Thursday, July 27, 2017

कोणाचे काय चुकले?

 sonia lalu cartoon के लिए चित्र परिणाम

कुठल्याही खेळाचे काही नियम असतात. त्यात दोन बाजू असल्या तर एका बाजूला दुसर्‍या बाजूची कोंडी करून विजय संपादन करायचा असतो. त्यात मग परस्परांवर कुरघोडी केली जात असते. ज्याची फ़लंदाजी चालू असते त्याला अंगावर येणारा चेंडू अडवून किंवा फ़टकारून धावा जमवायच्या असतात. तर क्षेत्ररक्षण वा गोलंदाजी करणार्‍या बाजूला समोरच्या फ़लंदाजाची कोंडी करून बळी मिळवायचा असतो. त्याचेही अनेक प्रकार असतात. झेल घेऊन वा फ़लंदाजाला उंच फ़टका मारण्यास भाग पाडूनही त्याचा बळी घेता येत असतो. कधी चकवणारा चेंडू टाकूनही बळी मिळतो. सहाजिकच भारतात जे राजकारण चालू आहे, त्यात मोदी व मोदीविरोधी अशा दोन बाजू आता तयार झालेल्या आहेत. त्यात प्रत्येक बाजू दुसर्‍यावर कुरघोडी करून जिंकण्याचे डावपेच खेळणार यात शंका नाही. नितीशना एनडीएमधून फ़ोडण्य़ाचे डावपेच चार वर्षापुर्वी पुरोगामी म्हणवणार्‍या पक्ष व जाणत्यांनी खेळले असतील, तर तीच संधी तेव्हा किंवा नंतरही भाजपा व मोदींनाही असते. त्याला लबाडी वा गद्दारी असले नाव देण्यात अर्थ नाही. नितीशकुमार यांनी बिहार विधानसभेच्या निवडणूकीत मोदींना पाणी पाजण्याचा प्रयोग यशस्वी केला. तेव्हापासून त्यांच्याकडे भावी राजकारणात मोदींचे स्पर्धक म्हणून बघितले गेले होते. पण जसजसे दिवस गेले तसतसा त्यांचा भ्रमनिरास करण्यापेक्षा विरोधकांनी काहीही केले नाही. ताज्या प्रकरणात विरोधकांना पराभूत व्हावे लागले असले, तरी त्याला भाजपा वा मोदी चा विजय मानता येत नाही. तो त्यांच्या विरोधकांनी ओढवून आणलेला पराभव आहे. मग समोर उभा असलेला प्रतिस्पर्धी जिंकलेला दिसणे स्वाभाविक आहे. पण विरोधकांचा पराभव हे निखळ सत्य आहे. कारण त्यांनी नितीश भाजपाच्या गळाला लागणार असे स्पष्ट दिसत असतानाही कोणतीही हालचाल केली नाही. हा मोदींना दोष कसा मानता येईल?

आखुड टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने टाकलेला असतो, तेव्हा त्याकडे काणाडोळा करण्यात शहाणपणा असतो. उलट त्याच षटकार मारण्यात झेल जाण्याचा धोका असतो. तसा बळी गेला मग गोलंदाजावर किंवा झेल घेणार्‍यावर दोषारोप करण्यात अर्थ नसतो. इथे लालूंच्या कुटुंबावर विविध आरोप झालेले होते आणि त्याविषयी लालूंनी खुलासा करावा, इतकीच मागणी नितीशनी केलेली होती. त्याविषयी स्पष्टीकरण देतानाही नितीशनी तेजस्वीचा राजिनामा मागितला नव्हता. पण जनतेला स्पष्टीकरण द्यावे, इतकीच मागणी केली होती. अन्यथा आपल्याला दोषारोप असलेल्या व्यक्तीसोबत सरकार चालवणे अशक्य असल्याचा इशारा दिलेला होता. या निमीत्ताने लालूंची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली होती व राहुल सोनियांनाही कल्पना देण्यात आली होती. आपणच राजिनामा देऊन सरकार निकालात काढू; असे मात्र नितीश कोणाला केव्हाही म्हणालेले नव्हते. पण तेजस्वीसह सरकारमध्ये बसणे अशक्य असल्याची स्पष्ट कल्पना दिलेली होती. त्यातले गांभिर्य लालू वा राहुलना ओळखता आले नसेल, तर तो नितीशचा दोष नाही की त्यांच्याशी हातमिळवणी करणार्‍या भाजपाचा गुन्हा म्हणता येणार नाही. कुठलाही खेळाडू आपले डाव आणि पेच जगासमोर उघडपणे मांडत नसतो. काही हुकूमाचे पत्ते आपल्या खिशात लपवूनच ठेवत असतो. नितीशनीही आपला राजिनाम्याचा पत्ता तसाच गुलदस्त्यात ठेवलेला होता. आपली मागणी पदरात पडणार नसेल तर सरकार बुडवण्याची खेळी त्यांनी कायम गोपनीय राखलेली होती. अशा वेळी नितीशना कडेलोटावर नेऊन उभे करण्याची गरज नव्हती. उलट तशा निर्णयाप्रत ते जाणार नाहीत, याची सज्जता महागठबंधन चालवणार्‍यांनी घ्यायला हवी होती. पण चाणक्य व चंद्रगुप्त दोन्ही आपणच असलेल्यांच्या मेंदूत साध्या गोष्टी शिरत नसतात आणि त्यांचा कपाळमोक्ष अपरिहार्य असतो.

आज लालू किंवा राहुल म्हणतात, की आधीपासून नितीशनी भाजपाशी सौदा केलेला होता. त्याचा आपल्याला संशय होता. त्यात तथ्य असेल, तर नितीशचा तोच सौदा निष्फ़ळ करण्याची खेळी राहुल वा लालू खेळू शकत होते. तेजस्वीने राजिनामा फ़ेकला असता व अन्य कुणाला उपमुख्यमंत्री म्हणून लालूंनी आपल्या सहकार्‍याला पुढे केले असते, तर नितीशना राजिनामा द्यायला जागाच उरली नसती. त्यांचा एनडीएत जाण्याचा मार्गच बंद झाला असता व निमूटपणे महागठबंधनात जखडून पडायची वेळ आली असती. तो भले लालूंचा व्यक्तीगत विजय ठरला नसता. पण त्यात भाजपा नितीशच्या सौदेबाजीचे नाक नक्कीच कापले गेले असते. कारण एका बिहारच्या सत्तेत भागिदारी मिळवणे, हे भाजपाचे वा मोदींचे उद्दीष्ट असू शकत नाही. त्यांचा मतलब भलताच मोठा होता. नितीशनी महागठबंधनातून बाहेर पडणे व एनडीएमध्ये सहभागी होण्याला प्राधान्य होते. तसे झाल्यास २०१९ च्या विरोधकांच्या मोर्चेबांधणीला सुरूंग लागणार होता. म्हणूनच नुसते नितीशना फ़ोडणे वा तेजस्वीचा राजिनामा मिळवणे, असा हेतूच नव्हता. सहाजिकच तेजस्वीने राजिनामा दिला असता, तर नितीशना एनडीएत जाण्याचा मार्ग बंद झाला असता. दुसराही एक उपाय होता. लालूंच्या सर्व मंत्र्यांनी राजिनामे देऊन बाहेरून नितीशच्या सरकारचा पाठींबा चालू ठेवला असता, तरी नितीशना एनडीएत जाण्याचा मार्ग उरला नसता. कुठूनही नितीश व जदयु यांना महागठबंधनात बंदिस्त करण्याला प्राधान्य होते. पण आपल्या कुटुंब व पुत्राच्या मंत्रीपदापेक्षा पलिकडला विचार लालूंना जमला नाही आणि राहुल-सोनिया यांना तर आपल्या दारात कोणी रांगत येण्यापेक्षा अन्य कशाचेही महत्व अधिक वाटत नाही. सहाजिकच त्यांच्यासाठी मोदी-शहा व भाजपा-नितीशनी लावलेला सापळा पुरेसा होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे युपीए वा महागठबंधनाची पात्रे काम करत गेली.

म्हणूनच बुधवार गुरूवारी जे काही नाट्य रंगलेले आहे, त्यात मोदी वा भाजपाने मोठा विजय मिळवला, असे समजण्यात अर्थ नाही. त्यांनी सापळा लावला आणि त्यात नितीश अडकले, असाही दावा करण्यात अर्थ नाही. असे सापळे आपणही आपल्या घरात उंदरासाठी लावतच असतो. पण चतुर उंदीरही त्यात सहजासहजी फ़सत नाही. अनेक उंदिर अशा सापळ्यापासून कटाक्षाने दूर रहातात. पण ज्यांना पिंजर्‍यातील किरकोळ खाऊचा मोह आवरता येत नाही, ते आयतेच पिंजर्‍यात येऊन फ़सत असतात. लालू व कॉग्रेससहीत बाकीच्या मोदी विरोधकांची तीच तर गंमत आहे. त्यांना भाजपा वा मोदींसाठी सापळा लावता येत नाहीच. पण त्यांनी लावलेल्या सापळे व पिंजर्‍यापासून स्वत:चा बचाव करण्याचीही बुद्धी शिल्लक राहिलेली नाही. राष्ट्रपती पदाच्या लढतीमध्ये नितीशनी भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्यावर प्रथम ती हरायची निवडणूक विसरून, बिहारचे महागठबंधन वाचवण्याकडे विरोधकांनी लक्ष देण्याची गरज होती. पण त्याकडे साफ़ दुर्लक्ष करून तमाम मोदी विरोधक राष्ट्रपती निवडून आणण्याच्या वल्गना करण्यात रममाण झाले. त्यांनी महागठबंधनालाच सुरूंग लावण्याचा सापळा तयार करण्याची खुली मोकळीक नितीश व मोदी-शहांना देऊन टाकली. बुधवारी त्या सापळ्याचा चाप ओढला जाईपर्यंत लालू, राहुल वा पुरोगाम्यांना ते कुठल्या सापळ्यात आपल्याच पायांनी चालत आलेले आहेत, त्याचा पत्ताही लागलेला नव्हता. अकस्मात नितीश उठून राजभवनात गेले, तेव्हाही विरोधकांना नितीश एनडीएत चाललेत याचा सुगावा लागला नव्हता. म्हणून तर लालू उठून रांचीना निघून गेले आणि मगच सुशील मोदींसह नितीश राजभवनात पुन्हा गेले. पुढला घटनाक्रम सर्वांपुढे आहे. परिणामी सिक्सर ठोकण्याचा आवेश आणणार्‍यांचा सोपा झेल गेला आणि आता धावपट्टीवर बॅट आपटण्याचा तमाशा रंगला आहे.

12 comments:

  1. तर्कशुद्ध विवेचन भाऊ....16 July 17 च्या नितिश काय करणार...या मध्ये futute forecasting आपण केलेले होतेच...

    ReplyDelete
  2. Khup ch Sundar ...Tumcha kahi divsanadhich prediction ithe khara tharla

    ReplyDelete
  3. भाउ नेहमीप्रमाणे तुमच नितीश राजीनामा देतील हे भाकित पण खर ठरल.

    ReplyDelete
  4. भाऊ तोरसेकरांचा लेख म्हणजे तत्कालीन घडामोडींच नेमक्या शब्दांतलं मार्मिक वर्णन! 👍🏻👏🏻👏🏻

    ReplyDelete
  5. उत्तम विश्लेषण!

    ReplyDelete
  6. ठग आणि पेंढार्यांनी ओलीस ठेवलेल्या असहाय माजी मित्राची सुटका करणे हे स्वतःच्या स्वार्थासह असणारे भाजपिय कर्तव्यच नव्हते काय? विरोधी पुरोगामी भलेत्यालाकुतील कारस्थान समजे ना का!!!

    ReplyDelete
  7. मस्त विस्लेषण, तीन वर्षाच्या मोदिंच्या कारकिर्दीने नितीशकुमारांचे स्वप्न उध्वस्त झाले. मोदी जिवंत आहेत तोवर फक्त मोदी हे ही त्यांच्या लक्षात आले.
    हा मोहरा कामाचा आहे हे मोदीनाही माहीत होते.
    व नितीशनी लालूचाही अनुभव घेतला तसाच सुशील मोदींचाही अनुभव घेतलेला आहे.
    भाऊ,
    थोड्याच दिवसात नितीश मोदिंच्या गोपनीय वर्तुळात असतील.
    मला तरी आनंद झाला

    ReplyDelete
  8. खरा जागता पहारा, भाउ मान लिया

    ReplyDelete
  9. उत्तम विश्लेषण ✍️👌

    ReplyDelete
  10. अगदी यथार्थ विवेचन.आपले लेख म्हणजे चालू घडामोडींचा लेखाजोखा असतो.

    ReplyDelete
  11. महागठबंधन हे खरे म्हणजे महाठगबंधन -एकसे बढकर एक ठग एकत्र आले की एकमेकांचे खिसेच कापणार ना ? याचा अचूक फायदा महाठगाने घेतला . गाठ पडली ठका ठका ,त्याचे वर्म जाणे तुका याची आठवण करून देणारी बिहारी मालिका आपल्याला दिसली

    ReplyDelete