Tuesday, June 23, 2015

ललित मोदीचा पुर्वज: डॉ धर्मा तेजा




गेला आठवडाभर आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांच्यासह मोदी सरकारला घेरण्याचे राजकारण रंगले आहे. त्यात मग लंडनमध्ये दडी मारून बसलेल्या या ललित मोदीला कोण कोण भेटले, त्याच्याशी कोणाचे काय संबंध व व्यवहार आहेत, त्याचा अखंड उहपोह चालू आहे. एखाद्या खंडत्मक रहस्यमय कादंबरीसारखे त्याचे पदर उलगडण्याची स्पर्धाच चालली आहे. पण त्यात कुणाला अशा भानगडखोर खलनायकांचा मुळपुरूष मानल्या जाणार्‍या डॉ. धर्मा तेजाचे नाव  कसे स्मरले नाही याचे नवल वाटते. प्रामुख्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे आणि लाभासाठी मदत केल्याचा आक्षेप आहे. स्वराज यांच्या पुतण्य़ाला गुणवत्ता कमी असूनही ललित मोदीने ब्रिटनच्या विद्यापिठात प्रवेश मिळवून दिल्याचा आक्षेप आहे. नेमक्या याच कारणास्तव निदान जुन्या व अभ्यासू पत्रकारांना धर्मा तेजाचे स्मरण व्हायला हवे. कारण त्यानेही असेच काही सरकारी कृपेच्या बदल्यात केल्याचा गवगवा पन्नास वर्षापुर्वी झालेला होता. तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची नातवंडे व नंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुत्रांना ब्रिटीश शिक्षण मिळण्याची सुविधा याच धर्म तेजाने करून दिल्याच्या बातम्या १९६० च्या दशकात धुमाकुळ घालत होत्या. मात्र तेव्हा आजच्यासारखी वृत्तवाहिन्यांची गर्दी व वर्दळ नसल्याने दिवसभर ब्रेकिंग न्युज होत नसत. पण जी काही माध्यमे छपाईच्या स्वरूपात तेव्हा उपलब्ध होती, त्यांची मोठी जागा कित्येक दिवस व महिने धर्म तेजाने व्यापलेली होती. आणि त्यात थेट नेहरूंवर आणि इंदिरा गांधींवर गंभीर आरोप झालेले होते. त्याच्या तुलनेत ललित मोदी हे किस झाडकी पत्ती म्हणावे, इतके नगण्य प्रकरण आहे. कारण यात नुसता औचित्याचा प्रश्न आहे. तेजा प्रकरणात संगनमताने सरकारी तिजोरी लूटण्याचा मामला होता.

१९६० च्या दशकात दिल्लीत ललित मोदी यांच्या इतकाच प्रसिद्धीलोलूप एक इसम आपल्या पत्नीसह दिल्लीत अवतीर्ण झाला. दिर्घकाळ परदेशी राहून अफ़ाट पैसा त्याने मिळवल्याचे व आता देशासाठी आपले पांग फ़ेडायला परत आला असल्याच्या दंतकथा त्याच्याबद्दल बोलल्या जायच्या. मोठमोठ्या हॉटेलात राजकीय नेते व अधिकार्‍यांना श्रीमंती मेजवान्या देण्याचा त्याने सपाटा लावला होता. त्यातून अल्पावधीत त्याची दिल्लीत खुप किर्ती पसरली आणि सत्ताधारी व उच्चभ्रूंच्या वर्तुळात डॉ. धर्मा तेजा हे नाव परवलीच शब्द झाला. फ़्रान्समध्ये भव्य प्रासाद व अनेक देशात स्वत:चे बंगले असलेला धर्मा तेजा, दिल्लीची शान मानला जाऊ लागला. त्याच्या आमंत्रणाची प्रतिष्ठीत मान्यवर प्रतिक्षा करू लागले. नेहरूंना अशा कर्तबगार व गुणी लोकांचे खुप आकर्षण होते. सहाजिकच लौकरच धर्मा तेजाची ख्याती थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचली. तेजाशी नेहरूंची जवळीक बघुन त्याचा शब्दच चलनी नाणे झाल्यास नवल नव्हते. आपण देशासाठी काही करू इच्छितो हे त्याचे शब्द नेहरूंनी उचलून धरले आणि नौकानयन क्षेत्रात त्याला पराक्रम गाजवण्याची संधी देण्याचा निर्णय झाला. परदेशात इतका यशस्वी झालेला इसम मायदेशात आपली गुणवत्ता कामाला लावतोय, तर त्यात सरकारने अडथळा करू नये, इथपर्यंत ठीक होते. पण धर्मा तेजाला भांडवलही हवे होते. हा विषय प्रशासनात फ़सला होता. कारण अनेक अधिकारी व जाणकार तेजाच्या दाव्याविषयी साशंक होते. पण नेहरूंनी मंत्रीमंडळ बैठकीतच त्यावर मोहर उठवली आणि एक कोटीच्या आसपास रक्कम त्याला सरकारने देण्याचा निर्णय झाला. एवढ्या भांडवलावर धर्मा तेजाने जो काही पराक्रम केला, त्याच्या समोर ललित मोदी फ़डतुस म्हणावा, अशी स्थिती आहे. धर्मा तेजाने पुढल्या काळात पैशापेक्षा नेहरू-इंदिरा जवळीकीचेच भांडवल करून कोट्यवधीची अफ़रातफ़र केली.

जयंती शिपींग कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून सरकारी अनुदानातून धर्मा तेजाने जपानच्या मित्सुबिशी कंपनीशी एक करार केला. हप्त्याच्या बोलीवर अनेक मालवाहू जहाजे खरेदी केली. मग त्याच जहाजांचा ताबा मिळाल्यावर इथल्या बॅन्कांकडे ती जहाजे गहाण टाकून आणखी भांडवल उभारणी केली. आणखी नव्या जहाजांची ऑर्डर दिली. देशातल्या नौकानयनाचा बादशहा होण्याचा चंग जणू त्याने बांधला होता. दरम्यान नेहरूंचे निधन झाले आणि शास्त्रीही ताश्कंद वाटाघाटीच्या दरम्यान निवर्तले. त्यांच्या जागी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या आणि तरीही धर्मा तेजाचा खेळ तसाच चालू होता. पंतप्रधान झाल्यावर प्रथमच अमेरिका भेटीला त्या गेल्या, तेव्हा तिथे त्यांची सर्व उठबस याच धर्मा तेजाने केलेली होती. थोडक्यात जो कोणी त्याच्या व्यवहार व उलाढालीची चौकशी करायचा प्रयत्न करील, त्याला गप्प करण्याची सोय त्याने करून ठेवली होती. पण म्हणून पापाला वाचा फ़ुटायचे थांबत नाही. हळूहळू त्याची पापे व देखावे उघडे पडू लागले. मित्सुबिशी कंपनीला प्रथम जाग आली. पहिले हप्ते भरून जहाजे ताब्यात घेणार्‍या धर्मा तेजाने पुढले हप्तेच भरले नव्हते. दुसरीकडे त्याच्या मालवाहू जहाजांच्या ताफ़्यावर नोकरी करणार्‍यांना अनेक महिने पगारच मिळालेले नव्हते. एक एक अशा भानगडी चव्हाट्यावर येऊ लागल्या आणि धर्मा तेजाच्या झगमगणार्‍या कर्तबगारीचे पितळ उघडे पडू लागले. त्याच सुगावा लागल्याने तो गाजावाजा होण्यापुर्वीच मायदेश सोडून फ़रारी झाला. त्याला कायदा व पोलिसांच्या तावडीतून पळून जायला कोणी कशी मदत केली, त्याच्या आरोपांनी तेव्हाच्या संसदीय कामकाजाचे कित्येक तास व्यापलेले आहेत. शेवटी त्याचा तपास करावा लागला आणि धर्मा तेजा नावाच्या भामट्याने नेहरू इंदिरा याच्याशी जवळीकीने भ्रामक चित्र उभे करून भारत सरकार व अनेकांना टोपी घातल्याचे निष्पन्न झाले.

ही झाली धर्मा तेजाची नुसती तोंडओळख. त्याच्या कथा कहाण्यांचे अनेक अध्याय आहेत. नुसता पैशाचा अपहार व अफ़रातफ़र इतकाच विषय नाही. राजकीय नेते व विविध पक्षातील राजकारण्यांसह अधिकार्‍यांना तेजाने आपल्या भामटेगिरीत कसे मोहर्‍याप्रमाणे वापरले; त्याचे तपशील थक्क करून सोडणारे आहेत. पण नेहरू व इंदिरा गांधी यांचे एकनिष्ठ मानले जाणारे तात्कालीन ज्येष्ठ पत्रकार इंदर मल्होत्राही तीन वर्षापुर्वी धर्मा तेजाविषयी लिहीताना काय म्हणतात, ते लक्षात घेण्यासारखे आहे. इतकी वर्षे उलटून गेली असताना फ़ेब्रुवारी २०१२ मध्ये रेडीफ़ या संकेत स्थळावर लिहीलेल्या लेखाची सुरूवात करताना मल्होत्रा म्हणतात, ‘मागल्या शतकाच्या सहाव्या दशकाच्या आरंभी दिल्लीत एक नजर वेधून घेणारे जोडपे अवतीर्ण झाले, डॉ धर्मा तेजा आणि त्याची "आकर्षक" देखणी पत्नी’. मल्होत्रा हे नेहरूभक्त असूनही धर्मा तेजाचा उल्लेख करताना त्याची पत्नी इतकाच उल्लेख करीत नाहीत, ही बाब लक्षणिय नाही काय? त्या काळातील अशा कित्येक दंतकथा गावगप्पा आजच्या कॉग्रेसजनांना ठाऊकही नसतील, तर माफ़ आहे. पण स्वत:ला अभ्यासू व व्यासंगी म्हणवून मिरवणार्‍या पत्रकार भाष्यकारांना इतका महत्वाचा संदर्भ ललित मोदीच्या भानगडीत आठवत नसेल, तर त्यांना स्मृतीभ्रंश झाला म्हणावा लागेल. ललित मोदीच्या भानगडीचा डंका पिटणार्‍यांना माहिती नाही काय? ललित मोदी व त्याच्यावरील आरोपांच्या कित्येक पटीने धर्मा तेजा प्रकरण गुंतागुंतीचे व अनुचित होते. सुषमा स्वराजनी ललित मोदीला किरकोळ युरोपमध्ये फ़िरायला मुभा मिळण्याची मदत केली असेल. पण धर्मा तेजा नामक भानगडीला दोनतीन पंतप्रधानांच्या कारकिर्दीत देशाला फ़सवण्यापासून कित्येक गुन्हे करून निसटण्याची मुभा देण्यापर्यंत मजल गेली होती. तेजाला इतके गुन्हे करायला व निसटायला मदत करणार्‍या देशात सुषमा स्वराज यांना औचित्याचे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कुणाला उरतो काय?

9 comments:

  1. कया बात ! आणि किती हा अभ्यास !! Hats Off भाऊ

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    एके काळी भारतातून अवघे आठ डॉलर्स (अंकात रक्कम $८.००/-) परकीय चलन बाहेर नेता येत असे. अगदी कोणाला परदेशात शिकायला जरी जायचं झालं तरी स्वत:चा पैसा रुपांतरीत करता येत नसे. त्या वेळेस राजीव गांधी आणि संजय गांधी लंडनमध्ये बसून कुणाच्या पैशावर ऐश करत होते? या अशा पैसेवाल्या चोरांच्या आणि आय एस आय च्या हस्तकांच्या जिवावरच ना? कधी कुठल्या सेक्युलर वृत्तपत्राने कधी एक ओळ तरी लिहिली आहे काय यासंबंधी?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. इथे देशच पोखरलाय ISI च्या हस्तकांनी. तिथे त्यावेळचं काय घेवून बसलायत. या सरकारची सगळीच दमछाक होतेय. आताच ढेपाळलेत.

      Delete
  3. फारच अभ्यासपूर्ण माहिती ! धन्यवाद !

    ReplyDelete
  4. Khoopach abhyas poorvak Likhan.

    ReplyDelete
  5. Rajeev and Sanjay were staying in London for their further so called further studies. Their local guardian was Dharma Teja and they stayed at his residence.
    When Lal Bahadur became PM he revued Jayanti Shipping Files and put his notations.
    Dharma Teja finally migrated to Costa Rica. This scam has been written in All the prime Ministers men authored by noted journalist Janardan Thakur.
    Suka Pandu

    ReplyDelete
  6. सुंदर माहिती, पण त्यामुळे ललित मोदी का सूट द्यायची का?

    ReplyDelete