Sunday, July 30, 2017

घी देखा, बडगा नही देखा?

kejri cartoon के लिए चित्र परिणाम

राजकारणातील यश वा निवडणूकीतला विजय हंगामी असतो. त्यात मशगुल राहिले, मग पराभव आपल्या दिशेने चाल करून येत असल्याची जाणिवही होत नाही. हेच २००४ साली सत्ता मिळाल्यावर कॉग्रेसचे झाले आणि अलिकडल्या काळातही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. पण कॉग्रेसने मागल्या सात दशकात बहुतांश काळ सत्ता भोगली आहे. त्यामुळेच त्यांच्यात बेसावधपणा वा हलगर्जीपणा आला, तर नवल नाही. आम आदमी पक्षाची तशी स्थिती नाही. स्थापनेनंतर वर्षभरात त्यांना सत्ता मिळाली आणि उतावळेपणातून त्यांनी मिळालेले यशही मातीमोल करून दाखवलेले होते. त्यातून केजरीवाल व त्यांच सहकारी सावरले, म्हणून त्यांना दिल्लीची सत्ता पुन्हा मिळालेली होती. किंबहूना त्यांना दुसर्‍या खेपेस मिळालेले यश अधिक निर्विवाद होते. पण असे मोठे यश मिळाल्यावर ते पचवणे अतिशय कठीण होते. आता आजन्म आपण यशावर जगू शकतो अशी धारणा होते आणि सारसार विचार करण्याची क्षमता मेंदू गमावून बसतो. केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांची नेमकी तशी अवस्था झाली. परिणामी मागल्या दोन वर्षात त्यांनी इतका धुमाकुळ घातला की आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. अन्य कुठल्याही पक्षाने वा संघटनेने त्यांच्या पक्षाला संपवण्याची मग गरज उरली नाही. गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाप्रमाणे केजरीवाल आत्मघाती फ़िदायीन होऊन गेलेले होते. आता बडगा पाठीत बसल्यावर त्यांना पळता भूई थोडी झाली आहे. तसे नसते तर त्यांना आपल्याच सापळ्यात अडकण्याची वेळ कशाला आली असती? आपल्या गळ्यात फ़ास अडकवून त्याचा दोर त्यांनीच भाजपा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हाती दिला आहे. आता तो फ़ास आपोआप आवळला जात असून, त्याचे नाव राम जेठमलानी असे आहे. आत्ममग्न केजरीवालना आता जेठमलानी नावाची जीवघेणी गंमत समजली आहे. पण उपयोग काहीच राहिलेला नाही.

दिल्लीकरांनी केजरीवाल व आम आदमी पक्षाला पाच वर्षे निर्वेधपणे सत्ता राबवायला अधिकार दिलेला होता. त्यात कोणी व्यत्यय आणू नये, इतके भयंकर बहूमत दिले होते. पण त्याची झींग केजरीवाल यांच्या डोक्यात इतकी गेली, की आपण काहीही चुक करू शकत नाही, अशा भ्रमाने त्यांना कब्जात घेतले. त्यातून मग मित्र वा शत्रू यातलाही फ़रक त्यांना कळेनासा झाला. वागण्यातले तारतम्य लयाला गेले आणि बेताल बोलणे व बेछूट वागणे, म्हणजे राजकारण अशी समजूत त्यांनी करून घेतली. त्यामुळे दिल्लीकर जनतेच्या मनातून हा नेता उतरत गेला. त्यातच डोळे मिटून मांजराने दूध प्यावे, तशी लबाडीही करीत गेला. भ्रष्टाचाराच्या नावाने शंख करीत त्याने मुरलेल्या राजकारण्यांनाही लाजवील असा भ्रष्टाचार व लूटमार केली. मात्र हे सर्व करताना इतरांच्या अंगावर शिंतोडे उडवणे हा छंदही जोपासला. त्याची आता एकत्रित किंमत मोजायची पाळी त्याच्यावर आलेली आहे. सत्तेत आल्यावर आपल्याच जुन्या व प्रामाणिक मित्र सहकार्‍यांना लाथाडण्यापर्यंत केजरीवाल यांची मस्ती गेलेली होती. आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून निरलसपणे त्यात पुढाकार घेणारे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण, यांनाही ‘कमीने’ संबोधून केजरीवालनी आपल्यातला अस्सल गुंड उघड केला होता. यापैकी भूषण हा सुप्रिम कोर्टातला ख्यातनाम वकील आणि त्याने केजरीवाल यांच्या अनेक पोरकट वक्तव्ये व वर्तनाला कोर्टातही बचाव दिला होता. गडकरी यांनी दाखल केलेल्या एका खटल्यात समन्स घ्यायचे नाकारल्याने केजरीवाल यांच्यावर वॉरन्ट निघाले. तेव्हाही त्यांच्या पाठीशी भूषण उभे होते. पण सत्ता मिळाल्यावर या मित्रांची किंमत राहिली नाही. ती किंमत किती आहे, त्याचा साक्षात्कार आता केजरीवाल यांना होणार आहे. कारण तशाच एका खटल्यात आता जेठमलानी यांच्यासारखा शत्रू केजरीवालनी निर्माण करून ठेवला आहे.

जेठमलानी भाजपात असतानापासून अरुण जेटलींना शत्रू मानत आले. तो त्यांच्या व्यक्तीगत मामला होता. दिल्ली क्रिकेटच्या संदर्भात केजरीवाल यांनी अरूण जेटली यांच्यावर बेताल आरोप केले असताना, जेटलींनी बदनामीचा खटला दाखल केला. तर जेटलींवरचा राग काढण्यासाठी जेठमलानी केजरीवाल यांचे वकीलपत्र घेऊन उभे राहिले. त्यांना आपला कंडू शमवून घ्यायला ही उत्तम संधी वाटली. उलट केजरीवाल खुश होते, कारण त्यांना नामांकित वकील मिळालेला होता, जेठमलानी यांनी ती संधी घेऊन कोर्टात उलटतपासणी करताना जेटली यांच्यावर गलिच्छ शब्दात आरोप केले व अपशब्दांचा वापर केला. तितक्याच ताकदीचे वकील असल्यामुळे जेटली यांनी तिथेच उलटा प्रश्न केला. जेठमलानी आपल्या बुद्धीने असे शब्द वापरत आहेत, की अशील केजरीवाल यांच्या सूचनेनुसार अपशब्द वापरत आहेत? त्यांनीही केजरीवालनीच हे शब्द वापरण्यास सांगितल्याचा निर्वाळा दिला. कोर्टाने सुनावणीतून ते शब्द काढून टाकले आणि जेटली यांना आणखी एक खटला भरण्याची मोकळीक दिली. आता त्यात खरेखोटे करण्यासाठी कोर्टाने विचारणा केली असता, केजरीवाल यांनी साफ़ इन्कार केला आहे. त्यामुळे जेठमलानी खवळले आहेत आणि त्यांनी केजरीवाल यांचे वकीलपत्र सोडून दिल्याची घोषणा केलेली आहे. पण तिथेच न थांबता त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहून प्रत्यक्ष भेटीमध्ये जेटलींच्या विरोधात अपशब्द वापरलेले असल्याची लेखी आठवण करून दिलेली आहे. म्हणजे गंमत अशी झाली आहे, की कालपर्यंत केजरीवाल यांची वकिली करणारे जेठमलानी आता जेटली यांच्यासाठी दुसर्‍या खटल्यातले मुख्य साक्षीदार होऊन गेलेले आहेत. आपल्या मित्राला शत्रू करण्याची केजरीवाल यांची ही अजब कला दुर्मिळच म्हणायला हवी. वास्तविक कितीही मोठे वकील असले तरी जेठमलानी व्यक्तीगत पातळीवर उतरतात. म्हणूनच त्यांच्या नादी लागण्यातला धोका केजरीवालनी टाळायला होता. पण अतिशहाण्यांना कोणी समजवायचे?

केजरीवाल जितके बेछूट व बेताल आहेत, त्यापेक्षाही जेठमलानी बेभरवशी आहेत. वाजपेयी यांच्या कारकिर्दीत त्यांना कायदामंत्री केलेले होते. त्याच दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील एक विषय सुप्रिम कोर्टात आलेला होता आणि त्यात अटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी बाळासाहेबांचे मताचे अधिकार रद्द करण्याविषयी होकारार्थी भूमिका मांडलेली होती. त्यामुळे खवळलेल्या जेठमलानी यांनी सोराबजी यांच्यावर तोंडसुख घेतलेले होते. सहाजिकच विचलीत झालेल्या सोराबजी यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घातले. विनाविलंब वाजपेयी यांनी कायदामंत्र्याचा राजिनामा घेतला होता. तेव्हापासून जेठमलानी वाजपेयी यांचे शत्रू झाले आणि दोन वर्षांनी लखनौ मतदारसंघात त्यांनी सोनियांच्या आशीर्वादाने वाजपेयी विरोधात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती. अलिकडल्या काळात त्यांनी मोदींना भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याचा आग्रह धरून अडवाणी यांचा रोष ओढवून घेतला होता आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर कुठे वर्णी लागली नाही, म्हणून मोदींच्याही विरोधात दुगाण्या झाडलेल्या होत्या. मग राज्यसभेत टिकण्यासाठी ते लालूंच्या पक्षात दाखल झाले. थोडक्यात आज केजरीवाल कोवळ्या वयात ज्या मर्कटलिला करीत असतात, तशा अनेक कोलांट्या उड्या जेठमलानी यांनी राजकारणात खुप आधीपासून मारलेल्या आहेत. सहाजिकच जेठमलानी वकीलपत्र घ्यायला आले तर केजरीवाल यांना गंमत वाटलेली होती. आता त्याची खरी किंमत मोजायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यांना कुवत नसताना इतके मोठे यश मिळाले होते आणि तेच यश पचवण्याचीही औकात त्यांच्यापाशी नव्हती. म्हणून तर त्यांनी जेटलींना शडा शिकवताना आपल्याच गळ्यात फ़ास बांधून घेतला आणि त्याचा दोर जेठमलानींकडे दिलेला आहे. आता हे वडीलधारे वकील केजरीवालची काय लक्तरे बाहेर काढतात ते बघणे मनोरंजक असेल.

6 comments:

  1. निर्लज्ज माणूस आहे हा. अशी लक्तरे वगैरे निघाल्याने त्याला काहीच फरक पडत नाही.
    महत्वाचं हे आहे की जो होईल तो दंड आणि वकीलांची फी (आता पर्यंत २कोटी ₹) कोणी भरायचे. हा माणूस स्वत:च्या खिशातून भरू शकत नाही कारण मग बाकिच्या यंत्रण (IT,ED etc) हात धूऊन मागे लागतील, आणि दिल्ली सरकारकडे तर महापालीका कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे नाहीत.

    ReplyDelete
  2. 35अ कलमाबद्दल लिहा धन्यवाद

    ReplyDelete
  3. दुष्कालात तेरावा महीना 19 मे 2017.
    आपले भाकीत तंतोतंत, भाऊ!

    ReplyDelete
  4. भाऊ कुठं आहात तुम्ही ????
    आम्ही पूर्ण महिना श्रावण सहन करू शकतो
    तुमचा लेख न वाचता एकहि दिवस नाही राहू शकत

    ReplyDelete
  5. Waiting eagerly for new writing.. Blog is silent from a week.. May be author is busy.. I missing your apt analysis on recent developments.. Please come back asap

    ReplyDelete