Sunday, December 27, 2015

भारतातले ‘पाकमित्र’ अस्वस्थ कशाला?

modi in lahore के लिए इमेज परिणाम

दोन महिन्यांपुर्वी मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फ़ासण्यावरून वादळ उठले होते. कारण त्यांनी पाकिस्तानचे एक ज्येष्ठ नेता खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते. त्यावेळी आपला चेहरा साफ़ करण्यापेक्षा कुलकर्णी काळ्या तोंडानेच टिव्हीच्या कॅमेरासमोर मिरवले होते. मग दोनतीन आठवड्यांनी कुलकर्णी यांनी त्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणखी एक कार्यक्रम थेट पाकिस्तानात योजला होता. त्यात पाकचे माजी लष्करप्रमुख व लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ सहभागी झाले होते. त्यांच्याच मांडीला मांडी लावून भारताचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर बसलेले होते. अय्यर हे कोणी सामान्य असामी नाही. भारतीय प्रशासन सेवेत दिर्घकाळ काम केल्यावर राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत ते नोकरी सोडून राजकारणात आले. राजीव गांधी यांची भाषणे लिहून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या कॉग्रेसमध्ये ज्येष्ठ विचारवंत म्हणून त्यांना सन्मान दिला जातो. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनापासून द्वेष करण्यासाठीच त्यांची ख्याती आहे. म्हणूनच लोकसभा निवडणूकीपुर्वी ‘चायवाला देश का पंतप्रधान नही हो सकता’ अशी ग्वाही त्यांनी दिलेली होती. अशा अय्यर यांनी दिड महिन्यापुर्वी भारत-पाक यांच्यात संवाद साधण्याचा सोपा व नेमका उपाय जगापुढे मांडला होता. दोन देशात मैत्रीपुर्ण संवाद व्हायला हवा असेल, तर नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधान पदावरून हटवायला हवे आणि कॉग्रेसला पुन्हा सत्तेत आणायला हवे, असे आवाहन अय्यर यांनी पाकिस्तानी भूमीत उभे राहून केले होते. त्यांच्या अशा बुद्धीमान मतप्रदर्शनाने मुशर्रफ़ यांच्यासारखा जिहादी मानसितेचा पाक नेताही गडबडून गेला होता. पण कॉग्रेसश्रेष्ठी वा सोनिया-राहुल गांधींना यात काही वावगे वाटले नव्हते. हा संदर्भ सोडून मोदींच्या लाहोर भेटीकडे बघणे शक्य आहे काय?

मोदी यांनी रशियाहून माघारी येताना अकस्मात पाकिस्तानला धावती भेट दिली, त्यानंतरच्या कॉग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया अय्यर यांच्या विधानाशी जोडून बघणे म्हणूनच भाग आहे. मोदी असेपर्यत भारत-पाक मैत्री होऊ शकत नाही, की दोन देशात संवादही होऊ शकत नाही अशी त्यांना खात्री होती. मग तसा संवाद झाल्यास कॉग्रेसला ते पचेल कसे? त्यांना पोटदुखी होणेच अपरिहार्य नाही काय? ही अर्थात यातली एक बाजू आहे. अय्यर यांची कॉग्रेसचे विचारवंत नेते इतकीच ओळख नाही. त्यांची एक पाकिस्तानी ओळखही आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या आशीर्वादाने स्थापन झालेली व चालणारी एक संस्था आहे, ‘रिजनल पीस इन्स्टीट्युट’! याच संस्थेचे बहुतेक संचालक पाक गुप्तचर संस्थेचे माजी मुख्याधिकारी आहेत. त्याला दोन अपवाद आहेत. एक चिनी व दुसरा भारतीय! त्यातला भारतीय मणिशंकर अय्यर होत. थोडक्यात अय्यर यांची भारत-पाक मैत्री ही पाक हेरखात्याच्या इच्छेनुसार ठरत असते असा सरळ निष्कर्ष आपण काढू शकतो. असा माणूस कॉग्रेसचा विचारवंत असेल, तर त्याची व त्याच्या पक्षाची पाकविषयक निती भारताला हितकारक असण्यापेक्षा पाकधार्जिणी असल्यास नवल नाही. मग कॉग्रेसचे वा त्या पक्षाचे सरकार पाकच्या इच्छेनुसार चालत असेल, तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे काय? मात्र मोदी वा त्यांचे सरकार आणि त्याचे धोरण पाक हेरखात्याच्या आदेशानुसार चालणार नाही. म्हणूनच मोदींविषयी पाक हेरखात्याला पोटदुखी असणे स्वाभाविक आहे. त्याच्याच परिणामी अय्यर आणि त्यांच्या कॉग्रेस पक्षाला पाक हेरखात्याच्या इच्छेबाहेर जाणारी पाकनिती वा धोरण नावडणेही स्वाभाविक नाही काय? त्यांना गाफ़ील ठेवून शरीफ़ मोदींना भेटले वा मोदी पाकिस्तानला सदिच्छा भेट द्यायला गेले, तर अय्यरसह अवघी कॉग्रेस विचलीत होणारच ना?

रशियाहून माघारी येताना मोदी अकस्मात लाहोर येथे विमानाने उतरले आणि त्याची कानोकान खबर पाक हेरखात्याला मिळू शकली नसेल, तर त्या हेरखात्याला संताप येणे योग्यच आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या भारतातील हस्तकांच्या कंबरड्यात लाथा घातल्या, तर तेही योग्यच नाही काय? भारतात राहून पाकहिताचे काम करणार्‍यांनी जी खबर खुप आधीच आपल्या पाकिस्तानी धन्याला द्यायची असते, त्यात गफ़लत झाली तर धन्याने लाथा घालायलाच हव्यात ना? भारत-पाक यांच्यातली बोलणी, वाटाघाटी वा मैत्री, शत्रूत्व हे ठरवण्याची वा बिघडवण्याची कामगिरी दोन्हीकडल्या हेरखात्यांकडून होत असते. आपापल्या रणनितीनुसार दोन्हीकडली हेरखाती हितसंबंध जपून त्याला हातभार लावतात किंवा त्यात विघ्न निर्माण करतात. त्यात मग दुसर्‍याच्या प्रदेशातील आपले हस्तक कामाला लावले जात असतात. हे हस्तक मायदेशी राहून शत्रूदेशाचे हित जपत असतात आणि त्याला पुरक ठरतील अशी दिशा घटनाक्रमाला मिळावी यासाठी झटत असतात. अशा हस्तकांचे पहिले वा प्रमुख काम धन्याला मायदेशातील बारीकसारीक हालचालींची पुर्वसूचना देण्याचे असते. थोडक्यात कुठल्याही कारणास्तव भारताचा मंत्री अधिकारी वा पंतप्रधान पाक संबंधात काय करतो आहे, करू बघतो आहे, त्याची माहिती मिळवून पाक हेरखात्याला पुरवणे, हेच अशा ‘पाकमित्रांचे’ वास्तविक काम असते. रशिया भेटीला मोदी जाणार आणि तिथून माघारी येताना अफ़गाणिस्तानला धावती भेट देणार, हे जगजाहिर झालेले होते. पण पाकिस्तानला दोन तासाची भेट देणार आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही त्यांचे व्यक्तीगत स्वागत करून भेटणार, याचा थांगपत्ता इथल्या ‘पाकमित्रांना’ लागला नसेल, तर ती त्यांची कामातली त्रुटी नाही काय? बरखा दत्त वा अय्यर इत्यादिकांचे काम काय? त्यांना मोदी-नवाज भेटीची खबर असायला नको का? ती त्यांनी धन्याला द्यायला नको काय?

दिडदोन तास आधी अशी खबर जगाकडून पाक हेरखात्याला मिळाली आणि त्यांनी पोसलेल्या भारतातील हस्तकांकडून मिळू शकलेली नसेल, तर अशा हस्तकांचा पाक हेरखात्याला उपयोगच काय? मोदीना हटवल्याशिवाय भारत पाक बोलणी होऊ शकत नाहीत. अशी ग्वाही अय्यर देतात आणि दीड महिन्यात दोन्ही देशाचे पंतप्रधान थेट घरगुती समारंभालाही एकत्र येऊ शकतात? याचा अर्थ काय होतो? संस्थेचा संचालक करूनही अय्यर वा त्यांचे बरखा, पाडगावकर यांच्यासारखे सहकारी निकामी ठरतात ना? मोदी लाहोरला गेले यामागची पोटदुखी, याच संदर्भात समजून घेणे भाग आहे. दोन पंतप्रधान भेटून नेमके काय बोलले वा त्यात काय शिजले, यापेक्षा त्यांनी परस्पर भेट ठरवून पार पाडल्याचे दुखणे मोठे आहे. मोदीच नव्हेतर शरीफ़ यांच्याही गोटातून याविषयी संपुर्ण गोपनीयता पाळली गेली, हे दुखणे आहे. त्यात नाक खुपसून विचका करणे वा त्यावर प्रभाव पाडण्याची कुठलीही संधी तथाकथित पाकमित्रांना मिळाली नाही, हे रडगाणे आहे. थेट मुशर्रफ़, शरीफ़ यांच्याशी गुजगोष्टी करणार्‍या बरखा दत्त, अय्यर वा पाडगावकर यांना अंधारात ठेवून शरीफ़ यांनी मोदींशी संपर्क साधला आणि भेटगाठही झाली, ही वेदना आहे. पाक गुप्तहेरांना त्याचा आधीच सुगावा लागला नाही, हीच कॉग्रेसची वा इथल्या पाकमित्रांची खरी पोटदुखी नाही काय? दोन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार बॅन्कॉक येथे भेटल्यावर बातमी बाहेर आली. दोन दिवस आधी ठरले आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादला पोहोचल्या. दोन तास आधी जाहिर झाले आणि मोदी लाहोरला पोहोचलेही. दुखणे आहे ते पाक गुप्तचर संस्थेला त्यांच्या खबर्‍यांकडून याचा आधी सुगावा लागला नाही, त्याचे! म्हणूनच मोदींच्या लाहोर भेटीने अस्वस्थ झालेले आणि वेदप्रकाश वैदिकला घेऊन पाकिस्तानला सव्वा वर्षापुर्वी गेलेले, कसुरीच्या प्रकाशनातले चेहरे तपासून बघायला हवे. तरच कोण कशासाठी रडकुंडीला आलाय, त्याचा उलगडा होऊ शकेल.

4 comments:

  1. Bbhau,he Khare vishleshan.nahitari futka Mani kahi kamacha ahe ase watle nahi yapoorvi kadhi. Swatantryaveer savarkaranvishyee ' Mafia magun shiksha radda karnara gunhegar itkya khalchya patliwar Jain teeka karnara ha ****** kay laykeecha ahe te duniya jante.

    ReplyDelete
  2. the cartoon has one serious issue: gives an impression that the lady is bjp chief. please rectify :)

    ReplyDelete
  3. मस्त भाऊ पण या देशबुडवणारे लोकांना जनता निवडुन देते याचे विषेश वाटते जनता वेडी आहे व मिडीया बिकाऊ?

    ReplyDelete