Wednesday, June 24, 2015

सानेगुरूजींनाही नमोभक्त म्हणायचे काय?



अमळनेर गांवात आज विश्वधर्म मंडळाच्या वतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे.

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो.

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.

----------------------------------------------

   उपरोक्त उतारा पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील आहे. त्यात आजच्या सेक्युलर पत्रकारितेचे नेमके वर्णन आले आहे की नाही? गुरूजींना जाऊन आता सहा दशकांचा कालावधी लोटला आहे. मात्र त्यांच्या कथा व संस्काराची आठवण महाराष्ट्र विसरलेला नाही. पण दुर्दैव असे, की गुरुजींच्याच नावाने मळवट भरून मिरवणारे म्हणुन जे कोणी आजकाल समाजात उजळमाथ्याने वावरत असतात, त्यांनी मात्र गुरू्जींचे तेच विचार पुरते धुळीस मिळवले आहेत. आणि जर अशा सानेगुरूजी भगतगणांची नावे मी इथे सांगितली तर वाचकाला भोवळच येईल. कारण ज्यांना गुरूजी आपल्या कथेतून दंगलीत आगीचे तेल ओतणारे विघ्नसंतोषी म्हणुन दोष देत आहेत, ते बहुतांशी त्याच गुरूजींच्या परिवारातले आहेत ज्यांना सेवादलीय म्हणतात. सानेगुरुजी यांच्याच प्रेरणेने राष्ट्र सेवा दल नावाची संघटना स्वातंत्र्याच्या उदयकाली स्थापन झाली. आणि निखिल वागळे यांच्यापासून प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रताप आसबे, समर खडस अशी तमाम सेवादलीय मंडळी स्वत:वर गुरूजींचे संस्कार असल्याचा नित्यनेमाने दावा करीत असतात. पण त्यांनी कधीतरी गुरूजींची ही कथा वाचली आहे काय? किंवा त्यापासून बोध घेण्याचा प्रयास तरी केला आहे काय? असता तर त्यांनी नेमकी सानेगुरूजींना नको असलेलीच पत्रकारिता कशाला केली असती? अवघ्या देशाचे मला माहित नाही. पण आजच्या मराठी पत्रसृष्टीवर सेवादलीय लोकांचा मोठाच पगडा आहे. आणि त्यातून ज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या आग विझवणार्‍या नसून आगीत तेल ओतणार्‍या असतील याची काळजी घेतली जात असते. किंबहूना राईचा पर्वत कसा करता येईल यासाठी अहोरात्र हातात भिंग घेऊन राई शोधत असे दिवटे फ़िरत असतात, हे आपण अनुभवत असतो. आणि असे करताना आपण सानेगुरुजींच्या भावना व विचार सातत्याने पायदळी तुडवतो, याची खंतही कोणाच्या चेहर्‍यावर दिसणार नाही.

6 comments:

  1. निखिल वागळे यांच्यापासून प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रताप आसबे, समर खडस
    try to give more and more information about these people
    unnecessary these people write speak which is far far away from SATYA
    PLEASE CONTINUE
    THANKS FOR INFORMATION

    ReplyDelete
  2. साने गुरुजींचा हा लेख प्रकाशात आणल्याबद्दल आभार, पण हे वाचून सुद्धा तुम्ही जयांची नावे घेतलीत त्याना काहीच फरक पडणार नाही.

    ReplyDelete
  3. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो......... mast bhau.....Milind Revalkar

    ReplyDelete
  4. आपण नेमकेपणाने वस्तुस्थिती मांडली आहे.

    ReplyDelete
  5. Far far varshanpoorvee ek sanskrit subhashit abhyasale hote:
    Ghatm Bhindyat Patam Chhindyat kurvantu gardabharohanam
    Yen Ken prakaren prasiddho purusho Bhavet!!

    ReplyDelete
  6. मार्मिक लिखान आहे.

    ReplyDelete