Sunday, June 28, 2015

तण देई धन



                                                           (श्री. फ़ुकूओका सान)

 नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि प्रचार करणारी काही उच्च विद्याविभूषित विद्वान मंडळी ‘तण देई धन’चा अगदी हिरीरीने प्रचार करताना दिसून येतात. दोष असलाच तर तो दोष आहे, त्यांना मिळालेल्या शिक्षण पद्धतीचा आहे. लॉर्ड मेकॉलेने म्हटले होते, इंग्रज जातील, पण इंग्रजी जाणार नाही. आज तेच चित्र दिसत आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की नाही, हा वादाचा मुद्दा ठरेलही. पण राजकीय स्वातंत्र्य मिळाले हे नक्की! आणि त्याच बरोबर मानसिक गुलामगिरीही! या मानसिक गुलामगिरीतुनच परकीयांची भ्रष्ट नक्कल करण्याची चुरस आमच्या आजच्या तथाकथित विद्वान उच्चभ्रू समाजात विद्वत्तेचा मानदंड ठरू लागला! या दृष्टीने विचार केला गेला तर इंग्रजीला वाघीणीचे दूध म्हणणार्‍या कै. विष्णूशास्त्री चिपळूणकरांची व आपले पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेले पाहिजे असे म्हणणार्‍या पालकाची जातकुळी एकच! मानसिक गुलाम! अशी जातकुळी सांगणार्‍या मंडळींनी ‘तण देई धन’चा पुकारा लावला आहे. कारण नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करणारे, मॅगसेसे पारितोषिक विजेते जपानचे श्री. फ़ुकुओका सान यांनी तसे म्हटले आहे. विचारवंत त्यातून तो समाजवादी विचारवंत असेल तर त्याच्या हाडामासात तो परदेशी विचार भ्रष्ट स्वरूपात शंभर टक्के रुजतो आणि त्याच्या प्रचाराचे रान उठवले जाते. बरे हे विचारवंत अखेरपर्यंत आपल्या विचाराशी (?) ठाम रहातात असेही नाही. आपल्या उतारवयात त्यांना आपले आत्मचरित्र लिहीण्याची सवय पडून गेलेली असते. त्यात ते अगदी प्रांजळपणे आर्जवून लिहीतात की आपण २५-३० वर्षापुर्वी ज्या विचारांचा प्रचार करीत होतो, ते विचारच चुकीचे होते! आणि नव्या दमाचे त्यांचे अनुयायी ह्या त्यांच्या प्रामाणिकपणाचे (चुकीच्या मार्गदर्शनाचे) कौतुक करीत आपणही त्याच चुका न चुकता करतात! मी स्पष्ट लिहीतो आणि बोलतोही कारण राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण जो विचार मांडाल त्याचा बरावाईट परिणाम होतच असतो. पण त्यामुळे समाजाच्या अस्तित्वाला आव्हान नसते. पण जेव्हा तुम्ही शेती क्षेत्रामध्ये एखादा चुकीचा विचार मांडत असता तेव्हा तो फ़क्त परिणामापुरता मर्यदित रहात नाही. तर तो समाजाच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा ठरत असतो. कारण शेती क्षेत्र एकच असे क्षेत्र आहे की त्यामधून अगणित जीव सृष्टीची निर्मीती होत असते!

माझ्या पुण्याच्या परिसंवादाला असे़च एक वयोवृद्ध समाजवादी विचारवंत अध्यक्ष लाभले होते. ते अध्यक्षच होते. त्यांनी त्यांच्याच विचारसरणीच्या नाशिकच्या एका शेतकर्‍याचा त्या परिसंवादात फ़ुकूओकाचे निष्ठावंत, खंदे, पट्टशिष्य वगैरे वगैरे म्हणून परिचय करून दिला होता. परिसंवादाला दोन दोनशे रुपये भरून शेतकरी आलेले होते. त्यांनी खंदे निष्ठावंत म्हणजे काय त्याचा खुलासा करावा अशी मागणी केली. त्या पट्टशिष्यांनाच उत्तरे देण्यास सांगितले गेले. प्रश्नांचा भडीमार होत होता. ते पट्टशिष्य उपहास झेलत झेलत उत्तरे देत होते. अगदी प्रामाणिकपणे! किळसवाणा प्रामाणिकपणा की कींव आणणारा प्रामाणिकपणा; निश्चित सांगता येणार नाही. पण प्रामाणिकपणा होता एवढे मात्र निश्चित! त्यांच्या म्हणण्याचा सारांश...... त्यांनी ‘तण देई धन’चा आदेश शब्दश: मानला होता व पाळलाही होता. तण काढले नव्हते. साठ किलो गहू पेरले होते, सहा किलो उत्पादन झाले होते! असाच अनुभव नेरे (पनवेल) जवळ असलेल्या कुष्ट सेवाश्रम येथे भातशेतीमध्ये आला. ते तर ‘तण देई धन’ या विचारांचा अत्यंत तिरस्कारणिय भाषेत उल्लेख करीत होते. बलसाड (गुजरात) भागात या ‘तण देई धन’च्या भ्रष्ट अनुकरणाने आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, होत आहे!

श्री.  फ़ुकूओका सान यांनी सांगितले आहे, ‘तण देई धन’ हे बरोबर आहे. पण केव्हा? कसे? पद्धती कोणती? हरळीसारख्या वाढणार्‍या ‘क्राब ग्रास’नी फ़ुकूओका यांनाही डोकेदुखी करून ठेवली होती. पण हे सारे बाजूला ठेवून आपले उच्च विद्याविभूषित नैसर्गिक शेतीतज्ञ बेधडक सांगू लागले, ‘तण देई धन’! ध चा मा करणार्‍या अशा लेखणी बहाद्दरांनी ‘ने’ चा केला ‘दे’.

श्री फ़ुकूओका सान एका कांडातून क्रांती म्हणत असताना ती कृतीत आणत असताना जी विशिष्ट पद्धत वापरत ती पद्धती न वापरता, तण न काढता पीक येते, असे सांगणे म्हणजे एखाद्या विचारांची भ्रष्ट नक्कल करून तो विचारच मारून टाकणे होय. श्री. फ़ुकूओका सान भात पेरतात आठ दहा दिवस पेरत पाणी ठेवतात. भाताची रोपे आली की पाणी काढून घेतात. त्या सर्व वाफ़्यामध्ये काडीकचरा पसरून देतात. त्यामुळे तण उठत नाही. उठले तरी निर्जीव उठते. नंतर भात कापणीच्या वेळी अगोदर १५-२० दिवस त्या उभ्या भातामध्ये गहू विखरून पेरून देतात. १५ दिवसांनी भात कापून घेतात व त्याच भाताचा पेंढा नंतर गव्हाच्या शेतामध्ये पसरून टाकतात. आधीच निर्जीव उठले तण मरून तरी जाते किंवा अच्छादनाखाली झाकले तरी जाते. अशा रितीचा ‘तण देई धन’चा श्री. फ़ुकूओका सान यांचा प्रयोग आहे. सांगितला जातो का हा प्रयोग? पाणी देण्यासाठी मग कोणती पद्धत वापरणार? एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. शोधलीत का ही उत्तरे? केलाय का कोणी प्रयोग? नाही, शक्यच नाही! कारण आम्हाला हवा असतो कृष्ण, तोही राधेबरोबरचा! राधाकृष्ण राधाकृष्ण म्हणत टाळ कुटायला! कुणाला हवा असतो तो आराधना कृष्ण? कारण त्यासाठी लागते साधना आणि परिश्रम! पण श्रमाचीच किंमत ज्यांनी नष्ट केली आहे तेच आज भ्रष्ट नक्कल करण्यात आघाडीवर आहेत. आपले मार्गदर्शक आहेत. तणांचा उपयोग आच्छादनासाठी केला तर नक्कीच ‘तण देई धन’ हे बरोबर म्हणता येईल. आणि याचा उपयोग आम्ही परंपरेने करतच आलेलो आहोत. हिरवळीचे खत हा त्यातलाच प्रकार आहे. मिश्र पिक ही त्याचीच सुधारित पुढची पायरी आहे. पुर्वापार चालत आलेल्या पद्धतीमध्ये थोडीफ़ार भर घालून शेतकर्‍यांना सांगता आले असते, शेतकर्‍यांना ते पटलेही असते! पण आपण चार देश हिंडून आलो तेच मुळी नविन विचार देण्यासाठी; या विचाराने भारावलेले विचारवंत मार्गदर्शक ठरवायचे असतील, तर त्यांना ‘नविन ज्ञान’ लोकांपर्यंत नको का पोहोचवायला?

[मोहन शंकर देशपांडे यांच्या ‘ॠषी-कृषि तंत्रज्ञान’ नामक पुस्तकातला हा उतारा आहे. वास्तविक त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. पण योगायोगाने त्यात काही उल्लेख राजकीय उतावळेपणाशी संबंधित आहेत. अर्धवट अक्कल व ज्ञानाने कसे भयंकर नुकसान होऊ शकते आणि ते कोण करतात, त्याचा हा अजब दाखला सापडला. माध्यमातल्या काही मोजक्या पुरोगामी संपादकांपासून ज्येष्ठ विचारवंत म्हणून पेश केल्या जाणार्‍या पुस्तकपंडितांचे चेहरे डोळ्यासमोर आणले तर देशपांडे कोणाचा संदर्भ देत आहेत त्याचा खुलासा होऊ शकेल. क्षेत्र शेतीचे असो किंवा सामाजिक राजकीय परिवर्तनाचे असो, त्यात अर्धवटरावांनी घुसखोरी केली म्हणजे किती दिर्घकालीन नुकसान होऊ शकते, त्याचा दाखला म्हणून एक नमूना इथे पेश केला.] (श्री समर्थ शेती संशोधन केंद्र, मुक्काम खेडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने उपरोक्त पुस्तक जानेवारी १९९६ मध्ये प्रकाशित झालेले आहे.)

ताजा कलम:-
पुढल्या काळात ह्याचा संदर्भ अनेकदा देता येईल म्हणून आता कुठलेच भाष्य केलेले नाही.

2 comments:

  1. भाऊराव,

    एक संदर्भ अगदी डोळ्यासमोर दिसतोय.

    मुसलमान हे भारतातील सामाजिक तण आहे. त्याला सवलतींचे खत घातले तर हेच तण धन देईल अशी भारतीय जनतेची सेक्युलरी लोकांनी समजूत करून दिली आहे. मात्र जनता हळूहळू शहाणी होतेय. तिला व्यवस्थित कळतं कोण कसा आहे ते. कुठल्यातरी भंपक सिद्धांताच्या आधारे भारत तोडून उरावर पाकिस्तान बसवला आणि तण फोफावलं. प्रत्युत्तर म्हणून पीक वाढवून माजलेल्या तणाला फस्त केलंच पाहिजे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete