Monday, June 29, 2015

धुळवड आटोपली असेल तर......



ललित मोदी नावाच्या राईची पर्वतराजी उभी करण्याची हौस फ़िटली असेल, तर आता जरा भिंग घेऊन आपण ती राई उर्फ़ मोहरी शोधायचे कष्ट घेऊया का? कारण सगळे उठून एकच आरोप करत आहेत आणि कल्लोळ करत सुटले आहेत. अमूक कोणी ललितला भेटला आणि तोही इसम त्याची मजा उठवत तमूकही मला भेटलाय, अशा गमजा करतोय. ललित मोदीला भेटण्यात वा त्याच्याशी कुठलाही व्यवहार करण्यात गुन्हा आहे, हे एकूणच या पर्वतराजीचे मोठे तत्व आहे. पण ललित मोदीला भेटण्यात गैर काय आहे आणि कशासाठी तो गुन्हा आहे, त्याचा खुलासा देण्य़ाचे कष्ट कोणीच घ्यायला तयार नाही. ललित मोदी म्हणायचे की पुढे गलका सुरू झाला. एकोणिस वर्षापुर्वी असाच एक मामला देशात खुप गाजत होता १९९६ सालच्या लोकसभा निवडणूका दार ठोठावत होत्या. तेव्हा वृत्तवाहिन्यांचे पेव फ़ुटलेले नव्हते आणि बहुतांश माध्यमे म्हणजे छपाई झालेले वर्तमानपत्र असायचे. तेव्हा अशीच एक राई माध्यमातल्या उतावळ्यांच्या हाती लागली होती आणि त्यातून एक मोठा डोंगर उभा केला गेलेला होता. पण कोणी म्हणून ती राई कुठे आहे, त्याचे उत्तर देत नव्हता. त्या राईचे नाव ‘जैन डायरी’ असे होते. कुठून तरी अशी एक डायरी सीबीआयच्या हाती आली आणि हॉंगकॉंगचा हा कुणी लोणच्याचा व्यापारी व्हीलचेअरमध्ये बसून कुणावरही आरोप करीत सुटला होता. त्याचे इतके काहूर माजवण्यात आले, की नाव त्या जैन डायरीत आहे, म्हणजे़च त्याने मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याने विनाविलंब विनाचौकशी असेल त्या पदाचा राजिनामा दिलाच पाहिजे. आणि झाले सुद्धा तसेच. काहींनी राजिनामे दिले तर काहीजणांची त्यांच्या पक्षातूनही हाकालपट्टी झालेली होती. आज कुणाला त्या जैन डायरीची आठवणही राहिलेली नाही. इतके ते प्रकरण बोगस व बिनबुडाचे सिद्ध झालेले होते.

आता त्याचे मढे उकरून काढण्याचे कारण काय? तर प्रत्येकजण उठून कुणाचा तरी राजिनामा मागतो आहे. म्हणे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राजिनाम्याचे अग्निदिव्य करायलाच हवे. आणि असे अग्निदिव्य करायचा हट्ट धरणारे होणारे नुकसान भरून देणार आहेत काय? जैन डायरीमुळे ज्यांचे राजकीय जीवन उध्वस्त झाले. त्यांना राजिनामा मागणार्‍यांनी पुन्हा मुळपदावर आणून बसवायची कुठली काळजी घेतली होती? मुद्दा असा होता, की ज्यांना राजिनामे द्यायला सार्वजनिक दबाव आणून भाग पाडण्यात आले, त्यांचा गुन्हा काय होता? जैन डायरीत त्यांची नावे होती इतकाच. त्यात भाजपाचे तेव्हाचे सर्वोच्च नेता मानले जाणारे लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांची नावे होती. कॉग्रेसचे मध्य प्रदेशातील दांडगे नेता माधवराव शिंदे यांच्यासह विद्याचरण शुक्ला, पी. शिवशंकर, बलराम जाखड यांची नावे होती. जनता दलाचे शरद यादव यांचाही त्यात समावेश होता. अशा कित्येकजणांना त्यात लाजेकाजेस्तव राजिनामे देण्याची माध्यमांनी वेळ आणली. हे हवाला प्रकरण असून त्यात अशा नेत्यांनी हवाला मार्गाने पैसे घेतल्य़ाचा गौप्यस्फ़ोट दोन पत्रकारांनी जनसत्ता या हिंदी दैनिकातून केला. मग काय वखवखलेले सनसनाटीखोर त्यावर तुटून पडले. अडवाणी तेव्हा पंतप्रधान पदाचे जणू उमेदवारच होते. पण आपल्या खासदारकीचा राजिनामा त्यांनी दिला आणि निर्दोष ठरेपर्यंत पुन्हा कुठलीच निवडणूक लढवणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. पुढे काय झाले? राजिनामे वा हाकालपट्टी झाल्यावर जैन दायरी कोपर्‍यात पडली आणि कोणीच त्याबद्दल अवाक्षर बोलेना. सीबीआयने एफ़ आय आर दाखल केले आणि तिकडे पाठ फ़िरवली. जणू लोक जैन डायरी विसरूनच गेले. बिचार्‍या अशा नेत्यांचे पुढे काय झाले असेल? सत्य समोर आले का?

ज्यांनी सत्य समोर आणायचा अट्टाहास करीत अशा नेत्यांविरोधात अहोरात्र चिखलफ़ेक केली होती, त्यांनी तिकडे पाठ फ़िरवली आणि आपल्या भवितव्याविषयी जागृत असलेल्या नेत्यांचे भविष्य काळवंडून गेले. त्यापैकी अडवाणी यांनी अखेर पुढाकार घेतला आणि आपल्यावरील आरोपांचा खटला त्वरेने चालवावा, अशी सुप्रिम कोर्टाकडे याचिका केली. त्यामुळे जी सुनावणी झाली त्यात कोर्टाने मुळात कुठलाही टिकणारा पुरावा नसल्याचा निर्वाळा दिला. तेवढेच नाही, तर अशा बाबतीत सीबीआयने तपास करताना त्यावर दक्षता आयोगाची देखरेख असावी, असेही सुचवले होते. म्हणजे़च ज्याला पुरावा म्हणून समोर आणून नेत्यांना बदनाम करण्यात आले, त्यांच्यावर सीबीआयने अन्याय केला, असाच त्याचा अर्थ झाला. पण सीबीआयने आपल्याच तपासातून हे प्रकरण उभे केलेले नव्हते. माध्यमातील काही अतिशहाण्यांनी जैन डायरी नामक काही चोपड्यात विविध नेत्यांची नावे व त्यापुढील आकडे म्हणजे त्यांना हवाला मार्फ़त दिलेली लाच असल्याचा उभा केलेला दिखावा होता. त्यात डझनभर नेत्यांचे राजकीय भवितव्य कायमचे काळवंडून गेले. अर्थात अडवाणी यांच्या पुढाकारामुळे त्याची दोन वर्षात सुनावणी तरी झाली आणि जैन डायरीचा फ़ुगा फ़ुटला. त्यातला महत्वाचा मुद्दा इतकाच, की हा निर्वाळा देताना सुप्रिम कोर्टाने कनिष्ठ कोर्टात अशा अर्थहीन डायर्‍या व कागदपत्रांना पुरावा ठरवणार्‍या न्यायदंडाधिकार्‍यावरही ताशेरे झाडले होते. ही अवस्था न्यायदंडाधिकार्‍याची असेल, तर आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे नित्यनेमाने वाहिन्यांवर न्याय-निवाडे करायला बसलेल्यांच्या शब्दाला कितीशी कायदेशीर किंमत द्यायची? त्यांची विश्वासार्हता किती मानायची? जितका जैन डायरीचा मामला उथळ व बिनबुडाचा होता, तितकाच आज फ़रारी ललित मोदीशी संपर्क ठेवण्याचे काहूर निरर्थक व अन्यायकारक आहे.

कालपरवाच इंटरपोल या जागतिक पोलिस यंत्रणेचे मागले तीन वर्षे प्रमुख असलेले रोनाल्ड नोबल यांनी अशा पोरकटपणाचे थोबाडच आपल्या मुलाखतीतून फ़ोडले आहे. रोजच्या रोज भारतीय माध्यमात कोणीही कसल्याही अफ़वा सोडून देतो आणि त्या प्रत्येक अफ़वेचे खुलासे देत बसलो, तर आम्हाला कामेच करता येणार नाहीत. ललित मोदी हा भारतातून पळालेला गुन्हेगार असेल वा खटल्यासाठी हवा असलेला आरोपी असेल, तर त्याची माहिती भारत सरकारने वा त्यांच्या कुठल्या तरी शाखेने द्यायला हवी. कोणी भारतीय परदेशात आहे, म्हणून त्याला फ़रारी म्हणता येत नाही. २०१० पासून ललित मोदी ब्रिटनमध्ये वास्तव्य करतो आहे आणि भारत सरकार त्याची मागणी इंटरपोल वा ब्रिटीश सरकारकडे करत नसेल किंवा त्याला हजर करायला कुणा कोर्टाने फ़र्मावलेले नसेल, तर तो फ़रारी गुन्हेगार कसा? असा सवाल त्याच रोनाल्ड नोबल यांनी केला आहे. मग जो गुन्हेगार नाही व स्वेच्छेने परदेशात वास्तव्य करतो आहे, अशा कुणा भारतीयाला कोणी भेटणे वा त्याच्याशी कसलाही व्यवहार करण्यात बेकायदेशीर काय असू शकते? सुषमा स्वराज किंवा वसुंधरा राजे यांच्यावर ललितशी संबंध असल्याचा आरोप करताना सरसकट फ़रारी गुन्हेगार असा आरोप करणारेच खोटारडे नाहीत काय? ज्यांच्या आरोपाचा पायाच खोटा आहे, त्यांच्या पुढल्या कहाण्या कपोलकल्पित असतात. जीवाच्या आकांताने ओरडल्याने काहीवेळ लोकांना ते खरे वाटेल. पण जैन डायरीप्रमाणे सत्य समोर आले, मग असेच लोक तोंड लपवून बिळात दडी मारतात. हे आजवर अनेकदा सिद्ध झालले आहे. अशा लोकांच्या पावित्र्याच्या नाटकासाठी किती नेत्यांनी राजिनाम्याचे अग्निदिव्य करायचे व कशासाठी? राईचा पर्वत करायला हरकत नाही, पण ज्यांना आपल्या पर्वताची इतकी खात्री आहे, त्यांनी कोर्टात एक साधी तक्रार दाखल करून राई तरी दाखवावी ना?

3 comments:

  1. Sir u r mixing two different cases ; hawala case is s k jain and lakhubhai pathak who is UK based pickle tycoon are 2 different cases .

    ReplyDelete
  2. Two different cases .

    ReplyDelete