यांनी केले. मग आपल्या माध्यमातील दोस्तांच्या सहकार्याने त्याचा देशव्यापी गाजावाजा घडवून आणला. पण त्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने आधीच पोलिसात मिसबाहच्या विरोधात वर्दी देऊन ठेवलेली असल्याने सेक्युलर थोतांड पुरते उघडे पडले. मात्र त्यातले खरे दोषी माध्यमकर्ते चव्हाट्य़ावर आले. गंमत याची वाटते, की आपला बाप मरून पडला तरी जितका आक्रोश केला नसता इतका त्यांचा टाहो, थक्क करून सोडणारा आहे. उदाहरणार्थ एबीपी माझा वाहिनीवरील चर्चेचा तर उत्साह ओसंडून वहात होता. पण यांचाच बाप अडीच वर्षापुर्वी तिथे आझाद मैदानात मरून पडला होता, तेव्हा त्यांच्या तोंडातून हुंदकाही निघालेला नव्हता. बाकी कोणाला नाही तरी एबीपीवाल्यांना आपल्या जखमा आठवायला नको काय? ऑगस्ट २०१२ मध्ये काय घडले होते आझाद मैदान परिसरात?

म्यानमार देशात मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होतात म्हणून रझा अकादमीने एक मोर्चा काढला होता. त्यासाठी जमा झालेल्या मुस्लिम तरूणांनी आसपासच्या बसेस वहाने पेटवून दिलेली होती. महापालिकेने उभारलेल्या अमर जवान ज्योती स्मारकाची मोडतोड केली होती. चित्रण करणार्‍या पत्रकारांना यथेच्छ झोडपले होते. त्यातच मग एबीपी नेटवर्कची एक ओबीव्ही गाडीही जाळून भस्मसात केलेली होती. तेव्हा त्या मुस्लिम दंगलखोरी व हिंसाचाराबद्दल ‘माझा’वर कितीशी चर्चा झाली होती? किती अश्रू ढाळ्लेले होते? तिथे जे काही झाले, त्यात महिला पोलिसही सुटल्या नव्हत्या. त्यांचे विनयभंग झाले असे ‘सभ्य भाषेत’ सांगितले गेले. त्याचा अर्थ काय होतो? तो सगळा धार्मिक उन्माद नव्हता? धार्मिक भेदभाव म्हणूनच जमावाने अशी वागणूक इतरांना दिलेली नव्हती? ज्यात मुस्लिम गुंतलेला असतो अशा हिंसेला व दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि चुकून त्यात हिंदू सापडला, की धर्माचे लेबल लावायचे; ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणतात? तो भेदभाव सेक्युलर माध्यमे व पत्रकार करतात. बुद्धीमंतच करतात. कोणी हिंसाचारी असा भेदभाव करत नाही. म्हणून तर दोन दगड कार्यालयावर फ़ेकले की आकाशपाताळ एक करणारे ओबीव्ही जाळली तरी चिडीचुप्प होते. की जाळपोळ चांगली असते आणि किरकोळ दगड फ़ेकणे भयावह असते असले सेक्युलर तर्कशास्त्र आहे? एबीपी माझावर चर्चा झाली त्याचे म्हणून वैषम्य वाटते. वडाची साल पिंपळाला लावण्याचाच तो प्रकार नव्हता काय? मिसबाहसाठी झुंजार झालेल्या प्रसन्ना जोशीने आपल्याच नेटवर्कची ओबीव्ही जाळली गेली, तेव्हा तितकेच शौर्य कशाला दाखवले नव्हते? मग वाटते त्यांच्यासाठी मुस्लिमांनी केलेला हिंसाचार हा शांततेचा प्रयोग असतो आणि कुणा हिंदूने शंका काढली तरी प्राणघातक हल्ला असतो. दुसरा काही अर्थ निघतच नाही ना?

मागल्या चौदा वर्षात अशाच खोट्यानाट्या प्रचार व थापेबाजीने मोदींना देशातील हिंदूसाठी तारणहार बनवण्याचा घाट घातला गेला. अशाच बिनबुडाच्या अपप्रचाराने मोदी इतके लोकप्रिय झाले, की भाजपासह संघाला त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. देशातील हिंदू समाज क्रमाक्रमाने सेक्युलर विचारांनी इतका भाबावलेला आहे, की त्याला अशा विचारांच्या धोक्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोदींना शरण जाण्याखेरीज कुठला पर्यायच राहिला नाही. लोकसभा निवडणूकीत त्याचेच प्रत्यंतर आलेले आहे. अशा ‘सेटलवाडी’ प्रचाराने मुस्लिमांना अधिक धर्मवादी बनवले आणि हिंदूंना मोदींच्या आश्रयाला जाणे भाग पाडले. त्यातून जे भाजपा सरकार सत्तेत आले आहे, तेवढ्याने सेक्युलर समाधानी दिसत नाहीत. त्यांना घटनात्मक बंधनातील मोदी वा भाजपा सरकार नको आहे. त्यांना पुर्णपणे हिंदू धर्मावर अधिष्ठीत सरकार व हिंदूराष्ट्र स्थापन करायचे आहे. ते काम भाजपा वा संघाच्या विद्यमान नेतृत्वाकडून शक्य नाही. खुलेआम हिंदूराष्ट्र स्थापनेची भाषा बोलायलाही संघ तयार नाही. मग हे कसे शक्य आहे? तर बहुतांश हिंदूमध्ये मुस्लिम व अल्पसंख्यांकाच्या विरोधात कडवे धर्मांध जनमत निर्माण करणे. मुस्लिम असे आक्रमक झाले तर भयभीत होऊन हिंदूंना आपला तारणहार शोधावा लागणारच. एकदा तितके बहुमत पाठीशी असेल, तर मोदी वा हिंदूत्ववादी घटनात्मक बदल करून भारताला हिंदूराष्ट्र घोषित करू शकतात. कारण तितके हिंदू जनमत टोकाला गेलेले असेल. आणि अशा प्रकारातून सेक्युलर तेच साधून देणार आहेत. म्हणून मिसबाह वा झीशानच्या नगण्य विषयाला इतके भडक करून पेश केले जाते. त्यातून मुस्लिमांप्रमाणे हिंदूमध्ये अधिक धृवीकरण साधले गेले पाहिजे. हाच तर सेक्युलर अजेंडा झालेला आहे. बिचारे मुस्लिम त्यात बळीचा बकरा म्हणून वापरले जात आहेत. कारण त्यांना आपल्या धर्माचे समर्थन माध्यमे करतात, यातच आनंद आहे. ‘उपकार’ चित्रपटातल्या प्रेम चोप्राप्रमाणे माध्यमांनी भरवलेली मिरची मुस्लिम खात आहेत ना? (अपुर्ण)

2 comments:

  1. . त्यांना घटनात्मक बंधनातील मोदी वा भाजपा सरकार नको आहे. त्यांना पुर्णपणे हिंदू धर्मावर अधिष्ठीत सरकार व हिंदूराष्ट्र स्थापन करायचे आहे. >> हे पटले नाही भाऊ! सेक्युलर लोकांच्या वागण्याचा हा परिणाम होईल पण त्यांची इच्छा तशी नाही. असे म्हणता येईल की सेक्युलर लोकांच्या हे अजूनही लक्षात येत नाही. ज्यावेळी लक्षात येईल, तेव्हा लगेच ते पलटी मारतील.

    ReplyDelete
    Replies
    1. zoplelyana jage karta yete pawar saheb. secular he khare secularach nahit tyani secular aslyache song ghetley.

      Delete